Monday, December 30, 2013

"मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"

नवीन वर्षाची पूर्वसंध्या .  नियोजन ,संकल्प,परामर्श आणि आत्मचिंतन अश्या हिंदोळ्यावर मनातील विचार आणि त्याला पूरक स्वसंवाद सुरु असणारी कातरवेळ . आणि त्याच वेळी …  " फार झाले, मी आता माझ्या पुरते पाहणार आहे ! " असे वाक्य त्या दोघांच्या संवादातून कानावर पडले, आणि मन अनेक वर्षे मागे गेले.
त्यावेळी मी शिक्षणा साठी घरापासून दूर मामाकडे तालुक्याच्या ठिकाणी राहत असे. तेंव्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी नक्की काय करावे हेच सुचत नसले कि, मी माझ्या एका मित्राच्या घरी जावून बसत असे.  खरे तर दारी जावून बसत असे. मी असे का म्हणतोय हे सांगण्यासाठी प्रथम मी त्या घराची रचना आणि स्थल वैशिष्ठ्य सांगणे जरुरीचे आहे. 

माझ्या मित्राचे घर तसे छोट्या गल्लीत ( बोळात ) होते घराचा मुख्य दरवाजा त्या गल्लीत उघडणारा होता. दारातून आत आले कि थोडी मोकळी जागा आणि लगेच तीन पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवर बसले कि दारासमोरील रस्ता दिसत असे. तो रस्ता  एकावेळी दोन किंवा तीन माणसे समांतर चालू शकतील इतकाच रुंद होता आणि दारासमोर मोठी भिंत असल्याने समोरील वर्दळ पायी जाणाऱ्यांची असे.

ती गल्ली जरी अरुंद असली तरी त्या तालुक्याच्या बस स्थानकाकडून गावाच्या मध्यवर्ती बाजारपेठे कडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने सतत ये जा सुरु असे.
त्या गल्लीतून जाणाऱ्या येणाऱ्यास, त्या भिंतीला समांतर चालताना बरोबर असणाऱ्या व्यक्तीशी चाललेला संवाद कोणाच्या कानी सहज पडत असेल  याचे भान नसे, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मनमोकळेपणा असे. त्यामुळे माझ्या मित्राच्या घरात थोड्याश्या आतल्या बाजूस पायरीवर बसले कि ,अश्या संवादाचे छोटे छोटे तुकडे सहजच कानी पडत आणि मग वेळ इतका छान जात असे  कि जणू काही आपण नाट्य छटाच ऐकतो आहोत. 
सगळा मिळून सवांद दीड ते दोन मिनिटां पुरताच एकू येत असे, पण त्यातील विविधता, सुख दुख वाटून घेण्याची तळमळ, राग लोभ हेवे दावे परस्पर मदतीची इच्छा अशी विविध रूपे समोर येत असत. 
आज त्या संवादाचा परामर्श घेतला तर जो कोणी अगदी पोट तिडकीने बोलत असेल तो आपल्या वागण्याचे समर्थन करताना मी,  मला , माझे या 'म ' च्या बाराखडीतच फिरत असे. 
" मी त्याला पैसे दिले पण त्याने जाण  ठेवली नाही "
" मी त्याला धोक्याची सूचना दिली होती पण त्याने ऐकले  नाही"
" मला विचारून त्याने लग्न केले नाही, आता माझी आठवण झाली?"
" मला सांगून त्याने व्यवसायात उडी घेतली नाही मग आता अडचणीत  आलास तर भोग आपल्या कर्माची फळे "
" माझे एकले असते तर आज त्याच्यावर हि वेळ आली नसती "
या संवादात कोणी बबन,  कोणी बाळू, कोणी काका, कुठली आत्या, किंवा कधी एखादा रावसाहेब किंवा एखादा पंत पाटील असा शेजारी, गावकरी असे. 
त्यांच्या संवादाचे दीड दोन मिनिटाचे साक्षीदार या पलीकडे तेंव्हा काहीच गम्य नसे 
पण त्यावेळी वरील संवादातील विविध नाते संबंधात बरेचदा ऐकलेले वाक्य होते, ते म्हणजे-  " फार झाले,मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"
आणि आज जवळजवळ तीस वर्षांनतर पुन्हा - " फार झाले,मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !" हे  वाक्य जसेच्या तसे कानावर आले आणि मन इतिहासात गेले. आणि गेल्या तीस वर्षात काहीच बदलेले नाही असेच वाटले. 
मग मनाशी विचार केला खरेच येवू घातलेल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने हीच "म" ची बाराखडी आपण बदलू शकू का? 

जर वरील विविध संवादाचा एक भाग म्हणून…  मी असेन तर … 

" तो तसा वागला म्हणून मी पण तसेच वागले पाहिजे का ?"

" लग्नाला बोलवले नाही असेल काही अडचण,त्यावेळी  मलाच  समजून घेता आले नाही"

"त्याची व्यवसायिक अडचण परिस्थितून आलेली आहे माझे कर्तव्य आहे त्याला आधार देण्याची "

असे  मी वागू शकेन का ? मला असा बदल स्वतः मध्ये करता येईल का?माझे वागणे देखील चुकू शकते ? असा विचार मी करीन का ?

या स्वसंवादाने मला अंतर्मुख केले आणि माझे मन मलाच म्हणाले जर तू सकारात्मक विचारच करणार नसशील तर आता मीच म्हणेन … 

" फार झाले,मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"

Sunday, October 6, 2013

रिती ओंजळ !

झुळूक वाऱ्याची दुरुनी  अलवार आली
मनातील आठवणींची  तार झंकारली

जरी भेटलो होतो नुकताच तिला मी
वाटत राहते  जणू युगे युगेच लोटली

आज स्वप्नात येत तिने जागविले
डोळ्याची कड होती ओथंबली

वाटले वाट पाहील त्याच वळणावरी
म्हणुनी पावले आपोआप वळाली

पाठमोरी सहजच  जाता पुढे ती
माळलेला गजरा ओघळून गेली

परिमल त्या सुकलेल्या बकुळीचा
मनीचा परिसर गंधाळून गेली

कधी  गुंतलो कसे गुंफलो
या कोड्यातच मने आक्रंदली

तिचे घेवूनी  दान सर्वस्वाचे
ओंजळ माझी रितीच  राहिली

Sunday, June 16, 2013

पितयापरी त्वां सांभाळिले ।

आजच्या रविवारी सकाळी नेहमीच कानावर पडणारे आणि बरेचदा म्हटले जाणारे व्यंकटेश स्तोत्र ऐकत होतो. पण एका ओळीवर मन एकदम अंतर्मुख झाले. कारण त्या ओळी होत्या -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
अनेक वर्ष नियमित म्हटले जाणारे स्तोत्र आणि त्यातील हे सुमधुर कडवे आज मला एक वेगळाच अर्थ समजावून सांगत होते.अर्थात या अंतर्मुखते मागे दोन घटनांची एकत्र गुंफण झाली होती. आज पितृ दिन जो निम्म्यापेक्षा अधिक जगात वडिलांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तो आजचा रविवार आणि आजची तिथी हि माझ्या आईची प्रथम पुण्यतिथी.
नक्की काय बोलावे ? कसे व्यक्त व्हावे काहीच सुचतच नाही. कारण तसे पितृ छत्र वयाच्या चौदाव्या वर्षी हरपले. आणि वयाच्या नवव्या वर्षापासून शिक्षणाकरिता घरापासून दूर रहावे लागल्यामुळे वडिलांचा सहवास कमी काळ लाभला. अल्प आजाराने त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अकस्मात निधन झाले.पण बालपणातील ज्या काही थोड्या धूसर काळाच्या पडद्याआड वडिलांच्या रेंगाळणाऱ्या आठवणी आहेत, त्यातील सर्वात महत्वाची आठवण म्हणजे," स्वाभिमानाने जगा ! " हा त्यांनी कृतीतून दिलेला संदेश. आणि जीवापाड केलेले प्रेम. अर्थात त्यावेळी लहान वयामुळे त्या कृती मागील भावना अर्थ हे तेंव्हा नक्कीच उमजले नाहीत पण आजच्या पितृदिनी त्या आठवणींनी मन सदगतीत नक्कीच होत आहे.
सन १९६८/६९ च्या दरम्यान वडिलांची नोकरी गेली आणि आमच्या घराची अवस्था व्यंकटेश स्तोत्रातील 'अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा ' यासारखी झाली. पण मला आठवतेय कि परिस्थीची खंत न बाळगता कष्टाने पण स्वाभिमानाने जगावे याचा पहिला धडा त्यांनी कृतीतून आम्हाला दिला. कोल्हापूर आणि रंकाळा यांचे नाते अतूट आहे. पण आमच्या आठवणीतील रंकाळा हा जेंव्हा शालिनी पॅलेस हे हॉटेल झाले नव्हते आणि रंकाळ्याचा काठ गावाबाहेर मोकळी हवा खाण्यासाठी फिरावयास जाण्याचे ठिकाण होते तो काळ. त्यावेळी 'रंकाळा चौपाटी' अस्तित्वात आलेली नव्हती पण हे ठिकाण एक दिवस नक्कीच चौपाटी होणार याची मनात खात्री होती बाबांच्या मनात पक्की खात्री होती. कारण तेथे फिरावयास येणाऱ्या लोकांना चिवडा पाकीट विकण्याचा पहिला प्रयोग माहे मे १९६८ मध्ये माझ्या बाबांनी केला.
त्या अर्थार्जनाचे प्रयोगास मी सक्रीय मदत केल्याचे मला आजही आठवते.इतकेच काय पण रु३.५०चे चिवडा सामान पोहे,शेगदाणे,खोबरे, तेल व छोट्या प्लास्टिक पिशव्या आणयचे मग आई त्याचा चिवडा बनवून देत असे. तर बाबा त्याची ५० पाकिटे तयार करीत असत. मग ती पाकिटे घेवून सायंकाळी ४.००ते ७.३० या वेळेत ती मी रंकाळ्यावर फिरावयास येणाऱ्या मंडळींना ती विकत असे. पन्नासावे पाकीट विकले गेले कि कोण आनंद होत असे मग ते ५.०० रुपये घेवून घरी गेले कि, त्यातून रु.३.५०चे चिवडा सामान व रु. १.५०चे किराणा सामान आणून त्या दिवशीची चूल पेटत असे.पण हे करताना कधी लाज बाळगण्याचे कारण नाही, आपण मिळवत आहे तो पैसा कष्ट करून मिळवत आहोत हे बाबांचे सांगणे असे. मला आठवते आहे कि, प्रथम हा धाडसी वाटलेला बाबांचा विचार पुढे किमान सहा महिने घर चालवण्यास उपयोगी ठरला.
प्रथम हा प्रयोग करताना परिचित नातेवाईक यांनी केलेली थट्टा आजही आठवते,पण आज “ रंकाळा चौपाटी”चे बदलते रूप पहिले तर मला मात्र बाबांची दूर दृष्टीच जाणवते. या चिवडा विक्रीतील एक किस्सा मला आजही आठवतो माझा थोरला भाऊ शेखर यास हा उद्योग फारसा आवडत नसे त्यामुळे तो स्वतः चिवडा विक्रीस जाण्यास राजी नसे. एके दिवशी बाबांनी थोडेसे सक्त्तीनेच माझ्या ऐवजी भावास चिवडा विक्रीस पाठवले.
तर तो गेला पण तासाभरातच परत आला आल्यावर घरी सर्वच आश्चर्य चकित झाले व त्यास विचारले अरे वा तू तर लवकर काम संपवलेस किती पाकिटे संपली? तर तो म्हणाला एक! आणि त्याचे पैसे कुठायत विचारल्यावर तो म्हणाला एक पाकीट पेरुवाल्यास दिले आणि आणि त्याचे कडून पेरू घेतला आणि तो खाल्ला. त्यानंतर बाबांनी कधी त्याला चिवडा विक्रीस पाठवले नाही.
खरे तर मला अण्णांचा सहवास तसा अल्पच लाभला. मी दहावीत गेलो आणि अण्णा गेले म्हणजे मी जेम तेम १४ वर्षांचा होतो आणि त्या चवदा वर्षांपैकी अखेरची पाच वर्षे मी त्यांचे पासून दूर मामाकडेच काढली. कारण मी चवथीपर्यंत घरीच असल्याने पहिली, भगवंताचे मंदिर- बार्शी, दुसरी ते चौथी, भक्ती सेवा विद्यापीठ - कोल्हापूर या ठिकाणी शिकलो.आणि त्यामुळेच माझ्या वडिलांबाबतच्या आठवणी तश्या थोड्या धूसरच आहेत पण त्या आठवणींचा चलचित्रपट आणि माझ्या मध्ये एक अदृश्य असा धुक्याचा पडदा आहे. कधी कधी एखादीच आठवणींची झुळूक येते आणि तो पडदा क्षणभरासाठी दूर होतो आणि अण्णा येवून समोर उभे राहिलेत असे वाटून तो काळ मी आजही पुन्हा एकदा तसाच अनुभवतो.
त्यामुळे जगाने जसे माझ्या बाबांना कधी ओळखले नाही तसे, जगास असे वाटते कि आम्हा मुलांना आमचे बाबा आठवतच नाहीत. पण त्याचा दोष मी माझ्या बाबांच्या आसपास वावरणाऱ्या परिचितांना देणार नाही कारण त्यांनी पहिले ते त्यांचे बाह्य रूप.अर्थात जवळचे नातेवाईक सुद्धा बाबांच्या वागणुकीवरून त्यांना तापट , हट्टी, दुराग्रही, हेकेखोर, तऱ्हेवाईक इतकेच काय पण माथेफिरू, वेडसर, मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावून मोकळे होत.
या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले
.
जसा जसा काळ मागे पडू लागला तसे तसे ज्या माझ्या वडिलांना इतकी विशेषणे न मागताच मिळाली ते माझे बाबा खरेच कसे होते याचा मला वरचेवर प्रश्न पडू लागला. कारण माझ्या आठवणीतील बाबा हे त्यांना मिळालेल्या कोणत्याच विशेषणात बसत नाहीत असा माझा पक्का समज होता पण न कळते वय आणि मन मोकळे करावे असे कोणी मैत्र नाही त्यामुळे माझे बाबा हे फक्त माझेच राहिले. त्यांचे मला भावलेले रूप इतके दिवस माझ्यापाशीच राहिले.
पुढे मी माझी पुण्यातील नोकरी संपवून चाकोरीतून बाहेर पडण्याचे ठरवले तेंव्हा मला बँकेतील मनेजर पद, भविष्यात बढती, पत्नी उच्च विद्या विभूषित, स्वतःचे चार खोल्यांचे अपार्टमेंट असताना हे स्थैर्य सोडून अनोळखी ठिकाणी जावून पुन्हा एकदा नवा डाव कशासाठी मांडायचा? असा प्रश्न केला ? फक्त हाच प्रश्न विचारून जर माझे हितचिंतक थांबले असते तरी ठीक होते. पण,का तू हि वडिलांसारखा वेडेपणा करायचे नक्की केले आहेस ? असा प्रश्न केला. आणि या प्रश्नाने मला खरोखर अंतर्मुख केले आणि ते मी वडिलांसारखा वेडेपणा करतोय का ? या विचारलेल्या प्रश्ना मुळे नाही तर माझे वडील या जगाला समजलेच नाहीत या दुःखाने.
पण त्यांनी आमच्या वर केलेली माया म्हणजेच वर नमूद केलेल्या श्लोकातीतील पुर्वाध होता तो म्हणजे -
जननीपरि त्वा पाळिले । वडील असून आईची माया दिली आणि जगण्यासाठी स्वाभिमानाचा मंत्र दिला.
आजही मित्रमंडळ, नातेवाईक किंवा परिचित यांची गप्पांची बैठक जमते आणि चर्चा वडिलार्जित मिळकत त्यामुळे होणारे वितंडवाद यावर येते तेंव्हा अतिशय अभिमन्ने मी नेहमीच सांगतो कि आमच्या वडिलांनी आमच्या साठी काय केले तर एक पैशाचे कर्ज अथवा उधार उसनवारीचे ओझे त्यांनी आमच्या शिरावर ठेवले नाही .आणि तोच आमचा सर्वात मोठा ठेवा आहे.
आता आज पितृ दिन असताना वडिलांच्या बरोबरीने आईच्या आठवण येण्यामागे, आज तिची प्रथम पुण्यतिथी इतकेच कारण नाही तर, वडिलांचे त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या आकस्मिक निधन झाल्यावर, पदरात असलेली तीन मुले संभालण्यासाठी तिने जे काही कष्ट घेतले होते त्याची किंमत शब्दात सांगता येणे कठीण आहे.
वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी वैधव्य पदरात पंधरा ते सहा वयोगटातील तीन मुले या परीस्थितीत तिने लेथ मशीनवर मशिनीस्ट म्हणून कष्टाची नोकरी स्वीकारून आम्हा तीन भावंडाना वाढवले. त्याकाळी आठ बाय दहाच्या चाळीतील खोली हेच आमचे विसाव्याचे ठिकाण होते. घरच्या गरिबीत नातेवाईक येत नसत, पुढे परिस्थिती सुधारल्यावर जेंव्हा नातेवाईकांपैकी कोणाकडून जेंव्हा पहिली साडी आईला घेतली गेली तेंव्हा आई म्हणाली होती कि," हा सन्मान माझा नसून सुधारलेल्या परिस्थितीचा आहे."
आणि पैशाशिवाय जगात किंमत नसली तरी, तो मिळवताना कधीही गैरमार्गाचा वापर करू नका, हे तिचे सांगणे होते. तिचा तो खंबीरपणाच आम्हा भावंडांना जगण्याचा मंत्र देवून गेला. त्यामुळे माझी आई म्हणजे वर उल्लेख केलेल्या श्लोकातील उत्तरार्ध आहे. कारण आईने आम्हाला कसे वाढविले हे सांगयचे झाले तर - पितयापरि त्वा सांभाळले | हेच खरे आहे.
म्हणूनच आजच्या पितृदिनी माझे अकाली गेलेल्या वडिलांना आणि त्यांच्या माघारी आमचे वडील झालेल्या आईस नतमस्तक होत वंदन करताना मी पुन्हा एकदा म्हणेन -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
आणि असे छत्र देणाऱ्या माझ्या बाबा आणि आई यांना आजच्या या पितृ दिनी माझे लाख लाख प्रणाम.

Sunday, June 9, 2013

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून….
'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत.
अशी परिस्थिती म्हणजे त्या प्रज्ञावंतांची मती कुंठलेली असते असे नाही पण त्या क्षणी व्यक्त होण्यासाठी त्यांना शब्द सुचत नाहीत. पण परिस्थिती कशी हि असो,कधी शब्दांशी हसत खेळत, कधी शब्दांवर स्वार होत, कधी काव्यातून सुरेख व्यक्त होत आपल्याला भाव भावनांची सहज सुंदर सफर घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत होती त्या मराठी साहित्यातील मात्तबर ' वागीश्वरीस ' आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
दिनांक १९ ऑक्टोबर १९२२ रोजी इंदापूर,पुणे जिल्हा येथे जनार्दन शेळके यांच्या कुटुंबात कन्यारत्न जन्मास आले,कन्या रत्न असूनही अपत्य प्राप्ती मुळे मनास शांती लाभली म्हणूच कि काय त्यांनी मुलीचे नाव शान्ता ठेवले,आणि एका पर्वाची नांदी झाली. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हीच मुलगी जगासमोर 'शान्ता शेळके' या नावाने अक्षरशः अजरामर झाली.
सामान्य कुटुंब, घरची बेताची परिस्थिती, या सर्व विपरीत स्थितीत जगरीत सांभाळत हि मुलगी शिकली. इंदापूर सारख्या ग्रामीण वातावरणातून थेट पुण्यनगरी गाठत शालेय शिक्षण हुजूरपागा व महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून पूर्ण केले. अर्थात पदवीधर होणे यात जरी नाविन्य नसले तरी मराठी आणि देव भाषा संस्कृत हे विषय घेत संपूर्ण विश्वविद्यालयात सर्वप्रथम येणे यात नाविन्य होते. आणि हे करताना 'न चि केळकर' आणि 'चिपळूणकर' हि दोन मानाची सुवर्णपदके या कर्तृत्वाला जणू सुवर्ण झळाळीच आणत होती .
इतके सारे कलागुण अंगी असूनही घर संसार या आघाडीवर वाट्यास आलेली वंचना त्यांनी आयुष्यभर अंतरंगात अक्षरशः तळाशी गाढून टाकली. आणि मग स्वतःचे व्यक्त होणे उरले ते काव्यातून …।
मात्र हे व्यक्त होणे देखील एक स्वतःशीच साधलेला संवाद होता त्यातुनच त्या म्हणतात -
विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन ,क्षण क्षण झुरति नयन
कोणा सांगू?
पण हे कोणा सांगू ? हे काही उद्वेगातून नसावे, कारण त्यांनी फक्त असाह्यताच व्यक्त केली असे नाही, तर मनोव्यापारातील सर्व व्यवहार त्यांनी नेहमीच सहजतेने शब्द बद्ध केले. शब्द बद्ध कसले, शब्द त्यांच्या समोर नेहमीच हात जोडून उभे असत,मनास कोणतीही भावना स्पर्श करुदे, त्यांना शब्द रूप देणे हा त्यांच्या लेखणीचा सहज खेळ होता.सहा दशके मराठी साहित्य क्षेत्राची अविरत सेवा करताना त्यांनी कविता संग्रह, कथा, कादंबरी, अनुवाद, ललित लेखन स्तंभ लेखन बालसाहित्य अश्या अनेक विभागात लीलया संचार केला आणि त्यामुळेच असेल कदाचित हे शब्द सामर्थ्य सदोदित टिकून राहावे म्हणून, शारदेचे वंदन जितक्या नम्रतेने त्या करतात तितक्याच तन्मयतेने त्या विद्येच्या देवतेस वंदन करताना म्हणतात -
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा ,अवघी विघ्ने नेसी विलया….
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!
रचना भक्तीस्वरूप असो किंवा भावरूप असो प्रेम ,विरह ,सलज्जता असो किंवा अविष्कार शब्दरूप होताना काय घडते तेदेखील त्यांच्या कडून काव्यात उतरताना त्या म्हणतात -
फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार
जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार
आज मी आळविते केदार!
स्त्री मन हे अतिशय भावूक असते,आपल्या मनातील राजकुमार आणि त्याची आराधना यात गुंतलेले स्त्रीमन जळी स्थळी आपल्याच प्रियकरास कसे पाहत राहते हे तिच्याच शब्दात सांगताना त्या म्हणतात -
भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतील गर्द झुला
जाईन विचारीत रान फुला
भेटेल तिथे ग सजण मला !
अशी जीवनाकडे सजगतेने पाहण्याची वृत्ती असताना' प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील विवाहाचा मंगल क्षण आपल्या समोर चित्रबद्ध करताना त्या म्हणतात -
चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटुपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशीम धागे ओढिती मागे व्याकूळ जीव हा झाला
साजणी बाई येणार साजण माझा!
थोडक्यात काय तर भावगीत हा त्यांचा हातखंडाच होता.
शांताबाई शेळके यांची प्रथमची आठवण तशी थोडी धूसरच आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आमच्या शाळेत त्या स्नेह संमेलनास प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. सफेद साडी डोक्यावरून पदर ठसठसीत कुंक आणि त्यावर चष्मा असे पटकन नजरेत भरणारे भरदार व्यक्तिमत्व,त्या व्यासपीठावर आल्या आणि समोर असलेला आठशे ते हजार विद्यार्थ्यांचा समुदाय अक्षरशः मंत्रमुग्ध झाला.
त्या आल्या त्यांनी पहिले आणि खरोखरच त्यांनी काही सांगण्या अगोदरच आम्हा सर्वांना जिंकले. सुरवातीची दहा पंधरा मिनटे अगदी नेहमीच्या सोपस्कारात गेली,आजच्या प्रमुख पाहुण्याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही असे सांगत आमच्या मराठीच्या मास्तरांनी बहुमोल पंधरा मिनटे खाल्ली पण काय करणार पुढील वर्षी पुन्हा तेच मास्तर वर्गावर येणार असल्या मुळे गुपचूप त्यांचे भाषण ऐकले.
त्यानंतर शान्ताबाई बोलण्यास उभ्या राहिल्या , पुढील अर्धा तास आम्ही शाळेत येवून काय करावे, म्हणजे क्रमिक अभ्यासक्रमाबाहेरचे काय शिकावे, याचा कानमंत्र त्यांच्या कडून घेत होतो."आशीर्वाद घ्यावा वाटेल असे गुरुजन आणि अशी शाळा तुमच्या वाट्यास आली हेच तुमचे भाग्य" हे एकच वाक्य अजून जसेच्या तसे मनावर कोरले गेले.त्याकाळी अशी भाषणे ध्वनिमुद्रित करून जपण्याची सोय ग्रामीण भागातील शाळेत नसल्याने, आज ते भाषण जसेच्या तसे उपलब्ध नाही. पण जर ते असते तर पु लंच्या 'हे जग मी सुंदर करून जाईन' या अजरामर भाषणा सारखे ते सर्वश्रुत झाले असते आणि आता मागे वळून पाहताना वाटते, कि आम्ही खरोखरच भाग्यवान म्हणून त्या आम्हास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.
शान्ताबाई यांनी हिस्लॉप महाविद्यालय ,नागपूर रुईया आणि दयानंद महाविद्यालय मुंबई येथे मराठीच्या अध्यापनाचे काम केले. माझ्या उभ्या आयुष्यात मी त्यांना एका स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ऐकले,त्या अनुभवातून मला वाटते कि,खरोखर त्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परम भाग्य म्हणून त्या त्यांना शिक्षिका म्हणून लाभल्या.
एक नामांकित प्राध्यापक असल्या तरी त्या सर्वाधिक व्यक्त झाल्या काव्य रचनेतून. त्यांना चित्रपट क्षेत्राकडे परिस्थिती मुळे वळावे लागले, जेंव्हा त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरवले तेंव्हा स्वतः गदिमा त्यांना म्हणाले होते , "अहो याहून मोठे कार्य तुमच्या हातून घडेल, नका तुम्ही इकडे येवू " पण निरुपाय म्हणून या सल्ल्याकडे पाठ फिरवत त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली. त्यांना यश मिळाले,पण बहुदा त्यांचे मन मात्र त्यांना नेहमीच म्हणत राहिले-
ईश्वरेच्छा हीच किंवा संचिताचा शाप का
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते?
मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
एक गीतकार म्हणून शान्ता शेळके यांचे नाव नावारूपास आले त्याची पूर्ण कल्पना त्यांना स्वतःला देखील होती. आपली हि ओळख त्यांना मान्य देखील होती. आपली हि ओळख कायम राहावी म्हणून त्या म्हणतात -
असेन मी नसेन मी ,तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे
असे असले तरी एक प्राध्यापक, वृतपत्र संपादक, लेखिका,स्तंभ लेखिका, अनुवाद्कार, ललित लेखक, बाल साहित्य लेखिका, अश्या अनेक क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. समाजाने इतका मान सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली तरी कुटुंबाकडून झालेली परवड त्या आयुष्यभर विसरू शकल्या नाहीत. कोष्टी समाजातील जन्म त्यांना कबीराची बुद्धी देवून गेला,शब्द वीण हि कला त्यांच्या हाती अशी होती कि, रेशमाच्या रेघांनी त्यांनी अनेक कशिदे त्यांनी सहजतेने विणले. पण तरीही त्या म्हणतात -
हा स्नेह, वंचना कि, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुल हि रुतावे हा दैवयोग आहे …

Saturday, May 25, 2013

विसंगती सदा घडो ......

अरेच्या! एक तर याला काही माहिती नाही किंवा लिहताना चूक केलेली दिसते, यापैकी काय वाटले आपल्याला. मनात विचार असा येणे यात चूक काही नाही कारण मूळ रचनेची सुरवात आहे ती अशी आहे ---
सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
अर्थात हे सुरेल अर्थपूर्ण गीत आणि त्यातील संदेश पूर्णता योग्यच आहे. पण या सुसंगातीवरून मी विसंगतीकडे का आलो ते मी आता सांगतो. नुकतेच माझ्या वाचनात एक वेगळ्या विषयावरचे पुस्तक आले. त्या पुस्तकाचे नाव आहे OXYMORONICA - paradoxical wit and wisdom from history's greatest wordsmiths लेखक - Dr. Mardy Grothe
या पुस्तकात लेखकाने विचारांच्या सुसंगतीतून विसंगतीतील सौंदर्य टिपले आहे असे मला वाटतेय. मला स्वतःला इंग्लिश वाचनाचा छंद वगैरे अजिबात नाही. उलट बरेचदा काही शब्दांच्या अचूक अर्थासाठी मी डिक्शनरीचा आधार अनेकदा घेत असतो. असे असून देखील या पुस्तकाने मला वेडे केले. या पुस्तकात जो खजिना दडला आहे त्याचा रस्ता आपणास दाखवणे आणि तो आपणास मिळाला तर आपणही नक्कीच श्रीमंत व्हाल याची खात्री वाटली, म्हणून या पुस्तकाचा अल्प परिचय मी आपणास करून देत आहे. आणि मूळ पुस्तक वाचून त्याचा खराखुरा आनंद मिळावा म्हणून परिचय जाणीवपूर्वक अल्पच ठेवणार आहे.
या पुस्तकातील सौंदर्य स्थळे शोधून त्याचा आनंद घेण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकेल.काही जण वाचनानंतर त्यातील काही विचार मनात कोरून ठेवून त्याचा आनंद घेतील,काहीजण त्यावर चर्चा करून अनुभव समृद्ध होतील. काही जण आपल्या आवडीचा विभाग पुन्हा पुन्हा वाचून आनंदाचा पुनःप्रत्यय घेतील. इतकेच काय पण काही जण स्वानुभावातील जगाला उलगडून सांगतील. इतके सर्व यात दडले आहे म्हणून मी त्यास खजिना म्हटले आहे.
मूळ पुस्तक इंग्लिश भाषेतील असल्याने काही माहिती मूळ भाषेत नोंदवून मगच माझे मत सांगणार आहे पण माझे मत किंवा पुस्तकावरील भाष्य हे कोणत्याही अधिकारातून नसून केवळ विचारांच्या अभिव्यक्तीपोटी केले आहे हे माझे आपणास नम्र सांगणे आहे.
पुस्तकाचे सुरवातीस लेखकाने - When people are asked to discribe an oxymoron, they almost always think of a " contradiction in terms " like jumbo shrimp, acting naturally, pretty ugly, असे म्हणत,पुढे काही प्रथितयश लोकांची सर्वमान्य झालेली काही वाक्ये दिलेली आहेत.
जसे-1. I am deeply superfisial.
2. Even is ignorance is encyclopedic.
3. I love my country too much to be a nationalist.
म्हणजेच या वाक्यातून दिसणारे शब्द परस्पर विरोधी असू शकतात. पण एकत्रितपणे ते खूप वेगळा अर्थ मांडताना दिसतात. माझे हे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून पुस्तकातील काही भाग मी इथे मुद्दाम देत आहे.
All of these quotes contain a juxtaposition of oppsing terms. They may be described by the adjective oxymoronic because they are characterized by or related to the rhetorical figure called oxymoron. The Oxford English Dictionary defines oxymoron this way:
A rhetorical figure by which contradictory or incongruous terms are conjoined so as to give point to the statement or expression; an erprssion in its superficial or literal meaning self contradictory or absurd, but involving a point.
The word , which appers in English for the first time in 1640, has an interesting etymology. In ancient Greek oxus means " sharp or pointed"
and moros means "dull, stupid, or foolish." So oxymoron is itself an oxymoron , iiterally meaning " ashrap dullness " or " pointed foolishness. "
echnically , the correct plural form of the word is oxymora, but so many people say oxymorons that ( except for purists ,pedants, and yours truly ) it is now generally regarded as an acceptable usage.
The best examples of oxymoronica don't contain a simple contradiction in terms; they contain what might be discribed as a contradiction in ideas. Many oxymoronic observetions stretch our minds and expand our thinking;
Free love is too expensive.- BERNADETTE DEVLIN
Melancholy is the pleasure of being sad. - VICTOR HUGO
Observations like these are usually called paradoxical, and all are consistent with one of the definations of the word paradox:
A statement that seems self- contradictory , false, or absurd but is nonetheless well-founded or true.
paradox या शब्दाचा आढळ इंग्लिश भाषेत प्रथम १५४० झालेला आढळतो.म्हणजेच oxymoron या शब्दाच्या वापरापूर्वी सुमारे १०० वर्षे याचा वापर दिसतो. paradox या शब्दाचा उगम पुराणकाळातील दोन ग्रीक शब्दांमधून झाला आहे. त्यातील para म्हणजे beyond आणि dox म्हणजे opinion . म्हणजेच paradox चा शब्दशः अर्थ जरी beyond opinion असा असला तरी या शब्दाचा मुळ स्त्रोत " being beyond the pale of current opinion" or " contrary to current thinking."हा अर्थ दाखवतो. सुरवातीचे काळात अशा शब्दांचा वापर अभूतपूर्व अविश्वासानिय गोष्टी उलगडून सांगण्यासाठी केला गेला. प्रतिभावान नाटकर, साहित्यिक शेक्सपियर यांनी त्यांच्या 'अथेल्लो' या नाटकात केला आहे. इतिहासातील अनेक उदाहरणे याप्रकारत आढळतात.
Less is more.
The more things change, the more they remain the same.
To lead the people, walk behind them. या सारखी वाक्ये आणि त्याचा गर्भित अर्थ उलगडून सांगणारी लेखकाची प्रतिभा यांनी हे पुस्तक अक्षरशः भरून वाहते आहे.हि थोडीफार माहिती मी आपणासमोर मांडताना संपूर्ण पुस्तकातील सुरवातीचा ओळख करून देणारा भागच मांडला आहे. पुढे या पुस्तकात लेखकाने विषयाची मांडणी विभागवार करून
पुस्तकास नेटके रूप देत विषय अधिकच सोपा करीत नेताना तो उत्कंठावर्धक केला आहे. वेगवेगळ्या विभागात मांडलेला हा विषय -
Oxymoranic Wit & Humor, Ancient Oxymoranica, Artistic Oxymoronica, या सारख्या चौदा विषयांना स्पर्श करतो.
या पुस्तकाचे वाचनातून मला काय मिळाले?असे मी स्वतःस विचारले आणि उत्तर म्हणून मला जे अगदी सहज सुचले ते मी आपणास सांगत आहे.
१. मी आरशात डोकावले असता,मीच त्यात दिसत नाही.
२. मी पावसात जातो पण तो मला भिजवत नाही.
३. परिचित ठिकाणी मी नेहमीच हरवतो.
४. तुमचे सर्वाधिक नुकसान करणारा व्यवहार,नेहमीच फायदेशीर असतो.
५. मी विचार करणे सोडून दिले कि मला नवीन कल्पना सुचतात.
यातील काही कल्पना आपणास पूर्वी कधी आढळल्या असतील, तर तो केवळ योग योग असून केवळ विचारांच्या प्रक्रियेतील साधर्म्य समजावे. पण त्यापलीकडे जावून माझे इतकेच सांगणे आहे कि, आपण हे पुस्तक जरूर वाचा.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण - Special Markets department, Harpercollins Publishers Inc.
10, East 53rd Street, New York, NY 10022.

Friday, May 3, 2013

'परिचय'- बर्खूरदार खलनायकाचा !....’दादासाहेब फाळके ‘पुरस्काराचे निमित्ताने !

आज दादासाहेब फाळके पुरस्काराने एक असे व्यक्तिमत्व सन्मानित होत आहे कि ज्यामुळे सन्मानित व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसणार आहे ? का त्या पुरस्काराचा सन्मान होतो आहे ? असा प्रश्न पडावा.
कारण १९६९ पासून गेली चव्वेचाळीस वर्षे दिला जाणारा हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार हा,दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माहिती आणि नभोवाणी मंत्रालयामार्फत सुरु करण्यात आला.
भारतीय सिनेमासाठी महत्वपूर्ण आणि दखल घेण्यायोग्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार, निर्मिती,दिग्दर्शन,अभिनय ,गायन, संगीत, छायाचित्रण या क्षेत्रात दिला जातो. रोख रक्कम रुपये अकरा हजार स्मृतिचिन्ह आणि शाल असा सुरु झालेला हा पुरस्कार आता रोख रक्कम रुपये दहा लाखां पर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज कपूर ,दिलीपकुमार,देवानंद यासारखे अभिनेते,तपन सिन्हा ,मृणाल सेन,सत्यजित रे, अदूर गोपालकृष्णन यासारखे दिग्दर्शक ,लता मंगेशकर,आशा भोसले,मन्ना डे यासारखे गायक कलाकार, यासह त्रेचाळीस कलावंतांना हा पुरस्कार प्रत्यक्ष वितरीत झाला आहे.
आज ३मे २०१३ रोजी, भारतीय चित्रपट सृष्टीस शंभर वर्षे पुर्ण होत असलेल्या वर्षात, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त कलावंतांची यादी अधिक सुशोभित होत आहे अशा एका नावाने,जी कलाकार व्यक्ती थोडी उशीरच सन्मानित होत आहे,आणि जी खरोखर भारतीय चित्रपट सृष्टीचा 'प्राण'आहे. आले ना लक्षात म्हणजे कोण ? तर हि कलाकार व्यक्ती म्हणजे प्राण क्रिशन सिकंद …'प्राण' पणाने ज्यांनी आपले उभे आयुष्य भारतीय चित्रपट सृष्टीसाठी वाहिले त्या पडद्यावरील खलनायकास आम्हा रसिकांचा मानाचा मुजरा !अर्थात पडद्यावरील सहस्त्रकातील सर्वात यशस्वी खलनायक आणि प्रत्यक्ष जीवनातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणजे ‘प्राण’.
बारा फेब्रुवारी १९२० रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या प्राण यांचे शालेय शिक्षण त्यांच्या वडिलांच्या फिरतीच्या कामामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. जणू काही शिक्षण घेत घेत त्यांनी बारा गावचे पाणी प्यायले होते. या शालेय शिक्षणाची सांगता रामपूर ह्या रामपुरी चाकू साठी प्रसिद्ध असलेल्या गावी झाली. आणि त्यामुळेच कि काय पण तेंव्हा जरी त्यांचा चित्रपट,अभिनय इकडे वळण्याचा मानस नसला तरी त्यांच्या वागण्यात लकबीत एक वेगळीच धार आली होती.
खरे तर प्राण यांची शिक्षणातील गती चांगली होती. त्यांचे गणितातील उपजत ज्ञान तर दैवी देणगी होती. पण असे असून देखील त्यांना उच्च शिक्षणाचे गणित काही सोडवता आले नाही. त्यामुळे म्हणा किंवा त्यांना छाया चित्रण ( फोटोग्राफी ) हा छंद जोपासावा वाटला म्हणून म्हणा त्यांनी उच्च शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि दास फोटोग्राफी स्टुडीओ या कॅनॉट प्लेस, दिल्ली स्थित दुकानात पूर्णवेळ नोकरी सुरु केली.
या दुकानाची प्रथम शाखा सिमला या थंड हवेच्या ठिकाणी सुरु झाली आणि त्याची जबाबदारी प्राण यांच्याकडे आली.तेथे त्यांनी आपले काम सांभाळत,अभिनयाच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकले. त्यावेळी अभिनय क्षेत्रात कितपत 'राम' आहे याची त्यांना जाणीव नसल्यामुळे असेल, पण त्यामुळे त्यांनी पारंपारिक ' रामलीला ' ह्या लोकनाट्यात पदार्पणातच सीतेची भूमिका वठवली होती.पुढे जेंव्हा दास यांनी दुसरी शाखा लाहोर येथे सुरु केली तेंव्हा प्राण यांनी आपला बाड बिस्तारा तिकडे हलविला. आता दिवसभर दुकान सांभाळणे आणि सायंकाळी मित्रपरिवारात रमणे,हा त्या वेळच्या वयाला शोभेल असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला.
या दिनक्रमाचा भाग म्हणून,संध्याकाळी जेवणानंतर पान खाण्याचा, त्यांच्या मित्र परिवाराचा रिवाज होता.एके दिवशी एक गृहस्थ प्राण यांच्या समोर येवून,त्यांना नखशिखांत न्याहाळत म्हणाले " काय रे नाव तुझे ?" त्यावर प्राण त्यांना उत्तरले," पण तुम्ही हे मला का विचारत आहात ? " तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख वाली महमंद वाली अशी करून देत,ते श्री. पांचोली यांच्याकरिता पटकथा लेखक म्हणून काम करतात याची माहिती दिली.
त्यापुढे,वाली यांनी मी सध्या जी पटकथा लिहित आहे त्यातील एक प्रमुख भूमिका करणार का ? असा प्रश्न प्राण यांना केला. व उद्या स्टुडीओत येवून भेटण्यास सांगितले. तेंव्हा त्या संधी मधील गांभीर्य न समजल्याने, प्राण त्यांना हो म्हणाले, पण प्रत्यक्षात तिकडे फिरकलेच नाहीत.
पुढील आठवड्यात प्लाझा सिनेमा येथे चित्रपट पाहण्यास गेले असताना, वाली यांची पुन्हा प्राण यांच्या बरोबर भेट झाली. तेंव्हा वाली यांनी अस्सल पंजाबीत, प्राण यांची खरडपट्टी काढत," मी तुझ्या वतीने शब्द दिला आणि तू फिरकलाच नाहीस" असे म्हणत पुन्हा एकदा प्राण यांची भेट नक्की करत,यावेळी ते स्वतः च त्यांना घेवून गेले. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे 'यमला जाट ' या पंजाबी चित्रपटा द्वारे प्राण यांचे या मायानगरीत पदार्पण झाले.
हे सर्व सुरु असताना भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऐन बहरात आलेली होती. भारताचे स्वातंत्र्य जवळजवळ निश्चित होत असताना दुर्दैवाने फाळणी च्या पर्यायाने वातावरण गंभीर बनून गेले होते. जातीय रक्तपात अनेक संसार अक्षरशः धुळीस मिळवत होते. त्याच वेळी प्राण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी, त्यांच्या मुलाच्या वाढदिवसा करिता इंदूर येथे येण्याचा निर्णय घेतला.दिनांक १० ऑगस्ट १९४७ रोजी इंदूर मुक्कामी आल्यानंतर संपूर्ण लाहोर रक्तरंजित दंगलीने वेढले गेले. आणि अखेर फाळणीवर शिक्कामोर्तब होत दिनांक १४ ऑगस्ट पासून सरहद्द बंद झाली .याचा थेट परिणाम म्हणजे ‘यमला जाट’ ने सुरु झालेला चित्रपट क्षेत्रातील प्राण यांचा प्रवास एका वेगळ्याच वळणावर ठप्प झाला.
या परिस्थितीत बावीस चित्रपटातील कामाचा अनुभव गाठीशी आहे, या उमेदीवर त्यांनी आपले बिऱ्हाड मुंबईस हलवले. त्यावेळी प्रथम त्यांनी आपला मुक्काम हॉटेल ताज येथे ठेवला आणि नव्याने काम शोधण्यास सुरवात केली. पण त्यांचा प्रथमचा अनुभव हा कटूच होता. दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना पहिले यश मिळाले. देवानंद यांच्या 'जिद्दी' या चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली. आणि इथेच त्यांची जिद्द कारणी लागली कारण या चित्रपटातील यशाने त्यांच्या समोर चित्रपटात काम करण्याची विनंती करणाऱ्यांची रांगच लागली.
खलनायक म्हणून काम करताना प्राण यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करण्याची पद्धत प्रथम पासूनच ठेवली होती. चित्रीकरण म्हणजे सर्वस्व मानणे हे त्यांच्या रक्तातच होते. त्यामुळे चित्रीकरणास ते नेहमीच वेळेवर हजर राहात आणि स्वतः चे काम संपले तरी अखेर पर्यंत थांबून संपूर्ण कथानक समजावून घेत असत.भूमिकेची रंगभूषा,वेशभूषा याचा ते स्वतः अभ्यास करत.त्यामुळे त्यांना माणूस वाचण्याची सवय लागून गेली होती.त्यासाठी त्यांनी वर्तमान पत्रातील वैशिष्ट्य पूर्ण छायाचित्रे जमवून त्यांचा वापर स्वतःची रंगभूषा अचूक करण्यासाठी केला.
स्वतः ची खलनायकी अभिनयाची लकब नेहमीच वेगळेपणाने उठून दिसावी म्हणून,त्यांनी विविध लकबी जाणीवपूर्वक वापरल्या. आणि त्यामुळेच प्राण म्हणजे सैतान अशी जरब त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच 'जिस देश में गंगा बहती हैं । ' मधील 'राका' असो किंवा 'राम और श्याम' मधील 'गजेंद्र' असो लोकांच्या मनात 'प्राण' इतक्याच त्या भूमिका देखील ठसल्या.
या त्यांच्या खलनायकी भूमिकांचा जनमानसावर झालेला परिणाम विशद करताना ते नेहमी म्हणत असत कि, प्राण या नावाचा धसका असा आहे कि एकोणीसशे पन्नास नंतर प्राण हे नाव वापरातून हद्दपार झाले. रावण हे नाव कधी कोणी ठेवते का ? असा त्यांचा प्रश्न असे.
त्यांनी जेंव्हा त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्याचे ठरवले तेंव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी विविध वर्तमानपत्रात निवेदन देत आम्ही 'प्राण' च्या शोधात आहोत असे सांगत सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अश्या प्राण नावाच्या व्यक्तीने हा विशेष समारंभ सन्माननीय अथिति म्हणून सहभागी होत सुशोभित करावा असे जाहीर आवाहन केले होते. आणि बहुदा त्यांना एकोणीसशे पन्नास नंतर जन्मलेला,दुसरा प्राण काही मिळाला नाही.यातच त्यांच्या खलनायकी यशाचे गमक दिसून येते.
कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे याबाबत ते कटाक्षाने शिस्त पाळत, पण ती इतरांनी पाळली नाही तर ते त्यांना बिलकुल सहन होत नसे. त्यांच्या ऐन बहाराच्या काळातील आघाडीचा अभिनेता राजेश खन्ना हे वेळ पाळण्याचे बाबत अत्यंत आळशी असल्याने, त्यांच्या बरोबर काम न करण्याचा, एकदा घेतलेला निर्णय त्यांनी चित्रपट सृष्टीतून निवृत्त होई पर्यंत पाळला.
असा हा खलनायकी प्रवास त्यांना यश प्रसिद्धी आणि पैसा भरभरून देत होता. राजेश खन्ना नंतर सर्वाधिक मानधन घेणारा असा प्राण यांचा उल्लेख होत राहिला .असे असून देखील त्यांनी खलनायक नाही नायक आहे, नव्हे कोणतही भूमिका करण्यास मी समर्थ आहे,असा संदेश देत खलनायकत्वाकडे पाठ फिरवली. आणि त्यामुळेच आपल्याला एक 'मंगल चाचा' भेटला. हे त्यांचे जणू काही चित्रपट सृष्टीवर 'उपकार' आहेत.
‘उपकार’पासून सुरु झालेली त्यांची पडद्यावरील सकारात्मक किंवा चरित्र अभिनेता म्हणून असलेली वाटचाल देखील, खलनायकत्वा इतकीच प्रभावी ठरली .एक निष्ठुर नाही तर शिस्तप्रिय करारी आजोबा ,अशी त्यांची ओळख 'परिचय' मधून झाली. मित्रत्वातील मैत्र जपणारी 'जंजीर' मधील 'शेरखान' ही भुमिका देखीलप्रभावी ठरली.अर्थात किती म्हणून भूमिकांचा उल्लेख करायचा?कारण त्यांच्या प्रत्येक भूमिकेत 'प्राण' आहे.
हिंदी चित्रपटचा आणखी एक अभिवाज्य घटक म्हणजे त्यातील गाणी. त्यामुळे जास्तीत जास्त गाणी नेहमीच आपल्यावर चित्रित व्हावीत असे कोणास वाटणार नाही. पण याही बाबतीत प्राण साहब हे प्रथम पासून थोडे हटकेच होते.’खानदान' या नुरजहा या नायिकेबरोबर पदार्पणात प्रमुख भूमिकेत नायकाची जबाबदारी पार पडल्यानंतर पुढील चित्रपट नायक म्हणून त्यांनी स्वीकारला नाही. आणि त्या मागचे त्यांचे कारण होते कि,झाडामागे पळत गाणी म्हणणे जमणार नाही.
अर्थात त्यात गाणी म्हणणे जमणार नाही या मागे कोणतीही भीती नव्हती,पण तो त्यांचा स्वभाव नव्हता. पण भूमिकेशी समरस होणारे गाणे असेल तर जिवंत करावे तर त्यांनीच. आणि त्यामुळेच कि काय पण साठच्या दशकात जेव्हा सर्वाधिक लांबीचे गाणे त्यांच्यावर चित्रित करण्याचे ठरले,तेंव्हा त्या गीताचे संगीतकार कल्याणजी यांनी दिग्दर्शकास तुम्ही माझ्या गाण्याचा सत्यानाश करायचा ठरवले आहे असा निषेध नोंदवला होता. पण चित्रिकरणा नंतर जेंव्हा त्यांनी - कस्मे वादे प्यार वफा सब बाते हैं, बतोंका क्या? हे गीत पाहिले तेंव्हा सर्वात प्रथम फोन करून प्राण यांचे अभिनंदन करताना त्यांना सांगितले कि, तुम्ही हे गाणे पडद्यावर चित्रित करताना ,ओठातून नाही तर हृदयातून गायला आहात.आणि त्यांच्या भूमिकेत समरस होण्याच्या वृत्तीमुळेच, त्यांच्या वाट्याला आलेली, ‘यारी हैं इमान मेरा,यार मेरी जिंदगी’,’इशारों को अगर समझो राज को राज रहेने दो’ , पासून ते ‘दारू कि बोतल में काहे पानी भरता हैं’ यासारखी गाणी अजरामर ठरली आहेत.
प्राण म्हटले कि 'खलनायक' हि त्यांची वरवरची ओळख आहे असेच मला वाटते. कारण चित्रपट कलाकारांचे आयुष्य खरोखरच पडद्यावर आणि पडद्यामागे असे विभागलेले असते. त्यामुळे पडद्यामागील कलाकार हाच खरा माणूस असतो. त्या भूमिकेतील प्राण हे एक क्रीडाप्रेमी म्हणून सर्वज्ञात आहेत.त्यांनी एक फुटबॉल संघ पुरस्कृत केला होताच,पण ज्या काळात क्रिकेट मध्ये खेळाडूंचा घोडेबाजार आला नव्हता,पैसा कमी आणि प्रसिद्धी जास्त होती, तेंव्हा भारताचा नवोदित उभरता खेळाडू कपिलदेव त्याच्या गूढघ्याच्या शस्त्रक्रियेच्या तयारीत होता, तेंव्हा गरज असल्यास, त्याचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी, प्राण यांनी स्वतः व्यक्त केली होती. याची आठवण कपिलदेव आजही स्वतः सांगतात.
अशा पडद्यामागील माणुसकी जपणाऱ्या कलाकारास, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाणारे, सर्वश्री दादासाहेब फाळके यांच्या जन्म शताब्दी वर्षात सुरु झालेला आणि त्यांच्याच नावे दिला जाणारा हा पुरस्कार, भारतीय चित्रपट सृष्टीस शताब्दी पूर्ण होताना, घोषित झाला याचा खरोखर अभिमान वाटतो. याठिकाणी प्राण आणि दादासाहेब फाळके यांच्यातील एका दुव्याचा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावा वाटतो. ऑक्टोबर ९३ मध्ये लातूर येथील भूकंप पीडितांच्या मदतीसाठी सहयोग फौंडेशन आयोजित कार्यक्रमात प्राण यांनी स्वतः भाग घेत त्याकाळी साडेतीन लाख रुपये पदयात्रेतून जमा केले.
त्यावेळच्या समारंभात दोन मंत्री व प्राण मंचावर असताना त्यांनी मंत्र्यांच्या कडे एका घराच्या बांधणीस किती रक्कम लागेल असे विचारले जेंव्हा त्यांना एका घराचा खर्च रुपये पन्नास हजारां पर्यंत येईल असे सांगितले तेंव्हा त्यांनी त्याच कार्यक्रमात रुपये एक लाख देणगी म्हणून दिले.आणि एकच विनंती केली, त्यांची विनंती होती दिलेल्या देणगीतून बांधली जाणारी दोन घरे अनुक्रमे सर्वस्वी व्ही . शांताराम आणि दादासाहेब फाळके यांच्या नावाने जपली जावीत. कारण भारतीय चित्रपट सृष्टी करिता या दोघांचे योगदान हे कधीही न विसरण्याजोगे आहे. .याप्रकारे ज्या चित्रपट सृष्टीने आपणास घडवले, त्या चित्रपट सृष्टीसाठी ज्यांनी आपले जीवन वाहिले त्यांचा आदर करण्याची प्राण यांची वृत्ती वंदनीय आहे. आणि ज्या दादासाहेब फाळके यांचा सन्मान त्यांच्या आठवणीतून प्राण यांनी जपला ,त्यांना आज हा पुरस्कार प्राप्त होत आहे.
आज भारताची राजधानी दिल्ली येथील पुरस्कार वितरणाच्या समारंभास,जरी आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण प्रत्यक्ष जाऊ शकला नसलात , तरी अभिनयाची दिल्ली आपण या पूर्वीच काबीज केलेली आहे आणि म्हणूनच आज एका उत्तुंग उंचीच्या खलनायकातील नायकास वंदन करीत व आम्हा रसिकांच्या शुभेच्छा देत हा लेख पुरा करतो.

Sunday, April 14, 2013

मनातील 'सल' 'अस्सल' पणे मांडणारा व्यथा सम्राट - अर्थात कविवर्य सुरेश भट


आज १५ एप्रिल,विदर्भाच्या रणरणत्या परिसरात एक्क्याऐंशी वर्षांपूर्वी अमरावतीत एक मुल जन्मास आले. वडील प्रथिथयश वैद्यकीय व्यवसायिक, तर आई एक कवियत्री.आता त्यावेळची ही घटना म्हणजे,एका सुखवस्तू कुटुंबात एक मुल जन्मास आले,इतपतच महत्वपूर्ण होती.मुल वाढू लागले,सर्व काही चाकोरीत चालले होते.पण मुल जेमतेम अडीच वर्षाचे झाले आणि घरातच डॉक्टर असूनही पोलिओचा अघात मुलास जन्माचे अपंगत्व देवून गेला.
खरेतर सर्वच नियतीचे खेळ.असे का ? या अनुत्तरीत करणऱ्या प्रश्नाच्या मालीकेत कुटुंबाची दैनंदिन गुरफटत गेली.आणि त्या अपंगत्वाचे ओझे मनावर घेवूनच ते मुल वाढत गेले.मुलाच्या वाढीत घराचा हातभार होता पण तो भार हाताबाहेर गेला होता.
आर्थिक आघाडीवर ते मुल ओझे नसेल, पण त्याचे अपंगत्व ओझे झाले होते.त्यामुळे त्यास घराचे छप्पर होते पण सावली नव्हती.माउली अबोलपणे सर्व काही करत होती,पण कुटुंबातील अन्य घटक अजाणतेपणे मूक झाले होते.
माणसास दुर्लक्ष झालेले एक वेळ चालते, पण दखलच घेतली गेली नाही तर त्याची होणारी कुचंबणा त्यास अगदी आतून कोलमडून टाकते आणि असे उन्मळून पडणे जेंव्हा घडते, तेंव्हा ते घडते,पण इतरांना ते दिसत नाही.याचेच परिणाम त्या माणसाची परिमाणे बदलण्यात होतात,आणि हेच सर्व घडले.असे दुर्दैवी बालपण वाट्यास आले त्या जीवाचे नाव होते-‘ सुरेश श्रीधर भट.’
अर्थात यात सुरेशजींच्या कुटुंबियांच्या कर्तव्यपुर्तीवर कसलीही टीका करण्याचा जरासुद्धा मानस नाही,पण त्यांची भूमिका सुरेशजींच्या मनात काय द्वंद्व निर्माण करीत असेल,याची प्रचीती त्यांच्या वागण्यातून येत असे आणि हाच सल सुरेशजी मनात ठेवून जगले असे नेहमीच वाटते ,तरीपण म्हणून त्यांनी कधीच कुणाचा द्वेष केला नाही.
मनाच्या तळ कप्प्यात गाडलेले दुखः तो कोंडमारा त्यांच्या कवितेतून आपल्या समोर आला.वाट्यास आलेली अवहेलना, त्याची वेदना, त्यांना अंतर्मुख करीत वैचारिक पातळीवर समृद्ध बनवत गेली.आणि खरेच तसे घडले हेच बरे झाले,कारण स्वतःला व्यक्त करण्याचा सुरेशजींनी निवडलेला काव्य रचनेचा मार्ग,आज मराठी साहित्यातील कविता,काव्य,गझल ही दालने समृद्ध करून गेला.
सुरेशजी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला.गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना 'गझल सम्राट' हा मनाचा किताब देवून गेला.पण कविता, गझल ह्या त्यात दडलेल्या अर्थासह समजावून घ्यावयाचे झाल्यास, मला तर ते खरेतर 'व्यथा सम्राट' वाटतात.आणि म्हणूनच जेंव्हा ते म्हणतात -
'वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी.'
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.
याठिकाणी मला या त्रासातून सोडव हि विनंती नियतीला करताना,त्यांचा सूर कोठेही "सोडव एकदा यातून" असा नसून त्यांना या सर्वापासून मुक्ती हवी आहे.आणि अशी मुक्ती हि मनात सल असले तरी द्वेष ठेवला नाही तरच मिळू शकते, याची त्यांना नक्कीच पुरेपूर जाण होती.
त्यांचे संवाद देखील स्वःमनाशी जेंव्हा चालत तेंव्हा त्यातील अंतर्मुखता पराकोटीची असल्याने आपोआप शब्द साकारतात -
समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !
मनातील खळबळ किंवा ज्याला आपण आतून तुटणे म्हणतो ते, अचूक शब्दात टिपताना केवळ शाब्दिक कसरत न करता भावनांना वाट करून देताना त्यांनी ज्या उपमा वापरलेल्या आहेत त्या खरोखरच शब्दातीत आहेत. त्यामुळे -
खरेच माझा जगावयाचा विचार होता …
या रचनेत त्यांनी जिवंतपणी भोगलेले मरणच मांडले आहे. वाट्यास आलेली दुजेपणाची वागणूक देणाऱ्या वृत्तीवर टीका करताना ते म्हणतात-
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही,
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता!
पण या सर्व परिस्थितीवर उपाय सांगताना, केलेल्या कृतीचे समर्थन करताना,ते वास्तवावर इतके अचूक बोट ठेवतात कि, त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली दुखेः त्रासदायक का तेथील परिस्थिती क्लेशदायक याचा आपणास प्रश्न पडावा, आणि त्यामुळेच जगायचा विचार हा देखील भूतकाळ बनतो आणि शब्द येतात-
अखेर गावामधून त्या मी निघून गेलो
तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता!
वाट्यास आलेले आयुष्य जगताना त्यांनी खरोखरच सकारात्मक जगण्याचा प्रयत्न केला,पण त्यात सुद्धा कधी कधी अपयशच आले.जगण्यातील हे मैत्र त्यांच्या नजरेतून पाहताना,जीवनास मित्र मानत ते प्रश्न करतात आणि म्हणतात -
सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा मी असा !
जे दान पदरात पडले त्याकडे, कवी नजरेने पाहिल्यामुळे, आपोआपच पुढील शब्द साकारतात-
एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा !
या खेळाच्या खेळीकडे वळून पाहताना,जरी हे सर्व मनासारखे झाले नाही तरी जग रीत म्हणून,मी कसा जगलो हे सांगताना -
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगले कि मज हसावे लागले !
या शब्दात ते अंतरंग उलगडतात .जगाचे मतलबी वागणे आणि त्याचा तिटकारा व्यक्त करताना, त्यांच्या 'केला करार त्यांनी' या रचनेत ते म्हणतात -
झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे ,
माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी !
सुरेश भट एक प्रथित यश कवी म्हणून सिद्ध होण्याचा काळ आणि त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातील भोग यांचा एकूण प्रवास बराच काळ समांतर राहिला आहे. शालेय, महाविद्यालयीन व पदवी इथ पर्यंतचे शिक्षण हे अनेकदा अपयश पचवीत त्यांनी पूर्ण केले.मग घरावर भार नको म्हणून, ग्रामीण भागात जावून शिक्षकी पेशा स्वीकारून, जगणे सुरु ठेवले. त्या काळात बरोबरीचे अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात स्थिर हॊउन इतरांना अनाहूत सल्ले देण्या इतके पुढे गेले होते.
याकाळातील कटू अनुभव नमूद करताना एका मुलाखतीत सुरेशजी म्हणतात -
" सांगू की नको? सांगतोच! त्या तशा अस्थिर काळात मी एकदा अमरावतीला गेलो होतो. प्रा. मधुकर केचे त्या रात्री स्टेशनवर भेटले. ते त्यावेळी सर्वार्थांनी फॉर्मात होते-म्हणजे प्राध्यापकाची नोकरी होती; त्यांचे लग्न झाले होते; चोहीकडे त्यांचे नाव झाले होते; आणि त्या पार्श्वभूमीवर , ते त्यावेळी ते मला अत्यंत उपहासाने हिणवीत म्हणाले होते: 'सुरेश, तू आता कवी म्हणून संपलास! तू आता अशीच गावोगावी मास्तरकी कर!' मी त्यावेळी त्यांना इतकेच म्हणालो, 'ते अजून ठरायचे आहे!' नंदनवार, आता परिस्थिती बदलली आहे. पण, मागची परिस्थिती मी विसरलेलो नाही. काही काळापुरती मला जीवनाच्या मोर्च्यापासून माघार घ्यावी लागली; पण कविता जगण्याचे युद्ध मी जिंकलो आहे! हे युद्ध जिंकल्यामुळे मी जीवनाचे युद्ध जिंकले आहे...
मला वाटतेय कि असे अनुभवच सुरेशजींच्या लेखाणीतून -
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो
हे शब्द साकारण्यास कारणीभूत ठरले असतील
अर्थात 'रूपगंधा' आणि 'रंग माझा वेगळा ' या काव्य संग्रहास मिळालेले राज्य शासनाचे पुरस्कार ,विद्यापीठ स्तरावर त्यांच्या काव्य रचना अभ्यासक्रमास निवडणे, विदर्भीय साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड या घटनाक्रमाने त्यांच्यातील माणूस नक्कीच सुखावला गेला असेल, कारण त्यामुळेच दुभंगून जाता जाता त्यांना म्हणावे वाटले -
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी
निमित्तास माझे गाणे ,निमित्तास टाळी
तरू काय ? इंद्रायणीचा मी तरंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
आणि शेवटी या रचनेवर मला नक्कीच असे वाटते कि,"सुरेशजी खरोखरच तुम्ही, तरू काय ? असा प्रश्न विचारण्याची खरोखरच अजिबात गरज नाही.
तुमच्या कार्याचा 'एल्गार' च सांगतोय कि ,तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'रंग माझा वेगळा' हा आम्हाला नुसताच दिसत नाही, तर त्यातील 'रसवंतीचा मुजरा' आम्हास 'सप्तरंग' दर्शवित 'रूपगंधा'तील 'झंझावात' आम्हा रसिकांना खरोखरच आतून हलवत उन्मळून टाकण्यास समर्थ आहे"
आज तुमच्या जयंतीच्या निमित्ताने इतकेच म्हणावे वाटते कि,तुम्ही आम्हाला सोडून गेलात तरीही-
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
अजुनी रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !
उष:काल होता होता काळरात्र झाली !

Wednesday, March 6, 2013

जागतिक महिला दिन.....अजून चालतोची वाट ...


आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी ते मलाला युसुफझाई ,माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे अजूनही वाट बिकटच आहे.
८ मार्च १९०८ साली मतदान ह्क्कासाठीचे न्यू यॉर्क मधील आंदोलन असो किंवा दोन दिवसांपूर्वीचे तरन  तारण येथील एका पिडीत महिलेचे एकाकी आंदोलन असो,जगण्याच्या प्राथमिक हक्काची लढाई स्त्री ला अजूनही लढावीच लागत आहे.
आणि हाच आपला सर्वात मोठा पराभव आहे.
तू अमला अविनाशी कीर्ती 
तू अवघ्या आशांची पूर्ती 
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा  ते नेई ....
अशी प्रार्थना माय भवानीस करताना आपण स्त्रीला परिपूर्ण आदिमायेच्या स्वरुपात पाहतो ते खरे कि, 
झेंडू बाम ते शीला कि जवानी या आयटेम सॉंग मधून पाहताना आपण जे हीन होतो ते खरे.... 
या प्रश्नांच्या गर्तेतून मला बाहेर पडायचे आहे.
बंदिनी स्त्री हि बंदिनी 
हृदयी पान्हा नयनी पाणी 
जन्मो जन्मीची कहाणी ...
बंदिनी स्त्री हि बंदिनी 
या ऐवजी ...
सत्यता शोधण्या घेउनी लेखणी 
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी 
दामिनी ...दामिनी 
या रुपात मला स्त्री कडे पहायचे आहे.
शेतावर राबणारी कष्टकरी ते कार्यालयातील सहचरी यापैकी  मला कोठेही भेटणाऱ्या स्त्रीचा संधी असून देखील मी गैरफायदा घेणार नाही.किंवा तिला अगतिक वाटेल असे वर्तन चुकून हि मी करणार नाही अशी प्रतिज्ञा जेंव्हा प्रत्येकजण स्वतःशी करेल 
तो खरा जागतिक महिला दिवस असेल.
..........आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी असा एखादा दिवस साजरा करण्याची गरजच उरणार नाही 

Wednesday, February 27, 2013

मराठी भाषा दिवस


   आज २७ फेब्रु २०१३ जेष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस.आपण हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.खरेतर मराठी आपली मातृभाषा,ज्यातून आपण नेहमीच सहजतेने व्यक्त होऊ शकतो त्या भाषेसाठी स्वतंत्र दिवस का म्हणून साजरा करायचाअसा प्रश्न मला नेहमीच पडतो.
 पण मग आपल्या याराजभाषेची आजची परीस्थीती यावर आपण अंतर्मुख होतो. वेगाने कमी होत चाललेल्या 
महानगरातील मराठी शाळां बाबत हळहळ व्यक्त करतो

 मग लक्षात येते कि आपले व्यक्त होणेच कमी होत चालले आहे आणि म्हणूनच आपण हा दिवस नक्कीच साजरा केला पाहिजे,जे मनात येते, बोलावे वाटते ते कागदावर उतरले पाहिजे. आपण जितके मनमोकळं व्यक्त होऊ तितकी आपली भाषा सकस होईल 

 आपण वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होऊ आणि आपले भाषा ज्ञान समृद्ध होईल.विचारांची गुंफण शब्दांचा मोत्यात केली कि खरोखरच त्यातुन सुंदर रास तयार होईल.आणि नव कल्पनांचा महासागर आपल्या भेटीला येईल.आणि मग आपणही कुसुमाग्रजांना स्मरून म्हणत राहू कि - अनंत आमुची ध्येया सक्ती अनंत आमुची आशा, किनारा तुला पामराला...