Monday, March 31, 2014

गुढी पाडवा-आठवण एका सृजनशील कुंभाराची !

आज गुढी पाडवा. जय नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शक १९३६ या वर्षारंभी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !

ब्रह्मदेवानी निर्मिलेल्या सृष्टीच्या प्रारंभ दिनाची नोंद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवून वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला तो हा दिवस.

भारतीय संस्कृतीस कालगणना चंद्र सूर्य यांचे परिभ्रमण यांचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून आहे. दिन दर्शिका, शून्य यांची जगाला देणगी हे आपल्या भारतीयांचे कर्तृत्व.
अशा अनेक कथा असल्या तरी आजच्या दिवसाशी जोडलेली शालिवाहन याची कथा मला सर्वाधिक भावते.

शालिवाहन नावाच्या कुंभाराने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यात प्राण भरले. या सैनिकांच्या मदतीने शकांचा पराभव केला तो दिवस म्हणजे आजचा गुढी पाडवा !

आता या घटनेची सत्यता शास्त्रीय आधारावर पडताळून पाहण्याची गरज जरासुद्धा वाटत नाही. कारण शालिवाहन हा कुंभार नव्हता तो होता सृजनशील नवनिर्मितीचा जनक.
त्याने मातीच्या सैनिकाच्या मूर्तीत प्राण भरले,म्हणजे ओल्या माती प्रमाणे स्वतःची ओळख  नसलेल्या अनेकांना अस्मितेची जाण करून दिली. ,सत्वा'ची ओळख पटवून दिली.ज्यामुळे त्या सैनिकात रणनीती ची निर्मिती झाली. आणि त्यामुळे त्यांनी शकांचा पराभव केला.

थोडक्यात काय तर ओल्या मातीत कोणताही आकार घेण्याची क्षमता असते,फक्त गरज असते वेळेवर त्यावरून कलात्मक बोटे फिरण्याची.हि बोटे कधी कुरवाळीत काम करतात तर कधी जरुरी प्रमाणे ताडतात. आणि त्याची जाण असलेला सृजन कलाकार म्हणजे कुंभार.
शालिवाहन हा असा सृजनशील कुंभार होता. त्याने प्राण फुंकून जिवंत केले ते सहा हजार सैनिक हा प्रातिनिधिक आकडा आहे.सैनिकांना त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची जाणीव करून दिली. त्याने असे अनेक कार्यकर्ते तयार केले.

ज्यांना स्वतःची ओळख नव्हती ती त्यांना मिळवून दिली. ज्या मधून त्या सैनिकांनी आपल्या देशसेवेची कार्याची गुढी उभारली. आणि या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्या दिवसापासून सुरु झालेली कालगणना शालिवाहनाच्या नावाने ओळखली जाते.

शालिवाहनाने जे काम केले त्याची अल्पशी पोहच म्हणून काळ गणनेस त्याचे नाव दिले गेले. कामातून त्याने जी स्वतःची ओळख निर्मिली तीच खरी गुढी उभारणी.त्यामुळेच गेली जवळ जवळ दोन हजार वर्षे या दिवशी आपण गुढी पाडवा शालीवाहनाच्या
नावे साजरा करीत आहोत.
आता वेळ आली आहे प्रत्येकाने कुंभार होण्याची, अगदी सहा हजार नाही पण किमान स्वतःला  ओळखून सत्वाचा आकार घेत काही नव निर्मिती करण्याची. सत असत मधील फरक ओळखून योग्य बाजूने निर्णय घेण्याची.जर हे मनापासून करता आले तर त्यातून उभी राहणारी गुढी अशी काही उंची गाठेल कि तेच खरे स्वर्गारोहण ठरेल.
   

Wednesday, February 26, 2014

चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।

'महाशिवरात्र ' -शिव शक्ती समोर नतमस्तक होण्याचे भाग्य उपलब्ध करून देणारा सोहळा.महाशिवरात्रीच्या निमित्ताने काही लिहावे म्हणून अनेकदा लेखणी सरसावली, पण शब्द आकार घेण्यास तयारच नव्हते.का बरे असे होत असेल? सर्व सगुण साकार असून हि माझे विचार असे सतत निर्गुण निराकार का होत आहेत? मी नतमस्तक आहे का निष्प्रभ आहे? अश्या अनेक प्रश्नांच्या गर्तेत मी सतत हेलकावे खात होतो.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने व शिवभक्ती साठी केले जाणारे महारुद्र स्मरणात आले .रुद्र म्हणजे काय ? यावर मनात सतत चिंतन सुरु झाले. आणि मन एकदम शालेय जीवनात गेले.
रुद्राची पहिली ओळख तेंव्हा पाठ्यपुस्तकातून झाली होती. अर्थात तेंव्हा जी ओळख वाटली ती हलकीशी झलक होती. निसटता स्पर्श होता. असे आता मागे वळून पाहताना वाटते. त्यावेळी कविवर्य भा. रा. तांबे यांची एक नितांत सुदर कविता 'रुद्रास आवाहन' अभ्यासास होती आणि त्या कवितेचे ध्रुव पद आज पस्तीस वर्षांनतर देखील -
'डुमडुमत डमरू ये ,खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये येई रुद्रा ..
हे जसेच्या तसे मनात रुंजी घालत आहे.खरेतर या कवितेने खरोखरच प्रार्थना जशी नतमस्तक होवून केली जाते तशीती अत्यंत त्वेषाने देखील करता येते हेच दाखवून दिले होते आणि म्हणूनच ते या प्रार्थनेस आवाहन असे म्हणतात.या जोशपूर्ण आवाहनाचा शेवट करताना तांबे म्हणतात -'जे जयांचे तया वीरभद्रा '!
आज महारुद्राच्या निमित्ताने त्याच ओळी मला पुन्हा एकदा नव्याने उमजल्या. आपल्या संस्कृती प्रमाणे आपण देव देवतांची अनेक रूपे मानतो. प्रत्येक देव देवतेची स्वतंत्र ओळख आणि एक मूर्त आपण प्रथम मनात मग प्रत्यक्षात साकारतो.आपल्या मनातील त्या देवतेस आपण मनपूर्वक सजवतो. ते सजवणे हीच एक प्रार्थना ठरते.वस्त्रालंकार,आभूषणे यातून सजगतेने आपण त्या मूर्तीत चैतन्य उतरवतो.याच बरोबर आपण आपल्या या मूर्तीस विविध आयुधांसह बलशाली बनवतो.
आपण आज ज्या सांभ सदाशिव ' महादेवास ' आशीर्वाद देण्यास विनवीत आहोत तो महादेव अन्य कोणत्याही देवांपेक्षा या सर्वच बाबतीत भिन्न ठरतो. उंची वस्त्रालंकार किंवा विविध आभूषणे यांनी सजण्या ऐवजी 'रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, आणि लेवुनिया भस्म कपाळा ' असा सजलेला हा देव कोणत्याही शाही आसनाची अपेक्षा न ठेवता व्याघ्र चामरावर विराजतो.
मात्र या 'शिवशक्ती'ची आयुधे मात्र सर्वस्वी वैशिष्टपूर्ण आहेत.डमरू,त्रिशूळ आणि शंख या तिहेरी आयुधांच्या वापरातून हा त्रिनेत्री देव आपले सातत्याने रक्षण करतो असे वाटते.डमरू नादातून तो आपणास जागरूक करतो, त्रिशुळाच्या खणखणाटातून तो आपणास सजग ठेवतो तर शंखध्वनीतूनतो आपणास भानावर आणतो.
म्हणजेच या रुद्रावतारी देवाचा या आयुधांचा प्रथम वापर हा नादब्रम्हातून आहे. गरज आहे आपण आपले कान उघडे ठेवून ते ऐकण्याची.'डमरू' च्या आवाजातून जागरूक हो हे त्याचे सांगणे म्हणजे जगताना बरे वाईट,मोहमयी काय ते समजून घे.
या डमरू च्या आवाजातील संदेश जर आपल्या पर्यंत पोचलाच नाही तर 'त्रिशुळा' चा खणखणाट आपणास बजावतो.अरे तुझे कान उघडे आहेत पण तू नाद ब्रह्मातील आवाज काय ध्वनित करतोय हेच ऐकत नाही आहेस.आवाज कानावरपडला पण तो आत पोचलाच नाही तर त्याचा उपयोग नाही, हे विसरू नकोस.
जर डमरू आणि त्रिशुळ यांच्या आवाजातील ध्वनित अर्थ भक्तासाठी अपुरे ठरले तर हा भैरव 'शंखा' च्या नाद लहरी अश्याप्रकारे उमटवतो कि त्या लहरीच्या नादमय लाटा भक्तास वास्तव जगाच्या परिघाच्या पलीकडे नेवून जाणीवेतून नेणीवेत नेवूनच भानावर आणतात.
म्हणूनच आपण देखील रुद्राच्या अभिषेकातून स्वतःस शुचिर्भूत करून घेण्याचे भाग्य आपल्या पदरी पडून घेवू.या ओंकार रुपी शिवाचे आत्मषटकात श्री आदी शंकराचार्य यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे अनुभूतीच्या पलीकडील त्यास शरण जाऊ, यातच आपले परम भाग्य दडलेले आहे.
कदाचित या महारुद्राच्या निमित्ताने चराचरात दडून राहिलेले माझ्यातील विश्व अथवा विश्वातील मी यांचे परस्परातील नाते उलगडले जाईल आणि थोड्या काळात माझ्यात कालातीत बदल घडेल. कदाचित मला अग्नीची होरपळ,पाण्याची तहान,विश्वाची व्याप्ती आणि श्रद्धेची अनुभूती यांची अल्पशी जाणीव होईल आणि माझ्या ओठी नेहमीच राहिल ते शब्द ब्रम्ह असेल -
अहं निर्विकल्पो निराकार रूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वन्द्रियाणि ।
सदा मी समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरुपः शिवोSहं शिवो S हम ।।

Saturday, February 15, 2014

'अब तक पचपन ' -च्या निमित्ताने

 तसा माझा आणि 'चेहरे पुस्तका 'चा परिचय थोडा कमीच. आणि त्यावर व्यक्त होताना एकूणच मला जरा मर्यादाच येतात.
पण जेंव्हा कोणी वाढ दिवस लक्षात ठेवून शुभेच्छा  देते तेंव्हा मात्र मन सुखावते. पाश्चिमात्य जगात जर कोणी जन्म तारीख विचारली तर एक जानेवारी किंवा सात मार्च अशीच सांगतात. का तर वय किती झाले ?या प्रश्नाला उत्तर देण्याचे धाडस नसणे असेच मला वाटते.

मीही आत्ता पर्यंत जन्म तारीख वर्ष वगळूनच सांगत असे, पण त्या मागे वय लपवणे हा हेतू कधीच नव्हता. पण मनात नेहमीच एक भीती वाटत असे कि समोरून येणाऱ्या शुभेच्छा जश्या प्रामाणिक असतात तश्या जर….अश्याही आल्यातर काय ? आणि अश्याही म्हणजे काय तर ….

आज कितवा वाढदिवस ? या प्रश्नाला …
जेंव्हा मी अठरा असे उत्तर दिले होते तेंव्हा जसे अरे वा आता मतदानाचा हक्क मिळाला अभिनंदन ! हे जसे ऐकायला मिळाले तसेच अठरा वर्षाचा घोडा झाला पण अजून बसून खातो असा आवाज देखील आला होता .

जेंव्हा मी पंचवीस असे उत्तर दिले होते तेंव्हा जसे अरे वा म्हणजे आता संसारात पडायला हरकत नाही हा जसा सूर होता तसेच नुसतीच गद्धे पंचविशी  झाली स्वतःचे स्वतः बघायला शिकणार म्हणून नाही हा सूर देखील ऐकला होता .
जेंव्हा तीस असे उत्तर दिले होते तेंव्हा खरे कि काय बघून वाटत नाही अशी प्रतिक्रिया असे तसेच अजून मुलगी पसंत नाही का ? या सरळ प्रश्ना मागे याला कोण पसंत करणार ! हे हि दडलेले असे.

अशीच वर्ष मागून वर्षे जात होती कधी चांगल्या, कधी उत्स्फूर्त, कधी कडवट अश्या अनेक अनेक प्रतिक्रियांची शिदोरी बरोबर घेत प्रवास सुरूच होता मग लक्षात आले वर्षा मागून वर्षे जातच  असतात, तुम्ही जगात जगता, कारण मरण आपल्या हातात नाही म्हणून पण जर तुम्ही थोडे जरी इतरांसाठी जगलात तर तुमचे जगणे इतरांसाठी नोंद घेण्या  जोगे असते. नाहीतर मग तुम्हाला नेहमीच संमिश्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागेल याची जाण  ठेवून जगणे महत्वाचे.
अशी " अब तक पचपन  " संपली आहेत जर ईश्वर कृपेने अंकी काही वर्षे जगलो तर निदान लोकांनी "साठी बुद्घी नाठी " असे म्हणू नये इतपत जाण ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना श्री चरणी करून ज्यांनी आज शुभेच्छा दिल्या त्या सर्व हितचिंतकांचे मनपूर्वक आभार मानतो!