Saturday, March 31, 2018

मला समजलेले तुकाराम -३

संत तुकाराम यांनी भागवत धर्म आणि त्याचे आचरण यांचे महत्व सांगताना, सामान्य वारकरी सतत डोळ्यासमोर ठेवला होता. आणि नामस्मरण, एकाग्र चित्त याद्वारे आपला दिनक्रम पार पडताना विठ्ठल भक्तीतून सरळ मार्गी जीवन आणि त्यामुळे मिळणारे सात्विक समाधान याचे महत्व सातत्याने नमूद केले आहे . त्यामुळे आपल्यात विठ्ठल किंवा विठ्ठल भक्त्तीत आपण कसे मग्न झाले पाहिजे हे सांगताना ते म्हणतात -

विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती । विठ्ठल विश्रांती भोग जया ।।१।।
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनी । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ।।ध्रु ।।
विठ्ठल जागृतीस्वप्नी सुषुप्ति । आन दुजे नेणती विठ्ठलेंविण ।।२।।
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरा ।।३।।
तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुरालें दुजेपणें ।।४।।

या अभंग रचनेतून आपण ज्याची भक्त्ती करतो तो ईश्वर चराचरात आहे हा मुद्दा पटवून देण्यासाठी जणू त्यांनी ठायी ठायी विठ्ठलाचे भान ठेवा असा आग्रहाचा सल्ला दिला आहे .त्याचे स्मरण गाण्यात असुदे ,मनात असुदे , आयुष्याचा  उपभोग घेताना विठ्ठलाची आठवण विसावा घेताना राहूदे .
उठता बसता ,झोपेत जागेपणी खाता पिता या सर्व जाणिवेच्या क्रिया करताना विठ्ठल आठवा हे ते सांगतात . पण त्या पलीकडे जाऊन नेणिवेत देखील विठ्ठल हवाच हे सांगताना त्यांनी सुषुप्ती या शब्दाचा केलेला वापर खरोखर स्तंभित करणारा आहे .
कारण सुषुप्ती या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ संपूर्ण निसर्ग रचने आत्मभान ठेवत जाणीव जपणारी परिपूर्ण अवस्था असा आहे तर या अवस्थेत देखील त्याची आठवण ठेवणे म्हणजेच जाणिवेतून नेणिवेकडे जाणे आहे हे त्यांनी समजावून दिले आहे .
माणूस जसा आभूषणे अलंकार यांनी नटला कि सुखावतो तसे तुम्ही विठ्ठल भक्तीत भरून जाता . आणि या विठ्ठल भक्त्तीचे असामान्यत्व अधोरेखित करताना ते म्हणतात , अशी मनपूर्वक जे त्याचे स्मरण ठेवतात ते माझ्या साठी विठ्ठलच आहेत . आणि दुसऱ्या कोणत्या विठ्ठलाची आस उरलीच नाही .

अर्थात हे मला भावलेले मी आपणासमोर मांडले , आणि हेच माझे तुकोबाच्या नजरेतील विठ्ठल दर्शन आहे .

Wednesday, February 28, 2018

मला समजलेले तुकाराम -२



          संत तुकाराम म्हटले कि भागवत धर्म आणि त्यांनी केलेला लोकजागर या दोन गोष्टी आपण विसरूच शकत नाही . पंढरीचा विठुराया हे जनसामान्यांचे आराध्य दैवत आहे ,आणि जनजागृतीसाठी विठलचरणी लिन होण्यासारखे प्रभावी साधन नाही याची जाण तुकाराम महाराजांना पुरेपूर होती . मात्र या विठ्ठल भक्तीचा त्यांनी जनजागृतीसाठी वापर केला असे न म्हणता मी म्हणेन कि त्यांनी लोकांच्या विठ्ठल भक्तीचा आदर केला .

          विठ्ठल महात्म्य जनसामान्यांना समजावण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक अभंगाबाबत आपण अभ्यास करू शकतो.. पण तुकारामांनी आपले विठ्ठलाशी असलेले नाते समजावून सांगताना विठ्ठलास इतक्या विविध रूपात पहिले आहे कि , तुकाराम आणि विठ्ठल यांना आपण वेगळे करूच शकत नाही .
त्यांच्या एका रचनेत ते म्हणतात -

विठ्ठल टाळ  विठ्ठल दिंडी !विठ्ठल तोंडी उच्चारा !!१!!
विठ्ठल अवघ्या भांडवला ! विठ्ठल बोला विठ्ठल !! ध्रु !!
विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद  विठ्ठल !! २!!
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा ! तुकया मुखा  विठ्ठल !! ३!!

         याठिकाणी टाळातील लय त्यांना विठ्ठलात दिसते, आणि दिंडीतील भान हरपून समरसणे त्यांना अचूक टिपता येते . वारीतील सहभाग त्यांना अशारीरिक पातळीवर अभिप्रेत असावा असे मला वाटते. म्हणून तोंडी विठोबाचे नाव असावे असे सांगता सांगता त्यांनी विठ्ठल भक्तीची  पुढची पायरी नाद पार करून तुम्ही
या भक्तीच्या छंदात रममाण होण्याचा सल्ला ते सहजतेने देतात.

        कधीकधी एखादे लहान मुल भवताल विसरून जेंव्हा स्वतः मध्ये रममाण होते आणि आपलेच भान विसरून जाते आणि त्याच्या त्या कृतीला त्या बाळाची आई सहजतेने म्हणते ,"नादिष्ट आहे अगदी ! " तो नाद तुकोबांना विठ्ठल भक्तीत हवा आहे . आणि वाढत्या वयानंतर माणसाला आपल्या उपजीविकेच्या पलीकडे कुठेतरी स्वानंद देणाऱ्या आणि समाजप्रिय कार्यात गुंतवून घेण्याच्या वृत्तीस छंद म्हणवून घेता आले पाहिजे असे काहीतरी तुकोबांना वाटले आणि म्हणून त्यांनी -विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद  विठ्ठल ! असे सांगितले असावे असे वाटत राहते.

        कारण शेवटी जगण्याच्या धडपडीत सुख आणि दुःख हे व्यक्तिसापेक्ष आणि  बदलते असले तरी ते प्रत्येकास अनुभवावे लागतेच . मात्र हा जीवनानुभव घेताना त्यास सामोरे जाताना तुमच्या जगण्यात सहजता यावी म्हणून विठ्ठलाचे स्मरण ठेवा हे सांगताना आधी केले मग सांगितले या तत्वा नुसार या रचणे सांगता करताना तुकोबा म्हणतात -  तुकया मुखा  विठ्ठल !! ३!!

       म्हणजेच तुम्हाला कोणी नादिष्ट कोणी छंदिष्ट म्हटले तरी स्वानंद घेण्यासाठी समाजहित साधने हीच खरी साधना हाच अर्थ मला या रचनेत दिसला . 

Monday, February 19, 2018

मला समजलेले तुकाराम


नुकताच माझा वाढदिवस झाला , किती जगलो ,किती वय झाले हे महत्वाचे, कि कसा जगलो ते महत्वाचे,असा विचार मनात आला . म्हणजे आता वय झाले असे  नाही तर आपण नक्की काय साधले  ? काय मिळवले ?  असा स्वतःला प्रश्न विचारला .

मग गेल्या अनेक वाढदिवसांच्या निमित्ताने आलेल्या भेटवस्तूंची पाहणी केली , आणि त्यातील एका पुस्तकरूपी भेटीपाशी मन थबकले , कारण माझ्या एका सहकारी मित्राने मला  माझा वाढदिवस होता आणि मी माझी पी. एचडी पूर्ण केली म्हणून  भेट  दिली होती , ते पुस्तक म्हणजे संत तुकाराम यांचे - ' अभंगाचा गाथा '

अर्थात गेले अनेक दिवस ते पुस्तक वाचावयास घेणे राहून जात होते, कारण ते पुस्तक हातात घेतले कि, मला माझ्या त्या मित्राची आठवण येते आणि आज तो या जगात नसल्याने मन त्याच्या आठवणींनी विचलित होते. पण नंतर जेंव्हा या पुस्तकाचे वाचन सुरु केले तेंव्हा बुवांच्या अफाट बुद्धिमत्तेने स्तंभित झालो .

गाथेतील अभंग वाचताना मन नतमस्तक होते. संत परंपरेतील प्रत्येक संत महानच आहेत पण विठ्ठल रुपी प्रबोधनाच्या मंदिर उभारणीतील या संतांचा सहभाग सातत्याने अधोरेखित होतो. आणि  ' ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस । ' या वाक्याची प्रचिती पदोपदी येते .

संत तुकारामांनी भागवत धर्म आणि विठ्ठल भक्ती यातून समाज प्रबोधन करताना जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे . आणि या समाज परिवर्तनाच्या कार्याची अफाट ताकद जेंव्हा त्यावेळच्या तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या लक्षात आली तेंव्हा त्यांनी तुकाराम महाराज यांच्या या कार्यास विरोध केला . त्यातून त्यांनी त्यांच्या हस्तलिखित प्रति इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या .

तेंव्हा त्या डोहात त्या हस्तलिखित प्रति बुडाल्या, पण महाराजांनी प्रबोधनातून केलेला जनमानसावरील ठसा कधीच पुसता आला नाही त्यामुळे गाथेतील संदेश कायमचा टिकून राहिला .अशा या अभंगांमधील काही निवडक काही परिचित काही अपरिचित अभंगांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे . म्हणूनच या लेख मालेचे शीर्षक आहे - मला समजलेले तुकाराम .

 प्रत्यक्ष गाथा वाचन आणि अभंगांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सुरु करण्या पूर्वी , या घटनेच्या इतिहासाचा मागोवा घेताना अचानक मनात पुढील ओळी आल्या - 


                                   बुडविली गाथा डोही । इंद्रायणीस  भार नाही ।

                                   दुभंगली पाने शाई। प्रत्येक मनी  आक्रोश राही ।।१।।

                                   दांभिक पंडित चेकाळले । बुवा मनी  थरारले ।

                                   घातले विठुरायास साकडे । गाथा आली तुजकडे ।।२।।

                                    विठ्ठल मनी आठवता  । गाथाच  झाली सरिता  ।

                                    गाथा स्थिरावली डोही । अभंग झाले प्रवाही ।।३।।

Wednesday, January 31, 2018

ऐसे ही किसी रोज ना जाने के लिए आ ....

ऐसे ही किसी रोज ना जाने  के लिए  आ ....

दूरवर हलकेसे वरील शब्द कानावर पडले आणि कुठेतरी खोलवर तिच्या आठवणीने गलबलून आले . तिच्या माझ्यातील नाते संबंध आणि हि गझल किती समांतर आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येत गेली .

खरे तर तिची माझी भेट झाली त्याला आता तीन दशके संपून गेलीत , जगासाठी ती कुमारी ,सौभाग्यवती आणि आता विधवा अशा अनेक रूपात माहित असेल पण माझ्या साठी मात्र ती या नितांत सुंदर गझलेतील प्रेयसीच आहे .

पहिली सुरवातीची तिची ओढ म्हणजे सगळे जग सोडून धावत येऊन गळ्यात पडणे म्हणजे काय असते याची प्रचती होती . काळ पुढे धावत होता ,प्रेमा पलीकडे असलेल्या वास्तव जगाचे प्रश्न समोर आले होते , जीवनात किमान स्थैर्य येण्याची धडपड सुरु असतानाच तिला घरच्यांच्या दबावाला झुकून लग्नासाठी उभे राहावे लागले होते .

त्यावेळी तिने तिची अगतिकता एका छोट्या पत्राने मला कळवली होती . त्याचे पाठवलेले उत्तर तिला कधीच मिळाले नाही . माझा होकार माझ्या मनात तसाच राहिला .  तिचा साखरपुडा झाला आणि एकदा तिच्या नियोजित वरा  बरोबर फिरावयास बागेत आलेली नजरेस पडली ती दुरून झालेली नजर भेट तिने स्वीकारलेला निर्णय किती अगतिकतेमधून आहे हेच सांगत होती .पण आता मागे वळून येणे तिला शक्य नव्हते ,ती तिच्या मार्गाने पुढे गेली  आणि ती सौभाग्यवती झाली पण अन्य कोणासाठी तरी ....

आणि मी तिच्या समोर असताना काहीही ओळख दिली  नाही कारण मला तिच्या जीवनात जरासुद्धा दुःख असावे असे कधीच वाटले नाही पण मन मात्र आक्रनंदुन म्हणत होते -----

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।

कारण असे वाटायचे अजूनही काहीतरी असे घडेल , ती येईल प्रेम करण्यासाठी नाही तर माझ्या प्रेमाला धक्का देण्यासाठी येईल एकदाच भेटून ती का दुसऱ्याची झाली हे डोळ्यात पाणी आणून सांगेल आणि मला त्या गझलेतील पुढील शब्द माझी आर्तता तिला पोहचवत आहेत  असे वाटून ओठावर  शब्द आले .....


रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

मन जरी म्हणत असले तुला त्रास नको तू आता माझी नाहीसच तर मी का तुझा हट्ट धरावा , म्हणून समाजासाठी ये ,सोडून जाण्यासाठी ये , असे  प्रेयसीला मन म्हणत असले तरी हृदयाचा आवाज तिला इतकेच सांगू इच्छित आहे कि ....

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ


रंजिश ही सही... ( एक कल्पना चित्र - मनातल्या काल्पनिक प्रेयसीचे )


Thursday, January 25, 2018

भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

दिनांक ३१ डिसेंबर २०१० या दिवशी मी ' मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने ' या ब्लॉग लिखाणास सुरवात केली . प्रथम लेखांचा / कवितांचा किंवा काहीतरी लिहीत राहण्याचा वेग बरा होता. पण गेली दोन तीन वर्षे लिखाण जवळ जवळ थांबलेच .

पण आता पुन्हा काही तरी लिहीत राहावे . जरा मनमोकळेपणाने व्यक्त व्हावे असे वाटायला लागलेय म्हणून पुन्हा सुरवात करायचे ठरवलंय . बघू कसे जमतेय . बरेच दिवस  कोरा असलेला कॅनव्हास काही रंग भरले तर बोलेल का ? त्यावरचे चित्र मनोगत उलगडून दाखवण्यास समर्थ ठरेल का ? अशा काही शंकांनी मन भरून गेले आहे . पण रेखाटन केल्याशिवाय जसे चित्र पूर्ण होत नाही तसे मनातील  भावनांना शब्दरूप दिल्याशिवाय मनास . हलके वाटत नाही हेच खरे .

जेंव्हा ब्लॉग लिखाण सुरु केले तेंव्हा आपला ब्लॉग कोणी वाचेल का ? अशी एक पुसटशी शंका मनात होतीच . नियमित लिखाण असताना एक ते आठ हजार पर्यंत वाचकांच्या भेटी टप्या टप्याने होत गेल्या पण लिखाण थांबल्यानंतर देखील होणाऱ्या वाचक भेटीने अकरा  हजार  भेटीचा टप्पा गाठला आणि पुन्हा काहीतरी  लिहावे  या विचारांनी उचल खाल्ली .

तर मग आता किमान महिन्यातून दोनदा मी आपणास  भेटणार ,  म्हणजे मी आता पुनर्भेटीस येत आहे . कधीआनंद देणार तर कधी कंटाळून टाकणार ( बोअर करणार ), बघू आता त्यात तरी नियमीत पणा ठेवता येतोय का ?

कारण आपल्या पुनर्भेटीची ओढ मलाच स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी पुन्हा ब्लॉगकडे वळालोय , तर करणार ना स्वागत माझ्या स्वनिमंत्रित भेटीचे ?