Thursday, December 2, 2010

'मैफिल एका रात्रीची'

तिची माझी पहिली भेट माझ्या मित्राच्या घरी झाली. मी नुकतेच कॉलेज सुरु केले होते. ती तिच्या बहिणी बरोबर आलेली. गोरी गोरी गोबरे गाल छानसा ड्रेस अंगावर .डोळे इतके बोलके कि, जणू सतत हसून काहीतरी सांगत आहेत. तेंव्हा वाटले हीच ती सोनपरी ! जिचा आपण शोध घेत आहोत. पण सगळे मनातल्या मनात, कोणास सांगणार कि हि आवडली आहे. आणि जिथे घर न दार, शिक्षण नातेवाईकांचे मेहरबानीने चाललेले. आई पुण्यात कष्ट काढती आहे, म्हणजे जबाबदारी हि की शिकून घराला हातभार लावण्याची गरज प्रथम पूर्ण करणे जरुरीचे.

दोन दिवस आठवणीत गेले.मन उदास झाले. आणि आपोआप दिनचक्र सुरु झाले.सोनेरी दिवस उडून गेले. पुण्यात येवून पुढील जीवनक्रम सुरु झाला. वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाई बागडताना दिसली कि मन उडत उडत मित्राचे घरी पोहचत असे, सोनपरीला आठवून परत येत असे. पण एक दिवस अघटीत घडले. माझ्या मित्राने काही कारणाने तिच्या बहिणीचा पुण्यातील पत्ता दिला.आणि तिला काही निरोप देण्यास सांगितले.मध्ये काळ गेला होता दीड तपाचा. मी मित्राचा निरोप घेवून तिच्या बहिणीचे घरी गेलो. भेटीने ती ही आनंदली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निघता निघता सहजच तिला “तुझी घाकटी बहिण काय करतेय ? “ म्हणून विचारले आणि तिने सांगितले कि, “अरे आता ती खूप काही करते आम्हा बहिणीतील ती एकमेव आहे जी जणू मुलगा होवून बाबा गेल्यावर आईला सांभाळते आहे”. गाणे शिकून सूर पकडला आहे. उच्च पदवी तीही अर्थशास्त्रातील घेवून बँकेत नोकरी करते आहे. सर्व ऐकून मी सर्दच झालो. अरे गोबऱ्या गालाची सोनपरी सोनसळी कधी झाली. खरच एकदा भेटलेच पाहिजे असे मानस बजावत निघणार इतक्यात थोरली सहज म्हणून गेली आज ती पुण्यास येणार आहे. तिची गाडी स्वारगेटला सहा वाजता येईल. मी ऐकून न ऐकल्यासारखे केले. आणि निघतो म्हणून बाहेर पडलो. घड्याळात बघितले ५.१५ वाजत आले होते. मोटारसायकलला किक मारली आणि थेट स्वारगेट गाठले. मन म्हणाले काय वेडेपणा करतोयस? पंधरा वर्षांपूर्वीची भेट. आता ती एक सुरेख गायिका, नोकरीत स्थिरावलेली. काय म्हणून तुला ओळख देईल. पण अंतर्मन म्हणत होते अरे तू तिला ओळखतोस ते सोनपरी म्हणून भेटून तर बघ.

गाडीने प्रवेश केला. गर्दी ओसरू लागली आणि तिला ओळखण्याचा प्रश्नच उरला नाही. तेच बोलके डोळे तेच गोबरे गाल, छे छे ते गोबरे गाल आता आरक्त झाले होते. तिला पाहताच अंगावरून एक लाट गेली. मी पुढे झालो. आणि आणि काय आश्चर्य तिने पहिले आणि तिने जिंकले. इतकी गोड हसली म्हणून सांगू , जणू पंधरा वर्षे नाही तर पंधरा दिवसानीच भेटतो आहोत. मला विचारले “अरे! तू इथे कसा काय? “ मी खरे तर तिच्या बहिणीकडे ती येणार हे कळले म्हणून आलो होतो पण मी तिच्याशी चक्क खोटे बोललो. म्हटले,”अग घरी पाहुणे आले होते त्यांना निरोप देवून परत चाललो होतो आणि तू अचानक दिसलीस.” माझ्या बोलण्यातील खोटेपणाचा जरासुद्धा वास तिला आला नाही. उलट ती तर इतकी खुश दिसली कि जणू मी तिलाच उतरवून घ्यायला आलो आहे. मी विचारले मी सोडू का तुला बहिणी कडे तर ती सहजच हो म्हणाली. मग काय मला तर स्वर्ग दोन बोटे उरला. तिची बँग गाडीवर मागे बांधली. आणि मोटारसायकलला किक मारली. माझी सोनपरी माझ्या मागे मला खेटून ( जागाच कमी असल्याने) बसली होती. मी तिला प्रवास कसा झाला ? विचारले ती “ छान ” म्हणाली. मन म्हणाले कोणता प्रवास विचारतोयस पंधरा मिनिटांपूर्वी संपलेला कि पंधरा वर्षांपूर्वी सुरु झालेला. तिच्या बहिणीचे घर आले पटकन उतरून ती घरात गेली आणि बहिणीला म्हणाली, “ अग ताई ! कोणी सोडले मला बघ. मला पाहून बहिण म्हणाली, “तुझी कोठे भेट झाली?”मी म्हणालो, “ अग!स्वारगेटला हि अचानक भेटली.” त्यावर ती म्हणाली, “ बरे झाले “ आणि माझी खूप काही गणिते मांडून तिला गाडीवरून आणण्याची धावपळ इतरांना 'अचानक' वाटली. पण मला माझी सोनपरी पुन्हा भेटली, तो योग मात्र असा अचानक आला होतो. तिला अच्छा ! म्हणून बाहेर पडलो.पण मानस वाटले कि, माझ्या मित्राने तिच्या बहिणीचा पत्ता देवून जणू माझ्या हाती जादूच्या पेटीची चावीच दिली आहे.

असेच दिवस चालले होते. नियतीच्या मनात काय होते कोणास ठाऊक? पण त्या बहिणीकडे जाणे येणे कमी होत गेले. संपर्कच राहिला नाही. बघता बघता चार/पाच वर्षे गेली. घरून असणारा सततचा तगादा,आईचे कष्ट पाहता लग्नास उभे राहणे हि कर्तव्याची बाब झाली आणि त्यातून माझे लग्न झाले सोनपरीला भेटण्याचे स्वप्न तसेच राहिले. जणू सागर किनाऱ्यावर शोधून शोधून हाती आलेला परीस कधी निसटून गेला तेच समजले नाही.

माझ्या लग्न नंतरची गोष्ट. एक दिवस ध्यानी मनी नसताना,पुन्हा तिच्या बहिणीची भेट घडून आली. जुने दिवस, जुन्या आठवणींचे मोहळच उठले. मला आठवतेय जवळ जवळ सहा तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आठवणीचा वारू चौखूर उधळला होता.त्याने तिचे माहेर, माझ्या मित्राचे गाव,माझे आजोळ असा खूप खूप प्रवास आम्हाला सहा तासात घडवून आणला होता. गप्पा निघता निघता माझ्या सोनपरीपाशी आल्या . एक मन म्हणत होते कशाला पुन्हा पुन्हा खपली काढून रक्त बंबाळ होतोस तर एक मन म्हणत होते अरे निदान डोकावून तरी येना सोनपरीच्या राज्यातून. “कशी आहे ग ती?”मी अगदी सहजतेने विचारले. “अरे!ती न” असे म्हणून बहिण गप्प झाली. जणू तिचे शब्द नव्हे, श्वासच थांबले होते. मी हि भांबावलो. आपले काही चुकले का? असे वाटले. मग मी सावरत म्हटले,”अग बरेच दिवस काहीच कळले नाही म्हणून विचारले. ”आता कोठे असते. आनंदात आहे ना तिचा संसार? मग मात्र डोळ्यात पाणी आणून बहिण बोलती झाली म्हणाली,”अरे ! फार मनस्वी आहे ती. कोणाशी म्हणून बोलत नाही.लग्नच करणार नाही म्हणते.”

काय करू ? तू तरी सांगशील का तिला काही समजावून ! २७/२८ म्हणजे अजूनही फार उशीर नाही झालेला पण दिवस काय थांबतात का रे कोणासाठी? बोलशील ना एकदा तिच्याशी.” “माझ्यासाठी एवढे करच”. जणू तिने हुकुमच सोडला. जणू काही मी तिला नाही म्हणूच नये. माझ्या मनात चर्र झाले. जिची इच्छा मनात धरली, पण भावना कोठेच उलगडली नाही, त्या माझ्या सोनपरीचे इतके नाजूक मर्मबंध पुन्हा एकदा उसळून आले.मी गुंतून तर जाणार नाही ना ? पण दुसरे मन म्हणाले अरे खरेच आवडली होती ना मनापासून. केले होतेस न अबोल प्रेम तिजवर. मग आता निदान तिचे सुख शोधण्याची तिच्या बहिणीची इच्छा तरी पुरी कर.

माझी संभ्रमित अवस्था पाहून तिची बहिण म्हणाली, “ तुला अवघड वाटणार असेल तर राहू दे. उगाच मी बोलले. “ त्यावर मी पटकन म्हणालो,” अस काय म्हणतेस मी नक्कीच बोलेन तिच्याशी.” आणि माझ्या त्या होकाराने बहिणीच्या डोळ्यात समाधानाचे आनंदाश्रू आले. मग सोनपरीला पुण्यातच बहिणीने बोलवायचे आणि मग तिला घेवून मी बाहेर जायचे आणि आम्ही बोलून यायचे, असे ठरवून आम्ही परस्परांचा निरोप घेतला. बहिणीच्या दृष्टीने तिने अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माझा आधार घेतला होता तर मी मात्र आठवणीच्या गर्तेत गटांगळ्या खात होतो.

त्या काळात माझ्या मनाची अवस्था अशी काही होती कि, घरात सुद्धा दोन तीन वेळा “हल्ली काय तुझे मन थाऱ्यावर नसते का? काही विचारले कि लक्ष नसते. जेवताना काही पाहिजे का म्हटले कि हो नाही, नको नाही. काय झालेय तुला ?”असे प्रश्न येवू लागले.मग मात्र ठरवले जावू दे, आपण तटस्थ राहून, मगच खरी मदत सोनपरीला करू शकतो. आणि निग्रहाने शांत होण्याचे ठरवले. अवघड गेले ते अमलात आणताना. पण अखेर यश आले चित्त स्थिरावले. दैनंदिनी पुढे सरकू लागली. आणि एक दिवस तो दिवस उजाडला तिच्या बहिणीचा फोन आला कि, ती आली आहे एकदा येवून जा.त्याच दिवशी संध्याकाळी मोटारसायकल काढली तिच्या बहिणीचे घरी गेलो. तर सोनपरी गावाहून आलेली. तेच हसरे आणि बोलके डोळे.पण यावेळी थोडी अंतर्मुख वाटली. तिला म्हटले,”चल!इतके वेळा पुण्यात ताईकडे येतेस पण घरी कधीच आलेली नाहीस आज जावून येवू” ती सहजतेने हो!म्हणाली. बहिणीचा तर काही प्रश्नच नव्हता. तिला मोटारसायकल वर घेतले. पण आज तो शहारा नव्हता. तिला म्हटले घरी कोणीच नाही तेंव्हा आपण बाहेरच काहीतरी खावून मग घरी जावून येवू. चालेल का ? ती लगेचच तयार झाली. मला आठवतेय पुण्याबाहेर कोथरूड/ कर्वेनगर उपनगरात कोठेतरी 'योगी' नावाचे हॉटेलात आम्ही आलो. जणू काही माझ्या अंगी पण तीच स्थितप्रज्ञता हवी होती जी योगी टिकवून ठेवतो.काय खाणार विचारले तर खास काहीच उत्तर नाही. शेवटी मीच प्रथम सूप घेवू म्हणत,हॉट अॅन्ड सोअर सूपची ऑर्डर दिली.तिचे लक्ष न खाण्यात न बोलण्यात भिर भिर अवस्थाच झालेली.

शेवटी मनाचा हिय्या करून विषयाला हात घातला आणि सरळ सरळ विचारले,” तू लग्न का करत नाहीस?”.तिने खाणे थांबवले आणि म्हणाली, “जेंव्हा तुझी वाट पहिली तेंव्हा कुठे होतास? “आणि आता स्वतःचे घर संसार झाल्यावर मला विचारतोस कि, लग्न का करत नाहीस? तुला माहित आहे ,मी गाणे शिकले ते गाण्यासाठी नाही रे ते शिकले जीवनाचे सूर समजावेत म्हणून, पण ज्याच्या साठी मैफिल रंगवावी वाटले, त्याने कधी ताल मागितलाच नाही. मग आता काय करू? “कोणासाठी गावू? “आज ताई म्हणाली, “तू येणार आहेस,त्याच्या बरोबर जा. काय सांगतो ते ऐक. थोडे फार जग पाहिलेय त्याने,म्हणून तुला त्याच्या बरोबर पाठवीत आहे.जरा समजुतीने घे उगीच काहीबाही बोलून त्याला दुखवू नकोस” तेंव्हा वाटले कि तिला सांगावे अग त्याचीच तर वाट पाहत राहिले.पण तो कधी निघून गेला ते कळलेच नाही ग म्हटले आता काय सांगणार आहे हा. “ तूच सांग कुठे होतास इतके दिवस? “

आणि आणि आता मला प्रश्न पडला कि, जर हिचे प्रश्नचिन्हच मी आहे तर आता मी काय गणित सोडवणार.शेवटी तिला म्हटले, ऐकायला आणि कृतीत आणायला थोडे अवघड आहे पण झाले गेले विसरून जा आणि आईसाठीतरी लग्न कर” तर मला म्हणाली, “अरे! खर सांगू तू आला नाहीस तेव्हांच ठरवले होते कि, आता आई साठीच लग्न करायचे नाही म्हणजे तिच्या सोबत राहून निदान बिनलग्नाचे तरी राहता येईल. आणि जगाला सांगू कि आईसह मला सांभाळणारा कोणी मिळत नाही म्हणून मी लग्न करीत नाही. काय बोलणार मी त्यावर, पण शेवटी तिला म्हणालो ,”हे बघ.! होते न तुझे माझ्यावर प्रेम, मग त्या प्रेमाची शप्पथ घालून तुला सांगतो कि, आज तू इतकी सुंदर गातेस, त्यातून मिळवती उच्च शिक्षित, तू घालशील त्या अटीवर कोणीही माळ घालेल तुझ्या गळ्यात. तेंव्हा तू माझ्या प्रेम खातर लग्नाला हो! म्हण,”मला वाटले असतात प्रेमाच्या आठवणी काढत झुरण्याचे थोडे दिवस.काही काळ गेला कि,गाडी येते रुळावर त्यानुसार ती हो म्हणेल. आणि आपले प्रेम खरे सुखी झालेले मला पाहायला मिळेल. त्यावर ती म्हणाली “जर तू प्रेमाची शप्पथ घालून म्हणत असशील तर मी आहे लग्नाला तयार ,पण मग ऐक!हि तडजोड अशी राहील,जे गाणे मी फक्त तुझ्याच साठी शिकले, ते माझ्या गळ्यातून कधीही येणार नाही. आणि जर मी पुन्हा मैफिलीत गावे, अशी तुझी इच्छा असेल, तर एक रात्र जेंव्हा तुझी नि माझी मैफिल रंगेल तेंव्हाच मी पुन्हा सतार हातात घेईन.आता तू ठरव मी कोणती मैफिल आधी रंगवू ते”.मी सुन्न होवून बसलो .गेली वीस वर्षे रियाज करून जपलेला सूर ,हि फक्त माझ्यासाठी कायमचा सोडणार ?काय उत्तर देवू तेच कळत नव्हते. शेवटी मी विचार केला आजन्म कुमारिका राहून संसाराची मैफिल उधळून सूर जपण्यापेक्षा संसार सुखात रंगून हिला प्रथम जीवनाची मैफिल सजवू दे. आणि तिला शेवटी मी एक खोटे वचन दिले तू लग्न कर, आणि रियाज चालू ठेव तुझी गाण्याची मैफिल यशस्वी होण्यासाठी आपली एका रात्रीची मैफिल नक्की रंगेल ! तु वाट पाहत रहा ! मी नक्की येईन. ती आनंदली तिने उठून मला चक्क मिठीच मारली आणि तिच्या तोंडी शब्द आले,” तू येई पर्यंत माझा रियाज सुरु राहील,आणि ताईला सांग मी लग्नास तयार आहे.”

घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजत आले होते. दोन तास संपले होते पण तिच्या बहिणीचा प्रश्न मी सोडवला होता स्वतःच प्रश्न बनून.

पुढे तिचे लग्न झाले. तिने हवा तसा नवरा मिळवला कि नाही हे आजही सांगता येणार नाही पण स्वतःच्या जिद्दीने तिने एक वचन मात्र पदरात पाडून घेतले ते म्हणजे 'मैफिल एका रात्रीची'. आणि मी मात्र एक केले गाणे ऐकणेच सोडून दिले. मैफिलीच्या सुरांची ओढ नको म्हणून मैफिलीची रात्र सुरूच होवू द्यायची नाही असे ठरवून टाकले. आणि म्हणूनच सरळ पुणे, पुण्यातील स्थिर नोकरी, घरदार सर्व सोडून एकटाच, सातासमुद्रापार अमेरिकेस येवून राहिलो. अजूनही वाटते आहे कि, सोनपारीने तिचा रियाज आणि गळा दोन्ही जपावे. आणि वचनभंग करीत तिने पुन्हा गावे. एक दिवस नक्कीच ते सूर सातासमुद्रापार येवून माझ्या कानावर पडतील आणि मैफिलीची खरीखुरी सांगता होईल.

No comments:

Post a Comment