Friday, December 31, 2010

मन विश्वरंगी रंगले ........

मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने …
मन विश्वरंगी रंगले ........

मन हो रामरंगी रंगले ... ‘संगीत तुलसीदास’ या नाटकातील श्री गोविंद सदाशिव टेंबे यांचे पहाडी रागावर आधारित हे पद स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली रचना. या विषयी मी पुढे लिहणार आहेच. पण त्यातील "मन विश्वरंगी रंगले .... ही माझ्या ब्लॉगच्या नामकरणा मागील प्रेरणा . मनाच्या विचार तरंगातून उठणाऱ्या लहरी. ज्यावर उमटणार आहेत मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने …जिथे साकारणार आहेत शब्दचित्रे .वर लिहिलेला छोटासा परिच्छेद हि माझ्या ब्लॉग लिखाणाची सुरवात. त्यात मी ‘मन हो राम रंगी रंगले’…या रचनेविषयी पुढे लिहिणार आहे, असे म्हटले होते तर तेंव्हा पासून मनात घोळणाऱ्या चित्राचे हे शब्द चित्र.
एखादे गाणे डोक्यात जाते म्हणजे काय होते दिवस सुरु होतो.कुठे तरी दूरवर एखादी सुरावट थिरकत असते. कधी एखादा शब्द, तरी कधी एखादि धून कानात शिरते. शिरते मात्र आणि पुरा दिवस बदलून जातो. पंडित भिमसेनजींचा भक्ती रचना गाताना लागणारा आवाज हा माझा सर्वात प्रिय क्षण आहे. अर्थात पंडितजी म्हटले कि, भक्ती रचना आणि विठ्ठल गीते यांचे समीकरण इतके पक्के मनात असते कि, पंडितजी म्हणजे,'इंद्रायणी काठी.... किंवा पंडितजी म्हणजे,
'देह विठ्ठल तीर्थ विठ्ठल' ..... यांची आठवण प्रकर्षाने येते.
पण असे का घडते? मन सतत अशी ओढ घेत त्याच त्याच सुराववटींकडे धाव का घेते ? या भोवती माझी विचारांची गुंफण चालली होती. आणि मन,मना भोवतीच रुंजी घालू लागले. त्या दिवशी पण असेच काहीसे घडले. दूरवरून कानावर त्या ओळी पडल्या ...
मन हो राम रंगी रंगले.....
दिवसभर ते शब्द ती सुरावट यांनी पाठ सोडली नाही. सायंकाळी घरी आलो. आज बैठक मारून, निवांत आणि समजून घेवून हि रचना ऐकायची असे ठरवून गाणे ऐकले. गाणे ऐकले मात्र आणि मन अधिकच सैर भैर झाले कारण त्या गाण्यात होते एकूण फक्त सतरा शब्द .पहा ना तो अभंग असा आहे.
मन हो राम रंगी रंगले
आत्मरंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले
चरणी नेत्र गुंतले
भृंग अंबूजातले
भवतरंगी रंगले ....
पण किती मोठा आणि गर्भित अर्थ उलगडून दाखवण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. खरच एकदम मला, मन आणि त्याचे विविध पदर यांची मालिका व असे अनेक विचारांचे कल्लोळ यांनी चक्रावून टाकले. मन आकार हीन आहे अशरीरेय आहे, असा एक मत प्रवाह आहे तर मन हे अव्यक्त शरीर आहे असा एक प्रवाह आहे. मनाचे एकूण तीन स्तर मानले तर ते पुढील तीन प्रकारात मोडतात असे मानले जाते. पहिला मनाचा स्तर म्हणजे बाह्यमन , दुसरा स्तर म्हणजे अंतर्मन , आणि तिसरा म्हणजे वैश्विक मन होय. राम म्हणजे माझ्या दृष्टीने कोणी व्यक्ती अथवा दैवी शक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. आणि म्हणून ती चराचर व्यापून राहीली आहे. जर माणसाचे एखाद्या गोष्टीतील स्वारस्य संपले कि तो पटकन म्हणतो, यात काही राम नाही. आणि जेंव्हा एखादी अशक्यप्राय,अवघड गोष्ट देखील करण्याची इच्छा तीव्र झाली कि, त्याची सुरवात करताना जय राम , श्रीराम, जय रामजी कि असे म्हणत सहजतेने केली जाते.जुन्या परंपरेतील बायका स्वयंपाकात फोडणी टाकून पदार्थ करण्यास सुरु करताना 'श्रीराम' म्हणून सुरवात करताना आम्ही लहानपणी अनुभवले आहे. हे सर्व म्हणजेच परिसराकडे बघण्याची माणसाची मनोवृत्ती होय. म्हणजेज आपले बाह्यमन होय.
मनोवृत्ती निरक्षण परिसराचे करते.त्यातून स्वतः नियोजन केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी मी कायकेले पाहिजे हा प्रश्न माणूस स्व संवादातून मनास विचारतो. त्याचे उत्तर म्हणजे मेंदूने परिसराचे आकलन करून शरीरास कार्यरत होण्यासाठी दिलेली प्रेरणा होय. आणि म्हणून स्वयं प्रेरणेने केलेले काम कितीही कष्टप्रद असले तरी त्याच्या पुर्तातेतून आनंदच मिळतो. हि अन्तः प्रेरणा कार्यरत करण्याची प्रक्रिया ज्यातून निर्माण होते ते आपले अंतर्मन होय.
मग जर बाह्यमन आणि अंतर्मन हि दोन प्रेरणा स्थाने आहेत तर मग आता तिसऱ्या शक्तीची दखल का म्हणून घ्यायची. तर इथे सुरु होते वैश्विक मनाची संकल्पना. म्हणजे परिसर आणि आपण याचा दुवा बनलेले अवकाश आणि त्यातील घडामोडी यांचा कार्यकारण भाव लावताना होणारी मनाची अवस्था म्हणजे वैश्विक मन होय. हे असे का ? या प्रश्नास शास्त्रीय आधारावर उत्तरे आहेत. शास्त्रज्ञ त्याची उत्तरे देतात. ग्रह, परग्रह पृथ्वीची गतिशीलता यांच्या कार्यकारण भावाचा शोध घेण्यासाठी कोपर्निकस, गॅलिलिओ , यांच्या पासून ते अलीकडील डॉ. जयंत नारळीकर, स्टीफन हॉकिंग यांची संसोधाने पाहिली तर आजही हे असे का ? या प्रश्नाचे उत्तरात ज्ञातापेक्षा अज्ञाताचा हिस्सा अजूनहि अधिक आहे.अभ्यासातून लागलेल्या शोधांपेक्षा अपघाताने लागलेले शोध अधिक आहेत. इथे विश्वाच्या पसाऱ्यातील माणूस नगण्य का माणसाच्या अंतरंगातील विश्वाचा पसारा अगम्य हा माझ्या समोर असलेला प्रश्न आहे.त्यावर विचार करताना मन जिथे फिरते तो भव ताल. कदाचित भोवताली काय घडतेय ते जरा उघड्या डोळ्यांनी पाहण्यास शिका. या आपल्या आधीच्या पिढीतील करारी बापाच्या तोंडी असणाऱ्या वाक्यातील भोवताल हा या भव तालातूनच आला असेल का ? असा जेंव्हा मला प्रश्न पडतो तेंव्हा माझे मन खरोखरच भव तरंगात रंगलेले असते.
अशा अनेक विषयांवर स्वतःशी बोलत विचारांची साखळी मन जेंव्हा गुंफू लागते तेंव्हा खरोखरच मनाची अवस्था मन विश्वरंगी रंगले अशी होते. विचारांची शब्द चित्रे साकारू लागतात.कधी कधी ती मनाच्या कँनव्हासवरील रेखाटने ठरतात , तर कधी फुलात लपलेल्या भुंग्या सारखी अडकून पडतात.
माझ्या ब्लॉगवरील सर्वात पाहिली नोंद लिहताना मनात हीच भावना होती. विचार अनेक दिवस घोळत होते. शब्द रूप आज दिले. या बरोबरच संपणाऱ्या या वर्षास निरोप देत व सर्व ब्लॉग वाचकांना येणाऱ्या नाव वर्षाच्या शुभेच्छा देत या वर्षीचे माझे ब्लॉग लिखाण आटोपते घेतो.

Monday, December 20, 2010

एक आदरांजली जनकवीस .... त्यांच्याच सुरेल गीतांमधून.

.....आणि या नंतरच्या गीताचे शब्द आहेत श्री.निवृत्ती रावजी पाटील यांचे.असे म्हणून जर निवेदकांनी निवेदन थांबवले, तर काय होईल ?काही नाही जे काय असेल ते ऐकु.काय करणार असे मनात म्हणत तुम्ही गप्प बसाल.पण काही क्षणच कारण त्यानंतर तुम्हाला अशी सुरावट कानी पडेल कि बस्स फक्त ऐकतच राहावे.कारण तुमच्या कानावर पडत असेल हि सुरावट ....

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा,दिल्या घरी तू सुखी रहा …......काय ओळखलेत ना ? श्री. निवृत्ती रावजी पाटील म्हणजेच आपले पी.सावळाराम.

हो !मी म्हणालो,कि आपले पी.सावळाराम.आणि का नाही म्हणायचे आपले म्हणून?कारण त्यांनी दिलेल्या रचना सर्वथा त्यांच्याच प्रतिभेचे देणे आहे,पण मन कोणाचे जाणलेय त्यांनी?या प्रश्नाचे उत्तर आहे,आपले अगदी आपल्या सर्वांचे.त्यात कोण नाही ?मुलगी,आई ,प्रेयसी, शेतकरी, कामकरी,भक्त, चित्रकार कोणतेही व्यक्तिमत्व घ्या मनोगतासाठी शब्द आहेत आपल्या लाडक्या शब्द प्रभूचे.तर हे पी. सावळाराम जे काही थोडेफार मला समजलेत ते मी आपणासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या भावना ,त्यांच्या विषयीचा आदर याबद्दल बोलताना मनापासून लिहणार आहे, त्याच्या स्मृतीदिनी त्यांचा चाहता म्हणून त्यांना वाहिलेली हि एक आदरांजली आहे. जे सुचतेय ते लिहिणार आहे. पण त्यासाठी सर्वाधिक मदत घेणार आहे त्यांच्याच सुमधुर गीतांची. माझा हा प्रयत्न थोडा धाडसी मानून घेत त्यांच्या आजच्या सृम्तीदिनी मी त्यांना वंदन करून त्याचे आशीर्वादच मागत आहे.
मी पी. सावळाराम यांना शब्दप्रभू म्हटले आणि तेही कसे तर अगदी 'दिलसे' कारण मराठी आणि तिचा पुरेसा वापर याबाबत आपण नेहमीच 'दिलसे' आणि 'मनसे' जागरूक आहोत असे म्हणत असतो. आणि आपल्याच मातृ भाषेसाठी असा अभिमान बाळगणे हे सर्वार्थाने बरोबर देखील आहे. पण हि माझी भाषा मला किती आणि कशी समजते यासाठी भाषेचा वापर, त्यातील गद्य आणि पद्य, त्यातील सौंदर्य स्थळे यांचे आकलन होणे तितकेच जरुरीचे आहे. पी. सावळाराम यांना आपली भाषा आणि तिचे महत्व इतके पराकोटीचे समजले होते कि, त्यांनी भगवत गीतेचे निरुपण आणि सहज सुंदर शब्दात तिचे विवेचन करण्याचे जे कार्य संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहून केले.त्या महत कार्याकडे बघताना एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघितले आहे.
ते स्वतः कवी मनाने, त्या ज्ञानेश्वरी निर्मितीच्या शुभारंभाचे क्षणा पाशी पोहचले आहेत आणि ज्ञानेश्वर जे बालकच आहेत,या बालकाचे अंगी नव निर्मितीच्या सृजन क्षणी सृजनत्वाचे बळ यावे म्हणून मराठी भाषा हि स्वतःच परमेश्वरास विनवते आहे,
हे भगवंत हि ज्ञानेश्वारीची निर्मिती हा बालक तुझ्यासाठीच करीत आहे. या बालकाचा हा जगावेगळा प्रयास मार्गी लावण्याचे बळ तूच दे. आता मला सांगा मुळात भगवत गीता किती अवघड, पण ती सोपी करून जन सामान्यांना ज्ञानेश्वरी रुपात देण्याचे काम,नुसत्या कल्पनेने थरकाप होतो मग ते निरुपण सुलभ आणि अचूक असावे असे कोणासही वाटेल.संत ज्ञानेश्वरांनी ते केले, नव्हे ते केले म्हणूनच ते संत झाले. पण हे भाषाविष्काराचे काम अतुलनीय म्हणूनच भाषाच परमेश्वराकडे धावली असे पी. सावळारामजींना कवी कल्पनेतून वाटले आणि अवतरले हे सुरेल काव्य

1.ज्ञानदेव बाळ माझा,सांगे गीता,भगवंता
लक्ष द्या हो विनविते,मराठी मी त्याची माता
पी.सावळाराम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी या गावी झाला. गाव परिसर तसा अस्सल ग्रामीण.कदाचित त्यांच्या लहानपणी त्यांनी वर्णाश्रमाचा पगडा पहिला असेल.उच्च वर्गाचे चुकीचे वागणे अनुभवले पण असेल. त्यावर त्यांनी कोणतीही कडवट टीका केली नाही पण जाती भेद दूर करून जगायचे कसे याचा संदेश देताना ते म्हणतात ..

2. खरा ब्राह्मण नाथची झाला
जो महारा घरी जेवला ...

आत्ता आपण ऐकलेल्या गीतातील अखेरच्या कडव्यातील ओळी होत्या,

धूप घालता सुवास सुटला
मागे पुढती पाट मांडिला
नाथाने मुखी घास घातला
पुंडलिक वरदा हरी बोलला ....
म्हणजे ज्याक्षणी नाथांनी सम विषमतेच्या मर्यादा मोडून ,गरीबाघरी पहिला घास घेतला,तेंव्हा त्यांची ती कृती अशा उंचीची होती कि,त्यातून जातीभेद टाळून सर्व प्राणीमात्र एकच आहेत हि शिकवण त्यांनी कृतीतून दिली. आणि ह्या पद्धतीने जगू इच्छिणारा माणूस हाच खरा श्रेष्ठ माणूस आहे.देवाला देखील हे वागणे पूर्णतः ग्राह्य आहे आणि इतका मोठा आणि अचूक संदेश या कवींनी फक्त एका सांकेतिक कृतीच्या वर्णनातून दिला आहे आणि त्यासाठी ते म्हणतात - पुंडलिक वरदा हरी बोलला.

एकूणच काय तर पी. सावळाराम हे सश्रद्ध, डोळस भक्ती करणारे आणि परमेश्वरी ताकद मानणारे कवी होते. गुरुत्वाकर्षण, कृष्णविवर, आकाशगंगेतील आपले स्थान यावर सान थोरांपासून ते आगदी नासा पर्यंत कोणी काहीही म्हणो पण हा डोलारा शास्त्रीय मुलभूत तत्वांवर जसा उभा आहे तसा, या सर्वामागे एक ईश्वरी ताकद कार्यरत आहे आणि हे वास्तव गीतबद्ध करताना पी.सावळाराम,सांगतात कि परमेश्वर अद्भुत आहे. सर्व जग चालवण्याची माया ज्याचे अंगी आहे तो मातेच्या माया, ममतेसाठी अजाणत्या रुपात प्रकटतो.आणि हे त्रिकालाबाधीत जपलेले ईश्वराचे अधिष्ठान आपणासाठी सहज सोप्या रुपात गीतबद्ध करताना ते म्हणतात ..

3.सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी
पी. सावळाराम हे जनकवी म्हणून ओळखले जातात पण मला मात्र ते सृजन कवी वाटतात.शहरी आणि अतर्क्य कविता मांडत पुढे न जाता, ज्यांनी आपली कविता शेतावरून गावात नेली. पण या कवीचे मन इतके संवेदनशील राहिले कि त्यांच्या हातून सर्वाधिक सुंदर रचना ह्या स्त्री मनाची आंदोलने टिपणाऱ्या झाल्या. प्रत्येक स्त्रीचे भाव विश्व विवाह बंधनाने आणि सासर माहेरच्या नात्याने इतके बदलते कि, त्यामुळे स्त्री अंतर्बाह्य बदलून जाते. त्यांनी प्रेम गीते लिहलीतच.पण त्याच बरोबर विवाह निश्चिती, विवाह सोहळा,पाठवणी, ते मधुचंद्राची रात्र यावर काव्य रचना केल्या आहेत. तसेच त्यांनी पुराणातील अमर प्रेम कथांवर देखील सुरेल रचना करताना शंकर पार्वती, राधा कृष्ण सीता राम यांचा नातेसंबंध सुरेख उलगडला आहे.
पण या स्त्री मनाचा पट उलगडताना,त्यांनी प्रेमालाच प्रश्न विचारणारी स्त्री उभी करून केलेली सुंदर रचना मला सर्वाधिक भावली आहे. कारण हा प्रश्न विचारताना ती प्रेमाला म्हणते, काय देवू मी तुला ? पण त्या प्रश्न मागे साशंकता नसून अर्पण भाव आहे.प्रेमातून मिळालेला सौख्याचा काळ तिला कृत कृत्य करीत आहे आणि त्यामुळे तिच्या ओठी शब्द येतात...

४.प्रेमा काय देवू तुला ?
भाग्य दिले तू मला...
पी.सावळाराम हे ठाणेकर म्हणूनच परिचित.पण बालपणी पश्चिम महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध आणि कलाक्षेत्राशी असलेल्या संबंधातून जुळलेली ग्रामीण परिसराची नाळ,यामुळे शेती,शेतकरी म्हणजे काय ?याची त्यांना पूर्णता जाणीव होती. शेतकरी कामाच्या रगाड्यात जरी थकून जात असला,तरी त्याची काळ्या मातीची ओढ तिच्यावरील माया कधीच कमी होत नाही. त्यामुळे पीक दाणापाणी जेंव्हा पूर्ण तयार होते तेंव्हा प्राणी,पक्षी यांच्या तडाख्यातून ते वाचवण्याचे काम करताना सुद्धा शेतकरी ते ममत्वाने करतो. त्यातील काव्य काय किंवा निसर्गाने भरभरून दिल्यावर त्या शेतीच्या उत्पन्नाची तुलना थेट स्वर्गातील खजिन्याशी करण्याची कल्पना हा ग्रामीण कवीच करू शकतो. मग त्याला शेतच देवाचा अवतार वाटले,तर त्यात काय नवल आणि आपोआप ओठावर शब्द येतात ....

५.देवावाणी शेत माझ नवसाला पावलं
कुबेराच धन माझ्या शेतात घावल...
प्रेम, विरह, मानसिक आंदोलने हि जशी कवी मनाची हळवी ठिकाणे,त्याप्रमाणे कवीच्या मनास भावणारा विषय म्हणजे निसर्ग. कवी मनाने निसर्गाच्या विविध रुपांकडे नजर टाकली कि, मग उन हसरे होते,थंडी गुलाबी रंग घेते,वारा गाणे गाऊ
लागतो.याप्रमाणेच कवीस नेहमीच भावणारा निसर्गाचा चमत्कार म्हणजे पाऊस.त्याचे आणि पावसाचे नाते इतके घट्ट आहे कि, कवी मन आहे आणि पावसावर गाणे नाही हे घडणेच अशक्य. पी.सावळाराम देखील यास अपवाद नाहीत.पण त्याची पावसाकडे बघण्याची नजर म्हणजे प्रेम, चुटपूट, मनाची दोलायमान होणारी अवस्था, हळवे स्त्री मन या सगळ्याचा अनोखा संगम आहे. स्त्री मन, राधेचे अव्यक्त प्रेम, आणि पाऊस असा त्रिवेणी संगम ज्या पावसात घडून आला आहे त्या या पावसाच्या तरल गाण्याने आनंद तर होतोच पण पावसाची रिमझिम आपल्याला फक्त भिजवत नाही तर पुरती चिंब करते आणि राधेला कृष्ण भेटीने होणारा मिलनाचा आनंद आपल्याही मनात द्विगुणीत होतो. चला तर या गोकुळातील पावसात भिजायला...

६. रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे ...
कवी, त्याच्या रचना, त्यातून दिलेला संदेश यासारखा विषय जेंव्हा निखळ आनंद घेण्याकडून अभ्यासाकडे वळतो तेंव्हा समीक्षक टीकाकार कवीने काल्पनिक जगात न वावरता सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे, त्याचा कविता ह्या स्वप्नमय जगातून बाहेर येवून त्यात सामाजिक जाणिवेची स्पंदने असली पाहिजेत, असा सूर लावताना दिसतात. खरे तर कवी प्रथम माणूस असतो. तुमच्या आमच्या सारखं त्यालाही मन असते. फक्त एक व्यक्त होण्याची अव्यक्त नजर त्याच्या मनात दडलेली असते. त्यामुळे कवीची समाज त्यातील भोंदुगिरी, अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची चीड हि तुम्हा आम्हा सामान्य माणसापेक्षा कितीतरीपटीने तीव्र असते. तेथे त्याची लेखणी तलवार बनते. श्वास- उच्छवास अंगार बनतात.
पण असा अन्याय अशी लढाई लढताना ती परमेश्वराचे नजरेतून लढणे,अन्यायाविरुध्द लढताना सुरवात घरापासून करणे याची जाणीव ठेवत केलीली रचना हे सामाजिक जाणिवेचे खरे खुरे प्रतिक आहे. आज आपण समाजात वावरताना परस्परांची गरज म्हणून, बदलते संदर्भ स्वीकारून जातीभेदापासून दूर जाण्यास सुरवात केली आहे. पण तीन चारशे वर्षापूर्वी त्याची तीव्रता इतकी प्रखर होती कि, स्वतंत्र पाणवठे, स्वतंत्र विहरी, देवळात प्रवेशास बंदी,असे हीन प्रकार चालत असत. त्याचे पडसाद संत कवींच्या रचनेत सुद्धा दिसून येतात. काळाच्या ओघात प्रथा बदलल्या, 'एक गाव एक पाणवठा' अशा घोषणा करीत पुढाऱ्याकडून या प्रथेस पायबंद घालण्याचे प्रयत्न झाले. तरीही अश्या गोष्टीचे उच्चाटन सार्वजनिक झाले तरी मनापासून होणे हि खरी गरज ठरते.
याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात माजलेली बडवेगिरी व त्यातून पैसा खावून दर्शन देण्याची प्रथा, कागदोपत्री मंदिर प्रवेश सर्वांसाठी खुला झाल्यावर देखील मागील दाराने टिकून होती. याचा तिटकारा येवून पी. सावळाराम यांनी लिहिलेले काव्य इतके अप्रतिम आहे कि बस्स! रुखमाई स्वतःच जर देव दर्शन सर्वांना खुले नसेल तर येथे काय पावित्र्य राहिले ? असा प्रश्न करून विठ्ठलास म्हणते कि हे अमंगल ठिकाणच सोडून आपण दूर निघून जावू. आणि इतके म्हणून न थांबता,पुढे ती म्हणते कि आताच्या या परिस्थितीत अन्याय सहन करत इथेच राहणे हा आपल्या नावाला कलंक आहे म्हणून चला.आणि अश्या अन्याया विरुध्द लढण्याची तिची तळमळ दर्शवणारी मनस्थिती गीताचे अखेरच्या ओळीत इतकी सुंदर टिपली आहे कि ती तुम्ही जरूर अनुभवाच.

७. पंढरिनाथा झडकरी आता,
पंढरी सोडून चला विनवते रुखमाई विठ्ठला...
चित्रपट सृष्टी जिला मायानगरी म्हणून ओळखले जाते तिथे काम करताना,यश अपयश,लढा झगडा,सुख दुखः,या चढ उतारांवरून होणारा प्रवास कोणालाच चुकत नाही.त्यामुळे अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रांतील कलाकारांची आत्मचरित्रे वास्तव दाहकतेने सजलेली दिसतात. काम करताना काही मने इतकी जुळतात कि त्यातून नंतर नंतर फक्त अप्रतिम तेच येत राहते. जसे मुकेश आणि राजकपूर, लता दीदी आणि मदन मोहन , गदिमा आणि सुधीर फडके,किती नावे घ्यायची.पी. सावळाराम हे देखील यास अपवाद नाहीत. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कशी बहरली याचा पुरेशा तपशील जरी मला ठावूक नसला तरी वसंत प्रभू आणि पी सावळाराम यांनी आपणास नेहमीच निखळ आनंद दिला आहे.
त्यांच्या आजच्या दिनांक २१ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना वंदन करून मी माझ्या या आपणासाठी केलेल्या कार्यक्रमाची पूर्तता करू इच्छितो. अखेरीस या कवीने इतके सर्व समाजाला देत, आगदी लोकाग्रहास्तव ठाण्याचे नगराध्यक्षपद पण भूषवले होते.तरीही या सर्व यशानंतर आपण ध्येय पुर्ती केली का ? असे मनास विचारात जनकवी पी.सावळाराम यांनी पुढील रचना लिहिली असावी असे मला वाटते.पहा बरे माझे म्हणणे तुम्हाला पटते का?

८. हरवले ते गवसले का ?
गवसले ते हरवले का ?

Sunday, December 19, 2010

वाहिली धुंद आज सरिता

सोडूनी बंध, फोडुनी बांध, वाहिली धुंद आज सरिता
ओढ हि तिला कशाची कळेना, झुगारली बंधने कोणा  करिता ?

ओसरता पूर, धपापला उर, तुटले नुपूर, सारे निशब्द क्षणाकरिता !
थांबला खेळ, बसेना मेळ का अशी धावली कशा करिता ?

कुठे गेले तिचे संयमी पात्र, मर्यादेत राहणे , गतिशील वाहणे न पाही किनारा,
होता दूरवर माझाच पसारा, गतीशिलतेचा असे ठावूक दरारा !

आता वाटते तुजला कि,मी झाले बेधुंद, मला न दिसे किनारा,
कोणाची मर्यादा कोणी मोडली ? उत्तरात आहे प्रश्नाचा पसारा.

न बंध मानिले, न साहिले अकारा,उरे मागे एक केवळ दीर्घ सुस्कारा!!!

ओसरता पूर, आशेचा सूर
इथे होते मंदिर इथे होता पार

खुणा शोधीत धावे रस्ताच दूर
न सापडे गाव , न दिसे भाव

प्रत्येक नजर घेई काळजाचा ठाव
शोधण्या आधार उचलता नजर

नजरेस दिसेना काहीच आरपार ....

Saturday, December 18, 2010

या कातरवेळी........

विसरायचे ठरवता मन तिला आठवते
आठवायचे ठरवता का म्हणून विसरते,


आज अचानक आली तिची मूर्त डोळ्यासमोर
अश्रूंचा पूर थोपवला पापण्यांवर!

वाहु दे! म्हटले तरी वाहत नाहीत आता डोळे
नजरे समोर साकारतात फक्त तिचे भाव भोळे,

का म्हणून काळीज गलबलले या सांजवेळी
देवा समोर ज्योत लावून काय मागत असेल अशावेळी!

काय असतील तिच्या भावना आता अशा अवेळी
अंतःकरणी राहतो सल, पण सुकलेले डोळे म्हणती,

आठवांनी फुटू दे बांध, तुटू दे काळीज या काजळ काळी,
पण रड कोरडाच या कातरवेळी........

Thursday, December 16, 2010

ओळख मला आवडलेल्या पुस्तकांची -

आपण ब्लॉगवर आपल्या आवडीची पुस्तके त्यातून येणारे भारावलेपण यावर नेहमीच वाचत असतो. काही जण आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगतात, काही जण त्यातील एखादा उतारा देतात. काही जण परीक्षण मांडतात.या सर्व प्रकारातून आपली पुस्तक वाचण्याची जिज्ञासा वाढीस लागते . माझे अमराठी वाचन तसे मर्यादित आहे. किंवा खरे म्हणाल तर बैठक मारून संपवलीत अशी इंग्लिश पुस्तके हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. पण त्यातील- THE FREEDOM WRITERS DIARY.हे पुस्तक मला खूपच आवडले. आपणास हि त्या पुस्तकाबाबत उत्सुकता वाटावी म्हणून, त्या पुस्तकाची प्रस्तावना(अंशतः) मी     भाषांतरित करून आपणासाठी देत आहे.मला वाटतेय कि या प्रस्तावनेच्या वाचनानंतर आपण हे पुस्तक नक्कीच वाचाल.

प्रस्तावना-झेल्ता फिलीपोविक
जेंव्हा मला "दि फ्रीडम रायटर्स डायरी" या पुस्तकासाठी प्रस्तावना लिह्ण्याबाबत विचारण्यात आले, तेंव्हा प्रथम हे मला सांगितले पाहिजे कि,मला तो असा गौरव वाटला कि ज्याचा मला अभिमान आहे,परंतु त्याच वेळी मी भारावून जावून विचार करू लागले कि इतक्या अल्पावधीत किती आश्चर्यकारक घटना घडत आहेत.
१९९६ च्या मार्चमध्ये मी विल्सन हायस्कूलच्या शाळकरी मुलांना (विद्यार्थ्यांना) त्यांची भविष्यावरील श्रद्धा, समर्पणवृत्ती,आणि प्रयत्नवाद याकरिता त्यांचे आभार मानण्यासाठी भेटले. माझ्या बरोबर त्यांनी माझे पालक,माझी मैत्रीण मिरना ( जी बोस्नियात असल्यापासून माझी मैत्रीण आहे, आतासुद्धा जी माझ्या बरोबर आहे ) यांना लाँग बीच , कॅलिफोर्निया येथे आमंत्रित केले होते. मी जेंव्हा त्यांना प्रथम भेटले तेंव्हा त्यांच्या कनवाळूपणा व मायेने मी भारावून गेले. ते सर्वजण माझ्याच बरोबरीचे नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले होते, जगभरातील असंख्य तरुणांसारखेच ते हि होते,त्यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने मोठे होण्याची नेतृत्व करण्याची ताकद होती, जी इतरांना प्रेरणा देईल.
हे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका एरीन ग्रुवेल यांनी अॅन  फ्रंन्क हिची- " दि डायरी ऑफ यंग गर्ल ,माझे पुस्तक - झेल्ताज डायरी : ए चाइल्ड लाइफ इन साराजेवो आणि इतर अनेक पुस्तके यांचे वाचन केले ज्यामधून त्यांना त्यांची रोजनिशी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतःला ऑरगनाइज्ड करत काहीतरी वेगळे करण्याची, काहीतरी चिरस्मरणीय करण्याची काहीतरी ताकदीचे व मानवतावादी काम करण्याचे ठरवले.त्यासाठी त्यांनी सहजतेने पुढे जाण्याचा मार्ग निवडण्याचे ठरवले, त्याप्रमाणे त्यांनी केले लिखाणातून भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यातून त्यांनी प्रस्थापिता विरुद्ध लढाई पुकारली आणि खऱ्या अर्थाने स्वतःचे "फ्रीडम रायटर्स" हे नाव सार्थ केले.
मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान तर आहेच पण त्याच बरोबर आणखी एका गोष्टीचा आनंद देखील आहे तो म्हणजे त्यांच्या जडण घडणीच्या प्रगतीमध्ये माझा खारीचा वाटा आहे.
मी माझी रोजनिशी लिहिण्यास सुरवात बोस्नियाचे युद्ध सुरु होण्यापूर्वी केली होती, कारण मला माझ्या बालपणीच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी व मागे वळून पाहत रममाण होण्यासाठी त्यांची गरज होती. मला माझी रोजनिशी वाचताना जुन्या आठवणीत रंगून जाताना हसायचे होते,रडायचे होते, सदगतीत व्हायचे होते. मला माझ्या डायरी बरोबर मी कशी वाढले ते अनुभवायचे होते. माझ्या काही मोठ्या मैत्रिणी डायरी लिहित आणि वाचनात आलेल्या अन फ्रांक ,अदरिअन मोल यांच्या डायऱ्या यामुळे माझी खात्रीच झाली होती कि डायरी लिहिणे हि योग्यच गोष्ट आहे. मी कधीही कल्पनादेखील केली नव्हती कि माझी डायरी प्रकाशित होईल, आणि माझी डायरी एका युद्धाची रोजनिशी व्हावी अशी तर बिलकुल इच्छा नव्हती. माझे बालपण अचानक थांबेल असे कधी स्वप्नात देखील वाटले नाही. मात्र या घटनांनी अघटीत घटनांबद्दल विचार करण्याची सवय लावली. कारण मनुष्य स्वभाव असा असतो कि दुर्घटना/संकटे हि इतरांवर येतात अशी त्याची धारणा असते. पण जेंव्हा प्रत्यक्षात दुर्देवाचा घाला पडतो तेंव्हा तो स्वतः घाबरलेला,दुखी:, गोंधळलेला रागावलेला असा बनतो.
जेंव्हा बोस्नियाच्या महाभयंकर युद्धाला प्रत्यक्षात सुरवात झाली तेंव्हा माझे आनंदी आणि सुरक्षित बालपण संपुष्टात आले, आणि माझी डायरी हि रोजच्या घटना नोंदवण्याच्या पलीकडली बाब झाली. ती माझी खरीखुरी मैत्रीण झाली. मी जे काही बोलेन ते ऐकण्यासाठी,माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, माझी भीती,माझे दुखः स्वीकारण्यासाठी ती कायम तयार होती.मला माझ्या लिखाणातील आनंद उमजला---

Tuesday, December 14, 2010

माझी 'कविता'

तिने यावे वाटते तेंव्हा ती रुसते
तिची आठवण होता मन खुदकन हसते,

ती इथेच तर आहे मीच मला समजावतो
सहवासाने तिच्या मनोमन सुखावतो!

कधी कधी ती धावून येते
आषाढ मेघापरी पुरेपूर बरसते,

कधी कधी ती सहज येते
श्रावण सरीसारखी हुलकावणी देते!

तिचे येणे तिचे जाणे
जणू चांदणीचे गूढ आभाळी लपणे,

तिच्या आगमनाने चैत्र पालवी बहरते
तिच्या स्पर्शाने ती वैशाख वणवा विझवते!

येणे जाणे तिचे असुनी इतके अनिश्चित
मन मंदिरी तेवते आठवाची ज्योत सदोदित,

कोणाची हि कोणासाठी चाललीय प्रार्थना ?
प्रवेशिता गाभाऱ्यात कोण थांबावी स्पंदना ?

कोण बरे हि प्रतिभा कि कल्पना
का 'कविता' माझी आहे हि नुसतीच वल्गना!!

Friday, December 10, 2010

आठवणींचे शिंपले.

आज काय करावे सुचत नाही. वाचायला पुस्तक घेतले तर डोळे नुसतेच अक्षरावरून फिरतात. शब्द दिसतो पण शब्दार्थ हरवतो. टी. व्ही. लावला तर मनासारखा कार्यक्रम नसतो. काहीच न करता शांतपणे बसावे तर आपण शहरी गोंगाटाचे केंद्रस्थानी आहोत याची पुरती जाणीव कर्णेन्द्रीये देतात. आणि मन आणि शरीर हतबुद्ध होते. असा अनुभव आपण कधीतरी घेतलाच असेल. हि सैर भैर मनस्थिती पटकन जात नाही आणि बघणाऱ्याला वाटत असते. काय हा वेडा, जणू काही सुख दुखतेय.कोणी काही म्हणो पण कधी कधी माझी हि अवस्था होते हे मात्र खरे. आजही माझे मन असे अस्वस्थ झाले कि मी मागे जातो आणि अशा मनस्थिती तून बाहेर येण्यासाठी जुने पण निसर्गाने दिलेले शिंपल्यातील मोती उघडून पाहतो.आज ते शिंपले तुमच्यासाठी उघडून त्या अनुभवाची  अनुभूती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मला आठवतेय १९९४ सालची दिवाळी. त्यावर्षी माझे सासरे श्री. विनायक भा.देव यांचे नुकतेच निधन झाले होते. घरी दिवाळी करणार नव्हतोच. म्हणून दिवाळीचे पहिल्याच दिवशी पुण्यातून बाहेर पडलो. आणि वाई मार्गे पुढे धोम धरणाच्या बाजूस एक जोर नावाचे एक नितांत सुंदर खेडे आहे तिथे एक आश्रम होता तिथे गेलो. रस्त्या पासून थोडे आत एका छोट्या डोंगर उतारावर लहानसे पठार तेथे ते चौसोपी कौलारू घर पुढे स्वच्छ सोपा असा तो नेटका आश्रम होतो. कसलेही विशिष्ठ नियम कि उपासना असे न करता फक्त निसर्गात राहा, मनस्वास्थ जपा एवढेच सांगणे असणारा तो एक नैसर्गिक ठेवा होता. त्याठिकाणी दुपारी २.३० वाजता आम्ही पोहचलो. तिथल्या शेतातील ताजी भेंडीची भाजी आणि भाकरी असे जेवण घेतले. वातावरणामुळे म्हणा किंवा मनस्थितीमुळे म्हणा पण त्या चवीची भेंडी पुन्हा कधी खाल्ली नाही.जेवणानंतर समोरचा डोंगर चढून शब्दशः कडेकपारीतून फिरलो. सुमारे ३ तासाचे भटकंती नंतर परत आलो. पुन्हा एकदा सपाटून लागलेली भूक साध्याशा मेनुने शमवली. आणि आश्रमा समोरच्या स्वच्छ अंगणात सतरंज्या टाकून निवांत गप्पा हा एक कलमी कार्यक्रम सुरु केला. दोन तास मजेत गेले आणि त्यानंतर त्याच बैठकीवर आडवे झालो.त्यावेळी माझी नजर आकाशाकडे गेली आणि समोरच्या दृश्याने मी अक्षरशः रोमांचित झालो. मुळात तो आश्रम दोन उंच डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर होता. संपूर्ण परिसरात कोणताही कृत्रिम उजेड नाही.
दिवाळीची पहिली रात्र म्हणजे आमवस्या. त्यामुळे ब्रह्मदेवाची संस्कार भारती- रांगोळी आसमंतात रेखाटली होती. निरव शांतता, टिपूर चांदण्याचा ओसंडून वाहणारा उजेड मंद अल्हाददायक अशी थंडी, खरेतर त्या क्षणाचे वर्णन करताना आज देखील रोमांच उभे राहतात.अवकाश, विश्व, आकाशगंगा टिपूर चांदणे यांची ओढ कोणास नसते. त्याची मोहक वर्णने मी त्या दिवसापर्यंत फक्त वाचली होती पण त्या दिवशी ती अनुभवली. मग त्या अनोख्या रांगोळीतील ठिपके व परिचित अकार शोधण्याची आमची धडपड सुरु झाली. आमचे ते सगळे अप्रूप बघून तेथील स्थानिक शेतकरी जवळ आला आणि म्हणाला, "पावण, अजून एक दोन तास थांबा, अन मग बघा तारे कसे तुटतात ते" प्रथम काही उलगडा होईना पण इतक्यात एक उल्का कोसळताना त्याच्या सह आम्ही सर्वांनी पहिली आणि तो म्हणाला,"ते बघा,आता तारे कसे तुटतात ते." आणि उत्तररात्री चांदणे, ताऱ्यांचा लुकलुकाट , नाही खरे तर लखलखाट आणि उल्कापात असा त्रिवेणी सोहळाच आम्ही अनुभवला.
घरी, कृत्रिम उजेड आणि गर्दी यातून बाहेर पडून त्या दिवाळीला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि देवाने आम्हाला देव दिवाळीचाच अनुभव दिला. आज इतक्या वर्षांनतर देखील दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी मनात स्मरते ती निरव शांतातेतील निसर्ग दिवाळी. म्हणूनच आपणा सर्वांना एकच सांगणे आहे, जर कधी मनस्थिती बिघडली तर अशावेळी काय करावे तर उठून निसर्गाचे जवळ जावे तो तुम्हाला सगळ्या पलीकडे नेवून सोडतो.

Wednesday, December 8, 2010

खरच एखादा दिवस असा का सुरु होतो ?

काही प्रश्नचिन्हे ? .... काही अनुत्तरीत प्रश्न ???
खरच एखादा दिवस असा का सुरु होतो ?
त्या दिवशी असेच अचानक जे घडले ते जसेच्या तसे
कधी कधी दिवस सुरूच मुळी अस्वस्थतेत होतो. चहाची तल्लफ असते पण पहिल्या घोटानंतर तरतरी ऐवजी पुढच्या घोटला चहा नको वाटतो, तसेच झाले. दिनक्रम पुढे सरकू लागला घरून निघालो दार कुलुपबंद केले आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला घरातच राहिला म्हणून बंद दार पुन्हा उघडले. बस थांब्यावर आलो तर टोकन एकच शिल्लक , म्हणजे पुन्हा रात्री परतताना ५० सेंट जास्ती टाका किंवा ५/१० टोकन आजच विकत घ्या. तर एकूण काय तर दिवस वर येवू लागला तसे आडथळे वाढू लागले. शेवटी बस पकडून सर्वच अस्वस्थतेकडे कानाडोळा करीत पुस्तक उघडून वाचन सुरु केले श्री. रा. द. पेंडसे यांचे 'मी पाहिलेले जेआरडी ' वाचत होतो, पण त्यातही मन रमेना अखेर 'एअर इंडियातून निष्कांचन' हे प्रकरण सुरु केले. तेथेही जेआरडी सारख्या कर्मयोग्यास आलेले अस्वस्थतेचे कटू अनुभवच नमूद झालेले. बसवर प्रवाशांची येजा सुरूच होती शेवटी सरळ पुस्तक बाजूला ठेवले आणि डोळे चोळून स्वस्थ चित्ताने बसावे म्हटले, सहज आजूबाजूस नजर टाकली आणि डोळे मिटले तर डाव्या बाजूने नुकत्याच येवून बसलेल्या एका आडदांड बहुदा आफ्रिकन माणसाचे बडबडणे कानावर आले.तो प्रवासी उगाचच चेकाळला होता. शब्द कानार येत होते पण आर्थ लागत नव्हता पण पुन्हा एकदा तो माझ्यासाठीच बडबडतो आहे हे लक्षात आले. Do not observe , mind your……….. तत्सम काही म्हणत राहिला पुन्हा शांतता पुन्हा बडबड*******असंबद्ध शब्द I will punch your face xxxx I will call police. कानात शिरले ........ मग मात्र राग अनावर झाला. असेल सुदृढ,असेल आडदांड, असेल आफ्रिकन म्हणून मी गप्प का बसायचे? मन म्हणाले, आणि मी त्याच्या दुप्पट आवाजात सह प्रवाशांना देखील समजेल अश्या स्वच्छ शब्दात त्याला म्हणालो You try this and then see what happen, you …………..मग मात्र तो जागेवरून उठला I will call police असे बडबडत बस ड्रायव्हर पर्यंत गेला परत बडबडत आला. मी पुस्तक पुन्हा एकदा उघडून वाचन सुरु केले. पण ओळींवरून नुसतेच डोळे फिरत राहिले तो मध्येच कोठे तरी आला तसाच बडबडत उतरून देखील गेला, पण मनस्वास्थ्य बिघडवून.मी सरळ पुस्तक बाजूला ठेवले आणि विचार करीत राहिलो.

खरच एखादा दिवस असा का सुरु होतो ?

Tuesday, December 7, 2010

काहूर .

प्रथम तुझा हात घेतला हाती
थरारली दवात भिजलेली गवतांची पाती.
ओठांचा कोपरा दुमडून झालीस दूर
पण पाहून तुझी सलज्ज   हालचाल
दव बिंदुंच्या मनात उठले काहूर .

Sunday, December 5, 2010

उचलले पेन लावले कागदाला ....

पूर्वी म्हणजे अगदी पूर्वी नाही ……फार तर तीस चाळीस वर्षांपूर्वी,मी तेंव्हा आजोळी राहत होतो तेंव्हाची गोष्ट. घरी दारी , शेती वाडीवर बोलणाऱ्या लोकांच्यात म्हणींचा वापर आगदी सहजतेने होत असे.माझी आजी देखील त्याला अपवाद नव्हती. आणि फक्त आजीच नाही आसपास राहणारे, कष्टकरी शेतकरी संपर्कात येणारा प्रत्येक जण आपले मत आपला विचार मांडताना समृद्ध भाषेचा वापर करीत असे.

आमच्या लहानपणी आम्ही तालुक्याचे गावी राहून शिकलो गावाचे नाव उरूण-इस्लामपूर ह्या गावाचे आणखी एक विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणची सर्व कार्यालये, म्हणजे तहसीलदार कार्यालय, गट विकास कार्यालय,पोलीस स्टेशन,कोर्ट हे उरूण -इस्लामपूर येथे आहे पण तालुक्याचे नाव मात्र आहे वाळवा तालुका.आणि मला वाटते कि तालुक्याचे गाव एका ठिकाणी आणि नाव एका ठिकाणी असे असणारा हा एकमेव तालुका असावा. थोडे विषयांतर झाले पण सांगण्याचा मुद्दा काय तर शेती प्रगत परिसरात राहताना भाषा जपण्याचे बाबत मात्र जुनी पिढी जागरूक होती. घरात जेवणाची वेळ झाली आणि आम्ही मित्र परिवारात भटकत( खरे तर उंडारत) असलो तर आजी मामास सांगे , जारे! "त्याला बोलवून आण" मग मामाने विचारले कि पण तो गेलाय कुठे तर आजी कधीही मी कोणत्या मित्राचे घरी असेन हे न सांगता मामास म्हणे 'चुकला पीर मशिदीत. कि,त्यानंतर मामा मला बोलवण्यासाठी माझ्या मित्राचे घरी हजर.त्या काळी महिनाअखेरीस शेजारी पाजारी तात्पुरती मदत मागणे हा नित्याचा प्रकार असे. पण ते काम आम्हा मुलांना सागितले कि,त्याचे खूप दडपण येत असे. असेच एकदा मला आजीने समोरच्या घरातून साखर आणण्यास जा म्हणून सांगितले आणि हातात वाटी दिली.मला ती वाटी हातात घेवून जाण्याची खूप लाज वाटत होती. मग मी ती वाटी मी चड्डीच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो ते पाहून,आजी म्हणाली,"जारे हातात घेवून-' ताकाला जाताना भांडे काय लपवतोस'?" माझी मात्र विकेट उडालेली ??? ? आणायची आहे साखर आणि आजी म्हणते ताकाला जाताना भांडे काय लपवतोस?

अर्थात घरी आणि परिसरात तेंव्हा अशा खूप सुंदर म्हणी किंवा सुविचार कानी पडत, गल्लीतील काही घरे हि खणात मोजली जाणारी ,खणखणीत होती. त्याची सर्व साधारण रचना सारखीच म्हणजे प्रथम अंगण, मग ओसरी, त्यापुढे सोपा नंतर माजघर ..
अशा घरांच्या तुळईवर खडूनी सुविचार लिहिण्याची प्रथा असे त्यातील --' यत्न तो देव जाणावा ' प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे 'हे नेहमी दिसणारे सुविचार तर काही ठिकाणी संस्कृत सुभाषिते लिहिलेली असत. एका ठिकाणी - 'उगीचच मध्ये बोलून अपमान करून घेवू नका.'अशी पुणेरी वळणाची पाटी पाहिल्याचे आठवते तर हेच एका ठिकाणी ' जाणत्या समोर आपले गुण सांगू नयेत, कारण तो ते स्वतःच जाणतो. मुर्खासमोर आपले गुण सांगू नयेत कारण त्याचा उपयोग नसतो. असे भले मोठे वाक्य लिहून तुम्ही गप्प बसणे हिताचे हे सांगितले होते.

आता माझ्या शाळे विषयी म्हणाल तर, शाळा तिची परंपरा आमच्या गुरुजनानांनी आम्ही घडण्यासाठी घेतलेले कष्ट यांचे महत्व त्या काळी पुरेसे उमगलेच नाही असे आता म्हणावे वाटते. कारण १९६७/६८ साली इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला तेंव्हा आमच्या शाळेचे सुवर्ण मोह्त्सवी वर्ष होते.आणि आमच्या शाळेतील मुख्याद्यापक श्री. सांगलीकर सर आणि त्यांचे अनेक सहकारी अक्षरशः दारोदार फिरून शाळेच्या भविष्यातील विविध प्रकल्पांचे पूर्तीसाठी निधी संकलन करीत होते.

त्या काळी त्यात त्यांना किती यश आले किंवा कसे यांची आकडेवारी कधीच समजली नाही पण समृद्ध विचारधन विद्यार्थ्यांना दिले पाहिजे हे जाणून तसा प्रयत्न आमच्या त्या शाळेने नक्कीच केला असे मी आज मनपूर्वक आणि खात्रीने सांगेन. या वाक्याची प्रचीती आपणास यावी यासाठी मी शाळेत असताना वार्षिक स्नेह संमेलनासाठी शाळेने बोलावलेले प्रमुख पाहुणे कोण होते यांची माझ्या आठवणीतली नावे तुम्हास सांगतो, त्यात होते श्री. गं.बा. सरदार, अँडमिरल आवटी , श्रीमती शांता शेळके, श्रीमती इंदिरा संत. आणि तरीही आणखी तीन नावे आता विस्मृतीत गेली आहेत.पण एक खात्री आहे कि पाहुणे कोण होते हे आठवत नसले तरी त्यांनी स्नेह संमेलनाचे निमित्ताने दिलेले विचारधन कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नक्कीच कोरलेले आहे. आजच्या संगणकीय जगताचे भाषेत सांगायचे झाले तर ते हार्ड डिस्कवर (नव्हे हार्ट डिस्कवर ) आहे.

त्या काळातील शिक्षक किंवा मास्तर यांना काय किंमत होती ते सांगायचे झाले तर माझे आजोबा श्री गणेश रघुनाथ कुलकर्णी हे बहे नावाच्या माझ्या आजोळचे गावी शाळेचे मुख्याद्यापक होते.त्यांना सर्वजण “बाबा मास्तर” म्हणत. त्यांचे निधन १९६४ साली झाले. आज पंचेचाळीस वर्षांनतर मी आजोळी गेलो तर,तेथील जुने जाणते लोक मला ओळखतात ते बाबा मास्तरांचा नातू म्हणून. त्यांची हि ओळख टिकली ती त्यांनी ज्ञान दानासाठी जे कष्ट त्याकाळी घेतले त्यामुळे.

आमच्या हि शाळेबाबत मला नेहमी असेच वाटत आले आहे कि, कदाचित आमच्या आधीच पन्नास वर्षे शाळेने त्या परिसरात असे अनेक विद्यार्थी घडवल्या मुळेच आमच्या कानावर समृद्ध भाषा पडत राहिली असेल का ? माहित नाही पण वयाचे भान न ठेवता जर आजी समोर कधी फुशारकी मारली तर मात्र आजी पटकन म्हणत असे तुझे हे नेहमीचेच आहे " उचलली जीभ लावली टाळूला "
पुढे जेंव्हा त्या म्हणीचा उलगडा झाला तेंव्हा पासून आपोआपच नको तेंव्हा नको ते इतरांना ऐकवण्याची सवय आपोआप मोडली. पण हि आठवण सांगण्यासाठी मात्र आज मी काय केले माहित आहे का ? नाही ना , काही नाही जेंव्हा हे सर्व आठवले तेंव्हा उचलले पेन आणि लावले कागदाला.

Friday, December 3, 2010

मागणे सरणावरील.

आजच का तुझे असणे उसने वाटे,
गुलाब कोमेजतोय, पण फुललेत काटे

आजच का तुझा गंध भासे उपरा,
पारिजातकाच्या आसवांनी भिजातोय डोळ्याचा कोपरा

तुझे रुसणे आणि हसणे तेंव्हा होते सोनसळी
मग आजच का चंद्र किरणात भाजून निघतेय मासोळी

नको होवूस आरक्त , सांज अवतरेल आभाळी
सलज्ज मोहक हसू तुझे , गालावरती  थरथरेल खळी

मागणे आता एकच या कलत्या सांजवेळी
नकोत शपथा, नकोत आठवणी, या बकुल तरुतळी ....

नको मांडूस नवा खेळ,असता मी या सरणावरी
चिमुटभर राख भांगात भर, माझी चिता विझल्यावरी

Thursday, December 2, 2010

शिल्प.

हृदयाच्या गर्भातून उठली एक कळ
चमकली मूर्त तिची जणू पाषाणातील काळा कातळ

गळून पडले छिन्नी हातोडे थरारले मन वेडे
मूर्च्छित कलाकाराभोवती नुसतेच गर्दीचे कडे....

कोण म्हणे उन्हाचा झटका, कोण म्हणे भुकेचा फटका
खरच कुणा उमगेल कलाकाराच्या मनीचा खटका.

घडत असता मूर्त जडले नाते अमूर्त
पाषाणातून प्रकटता शिल्प,झडले मनीचे विकल्प

तो नव्हता मंदिराचा जिर्णोधार किंवा परिसराचा कायाकल्प
जणू साकारला होता त्याच्या अंतरीचा संकल्प

ते नव्हते छिन्नी हातोड्याचे घाव
फिरले होते पाषाणावरून जणू त्याच्या मनीचे भाव

हे तरी खरे कसे मानावे? .......बोलले अंतर्मन

घाव पहिला बसता कडाडली होती वीज
निमिषार्धात प्रकाशले भरदुपारी आकाशदीप
तरीही मनाने अंतरी आठविला नंदादीप

स्मरून तिला लावली होती मी शुभ्र सांजवात
तरीही आकारले होते वावटळातून झंजावात

शिंपडून पाणी केले बसते गर्दीतून कोणीतरी
भाकर तुकडा समोर धरीत

कोणी बोलले थांब जरा
कमी होवू दे उन्हाची तिरीप.

डोळ्यातून सांडत आपलेपणा त्याने गर्दीचे मानले आभार
लोटी आणि भाकर तुकडा घेतला त्याने साभार

न मोडला भाकर तुकडा, न जाणवली उन्हाची झळ
घडलेल्या मूर्तीने नजरेतूनच दिले घाव सोसण्याचे बळ

'मैफिल एका रात्रीची'

तिची माझी पहिली भेट माझ्या मित्राच्या घरी झाली. मी नुकतेच कॉलेज सुरु केले होते. ती तिच्या बहिणी बरोबर आलेली. गोरी गोरी गोबरे गाल छानसा ड्रेस अंगावर .डोळे इतके बोलके कि, जणू सतत हसून काहीतरी सांगत आहेत. तेंव्हा वाटले हीच ती सोनपरी ! जिचा आपण शोध घेत आहोत. पण सगळे मनातल्या मनात, कोणास सांगणार कि हि आवडली आहे. आणि जिथे घर न दार, शिक्षण नातेवाईकांचे मेहरबानीने चाललेले. आई पुण्यात कष्ट काढती आहे, म्हणजे जबाबदारी हि की शिकून घराला हातभार लावण्याची गरज प्रथम पूर्ण करणे जरुरीचे.

दोन दिवस आठवणीत गेले.मन उदास झाले. आणि आपोआप दिनचक्र सुरु झाले.सोनेरी दिवस उडून गेले. पुण्यात येवून पुढील जीवनक्रम सुरु झाला. वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाई बागडताना दिसली कि मन उडत उडत मित्राचे घरी पोहचत असे, सोनपरीला आठवून परत येत असे. पण एक दिवस अघटीत घडले. माझ्या मित्राने काही कारणाने तिच्या बहिणीचा पुण्यातील पत्ता दिला.आणि तिला काही निरोप देण्यास सांगितले.मध्ये काळ गेला होता दीड तपाचा. मी मित्राचा निरोप घेवून तिच्या बहिणीचे घरी गेलो. भेटीने ती ही आनंदली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निघता निघता सहजच तिला “तुझी घाकटी बहिण काय करतेय ? “ म्हणून विचारले आणि तिने सांगितले कि, “अरे आता ती खूप काही करते आम्हा बहिणीतील ती एकमेव आहे जी जणू मुलगा होवून बाबा गेल्यावर आईला सांभाळते आहे”. गाणे शिकून सूर पकडला आहे. उच्च पदवी तीही अर्थशास्त्रातील घेवून बँकेत नोकरी करते आहे. सर्व ऐकून मी सर्दच झालो. अरे गोबऱ्या गालाची सोनपरी सोनसळी कधी झाली. खरच एकदा भेटलेच पाहिजे असे मानस बजावत निघणार इतक्यात थोरली सहज म्हणून गेली आज ती पुण्यास येणार आहे. तिची गाडी स्वारगेटला सहा वाजता येईल. मी ऐकून न ऐकल्यासारखे केले. आणि निघतो म्हणून बाहेर पडलो. घड्याळात बघितले ५.१५ वाजत आले होते. मोटारसायकलला किक मारली आणि थेट स्वारगेट गाठले. मन म्हणाले काय वेडेपणा करतोयस? पंधरा वर्षांपूर्वीची भेट. आता ती एक सुरेख गायिका, नोकरीत स्थिरावलेली. काय म्हणून तुला ओळख देईल. पण अंतर्मन म्हणत होते अरे तू तिला ओळखतोस ते सोनपरी म्हणून भेटून तर बघ.

गाडीने प्रवेश केला. गर्दी ओसरू लागली आणि तिला ओळखण्याचा प्रश्नच उरला नाही. तेच बोलके डोळे तेच गोबरे गाल, छे छे ते गोबरे गाल आता आरक्त झाले होते. तिला पाहताच अंगावरून एक लाट गेली. मी पुढे झालो. आणि आणि काय आश्चर्य तिने पहिले आणि तिने जिंकले. इतकी गोड हसली म्हणून सांगू , जणू पंधरा वर्षे नाही तर पंधरा दिवसानीच भेटतो आहोत. मला विचारले “अरे! तू इथे कसा काय? “ मी खरे तर तिच्या बहिणीकडे ती येणार हे कळले म्हणून आलो होतो पण मी तिच्याशी चक्क खोटे बोललो. म्हटले,”अग घरी पाहुणे आले होते त्यांना निरोप देवून परत चाललो होतो आणि तू अचानक दिसलीस.” माझ्या बोलण्यातील खोटेपणाचा जरासुद्धा वास तिला आला नाही. उलट ती तर इतकी खुश दिसली कि जणू मी तिलाच उतरवून घ्यायला आलो आहे. मी विचारले मी सोडू का तुला बहिणी कडे तर ती सहजच हो म्हणाली. मग काय मला तर स्वर्ग दोन बोटे उरला. तिची बँग गाडीवर मागे बांधली. आणि मोटारसायकलला किक मारली. माझी सोनपरी माझ्या मागे मला खेटून ( जागाच कमी असल्याने) बसली होती. मी तिला प्रवास कसा झाला ? विचारले ती “ छान ” म्हणाली. मन म्हणाले कोणता प्रवास विचारतोयस पंधरा मिनिटांपूर्वी संपलेला कि पंधरा वर्षांपूर्वी सुरु झालेला. तिच्या बहिणीचे घर आले पटकन उतरून ती घरात गेली आणि बहिणीला म्हणाली, “ अग ताई ! कोणी सोडले मला बघ. मला पाहून बहिण म्हणाली, “तुझी कोठे भेट झाली?”मी म्हणालो, “ अग!स्वारगेटला हि अचानक भेटली.” त्यावर ती म्हणाली, “ बरे झाले “ आणि माझी खूप काही गणिते मांडून तिला गाडीवरून आणण्याची धावपळ इतरांना 'अचानक' वाटली. पण मला माझी सोनपरी पुन्हा भेटली, तो योग मात्र असा अचानक आला होतो. तिला अच्छा ! म्हणून बाहेर पडलो.पण मानस वाटले कि, माझ्या मित्राने तिच्या बहिणीचा पत्ता देवून जणू माझ्या हाती जादूच्या पेटीची चावीच दिली आहे.

असेच दिवस चालले होते. नियतीच्या मनात काय होते कोणास ठाऊक? पण त्या बहिणीकडे जाणे येणे कमी होत गेले. संपर्कच राहिला नाही. बघता बघता चार/पाच वर्षे गेली. घरून असणारा सततचा तगादा,आईचे कष्ट पाहता लग्नास उभे राहणे हि कर्तव्याची बाब झाली आणि त्यातून माझे लग्न झाले सोनपरीला भेटण्याचे स्वप्न तसेच राहिले. जणू सागर किनाऱ्यावर शोधून शोधून हाती आलेला परीस कधी निसटून गेला तेच समजले नाही.

माझ्या लग्न नंतरची गोष्ट. एक दिवस ध्यानी मनी नसताना,पुन्हा तिच्या बहिणीची भेट घडून आली. जुने दिवस, जुन्या आठवणींचे मोहळच उठले. मला आठवतेय जवळ जवळ सहा तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आठवणीचा वारू चौखूर उधळला होता.त्याने तिचे माहेर, माझ्या मित्राचे गाव,माझे आजोळ असा खूप खूप प्रवास आम्हाला सहा तासात घडवून आणला होता. गप्पा निघता निघता माझ्या सोनपरीपाशी आल्या . एक मन म्हणत होते कशाला पुन्हा पुन्हा खपली काढून रक्त बंबाळ होतोस तर एक मन म्हणत होते अरे निदान डोकावून तरी येना सोनपरीच्या राज्यातून. “कशी आहे ग ती?”मी अगदी सहजतेने विचारले. “अरे!ती न” असे म्हणून बहिण गप्प झाली. जणू तिचे शब्द नव्हे, श्वासच थांबले होते. मी हि भांबावलो. आपले काही चुकले का? असे वाटले. मग मी सावरत म्हटले,”अग बरेच दिवस काहीच कळले नाही म्हणून विचारले. ”आता कोठे असते. आनंदात आहे ना तिचा संसार? मग मात्र डोळ्यात पाणी आणून बहिण बोलती झाली म्हणाली,”अरे ! फार मनस्वी आहे ती. कोणाशी म्हणून बोलत नाही.लग्नच करणार नाही म्हणते.”

काय करू ? तू तरी सांगशील का तिला काही समजावून ! २७/२८ म्हणजे अजूनही फार उशीर नाही झालेला पण दिवस काय थांबतात का रे कोणासाठी? बोलशील ना एकदा तिच्याशी.” “माझ्यासाठी एवढे करच”. जणू तिने हुकुमच सोडला. जणू काही मी तिला नाही म्हणूच नये. माझ्या मनात चर्र झाले. जिची इच्छा मनात धरली, पण भावना कोठेच उलगडली नाही, त्या माझ्या सोनपरीचे इतके नाजूक मर्मबंध पुन्हा एकदा उसळून आले.मी गुंतून तर जाणार नाही ना ? पण दुसरे मन म्हणाले अरे खरेच आवडली होती ना मनापासून. केले होतेस न अबोल प्रेम तिजवर. मग आता निदान तिचे सुख शोधण्याची तिच्या बहिणीची इच्छा तरी पुरी कर.

माझी संभ्रमित अवस्था पाहून तिची बहिण म्हणाली, “ तुला अवघड वाटणार असेल तर राहू दे. उगाच मी बोलले. “ त्यावर मी पटकन म्हणालो,” अस काय म्हणतेस मी नक्कीच बोलेन तिच्याशी.” आणि माझ्या त्या होकाराने बहिणीच्या डोळ्यात समाधानाचे आनंदाश्रू आले. मग सोनपरीला पुण्यातच बहिणीने बोलवायचे आणि मग तिला घेवून मी बाहेर जायचे आणि आम्ही बोलून यायचे, असे ठरवून आम्ही परस्परांचा निरोप घेतला. बहिणीच्या दृष्टीने तिने अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माझा आधार घेतला होता तर मी मात्र आठवणीच्या गर्तेत गटांगळ्या खात होतो.

त्या काळात माझ्या मनाची अवस्था अशी काही होती कि, घरात सुद्धा दोन तीन वेळा “हल्ली काय तुझे मन थाऱ्यावर नसते का? काही विचारले कि लक्ष नसते. जेवताना काही पाहिजे का म्हटले कि हो नाही, नको नाही. काय झालेय तुला ?”असे प्रश्न येवू लागले.मग मात्र ठरवले जावू दे, आपण तटस्थ राहून, मगच खरी मदत सोनपरीला करू शकतो. आणि निग्रहाने शांत होण्याचे ठरवले. अवघड गेले ते अमलात आणताना. पण अखेर यश आले चित्त स्थिरावले. दैनंदिनी पुढे सरकू लागली. आणि एक दिवस तो दिवस उजाडला तिच्या बहिणीचा फोन आला कि, ती आली आहे एकदा येवून जा.त्याच दिवशी संध्याकाळी मोटारसायकल काढली तिच्या बहिणीचे घरी गेलो. तर सोनपरी गावाहून आलेली. तेच हसरे आणि बोलके डोळे.पण यावेळी थोडी अंतर्मुख वाटली. तिला म्हटले,”चल!इतके वेळा पुण्यात ताईकडे येतेस पण घरी कधीच आलेली नाहीस आज जावून येवू” ती सहजतेने हो!म्हणाली. बहिणीचा तर काही प्रश्नच नव्हता. तिला मोटारसायकल वर घेतले. पण आज तो शहारा नव्हता. तिला म्हटले घरी कोणीच नाही तेंव्हा आपण बाहेरच काहीतरी खावून मग घरी जावून येवू. चालेल का ? ती लगेचच तयार झाली. मला आठवतेय पुण्याबाहेर कोथरूड/ कर्वेनगर उपनगरात कोठेतरी 'योगी' नावाचे हॉटेलात आम्ही आलो. जणू काही माझ्या अंगी पण तीच स्थितप्रज्ञता हवी होती जी योगी टिकवून ठेवतो.काय खाणार विचारले तर खास काहीच उत्तर नाही. शेवटी मीच प्रथम सूप घेवू म्हणत,हॉट अॅन्ड सोअर सूपची ऑर्डर दिली.तिचे लक्ष न खाण्यात न बोलण्यात भिर भिर अवस्थाच झालेली.

शेवटी मनाचा हिय्या करून विषयाला हात घातला आणि सरळ सरळ विचारले,” तू लग्न का करत नाहीस?”.तिने खाणे थांबवले आणि म्हणाली, “जेंव्हा तुझी वाट पहिली तेंव्हा कुठे होतास? “आणि आता स्वतःचे घर संसार झाल्यावर मला विचारतोस कि, लग्न का करत नाहीस? तुला माहित आहे ,मी गाणे शिकले ते गाण्यासाठी नाही रे ते शिकले जीवनाचे सूर समजावेत म्हणून, पण ज्याच्या साठी मैफिल रंगवावी वाटले, त्याने कधी ताल मागितलाच नाही. मग आता काय करू? “कोणासाठी गावू? “आज ताई म्हणाली, “तू येणार आहेस,त्याच्या बरोबर जा. काय सांगतो ते ऐक. थोडे फार जग पाहिलेय त्याने,म्हणून तुला त्याच्या बरोबर पाठवीत आहे.जरा समजुतीने घे उगीच काहीबाही बोलून त्याला दुखवू नकोस” तेंव्हा वाटले कि तिला सांगावे अग त्याचीच तर वाट पाहत राहिले.पण तो कधी निघून गेला ते कळलेच नाही ग म्हटले आता काय सांगणार आहे हा. “ तूच सांग कुठे होतास इतके दिवस? “

आणि आणि आता मला प्रश्न पडला कि, जर हिचे प्रश्नचिन्हच मी आहे तर आता मी काय गणित सोडवणार.शेवटी तिला म्हटले, ऐकायला आणि कृतीत आणायला थोडे अवघड आहे पण झाले गेले विसरून जा आणि आईसाठीतरी लग्न कर” तर मला म्हणाली, “अरे! खर सांगू तू आला नाहीस तेव्हांच ठरवले होते कि, आता आई साठीच लग्न करायचे नाही म्हणजे तिच्या सोबत राहून निदान बिनलग्नाचे तरी राहता येईल. आणि जगाला सांगू कि आईसह मला सांभाळणारा कोणी मिळत नाही म्हणून मी लग्न करीत नाही. काय बोलणार मी त्यावर, पण शेवटी तिला म्हणालो ,”हे बघ.! होते न तुझे माझ्यावर प्रेम, मग त्या प्रेमाची शप्पथ घालून तुला सांगतो कि, आज तू इतकी सुंदर गातेस, त्यातून मिळवती उच्च शिक्षित, तू घालशील त्या अटीवर कोणीही माळ घालेल तुझ्या गळ्यात. तेंव्हा तू माझ्या प्रेम खातर लग्नाला हो! म्हण,”मला वाटले असतात प्रेमाच्या आठवणी काढत झुरण्याचे थोडे दिवस.काही काळ गेला कि,गाडी येते रुळावर त्यानुसार ती हो म्हणेल. आणि आपले प्रेम खरे सुखी झालेले मला पाहायला मिळेल. त्यावर ती म्हणाली “जर तू प्रेमाची शप्पथ घालून म्हणत असशील तर मी आहे लग्नाला तयार ,पण मग ऐक!हि तडजोड अशी राहील,जे गाणे मी फक्त तुझ्याच साठी शिकले, ते माझ्या गळ्यातून कधीही येणार नाही. आणि जर मी पुन्हा मैफिलीत गावे, अशी तुझी इच्छा असेल, तर एक रात्र जेंव्हा तुझी नि माझी मैफिल रंगेल तेंव्हाच मी पुन्हा सतार हातात घेईन.आता तू ठरव मी कोणती मैफिल आधी रंगवू ते”.मी सुन्न होवून बसलो .गेली वीस वर्षे रियाज करून जपलेला सूर ,हि फक्त माझ्यासाठी कायमचा सोडणार ?काय उत्तर देवू तेच कळत नव्हते. शेवटी मी विचार केला आजन्म कुमारिका राहून संसाराची मैफिल उधळून सूर जपण्यापेक्षा संसार सुखात रंगून हिला प्रथम जीवनाची मैफिल सजवू दे. आणि तिला शेवटी मी एक खोटे वचन दिले तू लग्न कर, आणि रियाज चालू ठेव तुझी गाण्याची मैफिल यशस्वी होण्यासाठी आपली एका रात्रीची मैफिल नक्की रंगेल ! तु वाट पाहत रहा ! मी नक्की येईन. ती आनंदली तिने उठून मला चक्क मिठीच मारली आणि तिच्या तोंडी शब्द आले,” तू येई पर्यंत माझा रियाज सुरु राहील,आणि ताईला सांग मी लग्नास तयार आहे.”

घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजत आले होते. दोन तास संपले होते पण तिच्या बहिणीचा प्रश्न मी सोडवला होता स्वतःच प्रश्न बनून.

पुढे तिचे लग्न झाले. तिने हवा तसा नवरा मिळवला कि नाही हे आजही सांगता येणार नाही पण स्वतःच्या जिद्दीने तिने एक वचन मात्र पदरात पाडून घेतले ते म्हणजे 'मैफिल एका रात्रीची'. आणि मी मात्र एक केले गाणे ऐकणेच सोडून दिले. मैफिलीच्या सुरांची ओढ नको म्हणून मैफिलीची रात्र सुरूच होवू द्यायची नाही असे ठरवून टाकले. आणि म्हणूनच सरळ पुणे, पुण्यातील स्थिर नोकरी, घरदार सर्व सोडून एकटाच, सातासमुद्रापार अमेरिकेस येवून राहिलो. अजूनही वाटते आहे कि, सोनपारीने तिचा रियाज आणि गळा दोन्ही जपावे. आणि वचनभंग करीत तिने पुन्हा गावे. एक दिवस नक्कीच ते सूर सातासमुद्रापार येवून माझ्या कानावर पडतील आणि मैफिलीची खरीखुरी सांगता होईल.