Showing posts with label ललित.. Show all posts
Showing posts with label ललित.. Show all posts

Sunday, June 16, 2013

पितयापरी त्वां सांभाळिले ।

आजच्या रविवारी सकाळी नेहमीच कानावर पडणारे आणि बरेचदा म्हटले जाणारे व्यंकटेश स्तोत्र ऐकत होतो. पण एका ओळीवर मन एकदम अंतर्मुख झाले. कारण त्या ओळी होत्या -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
अनेक वर्ष नियमित म्हटले जाणारे स्तोत्र आणि त्यातील हे सुमधुर कडवे आज मला एक वेगळाच अर्थ समजावून सांगत होते.अर्थात या अंतर्मुखते मागे दोन घटनांची एकत्र गुंफण झाली होती. आज पितृ दिन जो निम्म्यापेक्षा अधिक जगात वडिलांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तो आजचा रविवार आणि आजची तिथी हि माझ्या आईची प्रथम पुण्यतिथी.
नक्की काय बोलावे ? कसे व्यक्त व्हावे काहीच सुचतच नाही. कारण तसे पितृ छत्र वयाच्या चौदाव्या वर्षी हरपले. आणि वयाच्या नवव्या वर्षापासून शिक्षणाकरिता घरापासून दूर रहावे लागल्यामुळे वडिलांचा सहवास कमी काळ लाभला. अल्प आजाराने त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अकस्मात निधन झाले.पण बालपणातील ज्या काही थोड्या धूसर काळाच्या पडद्याआड वडिलांच्या रेंगाळणाऱ्या आठवणी आहेत, त्यातील सर्वात महत्वाची आठवण म्हणजे," स्वाभिमानाने जगा ! " हा त्यांनी कृतीतून दिलेला संदेश. आणि जीवापाड केलेले प्रेम. अर्थात त्यावेळी लहान वयामुळे त्या कृती मागील भावना अर्थ हे तेंव्हा नक्कीच उमजले नाहीत पण आजच्या पितृदिनी त्या आठवणींनी मन सदगतीत नक्कीच होत आहे.
सन १९६८/६९ च्या दरम्यान वडिलांची नोकरी गेली आणि आमच्या घराची अवस्था व्यंकटेश स्तोत्रातील 'अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा ' यासारखी झाली. पण मला आठवतेय कि परिस्थीची खंत न बाळगता कष्टाने पण स्वाभिमानाने जगावे याचा पहिला धडा त्यांनी कृतीतून आम्हाला दिला. कोल्हापूर आणि रंकाळा यांचे नाते अतूट आहे. पण आमच्या आठवणीतील रंकाळा हा जेंव्हा शालिनी पॅलेस हे हॉटेल झाले नव्हते आणि रंकाळ्याचा काठ गावाबाहेर मोकळी हवा खाण्यासाठी फिरावयास जाण्याचे ठिकाण होते तो काळ. त्यावेळी 'रंकाळा चौपाटी' अस्तित्वात आलेली नव्हती पण हे ठिकाण एक दिवस नक्कीच चौपाटी होणार याची मनात खात्री होती बाबांच्या मनात पक्की खात्री होती. कारण तेथे फिरावयास येणाऱ्या लोकांना चिवडा पाकीट विकण्याचा पहिला प्रयोग माहे मे १९६८ मध्ये माझ्या बाबांनी केला.
त्या अर्थार्जनाचे प्रयोगास मी सक्रीय मदत केल्याचे मला आजही आठवते.इतकेच काय पण रु३.५०चे चिवडा सामान पोहे,शेगदाणे,खोबरे, तेल व छोट्या प्लास्टिक पिशव्या आणयचे मग आई त्याचा चिवडा बनवून देत असे. तर बाबा त्याची ५० पाकिटे तयार करीत असत. मग ती पाकिटे घेवून सायंकाळी ४.००ते ७.३० या वेळेत ती मी रंकाळ्यावर फिरावयास येणाऱ्या मंडळींना ती विकत असे. पन्नासावे पाकीट विकले गेले कि कोण आनंद होत असे मग ते ५.०० रुपये घेवून घरी गेले कि, त्यातून रु.३.५०चे चिवडा सामान व रु. १.५०चे किराणा सामान आणून त्या दिवशीची चूल पेटत असे.पण हे करताना कधी लाज बाळगण्याचे कारण नाही, आपण मिळवत आहे तो पैसा कष्ट करून मिळवत आहोत हे बाबांचे सांगणे असे. मला आठवते आहे कि, प्रथम हा धाडसी वाटलेला बाबांचा विचार पुढे किमान सहा महिने घर चालवण्यास उपयोगी ठरला.
प्रथम हा प्रयोग करताना परिचित नातेवाईक यांनी केलेली थट्टा आजही आठवते,पण आज “ रंकाळा चौपाटी”चे बदलते रूप पहिले तर मला मात्र बाबांची दूर दृष्टीच जाणवते. या चिवडा विक्रीतील एक किस्सा मला आजही आठवतो माझा थोरला भाऊ शेखर यास हा उद्योग फारसा आवडत नसे त्यामुळे तो स्वतः चिवडा विक्रीस जाण्यास राजी नसे. एके दिवशी बाबांनी थोडेसे सक्त्तीनेच माझ्या ऐवजी भावास चिवडा विक्रीस पाठवले.
तर तो गेला पण तासाभरातच परत आला आल्यावर घरी सर्वच आश्चर्य चकित झाले व त्यास विचारले अरे वा तू तर लवकर काम संपवलेस किती पाकिटे संपली? तर तो म्हणाला एक! आणि त्याचे पैसे कुठायत विचारल्यावर तो म्हणाला एक पाकीट पेरुवाल्यास दिले आणि आणि त्याचे कडून पेरू घेतला आणि तो खाल्ला. त्यानंतर बाबांनी कधी त्याला चिवडा विक्रीस पाठवले नाही.
खरे तर मला अण्णांचा सहवास तसा अल्पच लाभला. मी दहावीत गेलो आणि अण्णा गेले म्हणजे मी जेम तेम १४ वर्षांचा होतो आणि त्या चवदा वर्षांपैकी अखेरची पाच वर्षे मी त्यांचे पासून दूर मामाकडेच काढली. कारण मी चवथीपर्यंत घरीच असल्याने पहिली, भगवंताचे मंदिर- बार्शी, दुसरी ते चौथी, भक्ती सेवा विद्यापीठ - कोल्हापूर या ठिकाणी शिकलो.आणि त्यामुळेच माझ्या वडिलांबाबतच्या आठवणी तश्या थोड्या धूसरच आहेत पण त्या आठवणींचा चलचित्रपट आणि माझ्या मध्ये एक अदृश्य असा धुक्याचा पडदा आहे. कधी कधी एखादीच आठवणींची झुळूक येते आणि तो पडदा क्षणभरासाठी दूर होतो आणि अण्णा येवून समोर उभे राहिलेत असे वाटून तो काळ मी आजही पुन्हा एकदा तसाच अनुभवतो.
त्यामुळे जगाने जसे माझ्या बाबांना कधी ओळखले नाही तसे, जगास असे वाटते कि आम्हा मुलांना आमचे बाबा आठवतच नाहीत. पण त्याचा दोष मी माझ्या बाबांच्या आसपास वावरणाऱ्या परिचितांना देणार नाही कारण त्यांनी पहिले ते त्यांचे बाह्य रूप.अर्थात जवळचे नातेवाईक सुद्धा बाबांच्या वागणुकीवरून त्यांना तापट , हट्टी, दुराग्रही, हेकेखोर, तऱ्हेवाईक इतकेच काय पण माथेफिरू, वेडसर, मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावून मोकळे होत.
या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले
.
जसा जसा काळ मागे पडू लागला तसे तसे ज्या माझ्या वडिलांना इतकी विशेषणे न मागताच मिळाली ते माझे बाबा खरेच कसे होते याचा मला वरचेवर प्रश्न पडू लागला. कारण माझ्या आठवणीतील बाबा हे त्यांना मिळालेल्या कोणत्याच विशेषणात बसत नाहीत असा माझा पक्का समज होता पण न कळते वय आणि मन मोकळे करावे असे कोणी मैत्र नाही त्यामुळे माझे बाबा हे फक्त माझेच राहिले. त्यांचे मला भावलेले रूप इतके दिवस माझ्यापाशीच राहिले.
पुढे मी माझी पुण्यातील नोकरी संपवून चाकोरीतून बाहेर पडण्याचे ठरवले तेंव्हा मला बँकेतील मनेजर पद, भविष्यात बढती, पत्नी उच्च विद्या विभूषित, स्वतःचे चार खोल्यांचे अपार्टमेंट असताना हे स्थैर्य सोडून अनोळखी ठिकाणी जावून पुन्हा एकदा नवा डाव कशासाठी मांडायचा? असा प्रश्न केला ? फक्त हाच प्रश्न विचारून जर माझे हितचिंतक थांबले असते तरी ठीक होते. पण,का तू हि वडिलांसारखा वेडेपणा करायचे नक्की केले आहेस ? असा प्रश्न केला. आणि या प्रश्नाने मला खरोखर अंतर्मुख केले आणि ते मी वडिलांसारखा वेडेपणा करतोय का ? या विचारलेल्या प्रश्ना मुळे नाही तर माझे वडील या जगाला समजलेच नाहीत या दुःखाने.
पण त्यांनी आमच्या वर केलेली माया म्हणजेच वर नमूद केलेल्या श्लोकातीतील पुर्वाध होता तो म्हणजे -
जननीपरि त्वा पाळिले । वडील असून आईची माया दिली आणि जगण्यासाठी स्वाभिमानाचा मंत्र दिला.
आजही मित्रमंडळ, नातेवाईक किंवा परिचित यांची गप्पांची बैठक जमते आणि चर्चा वडिलार्जित मिळकत त्यामुळे होणारे वितंडवाद यावर येते तेंव्हा अतिशय अभिमन्ने मी नेहमीच सांगतो कि आमच्या वडिलांनी आमच्या साठी काय केले तर एक पैशाचे कर्ज अथवा उधार उसनवारीचे ओझे त्यांनी आमच्या शिरावर ठेवले नाही .आणि तोच आमचा सर्वात मोठा ठेवा आहे.
आता आज पितृ दिन असताना वडिलांच्या बरोबरीने आईच्या आठवण येण्यामागे, आज तिची प्रथम पुण्यतिथी इतकेच कारण नाही तर, वडिलांचे त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या आकस्मिक निधन झाल्यावर, पदरात असलेली तीन मुले संभालण्यासाठी तिने जे काही कष्ट घेतले होते त्याची किंमत शब्दात सांगता येणे कठीण आहे.
वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी वैधव्य पदरात पंधरा ते सहा वयोगटातील तीन मुले या परीस्थितीत तिने लेथ मशीनवर मशिनीस्ट म्हणून कष्टाची नोकरी स्वीकारून आम्हा तीन भावंडाना वाढवले. त्याकाळी आठ बाय दहाच्या चाळीतील खोली हेच आमचे विसाव्याचे ठिकाण होते. घरच्या गरिबीत नातेवाईक येत नसत, पुढे परिस्थिती सुधारल्यावर जेंव्हा नातेवाईकांपैकी कोणाकडून जेंव्हा पहिली साडी आईला घेतली गेली तेंव्हा आई म्हणाली होती कि," हा सन्मान माझा नसून सुधारलेल्या परिस्थितीचा आहे."
आणि पैशाशिवाय जगात किंमत नसली तरी, तो मिळवताना कधीही गैरमार्गाचा वापर करू नका, हे तिचे सांगणे होते. तिचा तो खंबीरपणाच आम्हा भावंडांना जगण्याचा मंत्र देवून गेला. त्यामुळे माझी आई म्हणजे वर उल्लेख केलेल्या श्लोकातील उत्तरार्ध आहे. कारण आईने आम्हाला कसे वाढविले हे सांगयचे झाले तर - पितयापरि त्वा सांभाळले | हेच खरे आहे.
म्हणूनच आजच्या पितृदिनी माझे अकाली गेलेल्या वडिलांना आणि त्यांच्या माघारी आमचे वडील झालेल्या आईस नतमस्तक होत वंदन करताना मी पुन्हा एकदा म्हणेन -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
आणि असे छत्र देणाऱ्या माझ्या बाबा आणि आई यांना आजच्या या पितृ दिनी माझे लाख लाख प्रणाम.

Sunday, June 9, 2013

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून….
'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत.
अशी परिस्थिती म्हणजे त्या प्रज्ञावंतांची मती कुंठलेली असते असे नाही पण त्या क्षणी व्यक्त होण्यासाठी त्यांना शब्द सुचत नाहीत. पण परिस्थिती कशी हि असो,कधी शब्दांशी हसत खेळत, कधी शब्दांवर स्वार होत, कधी काव्यातून सुरेख व्यक्त होत आपल्याला भाव भावनांची सहज सुंदर सफर घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत होती त्या मराठी साहित्यातील मात्तबर ' वागीश्वरीस ' आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
दिनांक १९ ऑक्टोबर १९२२ रोजी इंदापूर,पुणे जिल्हा येथे जनार्दन शेळके यांच्या कुटुंबात कन्यारत्न जन्मास आले,कन्या रत्न असूनही अपत्य प्राप्ती मुळे मनास शांती लाभली म्हणूच कि काय त्यांनी मुलीचे नाव शान्ता ठेवले,आणि एका पर्वाची नांदी झाली. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हीच मुलगी जगासमोर 'शान्ता शेळके' या नावाने अक्षरशः अजरामर झाली.
सामान्य कुटुंब, घरची बेताची परिस्थिती, या सर्व विपरीत स्थितीत जगरीत सांभाळत हि मुलगी शिकली. इंदापूर सारख्या ग्रामीण वातावरणातून थेट पुण्यनगरी गाठत शालेय शिक्षण हुजूरपागा व महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून पूर्ण केले. अर्थात पदवीधर होणे यात जरी नाविन्य नसले तरी मराठी आणि देव भाषा संस्कृत हे विषय घेत संपूर्ण विश्वविद्यालयात सर्वप्रथम येणे यात नाविन्य होते. आणि हे करताना 'न चि केळकर' आणि 'चिपळूणकर' हि दोन मानाची सुवर्णपदके या कर्तृत्वाला जणू सुवर्ण झळाळीच आणत होती .
इतके सारे कलागुण अंगी असूनही घर संसार या आघाडीवर वाट्यास आलेली वंचना त्यांनी आयुष्यभर अंतरंगात अक्षरशः तळाशी गाढून टाकली. आणि मग स्वतःचे व्यक्त होणे उरले ते काव्यातून …।
मात्र हे व्यक्त होणे देखील एक स्वतःशीच साधलेला संवाद होता त्यातुनच त्या म्हणतात -
विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन ,क्षण क्षण झुरति नयन
कोणा सांगू?
पण हे कोणा सांगू ? हे काही उद्वेगातून नसावे, कारण त्यांनी फक्त असाह्यताच व्यक्त केली असे नाही, तर मनोव्यापारातील सर्व व्यवहार त्यांनी नेहमीच सहजतेने शब्द बद्ध केले. शब्द बद्ध कसले, शब्द त्यांच्या समोर नेहमीच हात जोडून उभे असत,मनास कोणतीही भावना स्पर्श करुदे, त्यांना शब्द रूप देणे हा त्यांच्या लेखणीचा सहज खेळ होता.सहा दशके मराठी साहित्य क्षेत्राची अविरत सेवा करताना त्यांनी कविता संग्रह, कथा, कादंबरी, अनुवाद, ललित लेखन स्तंभ लेखन बालसाहित्य अश्या अनेक विभागात लीलया संचार केला आणि त्यामुळेच असेल कदाचित हे शब्द सामर्थ्य सदोदित टिकून राहावे म्हणून, शारदेचे वंदन जितक्या नम्रतेने त्या करतात तितक्याच तन्मयतेने त्या विद्येच्या देवतेस वंदन करताना म्हणतात -
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा ,अवघी विघ्ने नेसी विलया….
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!
रचना भक्तीस्वरूप असो किंवा भावरूप असो प्रेम ,विरह ,सलज्जता असो किंवा अविष्कार शब्दरूप होताना काय घडते तेदेखील त्यांच्या कडून काव्यात उतरताना त्या म्हणतात -
फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार
जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार
आज मी आळविते केदार!
स्त्री मन हे अतिशय भावूक असते,आपल्या मनातील राजकुमार आणि त्याची आराधना यात गुंतलेले स्त्रीमन जळी स्थळी आपल्याच प्रियकरास कसे पाहत राहते हे तिच्याच शब्दात सांगताना त्या म्हणतात -
भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतील गर्द झुला
जाईन विचारीत रान फुला
भेटेल तिथे ग सजण मला !
अशी जीवनाकडे सजगतेने पाहण्याची वृत्ती असताना' प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील विवाहाचा मंगल क्षण आपल्या समोर चित्रबद्ध करताना त्या म्हणतात -
चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटुपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशीम धागे ओढिती मागे व्याकूळ जीव हा झाला
साजणी बाई येणार साजण माझा!
थोडक्यात काय तर भावगीत हा त्यांचा हातखंडाच होता.
शांताबाई शेळके यांची प्रथमची आठवण तशी थोडी धूसरच आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आमच्या शाळेत त्या स्नेह संमेलनास प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. सफेद साडी डोक्यावरून पदर ठसठसीत कुंक आणि त्यावर चष्मा असे पटकन नजरेत भरणारे भरदार व्यक्तिमत्व,त्या व्यासपीठावर आल्या आणि समोर असलेला आठशे ते हजार विद्यार्थ्यांचा समुदाय अक्षरशः मंत्रमुग्ध झाला.
त्या आल्या त्यांनी पहिले आणि खरोखरच त्यांनी काही सांगण्या अगोदरच आम्हा सर्वांना जिंकले. सुरवातीची दहा पंधरा मिनटे अगदी नेहमीच्या सोपस्कारात गेली,आजच्या प्रमुख पाहुण्याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही असे सांगत आमच्या मराठीच्या मास्तरांनी बहुमोल पंधरा मिनटे खाल्ली पण काय करणार पुढील वर्षी पुन्हा तेच मास्तर वर्गावर येणार असल्या मुळे गुपचूप त्यांचे भाषण ऐकले.
त्यानंतर शान्ताबाई बोलण्यास उभ्या राहिल्या , पुढील अर्धा तास आम्ही शाळेत येवून काय करावे, म्हणजे क्रमिक अभ्यासक्रमाबाहेरचे काय शिकावे, याचा कानमंत्र त्यांच्या कडून घेत होतो."आशीर्वाद घ्यावा वाटेल असे गुरुजन आणि अशी शाळा तुमच्या वाट्यास आली हेच तुमचे भाग्य" हे एकच वाक्य अजून जसेच्या तसे मनावर कोरले गेले.त्याकाळी अशी भाषणे ध्वनिमुद्रित करून जपण्याची सोय ग्रामीण भागातील शाळेत नसल्याने, आज ते भाषण जसेच्या तसे उपलब्ध नाही. पण जर ते असते तर पु लंच्या 'हे जग मी सुंदर करून जाईन' या अजरामर भाषणा सारखे ते सर्वश्रुत झाले असते आणि आता मागे वळून पाहताना वाटते, कि आम्ही खरोखरच भाग्यवान म्हणून त्या आम्हास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.
शान्ताबाई यांनी हिस्लॉप महाविद्यालय ,नागपूर रुईया आणि दयानंद महाविद्यालय मुंबई येथे मराठीच्या अध्यापनाचे काम केले. माझ्या उभ्या आयुष्यात मी त्यांना एका स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ऐकले,त्या अनुभवातून मला वाटते कि,खरोखर त्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परम भाग्य म्हणून त्या त्यांना शिक्षिका म्हणून लाभल्या.
एक नामांकित प्राध्यापक असल्या तरी त्या सर्वाधिक व्यक्त झाल्या काव्य रचनेतून. त्यांना चित्रपट क्षेत्राकडे परिस्थिती मुळे वळावे लागले, जेंव्हा त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरवले तेंव्हा स्वतः गदिमा त्यांना म्हणाले होते , "अहो याहून मोठे कार्य तुमच्या हातून घडेल, नका तुम्ही इकडे येवू " पण निरुपाय म्हणून या सल्ल्याकडे पाठ फिरवत त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली. त्यांना यश मिळाले,पण बहुदा त्यांचे मन मात्र त्यांना नेहमीच म्हणत राहिले-
ईश्वरेच्छा हीच किंवा संचिताचा शाप का
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते?
मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
एक गीतकार म्हणून शान्ता शेळके यांचे नाव नावारूपास आले त्याची पूर्ण कल्पना त्यांना स्वतःला देखील होती. आपली हि ओळख त्यांना मान्य देखील होती. आपली हि ओळख कायम राहावी म्हणून त्या म्हणतात -
असेन मी नसेन मी ,तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे
असे असले तरी एक प्राध्यापक, वृतपत्र संपादक, लेखिका,स्तंभ लेखिका, अनुवाद्कार, ललित लेखक, बाल साहित्य लेखिका, अश्या अनेक क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. समाजाने इतका मान सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली तरी कुटुंबाकडून झालेली परवड त्या आयुष्यभर विसरू शकल्या नाहीत. कोष्टी समाजातील जन्म त्यांना कबीराची बुद्धी देवून गेला,शब्द वीण हि कला त्यांच्या हाती अशी होती कि, रेशमाच्या रेघांनी त्यांनी अनेक कशिदे त्यांनी सहजतेने विणले. पण तरीही त्या म्हणतात -
हा स्नेह, वंचना कि, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुल हि रुतावे हा दैवयोग आहे …

Friday, May 3, 2013

'परिचय'- बर्खूरदार खलनायकाचा !....’दादासाहेब फाळके ‘पुरस्काराचे निमित्ताने !

आज दादासाहेब फाळके पुरस्काराने एक असे व्यक्तिमत्व सन्मानित होत आहे कि ज्यामुळे सन्मानित व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसणार आहे ? का त्या पुरस्काराचा सन्मान होतो आहे ? असा प्रश्न पडावा.
कारण १९६९ पासून गेली चव्वेचाळीस वर्षे दिला जाणारा हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार हा,दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माहिती आणि नभोवाणी मंत्रालयामार्फत सुरु करण्यात आला.
भारतीय सिनेमासाठी महत्वपूर्ण आणि दखल घेण्यायोग्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार, निर्मिती,दिग्दर्शन,अभिनय ,गायन, संगीत, छायाचित्रण या क्षेत्रात दिला जातो. रोख रक्कम रुपये अकरा हजार स्मृतिचिन्ह आणि शाल असा सुरु झालेला हा पुरस्कार आता रोख रक्कम रुपये दहा लाखां पर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज कपूर ,दिलीपकुमार,देवानंद यासारखे अभिनेते,तपन सिन्हा ,मृणाल सेन,सत्यजित रे, अदूर गोपालकृष्णन यासारखे दिग्दर्शक ,लता मंगेशकर,आशा भोसले,मन्ना डे यासारखे गायक कलाकार, यासह त्रेचाळीस कलावंतांना हा पुरस्कार प्रत्यक्ष वितरीत झाला आहे.
आज ३मे २०१३ रोजी, भारतीय चित्रपट सृष्टीस शंभर वर्षे पुर्ण होत असलेल्या वर्षात, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त कलावंतांची यादी अधिक सुशोभित होत आहे अशा एका नावाने,जी कलाकार व्यक्ती थोडी उशीरच सन्मानित होत आहे,आणि जी खरोखर भारतीय चित्रपट सृष्टीचा 'प्राण'आहे. आले ना लक्षात म्हणजे कोण ? तर हि कलाकार व्यक्ती म्हणजे प्राण क्रिशन सिकंद …'प्राण' पणाने ज्यांनी आपले उभे आयुष्य भारतीय चित्रपट सृष्टीसाठी वाहिले त्या पडद्यावरील खलनायकास आम्हा रसिकांचा मानाचा मुजरा !अर्थात पडद्यावरील सहस्त्रकातील सर्वात यशस्वी खलनायक आणि प्रत्यक्ष जीवनातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणजे ‘प्राण’.
बारा फेब्रुवारी १९२० रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या प्राण यांचे शालेय शिक्षण त्यांच्या वडिलांच्या फिरतीच्या कामामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. जणू काही शिक्षण घेत घेत त्यांनी बारा गावचे पाणी प्यायले होते. या शालेय शिक्षणाची सांगता रामपूर ह्या रामपुरी चाकू साठी प्रसिद्ध असलेल्या गावी झाली. आणि त्यामुळेच कि काय पण तेंव्हा जरी त्यांचा चित्रपट,अभिनय इकडे वळण्याचा मानस नसला तरी त्यांच्या वागण्यात लकबीत एक वेगळीच धार आली होती.
खरे तर प्राण यांची शिक्षणातील गती चांगली होती. त्यांचे गणितातील उपजत ज्ञान तर दैवी देणगी होती. पण असे असून देखील त्यांना उच्च शिक्षणाचे गणित काही सोडवता आले नाही. त्यामुळे म्हणा किंवा त्यांना छाया चित्रण ( फोटोग्राफी ) हा छंद जोपासावा वाटला म्हणून म्हणा त्यांनी उच्च शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि दास फोटोग्राफी स्टुडीओ या कॅनॉट प्लेस, दिल्ली स्थित दुकानात पूर्णवेळ नोकरी सुरु केली.
या दुकानाची प्रथम शाखा सिमला या थंड हवेच्या ठिकाणी सुरु झाली आणि त्याची जबाबदारी प्राण यांच्याकडे आली.तेथे त्यांनी आपले काम सांभाळत,अभिनयाच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकले. त्यावेळी अभिनय क्षेत्रात कितपत 'राम' आहे याची त्यांना जाणीव नसल्यामुळे असेल, पण त्यामुळे त्यांनी पारंपारिक ' रामलीला ' ह्या लोकनाट्यात पदार्पणातच सीतेची भूमिका वठवली होती.पुढे जेंव्हा दास यांनी दुसरी शाखा लाहोर येथे सुरु केली तेंव्हा प्राण यांनी आपला बाड बिस्तारा तिकडे हलविला. आता दिवसभर दुकान सांभाळणे आणि सायंकाळी मित्रपरिवारात रमणे,हा त्या वेळच्या वयाला शोभेल असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला.
या दिनक्रमाचा भाग म्हणून,संध्याकाळी जेवणानंतर पान खाण्याचा, त्यांच्या मित्र परिवाराचा रिवाज होता.एके दिवशी एक गृहस्थ प्राण यांच्या समोर येवून,त्यांना नखशिखांत न्याहाळत म्हणाले " काय रे नाव तुझे ?" त्यावर प्राण त्यांना उत्तरले," पण तुम्ही हे मला का विचारत आहात ? " तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख वाली महमंद वाली अशी करून देत,ते श्री. पांचोली यांच्याकरिता पटकथा लेखक म्हणून काम करतात याची माहिती दिली.
त्यापुढे,वाली यांनी मी सध्या जी पटकथा लिहित आहे त्यातील एक प्रमुख भूमिका करणार का ? असा प्रश्न प्राण यांना केला. व उद्या स्टुडीओत येवून भेटण्यास सांगितले. तेंव्हा त्या संधी मधील गांभीर्य न समजल्याने, प्राण त्यांना हो म्हणाले, पण प्रत्यक्षात तिकडे फिरकलेच नाहीत.
पुढील आठवड्यात प्लाझा सिनेमा येथे चित्रपट पाहण्यास गेले असताना, वाली यांची पुन्हा प्राण यांच्या बरोबर भेट झाली. तेंव्हा वाली यांनी अस्सल पंजाबीत, प्राण यांची खरडपट्टी काढत," मी तुझ्या वतीने शब्द दिला आणि तू फिरकलाच नाहीस" असे म्हणत पुन्हा एकदा प्राण यांची भेट नक्की करत,यावेळी ते स्वतः च त्यांना घेवून गेले. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे 'यमला जाट ' या पंजाबी चित्रपटा द्वारे प्राण यांचे या मायानगरीत पदार्पण झाले.
हे सर्व सुरु असताना भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऐन बहरात आलेली होती. भारताचे स्वातंत्र्य जवळजवळ निश्चित होत असताना दुर्दैवाने फाळणी च्या पर्यायाने वातावरण गंभीर बनून गेले होते. जातीय रक्तपात अनेक संसार अक्षरशः धुळीस मिळवत होते. त्याच वेळी प्राण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी, त्यांच्या मुलाच्या वाढदिवसा करिता इंदूर येथे येण्याचा निर्णय घेतला.दिनांक १० ऑगस्ट १९४७ रोजी इंदूर मुक्कामी आल्यानंतर संपूर्ण लाहोर रक्तरंजित दंगलीने वेढले गेले. आणि अखेर फाळणीवर शिक्कामोर्तब होत दिनांक १४ ऑगस्ट पासून सरहद्द बंद झाली .याचा थेट परिणाम म्हणजे ‘यमला जाट’ ने सुरु झालेला चित्रपट क्षेत्रातील प्राण यांचा प्रवास एका वेगळ्याच वळणावर ठप्प झाला.
या परिस्थितीत बावीस चित्रपटातील कामाचा अनुभव गाठीशी आहे, या उमेदीवर त्यांनी आपले बिऱ्हाड मुंबईस हलवले. त्यावेळी प्रथम त्यांनी आपला मुक्काम हॉटेल ताज येथे ठेवला आणि नव्याने काम शोधण्यास सुरवात केली. पण त्यांचा प्रथमचा अनुभव हा कटूच होता. दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना पहिले यश मिळाले. देवानंद यांच्या 'जिद्दी' या चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली. आणि इथेच त्यांची जिद्द कारणी लागली कारण या चित्रपटातील यशाने त्यांच्या समोर चित्रपटात काम करण्याची विनंती करणाऱ्यांची रांगच लागली.
खलनायक म्हणून काम करताना प्राण यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करण्याची पद्धत प्रथम पासूनच ठेवली होती. चित्रीकरण म्हणजे सर्वस्व मानणे हे त्यांच्या रक्तातच होते. त्यामुळे चित्रीकरणास ते नेहमीच वेळेवर हजर राहात आणि स्वतः चे काम संपले तरी अखेर पर्यंत थांबून संपूर्ण कथानक समजावून घेत असत.भूमिकेची रंगभूषा,वेशभूषा याचा ते स्वतः अभ्यास करत.त्यामुळे त्यांना माणूस वाचण्याची सवय लागून गेली होती.त्यासाठी त्यांनी वर्तमान पत्रातील वैशिष्ट्य पूर्ण छायाचित्रे जमवून त्यांचा वापर स्वतःची रंगभूषा अचूक करण्यासाठी केला.
स्वतः ची खलनायकी अभिनयाची लकब नेहमीच वेगळेपणाने उठून दिसावी म्हणून,त्यांनी विविध लकबी जाणीवपूर्वक वापरल्या. आणि त्यामुळेच प्राण म्हणजे सैतान अशी जरब त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच 'जिस देश में गंगा बहती हैं । ' मधील 'राका' असो किंवा 'राम और श्याम' मधील 'गजेंद्र' असो लोकांच्या मनात 'प्राण' इतक्याच त्या भूमिका देखील ठसल्या.
या त्यांच्या खलनायकी भूमिकांचा जनमानसावर झालेला परिणाम विशद करताना ते नेहमी म्हणत असत कि, प्राण या नावाचा धसका असा आहे कि एकोणीसशे पन्नास नंतर प्राण हे नाव वापरातून हद्दपार झाले. रावण हे नाव कधी कोणी ठेवते का ? असा त्यांचा प्रश्न असे.
त्यांनी जेंव्हा त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्याचे ठरवले तेंव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी विविध वर्तमानपत्रात निवेदन देत आम्ही 'प्राण' च्या शोधात आहोत असे सांगत सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अश्या प्राण नावाच्या व्यक्तीने हा विशेष समारंभ सन्माननीय अथिति म्हणून सहभागी होत सुशोभित करावा असे जाहीर आवाहन केले होते. आणि बहुदा त्यांना एकोणीसशे पन्नास नंतर जन्मलेला,दुसरा प्राण काही मिळाला नाही.यातच त्यांच्या खलनायकी यशाचे गमक दिसून येते.
कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे याबाबत ते कटाक्षाने शिस्त पाळत, पण ती इतरांनी पाळली नाही तर ते त्यांना बिलकुल सहन होत नसे. त्यांच्या ऐन बहाराच्या काळातील आघाडीचा अभिनेता राजेश खन्ना हे वेळ पाळण्याचे बाबत अत्यंत आळशी असल्याने, त्यांच्या बरोबर काम न करण्याचा, एकदा घेतलेला निर्णय त्यांनी चित्रपट सृष्टीतून निवृत्त होई पर्यंत पाळला.
असा हा खलनायकी प्रवास त्यांना यश प्रसिद्धी आणि पैसा भरभरून देत होता. राजेश खन्ना नंतर सर्वाधिक मानधन घेणारा असा प्राण यांचा उल्लेख होत राहिला .असे असून देखील त्यांनी खलनायक नाही नायक आहे, नव्हे कोणतही भूमिका करण्यास मी समर्थ आहे,असा संदेश देत खलनायकत्वाकडे पाठ फिरवली. आणि त्यामुळेच आपल्याला एक 'मंगल चाचा' भेटला. हे त्यांचे जणू काही चित्रपट सृष्टीवर 'उपकार' आहेत.
‘उपकार’पासून सुरु झालेली त्यांची पडद्यावरील सकारात्मक किंवा चरित्र अभिनेता म्हणून असलेली वाटचाल देखील, खलनायकत्वा इतकीच प्रभावी ठरली .एक निष्ठुर नाही तर शिस्तप्रिय करारी आजोबा ,अशी त्यांची ओळख 'परिचय' मधून झाली. मित्रत्वातील मैत्र जपणारी 'जंजीर' मधील 'शेरखान' ही भुमिका देखीलप्रभावी ठरली.अर्थात किती म्हणून भूमिकांचा उल्लेख करायचा?कारण त्यांच्या प्रत्येक भूमिकेत 'प्राण' आहे.
हिंदी चित्रपटचा आणखी एक अभिवाज्य घटक म्हणजे त्यातील गाणी. त्यामुळे जास्तीत जास्त गाणी नेहमीच आपल्यावर चित्रित व्हावीत असे कोणास वाटणार नाही. पण याही बाबतीत प्राण साहब हे प्रथम पासून थोडे हटकेच होते.’खानदान' या नुरजहा या नायिकेबरोबर पदार्पणात प्रमुख भूमिकेत नायकाची जबाबदारी पार पडल्यानंतर पुढील चित्रपट नायक म्हणून त्यांनी स्वीकारला नाही. आणि त्या मागचे त्यांचे कारण होते कि,झाडामागे पळत गाणी म्हणणे जमणार नाही.
अर्थात त्यात गाणी म्हणणे जमणार नाही या मागे कोणतीही भीती नव्हती,पण तो त्यांचा स्वभाव नव्हता. पण भूमिकेशी समरस होणारे गाणे असेल तर जिवंत करावे तर त्यांनीच. आणि त्यामुळेच कि काय पण साठच्या दशकात जेव्हा सर्वाधिक लांबीचे गाणे त्यांच्यावर चित्रित करण्याचे ठरले,तेंव्हा त्या गीताचे संगीतकार कल्याणजी यांनी दिग्दर्शकास तुम्ही माझ्या गाण्याचा सत्यानाश करायचा ठरवले आहे असा निषेध नोंदवला होता. पण चित्रिकरणा नंतर जेंव्हा त्यांनी - कस्मे वादे प्यार वफा सब बाते हैं, बतोंका क्या? हे गीत पाहिले तेंव्हा सर्वात प्रथम फोन करून प्राण यांचे अभिनंदन करताना त्यांना सांगितले कि, तुम्ही हे गाणे पडद्यावर चित्रित करताना ,ओठातून नाही तर हृदयातून गायला आहात.आणि त्यांच्या भूमिकेत समरस होण्याच्या वृत्तीमुळेच, त्यांच्या वाट्याला आलेली, ‘यारी हैं इमान मेरा,यार मेरी जिंदगी’,’इशारों को अगर समझो राज को राज रहेने दो’ , पासून ते ‘दारू कि बोतल में काहे पानी भरता हैं’ यासारखी गाणी अजरामर ठरली आहेत.
प्राण म्हटले कि 'खलनायक' हि त्यांची वरवरची ओळख आहे असेच मला वाटते. कारण चित्रपट कलाकारांचे आयुष्य खरोखरच पडद्यावर आणि पडद्यामागे असे विभागलेले असते. त्यामुळे पडद्यामागील कलाकार हाच खरा माणूस असतो. त्या भूमिकेतील प्राण हे एक क्रीडाप्रेमी म्हणून सर्वज्ञात आहेत.त्यांनी एक फुटबॉल संघ पुरस्कृत केला होताच,पण ज्या काळात क्रिकेट मध्ये खेळाडूंचा घोडेबाजार आला नव्हता,पैसा कमी आणि प्रसिद्धी जास्त होती, तेंव्हा भारताचा नवोदित उभरता खेळाडू कपिलदेव त्याच्या गूढघ्याच्या शस्त्रक्रियेच्या तयारीत होता, तेंव्हा गरज असल्यास, त्याचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी, प्राण यांनी स्वतः व्यक्त केली होती. याची आठवण कपिलदेव आजही स्वतः सांगतात.
अशा पडद्यामागील माणुसकी जपणाऱ्या कलाकारास, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाणारे, सर्वश्री दादासाहेब फाळके यांच्या जन्म शताब्दी वर्षात सुरु झालेला आणि त्यांच्याच नावे दिला जाणारा हा पुरस्कार, भारतीय चित्रपट सृष्टीस शताब्दी पूर्ण होताना, घोषित झाला याचा खरोखर अभिमान वाटतो. याठिकाणी प्राण आणि दादासाहेब फाळके यांच्यातील एका दुव्याचा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावा वाटतो. ऑक्टोबर ९३ मध्ये लातूर येथील भूकंप पीडितांच्या मदतीसाठी सहयोग फौंडेशन आयोजित कार्यक्रमात प्राण यांनी स्वतः भाग घेत त्याकाळी साडेतीन लाख रुपये पदयात्रेतून जमा केले.
त्यावेळच्या समारंभात दोन मंत्री व प्राण मंचावर असताना त्यांनी मंत्र्यांच्या कडे एका घराच्या बांधणीस किती रक्कम लागेल असे विचारले जेंव्हा त्यांना एका घराचा खर्च रुपये पन्नास हजारां पर्यंत येईल असे सांगितले तेंव्हा त्यांनी त्याच कार्यक्रमात रुपये एक लाख देणगी म्हणून दिले.आणि एकच विनंती केली, त्यांची विनंती होती दिलेल्या देणगीतून बांधली जाणारी दोन घरे अनुक्रमे सर्वस्वी व्ही . शांताराम आणि दादासाहेब फाळके यांच्या नावाने जपली जावीत. कारण भारतीय चित्रपट सृष्टी करिता या दोघांचे योगदान हे कधीही न विसरण्याजोगे आहे. .याप्रकारे ज्या चित्रपट सृष्टीने आपणास घडवले, त्या चित्रपट सृष्टीसाठी ज्यांनी आपले जीवन वाहिले त्यांचा आदर करण्याची प्राण यांची वृत्ती वंदनीय आहे. आणि ज्या दादासाहेब फाळके यांचा सन्मान त्यांच्या आठवणीतून प्राण यांनी जपला ,त्यांना आज हा पुरस्कार प्राप्त होत आहे.
आज भारताची राजधानी दिल्ली येथील पुरस्कार वितरणाच्या समारंभास,जरी आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण प्रत्यक्ष जाऊ शकला नसलात , तरी अभिनयाची दिल्ली आपण या पूर्वीच काबीज केलेली आहे आणि म्हणूनच आज एका उत्तुंग उंचीच्या खलनायकातील नायकास वंदन करीत व आम्हा रसिकांच्या शुभेच्छा देत हा लेख पुरा करतो.

Sunday, December 25, 2011

सिंहावलोकन

                       आज २५ डिसेंबर  सुट्टी संपत आली होती, दुपारचा चहा झाला होता. आणि घरात गप्पा मारताना सहजच कोणी तरी म्हणाले, २०११ हे वर्ष लवकर संपले. मग मी विचार करू लागलो खरच असे काही घडते का ? एखादे वर्ष लवकर संपते का ? खरेतर तसे काही नसते. पण पाहणाऱ्याचा दृष्टीकोन त्याच काळाला वेगळ्या मापात मोजतो. 
                     नवपरिणीत वधु लग्नानंतर नव्या घरी येते. नव्या वातावरणाशी जुळवून घेत नवी आव्हाने स्वीकारत  स्थिर होऊ पाहते. मग पहिली मंगळा गौर, पहिला दिवाळ सण आणि हो कधी कधी चुकलेल्या अंदाजातून आलेला पहिला पाळणा. तिच्या दृष्टीने  मागे वळून पाहिल्यास वर्ष कसे संपले कळातच नाही.
                     नव्याने सुरु झालेली नोकरी तीन महिने प्रशिक्षण, मग प्रोबेशन वगैरे अटीवर सुरु झालेली नोकरी. कधी साहेब कनवाळू भेटतो. एखादा अवघड प्रोजेक्ट संपवण्याची जबाबदारी देताना,  "मला तुझ्यात स्पार्क दिसला म्हणून तुला हि जबाबदारी देतोय", असे म्हणत  घरापासून लांब पाठवून देतो. आपणही झटून काम नियोजित वेळेत संपवतो. आता घरी यायला मिळणार असे म्हणेपर्यंत प्रोजेक्ट वाढतो. "आता नवीन कोणी शोधण्या पेक्षा तूच हे काम पुरे कर". असे साहेब साईटवर येवून बजावून जातो.आणि मग ते काम संपवून आपण ऑफिसात रुजू होतो. सहकार्यांशी गप्पा मारताना साहेबांशी झालेला संवाद सांगत आपण म्हणतो, "पहा किती जबाबदारी दिली होती." शेजारच्या टेबलवरील एखादी पांढरी मिशी गालातच हसते. कारण तेंव्हा समजत नाही, परतीच्या प्रवासात शेजारच्या सीटवर    ती पांढरी मिशी आल्यावर आपण हसण्याचे कारण विचारतो. मग कळते बाहेरगावी प्रोजेक्ट असला कि, पाठवणाऱ्या प्रत्येकाला साहेब " तुझ्यात स्पार्क दिसला " असेच म्हणतो.ते ऐकल्यावर आमच्या डोक्यात स्पार्क पडतो,अरे खरा स्पार्क माझ्यात नाही तर आहे साहेबात.घरी आल्यावर मित्र मंडळीत गप्पा मारताना वाटते वर्ष कधी संपले कळलेच नाही.
                     घरात सायंकाळी बाहेरून आले कि, वडील त्यांची डायरी काढून हिशोब लिहित बसलेले हे रोजचे दृश्य. पूर्वी कधी विचारण्याचे धाडस झाले नाही, पण पहिला पगार हाती ठेवताना विचारले,"बाबा वर्षानुवर्षे कारकुनी केलीत, बेसिक डी. ए. च्या चक्रातून कधी बाहेर आलाच नाहीत. शक्य असून वर कमाईस कधी हात लावला नाहीत. तर मग हि डायरी कशासाठी?" 
तेंव्हा वडील म्हणाले,पहिला पगार हाती देतातानाच विचारलेस म्हणून सांगतो. "अरे म्हटले तर काय? येईल ती जमा होईल तो खर्च आणि राहील ती शिल्लक हाही  हिशेबच आहे मग डायरी कशाला? पण बाबा अरे डायरी म्हणजे सिंहावलोकन. "
त्यांच्या या उत्तराने मी पुरता चक्रावलो. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न चिन्ह पाहून ते मला म्हणाले ,"जेंव्हा भरपूर जंगले होती, वनसंपदा,अरण्ये हि प्राण्यांसाठी होती, त्या काळातील हि गोष्ट आहे. जंगलात राजा प्रमाणे वावरणारा आणि जगणारा सिंह, मग तो शिकारीसाठी निघालेला असू देत किंवा आपल्या कार्यक्षेत्रावर  नजर ठेवण्यासाठी टेहळणीवर  निघालेला असू देत, त्याची एक सवय असते कि, निघालेल्या ठिकाणापासून ते इप्सित स्थळी पोहचेपर्यंत, वाटेत तो थांबून नेहमी किती अंतर चालून झाले ते तो वळून पाहतो.त्याचे हे वळून पाहणे किंवा अवलोकन हि त्याची सहजवृत्ती असते. त्यामुळे सिंह आणि त्याने केलेले अवलोकन या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला शब्द म्हणजे 'सिंहावलोकन'. " आता मला सांग जर अख्या जंगलावर अधिपत्य गाजवणारा सिंह देखील मागे वळून पाहत, काय कमावले, काय गमावले, किती चाललो, किती आलोआणि किती जायचेय हे ठरवतो, तर मग संसार करताना मी फक्त हिशेब मांडून कोठे आहे हे पहिले तर काय बिघडले. त्यातूनच कळते वर्ष भरात काय झाले, वर्ष कसे संपले. 
एखादा खर्च जरुरीचा होता का ? पुढील वर्षात महत्वाचे काम काय ? हे नियोजन करता येते. या सवयी मुळेच तर  आज डोक्यावर कर्ज न घेता संसार पार पडला."
थोडक्यात काय वर्षे येतात आणि जातात तुम्ही काय केलेत त्यावरून वर्षाचा वेग ठरतो. आता २०११ संपायला सहा दिवस आहेत, तेही उगवतील आणि मावळतील, पण जर त्यावेळी तुम्ही सिंहावलोकन केलेत तर कदाचित चाललेली  वाट कमी आणि  चालायची वाट जास्त, असे दिसले तरी पुढील  मार्गक्रमणाचा   वेग तर ठरवता येईल 

Friday, April 15, 2011

थडग्यातून पुन्हा बाहेर आलेला कलाकार......

डोक्यावर टोपी, हातात काठी,
ढगळी विजार आणि तंगकोट,
असा पेहराव देहाशी
बोलके डोळे आणि नाकाखाली छोटीशी मिशी.
ओळखले का कोण बरे हि स्वारी खाशी
हि तर व्यक्ती दिसते विदुषकी
पण बुद्धी, प्रसिद्धी आणि पैसा चालत आला याच्या पायाशी ......
ओळखलेत न हे वर्णन आहे एका अति प्रसिद्ध विनोद वीर, कलासक्त अभिनेत्याचे.
ज्याचे नाव घेताच, तुम्ही कितीही काळजीत, तणावात असलात तरी खुदकन हसाल असा अभिनेता ...चार्ली चॅप्लीन.
या थोर कलाकाराचा आज जन्म दिवस. आपले आयुष्य लोकांना हसवत ठेण्यासाठी खर्ची घालणारा हा कलंदर माणूस
आपल्या वडिलांचे बोट धरून याने चित्रपट सृष्टीत प्रवेश करत - "The Eight Lancashire Lads," या चित्रपटापासून कामास सुरवात केली.
जगाला हसवणाऱ्या या कलाकाराने वास्तव जीवनात हर तऱ्हेचे भोग भोगले. मुलगा आणि कुटुंबीय याची देखभाल नीट
न केल्याच्या आरोपावरून चार्लीच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला. अति मद्यपानामुळे वयाच्या ३७ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी चार्लीचे वय होते फक्त बारा वर्षे.
चार्लीवर सर्वाधिक प्रभाव होता त्याची आई हॅना हिचा. गायिका आणि विनोदी अभिनेत्री म्हणून काम करणारी त्याची आई ही त्याचे श्रद्धास्थान होते. पण आजारपणामुळे आवाजावर परिणाम झाल्याने,चार्ली वयाच्या पाचव्या वर्ष पासून काम करू लागला. आईचे आजारपण मात्र वाढत जावून शेवटी त्याची परिणीती ती मानसिक रुग्ण होण्यात झाली. पण चार्लीने आईस कधीच अंतर दिले नाही.
याप्रकारे कौटुंबिक ताण तणावा नंतर नाते संबंधात देखील या महान कलाकारास अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. काही वर्षांसाठी टिकलेली 'भातुकलीच्या खेळामधली ' अर्ध्यावर डाव मोडणारी तीन अयशस्वी लग्ने पदरी घेत केलेले त्याचे चौथे लग्न अखेर पर्यंत टिकले. हे लग्न झाले तेंव्हा चार्लीचे वय होते फक्त त्रेपन्न वर्षे. आणि वधु ओना-ओ-नील हि होती अठरा वर्षांची. या दाम्पत्यास आठ मुले झाली.
इतक्या हेलकावणाऱ्या नौकेतून प्रवास करणाऱ्या, या अस्थिर आयुष्य जगणाऱ्या कलाकाराने चित्रपट माध्यमातुन जगाला दिला तो फक्त निखळ आनंदच.
अर्थात या महान कलाकाराचे चित्रपट हसवणारे असले,तरी त्यातून जीवनातील विसंगती,दुखः, यावरील भाष्य पुरेपूर हादरवणारे होते.
आयुष्यभर असे अनंत चटके सोसत जगलेल्या कलाकाराचा अंत,स्विझर्लंड या सर्वात शांतताप्रिय देशात झाला. सन १९७७ च्या नाताळच्या पवित्र दिवशी चिरनिद्रा घेतलेल्या कलाकाराच्या नशिबी मृत्यू नंतर देखील शांत आयुष्य नसावे म्हणूनच कि काय पण १ मार्च १९७८ या दिवशी,त्याच्या मृतदेहाची चोरी झाली. मृतदेहाची शवपेटी परत करण्यासाठी पैशाची मागणी चोरांनी केली.
अर्थात स्विस सरकारने ११ आठवड्यात सदर शवपेटी परत मिळवून.ती अधिक सुरक्षित पणे दफन करून या प्रकरणावर पडदा टाकला. मी मात्र या घटना क्रमाकडे पाहताना असे म्हणतो कि, सतत ताण  तणावाच्या दुष्ट चक्रातून,जगाला  विनोद बुद्धी आणि विनोदी वृत्ती यांनी ज्याने जन्मभर फक्त हसवत ठेवले,तो परम प्रिय चार्ली त्याच्या मृत्युनंतर आता कोणी रडत नाही ना याची खात्री करण्यासाठीच जणू थडग्यातून पुन्हा बाहेर आला. आणि जणू त्याला समजले कि, मी गेलो तरी माझे चित्रपट लोकांना नेहमीच हसत ठेवतील. या खात्रीनंतर जणू त्याने खरी खुरी चिरनिद्रा घेतली. तर शेवटी इतकेच म्हणेन कि...
Simplicity is a difficult thing to achieve. हे एकच वाक्य प्रत्यक्षात अमलात आणणाऱ्या या कलाकारास त्याच्या जन्म दिनी केवळ सलाम !