Monday, November 1, 2010

अत्तराच्या कुपीची गोष्ट…..

पावसाचा हलकासा शिडकावा तापलेल्या धरित्रीवर झाला आणि बघता बघता सुट्टी संपल्याची घंटा झाल्याबरोबर मुले जशी मैदानातून पळतात तशी ढगांची पांगा पांग झाली. त्याच बरोबर वातावरणातला भरून राहिलेला कुंद्पणा आपोआप कमी झाला. हवेत एक सुखद गारवा आला. त्याने हलकेच खिडकी उघडली आणि त्याच बरोबर घर त्या मातीच्या वासाने भरून राहिले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. जणू त्या मृदगंधाबरोबर वारा त्याच्या गत आठवणींचा ठेवाच घेवून आला होता. अर्थात वास हा आपल्यासारख्या सामान्यांसाठीचा शब्द. त्याच्या साठी तो एक 'गंध'-अनाम .तसा तो थोडसा चोखंदळच म्हणा अगदी ‘गंध ‘पारखी नसला तरी निवडक आणि दर्जेदार अत्तरांचा वापर हि त्याची खासियत. त्यामुळे ऑफिसात देखील त्याचे अस्तित्व इतरांना किंचितसे सुगंधित असेच असे.पण त्याची हि आवड हे काही चोचले नव्हते. त्याच्या आवडीच्या एकदोन गंधा पलीकडे तो फारसा रमला नाही.
त्याच्या छोट्या पण सुबकतेने मांडलेल्या घरात त्याने आवडीने जपलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे एक छोट्खानी प्रदर्शनच त्याच्या हॉलमधील त्या सुंदर काचेच्या कपाटात असे. त्यात केंद्रस्थानी होती एक अत्तराची कुपी, पण कशी ? तर पूर्णतः रिकामी. ती कुपी अशी काही मांडून ठेवली होती की,वाटावे त्यात जुना गंध नव्हे तर जुन्या आठवणीच जणू बंद करून ठेवल्या आहेत. कधी जर त्याला त्यावरून छेडले तर तो बोलत नसे पण सहजतेने विषयांतर मात्र करीत असे. जणू त्याला ती कुपी बंदच ठेवायची होती.
पण आज त्याने घेतलेल्या दीर्घ श्वासाबरोबर त्या गंधांनी त्याला गत स्मृतीच्या गर्तेच ढकलले. आणि त्याचे स्वगतच सुरु  झाले......
सन १९७६/७७ चा काळ. कॉलेज नुकतेच सुरु झाले होते. तालुक्याचे ठिकाणचे गाव. गावातील वस्ती आणि कॉलेज दोन्ही हळूहळू वाढत होते.तो काळ म्हणजे मार्कांची टक्केवारी आणि पुढील शिक्षणाची दिशा याचे नाते देखील ठरून गेलेले. ८० टक्के किंवा अधिक मार्क, मग सोडा गाव आणि जा मेडीकल अथवा इंजीनियरिंगला तेही मुंबई, पुणे इकडे. ७५ टक्के मार्क्स मग मेडीकल अथवा इंजीनियरिंगला प्रवेश पण जा सांगली आणि अथवा सोलापूर, कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचे ठिकाणी. ७० टक्के मार्क्स मग सायन्स साईड तीही हव्या त्या गावी ६० मार्क्स कॉमर्स आहेच.आणि पास आहात तर मग आर्ट आगदी आर्ततेने वाट पाहत आहे. असा तो सरधोपट काळ. आम्ही अकरावी जेमतेम पास. पण पी.डी. ( पदवी पूर्व ) परीक्षेत ६० टक्के पदरात पडले आणि कॉमर्सचे दार उघडले.
आमचे कॉलेज म्हणजे वर्गात १०० मुले तर एक दोन मुली. त्यामुळे 'मैत्रीण' हि संकल्पना तशी गोष्टीतच राहिली. मला आठवतेय आमच्या वर्गात माझा एक मित्र होता.त्याचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेल्यामुळे इतर मित्रांपासून थोडासा दुरावलेला. फारसा कोणात आपण होवून न मिसळणारा. पण त्याचे घर आमच्या घराचे जवळ त्यामुळे कॉलेज  साठी आम्ही बरोबर जावू लागलो. त्यातून आम्ही आपोआपच एकत्र आलो. आभ्यासासाठी त्याचे घरी येणे जाणे झाले. त्यातून त्याची अभ्यासातील गोडी वाढत गेली. का कोण जाणे पण एकूणच मित्राबरोबर सर्व घराशी नाते जुळून गेले. त्यावर्षी त्याच्या मधल्या बहिणीचे लग्न ठरले.
मग काय आम्ही मुलीकडचे आपोआपच ' नारायण ' झालो. पडेल ते काम तेही आनंदाने असे आमचे तीन चार आठवडे भुरकन उडून गेले. लग्न दोन दिवसांवर आले होते. पाहुण्याची वर्दळ वाढली. आणि त्या दिवशी त्या दोघी आल्या. दोघी बहिणी बहिणी. थोरली असेल पंधरा / सोळा वर्षाची, तर धाकटी बारा / तेरा वर्षाची परकरी पोर. अर्थात माझे वय देखील फार तर सतरा वर्षाचे पण नकळते. लग्नाच्या धांदलीत कधी त्या दोघींकडे मन खेचले गेले ते कळलेच नाही. माझ्या मित्राचे घर म्हणजे एक जुना वाडा होता. काटकोनात वळत जाणाऱ्या गल्लीचे कोपऱ्यात वाड्याचे मोट्ठे दार त्यातून आत जात एक छोटा बोळ पार केला कि मित्राचे घर.मग छोटा सोपा , पाठो पाठ अंधारे माजघर उजव्या हाताला माडीचा जिना समोर सैपाकघर. माजघर आणि सैपाकघर यांच्या मधील उंबरा म्हणजे माझी बैठकीची जागा. तिथे बसून माझे तासंतास कसे जात ते आठवले कि आजही हसू येते. त्या दिवशी 'गृहमुख' झाले जेवणावळी उठत होत्या आणि माझ्या मित्राच्या आईने घरतील सर्वांना अत्तर लावण्याचे काम मला दिले. घर भर हिंडून माझे काम सुरु झाले. आणि अचानक माजघरात त्या दोघी समोर आल्या मग काय अत्तराचा सुगंध नाकातच काय पुरा डोक्यात गेला. घाकटीने हात पुढे केला आणि वास घेत बाहेर पाळली देखील आता समोर थोरली सलज्ज पण मोहरलेली. मन एकदम मोरपिसे झाले. मी तिचा हात हातात घेतला निमित्त अत्तर लावण्याचे पण स्पर्शाने या हृदयातील सुगंध त्या हृदयात कसा पोहचला ते कळलेच नाही.अजाणत्या वयात मन जाणते करणारा तो स्त्री स्पर्श जणू माझे जगच बदलून गेला. सगळे मिळून सहवास दीड मिनिटांचा. पण आठवणी आजही तितक्याच ताज्या . अंधाऱ्या माजघराने जणू आयुष्याच्या प्रकाश वाटा दाखवल्या. मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. पाठवणी झाली . मांडव रिता झाला. त्या दोघी मांडवातूनच गावी परतल्या. पण त्या दीड मिनिटाने माझे आयुष्यच बदलले. आठवणीचे मोरपीस सतत हळुवार स्मृतींना जागवू लागले. काही दिवस आठवणीच्या गावी सततचा मुक्काम असे. लग्नघर आणि अंधारे माजघर डोक्यात लख्ख राहिले. पण ना नाव विचारलेले ना पत्ता घेतलेला मित्राशी या विषयावर बोलायचे कसे? अखेर मन अभ्यासात आणि जीवन आभासात कसे गुंतले कळलेच नाही. पुढे पदवी पदरात घेवून पुण्यनगरीत पाय ठेवला. दिवस भर भर पुढे सरकत होते. अगदी छोट्या कापड दुकानात सेल्समन, ( आणि अभिमान काय तर प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर,त्या दुकानात कापड खरेदीला येते.)कंपनीसाठी क्लार्कस, मग मध्यम कंपनीसाठी कॉस्ट असिस्टंट असा प्रवास सुरु असताना अचानक एका बँकेत नोकरीची सुरवात. आणि आम्हाला स्वर्ग दोन बोटे उरला.कारण काय तर नोकरी आणि तीही बँकेतली.

आणि एक दिवस चक्क तीच शोधात आली. हो कारण माझ्या मित्राकडून पत्ता घेवून एवढ्या पुण्यात तिने शोधून काढले होते. १९७७ नंतर एकदम १९८७ मध्ये भेट.१० वर्षांचा काळ अगदी दहा मिनिटात भरून निघाला. माजघरातील ‘अत्तराची कुपी’ पुन्हा एकदा उघडली गेली. मन आठवणी आणि अभिमानाने भरून आले.जणू काही मध्ये काही काळ गेलाच नव्हता. “पुन्हा कधी का रे नाहीस भेटलास ?” तिच्या प्रश्नाने उर भरून आला. वाटले म्हणजे आहे कोणी तरी वाट पाहणारे. मोरपंखी क्षण पुन्हा एकदा उलगडले. म्हटले काय सांगू ? किती रात्री जागवल्यात तुझ्यासाठी.आणि सरळ सरळ तिला विचारले,” का का म्हणून शोधात आलीस ?”तर म्हणाली,”अरे पदवी झाली, गावी पुढे शिकायची सोय नाही.जवळचे मोठे गाव पुणे . इकडे यायचे ठरले. आईस एकदम आठवले कि तू आता पुण्यास असतोस. म्हटले भेटावे काही मदत होती का पाहावे.”मनात सतारीची तार अलगद छेडली गेली. मदत काय म्हणतेस मी तुझाच आहे.मग काय भटकणे सुरु झाले दिवस पालटू लागले. माझी नोकरी, तिचे कॉलेज दर आठवड्यास तिचे गावी जाणे यातून भेटीपेक्षा विरहच अधिक अनुभवास येवू लागला. असेच एकदा घरी ये कोणी असणार नाही तेंव्हा म्हणून बोलावले.ती आली किती विश्वास दाखवला तिने मन भरून आले. आनंदाने काळीज फुलले. प्रेमाने शारीरिक आकर्षणावर मात केली.  ती आली आणि गेली सूर झंकारले पण सतार अस्पर्शच राहिली. पुन्हा काही दिवस गेले. मे महिन्याची सुट्टी म्हणून ती गावीच गेली आणि एक दिवस अचानक तिचे पत्र बँकेत आले. आयुष्यातील एकमेव प्रेमपत्र हो मी तर त्याला प्रेमपत्रच मानतो. छोटेसेच वहीतील पण पंधरा वीस ओळींची मोती पसरलेली अक्षरे . तिने लिहले होते. लग्नाचे काय ठरवले आहेस अधून मधून भेटण्याचा टाईम-पास नको. वाचून चर्र झाले दहा वर्षापूर्वीचा पहिला स्पर्श आठवला. त्यातील जपलेली मोरपंखी निरागसता आठवली. बर खरेतर तीही आठवणीची कुपी बंद होवून आतल्या कप्यात दडली होती.कोण आले होते शोधात ती कुपी. का माझ्यासाठी ती अंतरंगातील कुपी होती, आणि तिच्या साठी नव्या गावी स्थिरावण्यासाठी हवी असणारी तात्पुरती मदत होती ? तिचे एकूणच वागणे गूढ वाटले. पुनर्भेटीचा तो सोहळा मी मनात कायमचा साठवला घरी बोलावले पण मर्यादा राखली. आणि किती सहजतेने लिहिले कि टाईम-पास नको.म्हणजे माझ्यासाठी काळ गेला आणि तिच्या साठी फक्त घड्याळाचे काटे सरकले? पंधरा ओळीनी पंधरा दिवस डोक्यात 'भुंगा' राहिला हे असे का ? म्हटले पुण्यातल्या पुण्यात असून हि पत्र पाठवते.आपण समक्ष भेटूनच खुलासा करूयात कि अग हा काही टाईम पास नाही.खरे तर हा परस्परांना आतून समजण्याचा समजून घेण्याचा,खूप दूरचा प्रवास आहे ज्यात त्या वळणाची मी वाट पाहत आहे. जिथे वाट नागमोडी होईल,पण मने सरळच राहतील. हात हातात गुंफून पुढील प्रवास करायच्या आणाभाका पुऱ्या होतील पंधरा दिवस मनाशी घोकून घोकून भेटीत काय बोलायचे कसे बोलायचे ठरवून तिला भेटायला तिच्या रूम वर गेलो तर भले थोरले कुलूप बंगल्यातील ते छोट्खानी आउट हाऊस, त्या समोर मी भांबावलेला उभा बंगल्याची मालकीण समोर येत म्हणाली,”अरे! ती गावी परत गेली कायमची. तिचे लग्न ठरले आहे.” माझे मलाच कळेना मी काय ऐकतोय? पण तेच वास्तव होते. कुलुपबंद दाराने आयुष्यातील सर्वच वाटा कायमच्या बंद केल्या आहेत हे जळजळीत वास्तव समोर आले. मी ज्याला प्रेम मानले ती तिची सोय होती.त्यामुळे तिचे पत्र म्हणजे जणू 'कारणे दाखवा नोटीस' होती कारण आता ती कायदे तज्ञ झाली होती. कोणत्याही कोर्टाची पायरी न चढताच पहिली लढाई मी हरलो होतो. शिक्षा काय तर स्मृती पटलावर कोरलेली प्रतिमा पुसता येत नव्हती. आणि ती तेथून काढून टाकायची तर भळभळती जखम आयुष्यभर ‘अश्वत्थामा ‘होणार होती.खरे तर मित्राला गावी जावून गाठून तिचा पत्ता घेवून पुन्हा एकदा तिच्यासमोर दत्त म्हणून उभे राहावे असे वाटत होते. पण जर ती नववधु म्हणूनच पुढे आली तर? ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते. प्रतिस्पर्धी वकीलच केस जिंकून गेली होती कारण माझ्याकडून कोणत्याच कोर्टात अपील होणार नव्हते. मी हरून जिंकलो होतो ती जिंकून हरली होती
मनातली वादळे मनातच शमली. ती आता कधी दिसेल का ? कधी कोठे आणि केंव्हा ? हि प्रश्न मालिका मानस छेडू लागली. एकदा घरी काही नातेवाईक आले म्हणून आम्ही सर्वजण एका संध्याकाळी संभाजी पार्कमध्ये गेलो होतो. आणि तिथे ती दिसली बरोबर तिचा नवरा होतो. नजरभेट झाली पण न मी काही बोलू शकलो ना ती थांबू शकली. एक वेळ ओळख न देताच गेली असती तरी वाईट वाटले नसते पण जाता जाता तिने मागे वळून पाहत असा काही कटाक्ष टाकला कि, मन पुन्हा एकदा माजघरातील अत्तराच्या कुपीतील तो गंध शोधू लागलो म्हणजे लग्नानंतर ती पुण्यातच आली होती. पण मन शोधून काढण्यासाठी पुढे धाव घेईना.कारण तसाही मी तिच्यासाठी टाईम-पास होतो ना. जगरहाटी थांबली नाही. समाजरीत आणि आयुष्यभर कष्ट काढणारी आई या दोन्हीला बळी पडून मी लग्नाला उभा राहिलो. नोकरी,संसार यांचे रहाटगाडगे सुरु झाले. मन कुठेच रमत नव्हते, शरीर आपला धर्म पार पाडत होते. आता अत्तराची कुपी सांडून संपली आहे. असा इशाराच जणू मनाने दिला. अश्याच का संध्याकाळी सुट्टी असून घरीच काही तरी काम चालले होते. दारावरची बेल वाजली. कोण आहे म्हणून दर उघडले तर ती आणि सोबत तिचा नवरा दारात. मनाची कवाडे वारंवार बंद करून देखील हि वास्तवाची दारे का पुन्हा पुन्हा का ठोठावते आहे असा प्रश्न मनात चमकून गेला पण तोंडातून आपोआपच शब्द आले, “अरेच्या! आज इकडे कसे काय?” तर मानभावीपणे नवऱ्यासमोर म्हणाली, "अरे आता संसारात स्थिरावले आहे. वेळ जात नाही घरी एकटे बसून म्हणून नोकरी करावी म्हणतेय, बघ ना तुझ्या बँकेत काही जमते का?"आता काय तर बँकेत नोकरीसाठी काही करता येईल का? मीही खरे तर काय करणार होतो कोणास ठाऊक? मन म्हणत होते कि कुपीतील सुगंधाची दरवळच ठीक, पुन्हा काही ती कुपी आणि तो गंध नको. पण घरातील इतरांचे उपस्थितीचा आणि तिच्या नवऱ्यासमोर तिचा मान ठेवीत मी काहीतरी प्रयत्न करेन असे म्हणालो. पुढे दोन,तीन महिने गेले एक दिवस तिने फोन केला आज दुपारी चार नंतर येवून जा आणि पत्ता दिला. जेंव्हा घर शोधून तिला पकडून म्हणावे कि, हा खरच टाईम पास नाही ग! असे वाटत होत तेंव्हा हि गावी निघून गेली आणि आता परस्वाधीन झाल्यावर मला म्हणते घरी येवून जा. मनाचा हिय्या होत नव्हता काय करू जावून? काय बोलू तिच्या नवऱ्याशी? पण तरीही गेलो दर तिनेच उघडले.अशी काही दिसत होती म्हणून सांगू ? तो केतकीचा पिवळेपणा भरून राहिला होता. चेहऱ्यावर नजर ठरू नये असा गोडवा आला होता मला कळत नव्हते कि ती बदलली कि माझे मनच प्रेमातून बाहेर पडत नाही आहे? मी विचारले नवरा कुठाय? तर म्हणते “तो आताच कामाला गेला आहे आत तरी ये ,का दारातूनच परत जाणार आहेस? “मी म्हटले,” मला सांग जेंव्हा दारात येवून तुझ्या प्रेमाची भिक मागायचे ठरवले तेंव्हा गाव सोडून निघून गेलीस आणि आता जेंव्हा झोळीच नाही तर तू दान देण्यास आतुर आहेस काय म्हणू तुला?”मला अजूनही आठवतेय त्यावर तिचे डोळे थोडेसे डबडबले किंचित बाजूला होत तिने मला आत येण्यास खुणावले. मी दारातून आत आलो मात्र ती दार ढकलून वेगाने आत पाळली. बाहेरच्या खोलीत सन्नाटा.मनात वादळ जणू वादळापूर्वीची शांतता. तोंडावरून हात फिरवीत ती बाहेर आली आणि तिला पुन्हा असे एकांतात डोळे भरून पाहताना तीच दरवळ जशीच्या तशी पुन्हा हवेतून आली. आणि काही समजायचे आतच तोंडून सहज शब्द गेले, “किती गोड दिसती आहेस”. ते ऐकले मात्र आणि तिचा इतक्या वर्षांचा सयंम सुटला. तिने धावत येवून मिठी मारली माझा हात हातात पकडून तो तिने तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाली अरे मला तुझा अंश हवा होता रे इथे. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला कि ती खरच का इतकी गोड दिसते आहे. तिला नुकतेच दिवस गेले होते. ती आता माझी कधी होणार नाही याची साक्षच परमेश्वराने दिली होती. मी तिला अलगद थोपटत दूर केले ती पुन्हा एकदा आत गेली आणि एक बंद छोटीशी भेट हातात देत म्हणाली, “हि तुला माझ्या कडून भेट.माझी आठवण ठेव.पण पुन्हा पुन्हा कधीच भेटू नकोस”......

आणि आणि पुढील अनर्थ ओढवण्यापूर्वी मी वेगाने बाहेर पडलो. हातात तिची भेट घट्ट पकडली होती मागील आनंदाचे सर्व क्षण हातून जणू निसटून गेले होते. मन तिने दिलेली भेट बघण्यास उतावीळ झाले होते. घर गाठले योगायोग असा कि घरातील सर्वजण बाहेर गेले होते. त्यांनी निरोप लिहून ठेवला होता पण म्हटले नंतर वाचू. भेट वस्तूचे वेष्टन सुटता सुटेना जणू तेथेही न सुटणारा गुंता झाला होता अखेर त्याची गाठ सुटली पण हातून भेट निसटून खाली पडली घरभर अत्तराचा घमघमाट झाला. तोच वास ज्याने मला त्याच माजघरात नेवून पोचवले. भारलेले क्षण मोहरून उठले.सोबत तिची मोत्याची अक्षरे आणि त्यावर फक्त या चार ओळी ……

मनात होते तू माझा होशील

माझ्या ओठीचे अमृतात आकंठ बुडशील

क्षणाक्षणाने माझे जीवन फुलताना

कणाकणाने तू माझ्यातच विरघळशील.

ठरवले होते तुला एकदाच भेटायचे,हे सांगण्यासाठी कि मला कायमचा विसरून जा…. आज तुझा वाढदिवस म्हणून तोच गंध तुला देते ज्याने मला तुझे वेड लावले ...ते अत्तर सांडून गेले होते. मी ती कुपी अलगद उचलली आणि तिचे झाकण इतके घट्ट बंद केले कि पुन्हा ती कुपी कधीच उघडणार नाही.

घरच्यांनी निरोप लिहलेला कागद उचलला म्हटले चला दिनक्रम सुरु करावा तर त्यावर निरोप होता. "अरे आर्चिज मधून फोन होता मी तुझ्यासाठी मागवलेले अत्तर आजच आले आहे .मी म्हटले आज तुझा वाढदिवस कशाला उशीर म्हणून बाहेर गेले आहे. लवकरच येते. पुन्हा कुठे जावू नकोस .."मी म्हटले, “नाही आता पुन्हा कुठेही जाणार नाही ...खरच कुठेही जाणार नाही”.

2 comments:

  1. तुमच्या मित्राच्या अत्तराची गोष्ट वाचुन एकदम गहिवरल्यासारख झाल....
    पण ती पुण्यातुन एकदम निघुन गेल्याचे कारण त्याला कळले कि नाही?

    ReplyDelete
  2. प्रिय दवाबिंदुजी!

    उत्तरास उशीर झाला क्षमस्व.
    काही गोष्टी गूढपणे सुरु होतात आणि गुढतेच संपतात.हेच खरे.
    आपण मनपूर्वक गोष्ट वाचून अभिप्राय दिलात धन्यवाद!

    ReplyDelete