Sunday, December 25, 2011

सिंहावलोकन

                       आज २५ डिसेंबर  सुट्टी संपत आली होती, दुपारचा चहा झाला होता. आणि घरात गप्पा मारताना सहजच कोणी तरी म्हणाले, २०११ हे वर्ष लवकर संपले. मग मी विचार करू लागलो खरच असे काही घडते का ? एखादे वर्ष लवकर संपते का ? खरेतर तसे काही नसते. पण पाहणाऱ्याचा दृष्टीकोन त्याच काळाला वेगळ्या मापात मोजतो. 
                     नवपरिणीत वधु लग्नानंतर नव्या घरी येते. नव्या वातावरणाशी जुळवून घेत नवी आव्हाने स्वीकारत  स्थिर होऊ पाहते. मग पहिली मंगळा गौर, पहिला दिवाळ सण आणि हो कधी कधी चुकलेल्या अंदाजातून आलेला पहिला पाळणा. तिच्या दृष्टीने  मागे वळून पाहिल्यास वर्ष कसे संपले कळातच नाही.
                     नव्याने सुरु झालेली नोकरी तीन महिने प्रशिक्षण, मग प्रोबेशन वगैरे अटीवर सुरु झालेली नोकरी. कधी साहेब कनवाळू भेटतो. एखादा अवघड प्रोजेक्ट संपवण्याची जबाबदारी देताना,  "मला तुझ्यात स्पार्क दिसला म्हणून तुला हि जबाबदारी देतोय", असे म्हणत  घरापासून लांब पाठवून देतो. आपणही झटून काम नियोजित वेळेत संपवतो. आता घरी यायला मिळणार असे म्हणेपर्यंत प्रोजेक्ट वाढतो. "आता नवीन कोणी शोधण्या पेक्षा तूच हे काम पुरे कर". असे साहेब साईटवर येवून बजावून जातो.आणि मग ते काम संपवून आपण ऑफिसात रुजू होतो. सहकार्यांशी गप्पा मारताना साहेबांशी झालेला संवाद सांगत आपण म्हणतो, "पहा किती जबाबदारी दिली होती." शेजारच्या टेबलवरील एखादी पांढरी मिशी गालातच हसते. कारण तेंव्हा समजत नाही, परतीच्या प्रवासात शेजारच्या सीटवर    ती पांढरी मिशी आल्यावर आपण हसण्याचे कारण विचारतो. मग कळते बाहेरगावी प्रोजेक्ट असला कि, पाठवणाऱ्या प्रत्येकाला साहेब " तुझ्यात स्पार्क दिसला " असेच म्हणतो.ते ऐकल्यावर आमच्या डोक्यात स्पार्क पडतो,अरे खरा स्पार्क माझ्यात नाही तर आहे साहेबात.घरी आल्यावर मित्र मंडळीत गप्पा मारताना वाटते वर्ष कधी संपले कळलेच नाही.
                     घरात सायंकाळी बाहेरून आले कि, वडील त्यांची डायरी काढून हिशोब लिहित बसलेले हे रोजचे दृश्य. पूर्वी कधी विचारण्याचे धाडस झाले नाही, पण पहिला पगार हाती ठेवताना विचारले,"बाबा वर्षानुवर्षे कारकुनी केलीत, बेसिक डी. ए. च्या चक्रातून कधी बाहेर आलाच नाहीत. शक्य असून वर कमाईस कधी हात लावला नाहीत. तर मग हि डायरी कशासाठी?" 
तेंव्हा वडील म्हणाले,पहिला पगार हाती देतातानाच विचारलेस म्हणून सांगतो. "अरे म्हटले तर काय? येईल ती जमा होईल तो खर्च आणि राहील ती शिल्लक हाही  हिशेबच आहे मग डायरी कशाला? पण बाबा अरे डायरी म्हणजे सिंहावलोकन. "
त्यांच्या या उत्तराने मी पुरता चक्रावलो. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न चिन्ह पाहून ते मला म्हणाले ,"जेंव्हा भरपूर जंगले होती, वनसंपदा,अरण्ये हि प्राण्यांसाठी होती, त्या काळातील हि गोष्ट आहे. जंगलात राजा प्रमाणे वावरणारा आणि जगणारा सिंह, मग तो शिकारीसाठी निघालेला असू देत किंवा आपल्या कार्यक्षेत्रावर  नजर ठेवण्यासाठी टेहळणीवर  निघालेला असू देत, त्याची एक सवय असते कि, निघालेल्या ठिकाणापासून ते इप्सित स्थळी पोहचेपर्यंत, वाटेत तो थांबून नेहमी किती अंतर चालून झाले ते तो वळून पाहतो.त्याचे हे वळून पाहणे किंवा अवलोकन हि त्याची सहजवृत्ती असते. त्यामुळे सिंह आणि त्याने केलेले अवलोकन या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला शब्द म्हणजे 'सिंहावलोकन'. " आता मला सांग जर अख्या जंगलावर अधिपत्य गाजवणारा सिंह देखील मागे वळून पाहत, काय कमावले, काय गमावले, किती चाललो, किती आलोआणि किती जायचेय हे ठरवतो, तर मग संसार करताना मी फक्त हिशेब मांडून कोठे आहे हे पहिले तर काय बिघडले. त्यातूनच कळते वर्ष भरात काय झाले, वर्ष कसे संपले. 
एखादा खर्च जरुरीचा होता का ? पुढील वर्षात महत्वाचे काम काय ? हे नियोजन करता येते. या सवयी मुळेच तर  आज डोक्यावर कर्ज न घेता संसार पार पडला."
थोडक्यात काय वर्षे येतात आणि जातात तुम्ही काय केलेत त्यावरून वर्षाचा वेग ठरतो. आता २०११ संपायला सहा दिवस आहेत, तेही उगवतील आणि मावळतील, पण जर त्यावेळी तुम्ही सिंहावलोकन केलेत तर कदाचित चाललेली  वाट कमी आणि  चालायची वाट जास्त, असे दिसले तरी पुढील  मार्गक्रमणाचा   वेग तर ठरवता येईल 

Tuesday, December 13, 2011

पोटापुरता पसा पाहिजे ....

                                                                              जर का तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि काय हवे ते माग म्हणाला तर ? तर आमची मागणीची यादी तयार होई पर्यंत, किंवा मनातली इच्छा देवास सांगेपर्यंत,बहुदा देव कंटाळून निघून जाईल.कारण आपण खूप संभ्रमात पडू,हे मागू का ते मागू या भावनिक गोंधळात बुडून जावू.पण जर तुमच्या भावनेला जर अचूक शब्दात पकडून तुमची रास्त मागणी देवाकडे पोहचवायची असेल तर ? त्यालाही एक छान उपाय आहे, तुमच्या भावनेला अचूक वाट करून देण्यासाठी,तुम्ही अशा माणसाला साकडे घालू शकता, ज्याचे शब्द भांडार अगणित आहे. देवाकडे काय मागायचे हि अडचण तुमच्या आमच्या सारख्या माणसांची. या शब्द प्रभूकडे देवाने विचारले, "बोल वत्सा, तुला  काय हवे ते माग" तर या शब्द प्रभूच्या ओठी शब्द येतात ..
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी 
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ..
           आले न लक्षात, तुमची भावना कोणतीही असो, ती व्यक्त करण्यासाठी न्याय शब्द देणारे कवी आहेत, ज्यांना सरस्वतीचा आशीर्वाद नव्हे तर वरद हस्तच लाभला होता, ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके 'गदिमा' उर्फ श्री.गजानन दिगंबर माडगुळकर सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ या एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला. बालपण तेथून जवळच असलेल्या माडगूळ या गावी गेले. पुढे शिक्षणासाठी ते पंत प्रतिनिधी यांच्या औंध या संस्थानात आले. पण दुर्दैवाने त्यांना इयत्ता १० वी नंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. माझ्या मते त्यांनी त्यावेळी थांबवले ते शिक्षण चार भिंतीच्या शाळेतील. पण बिन भिंतीच्या शाळेत ते इतके शिकले कि, त्यास सीमा नाही. त्यांनी लिहिलेल्या कथा,कविता या पुढे एम. ए. च्या अभ्यासासाठी निवडल्या गेल्याच, पण त्याशिवाय त्यांच्या साहित्य निर्मितीवर अभ्यास करून किमान चार ते पाच जणांनी पी.एचडी मिळवली आहे. आणि ती पी.एचडी हा त्या पदवी धारकांच्या  इतकाच गदिमा यांचाही सन्मान आहे. पण स्वतःचे लौकिक शिक्षण अपुरे असून हि पुढील पिढीला संदेश देताना गदिमा त्यांच्या गीतातून सांगतात- 
व्यर्थ जन्म रे विद्येवाचून, ज्ञान जगातील घेई वेचून
कीर्ती आण तू पायी खेचून, यशवंत हो, जयवंत हो, 
वयाच्या १९ व्या वर्षी आपले नशीब अजमावण्यासाठी, घरदार सोडून त्यांनी चित्रपट सृष्टीचे दार,करवीर नगरीत येवून ठोठावले. पैसा, प्रसिद्धी थोडी उशिरा लाभली,पण यश मात्र पदरी पडले.कारण त्यांच्या अंगी असलेले शब्द कौशल्य. सुरवातीच्या उमेदवारीच्या काळात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत संपली तरी मी समाधानी राहीन, हि त्यांची वृत्ती होती.  हि भावनाच त्यांच्या 'पोटापुरता पसा पाहिजे' या गीतात दिसते. याच गीतात ते शेवटी म्हणतात...
सोसे  तितुके देई ,याहुनी हट्ट नसे ग माझा 
सौख्य देई वा दुखः ईश्वरा, रंक करी व राजा
अपुरेपण हि  नलगे ,नलगे पास्तावाची पाळी..
आणि त्यास जागून ते जगले. दोन वेळच्या जेवणाची सोय होताच आपल्या पोटा पाण्याच्या पलीकडे जावून राहिलेला वेळ त्यांनी साहित्य,काव्य निर्मिती यासाठी दिला. भावनेला शब्दरूप देणे हा त्यांचा सहजधर्म होता. त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्वतःला  देशसेवेसाठी झोकून देताना तरुणांच्या  मनात देशप्रेम निर्माण करणारी अनेक गीते रचली.पण स्वतःच्या राष्ट्रास माउलीची उपमा देत केलेली - 
वेद मंत्राहून आम्हा वंद्य  वंदे मातरम, हि रचना आजही अंगावर रोमांच उभे करते.
गदिमा म्हटले कि, गीत रामायण हे नाते अतूट आहे.सलग ५२ आठवडे नियमितपणे रेदिओ केंद्रावरून प्रसारित झालेल्या गीत रामायणातील अनेक रचना त्यांनी ऐनवेळी तयार केल्याचे सुधीर फडके यांनी अनेकदा सांगितले आहे.गीत रामायण लिहून झाल्यावर त्यांना 'आधुनिक वाल्मिकी'असे संबोधण्यात येवू लागले. गदिमा स्वतः मात्र गीत रामायण हे ईश्वरी आशीर्वादातून झालेली रचना आहे असेच नम्रतेने सांगत.त्यामुळेच त्यांनी गीत रामायणाची जन्म कथा सांगताना, 'एक अदृश्य  अंगुली लिहिते' असे म्हणत ते नतमस्तक होतात. स्वतः इतकी अमुल्य निर्मिती करताना संदेश मात्र देतात कि - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... 
अर्थात गदिमांच्या अनेक विध पैलूंपैकी गीत रामायण हा त्याच्या रचनेतील 'कोहिनूर' म्हणता येईल. पण त्यांनी त्याच बरोबर चित्रपट सृष्टी करिता पण प्रचंड काम केले आहे. गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयीने मराठी चित्रपट सृष्टी वर आपली मोहर अशी उमटवली कि ते एक युग म्हणूनच ओळखले जाते.अर्थात त्यांचे चित्रपट सृष्टीसाठीचे योगदान इतके मोठे आहे कि त्यांनी एकूण १५७ मराठी व २३ हिंदी चित्रपटासाठी योगदान दिले. त्यांचे मराठी इतकेच हिंदी भाषेवरील प्रभुत्व देखील  सुरेख होते.त्यांची पटकथा असलेल्या 'दो आंखे बारा हाथ ' या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट मोह्त्सवात झाली होती.
गदिमा  वृतीने प्रेमळ असले तरी स्वभावाने तापट म्हणूनच ओळखले जात.त्यामुळे त्यांना कोणी डिवचले कि, ते हमखास अधिक सुंदर रचना करत असत. शब्द रचनेवरील त्यांची  हुकमत इतक्या टोकाची होती कि एकदा त्यांना, आहे ना तुमच्यात सहजता मग 'ळ' या शब्दावर काव्य करून दाखवा,असे आव्हान दिले. त्यावर उत्तर म्हणून त्यांनी त्याच बैठकीत आपल्याला एक अजरामर रचना दिली ती म्हणजे ..
घननिळा लडीवाळा झुलवू  नको हिंदोळा....
लावणी आणि संत काव्य या दोन्हीवरील त्यांचे  प्रभुत्व वादातीत होते. त्यामुळे ज्या लेखणीतून ..
'फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसला लागल कोल्हा' 
हि रचना उतरली त्याच लेखणीने, 
इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी, ज्ञानेशाची...
हि रचना दिली आहे यावर पटकन विश्वास बसत नाही. आणि असा समजुतीचा घोटाळा तुमचा आमचा होतो असे  नाही तर एच. एम. व्ही. या कंपनीने प्रथम,' इंद्रायणी काठी' ची रेकॉर्ड काढताना त्यावर गीतकार म्हणून गदिमांचे नाव न छापता पारंपारिक रचना असे छापले होते.
मला तर नेहमी वाटते कि अक्षरास अर्थाचे कोंदण दिल्याशिवाय शब्दार्थ सार्थ होत नाहीत  आणि असे शब्दांना अचूक कोंदणात बसवणारे कारागीर म्हणजे 'गदिमा'. त्यांच्या नजरेने पाहिले तर कुरूप वेडे बदकाचे पिल्लू देखील राजहंस होते. किंवा त्यांच्या शब्द सामर्थ्यातून ते प्रसंगी देवाला विकत घेण्याचे धाडस करू शकतात. आणि तेदेखील कवडी दमडी न खर्च करता.
या प्रतिभा संपन्न कवी, पटकथाकार, गीतकार, चित्रपट अभिनेता आणि माजी विधान परिषद सदस्य श्री. गजानन दिगंबर माडगुळकर यांची आज पुण्यतिथी. आज त्यांना आपल्यातून जावून ३५ वर्षे होत आहेत. ते  देह रूपाने आपल्यात नसले तरी शब्द रूपाने अनंत  काळ पर्यंत आपल्यातच राहणार आहेत. पण तरीही शेवटी म्हणावे वाटते कि ..
जरा मरण यांतून सुटला कोण प्राणिजात ?
दुखः मुक्त जगला  का रे कुणी जीवनात ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा  
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 
आणि त्यांनी दिलेला  हाच जीवनाचा संदेश समजावून घेण्याचा अल्पसा प्रयत्न हीच त्यांना आजच्या स्मृतीदिनी खरी आदरांजली.

Sunday, December 4, 2011

८८ हे काय वय होते का जायचे ?

सर्व साधारण आयुष्यमान,वाढते वयोमान विचारात घेतले तर याचे उत्तर होय असेच आहे.पण आज हा प्रश्न ज्यांच्या जाण्याचे संदर्भात विचारला गेला आहे त्यांच्या बाबत खरेतर हे काही जाण्याचे वय नव्हते हेच खरे.आपल्या सर्वांचे लाडके आणि अनेक तरुणींच्या मनातील'कॅटबरी चव' जिवंत ठेवणारे चॉकलेट हिरो देवानंद यांचे नुकतेच निधन झाले.त्यासंदर्भात मात्र नक्कीच त्यांचे जाण्याचे वय नक्कीच झाले नव्हते.आणि म्हणूनच ,मायबोलीकारांपैकी मित यांनी म्हटल्या प्रमाणे ८८ हे काय वय होते का जायचे ! हे अगदी भाव पूर्णतेने म्हटले आहे असे मनाला नक्की पटते.
खरच एखादी बातमी एखादी घटना इतकी त्रासदायक असते कि, आपले मन आपल्यालाच सतत विचारत राहते कि, असे का घडले? आणि हो हे आताच घडायला हवे होते का ? पण तरीही याबाबत एक त्रिकालाबाधित सत्य गदिमा त्यांच्या एका अजरामर काव्य रचनेत सांगून गेले आहेत ती ओळ इथे लागू होते ती म्हणजे ...'अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात'. आणि आत्ताच येवून धडकलेली हि बातमी अतर्क्य नसली तरी अकस्मात नक्कीच आहे.
पुण्यात माझे येणे कॉलेज शिक्षण संपल्यानंतर १९८० सालातील. जगण्याची धडपड सुरु करताना सुरवातीस केलेल्या नोकऱ्या देखील थोड्या रुटीनला सोडून.राहायला कोथरूड आणि नोकरी लक्ष्मी रस्त्यावर, दुपारचे दोन तीन तास कुठे काढायचे? हा त्या काळातील प्रश्न. बस प्रवासाचा खर्च दोनदा न परवडणारा. मग काय कधी अलका टॉकीज चौकातील रिगल किंवा डेक्कन वरील लकी हि वेळ काढण्याची ठिकाणे.त्यातील लकी हे सर्वाधिक आवडीचे ठिकाण  कारण देवानंद यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात आपला वेळ असाच लकी मध्ये चहा पीत काढला होता. पुढे लकीची आठवण ठेवत, देवानंद यांनी पुन्हा एकदा लकीला लकीली भेट पण दिल्याचे पुणेकरांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात असेल. आज लकीही नाही आणि देवानंद आपल्यात नाहीत, पण लकी आणि लकी पडण्यापूर्वी काही वर्षे तेथे असलेले देवानंद याचे हसमुख पोस्टर जसेच्या तसे डोळ्यासमोर आहे.
त्यांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने माझ्या श्री.शिरीष पिंगळे या मित्राने त्यांच्या कलागुणांचा यथोचित गौरव करणारा लेख एका इंग्रजी दैनिकात लिहल्याचे आजही स्मरणात आहे. आज चित्रपट सृष्टी आणि चित्रपट पाहणे यातील सुलभता पाहता आम्ही वयाच्या सतराव्या वर्षी पहिला चित्रपट पहिला हे वाक्य आज अनेकांना खरेही वाटणार नाही, पण हे सत्य आहे आणि सर्व प्रथम जिल्ह्याचे ठिकाणी जावून पाहिलेला माझा पहिला चित्रपट होता जॉनी मेरा नाम ... हि देव साहेबांची दुसरी आठवण.
पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले ! झुठाही सही.... असे म्हणत पुढे जीवन सुरु झाले. आयुष्यात प्रेम पुजारी होता आले नाही तरी प्रेम पुजारी या चित्रपटातील ...शोखीयोमे घोला जाये फुलोंका शबाब ह्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी आजही कणभरही कमी झालेली नाही. आज अमिताभ बच्चन किंवा अमीर , शाहरुख सलमान यांची कारकीर्द सुपरहिरो किंवा शतकातील नावाजलेले कलाकार म्हणून नोंदवली जाते, तरी अशी एक खांबी इमारत उभारण्याचे काम प्रथम देवजींनी केले. राज कपूर,दिलीपकुमार यांची छाप असलेला काळ असून देखील आपला वेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमटवणारे देवानंदजी कायमच लक्षात राहतील.
जर का मी आता जातोय असे सांगत निरोप घेण्याची इच्छा देवानंद यांनी व्यक्त केली असती तर त्यांचा प्रत्येक चाहता आजही म्हणाला असता कि ....अभी न जावो छोडकर कि दिल अभी भरा नही...
आणि आज  त्यांच्या पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीला नतमस्तक होत श्रद्धांजली वाहताना मन म्हणेल .... लेना होगा जनम तुम्हे कई कई बार

Sunday, November 6, 2011

छंद आठवणींचा!

तीच वेळ,तोच किनारा,आठवणीत रमण्याचा
छंद जडला,लाटेकडे डोळे लावून बसण्याचा
राग नव्हता उशीर होण्याचा,
सल होता न येण्याचा

तमा नव्हती नाकारण्याची,
खंत होती अव्हेरण्याची
नजरेस देत नजर,मी मागितली सोबत,
दोन पावले चालण्यासाठी....
नजरेतील नजर चुकवत,ती अडखळली होकारापाशी.

घाव बसले जिव्हारी,आयुष्य गेले संपून .....
वणवणलो पुरता,हातून निसटले ते शोधून,
शोधता सुवर्णक्षण,झाली आठवणीतली साखळी सोन्याची
हुरहूर मनी राहिली, परीस निसटून गेल्याची

शोधले किनारे,मांडला संसार,वाळूतील भातुकलीचा
दान पडले पदरी,जिंकलो डाव हरण्याचा
वाळूत दूर जाणारी तिची पाऊले,धूसर डोळ्यात साठवण्यासाठी
मीच झालो कोरडी लाट, ओल्या किनाऱ्यास भिजवण्यासाठी

Tuesday, September 13, 2011

" आजीची गोधडी "

गेले बरेच दिवस ब्लॉगपासून दूर होतो. १० सप्टेंबर रोजी मी मराठी. नेट या संकेत स्थळाने त्यांच्या कविता स्पर्धेचा निकाल जाहीर केला. सर्व कविता www.mimarathi.net  येथे वाचता येतीलच. या स्पर्धेसाठी मी एक कविता पाठवली होती. ती कविता आता आपल्या वाचनासाठी देत आहे.
कविता बक्षीस पात्र ठरली नाही, पण आपणास आवडते  का पहा.
कवितेचे नाव आहे " आजीची गोधडी "
परवा बसलो होतो गुरफटून, घेवून आजीची गोधडी
आठवणींच्या थंडीने, भरली होती हुड हुडी.
मन रेंगाळले, अन आठवल्या……
गोधडी शिवता शिवता आजीने सांगितलेल्या गोष्टी,
कधी रामायण-महाभारत, कधी पंचतंत्र-इसापनीती
कधी परोपकारी गोपाळ, तर कधी राजा गोष्टी वेल्हाळ
तर कधी भेटला तिच्या गोष्टीतून विक्रम आणि वेताळ.
तेंव्हाच्या तिच्या गोष्टी आजही स्मरतात ......
अन रामायणातील भांडणे, जीव गुदमरवून टाकतात
आजही महाभारतातील राजकारणाने, मने कातवतात.
आत जाणाऱ्या पावलांच्या खुणा असणाऱ्या सिहांच्या गुहा,
अन पंचतंत्रातील कोल्हे, माणसांच्या जंगलात ठायीठायी भेटतात.
हरवलो होतो या विचारात ....
इतक्यात, धावत आली लेक माझी धाकटी, अन दिला फटका
आणि म्हणाली, "इथे येवून लपलात तरी, आज नाही गोष्टीतून सुटका".
सरसावून बसत म्हटले,"सांग, काय सांगू आज तुला?
हवे रामायण कि हवे महाभारत, का आवडेल पंचतंत्र
का हवाय तुला 'तिळा तिळा दार उघड' चा जादुई मंत्र".
तर म्हणाली," मला नकोत माणसांची भांडणे,
पक्ष्यांचे चिडणे आणि प्राण्यांचे लढणे
त्यापेक्षा गोष्ट सांगा तुम्ही, छोटीशीच पण छानशी
झोपताना नेवून ती सोडेल मला, परीकथेतील स्वप्नांपाशी
नाहीतर मला चालेल, तुमचीच आवडती, गोपाळ अथवा इसापची
तुम्हीच म्हणता ना! यातच लढाई असते, खऱ्या खुऱ्या जगण्याची
शेवटी परीचीच गोष्ट सांगून झोपवले तिला
वास्तवातल्या चटक्यांपासून लपविले तिला
"केवढी वाढलीय थंडी," म्हणत....
मी गुरफटली गोधडी अंगभर,
तरीही थरथर जाईना मनातून, बोचरी लाटच घरभर
मग, मन म्हणाले, बोल रे! आज का वाटतीय भीती
दिले नाहीस लक्ष जेंव्हा आजीने शिकवली नीती
आजीची गोधडी आता, खरे तर खुपच उसवली आहे
पण त्यातल्या ऊबेने, जगण्याची आस मात्र टिकवली आहे.

Friday, May 13, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग अकरा

डायरीतील नोंद-- असलेली- तसं बघितले तर कलकत्त्यात आता काही उरले नव्हते कालीचा हुकुम about turn. तथापि विवेकानंदांच्या जन्म ठिकाणाचे दर्शन व राम कृष्णांना मी पुनश्च येईन(३.५ वर्षांची कालमर्यादा) असे सांगून कलकत्याहून निघावे असा आग्रह काळ बदलता आहे. ३.५ वर्षांनंतर कोणती परिस्थिती असेल हे आत्ताच सांगता येणार नाहीं. तथापि शेवटी पुन्हा एकदा दक्षिणेश्वरी जाण्याचे ठरवून रेल्वे स्टेशन वर आलो.लोकल दक्षिणे श्वर नजीकचा स्टेशन वर थांबत नाहीं बाहेर जावे तर T.C.चा अडसर अखेर एकदा उलटा कौल लागल्यावर इथूनच निरोप घ्यावयची तयारी होती.व जसा कौल लागला तसे मन त्या दिशेने ओढ घेऊ लागले व मुंबई गाडीत बसलो.परंतु मध्ये सारडीहा स्टेशन वर मिलिटरी पोलिसांनी उतरवले. बंगाली येत नाहीं वगैरे कल्पना दिल्यावर थोड्या वेळाने मुक्तता. दुसरा एक असा W.T.त्याचे उत्तर I have no aim to travel त्याला स्टेशन मास्तर कडून हरकत.मी कल्याणला जाण्याची भूमिका स्पष्ट केली व ती त्याने (appreciated ) मान्य केली.खेडे गावात तलाव अशी सोय नाहीं आडावर जावून स्नान कपडे धुतले. भगवानके लिये घर छोडा है असे म्हणून जवळ शिदोरी असता  मागावेसे वाटेना. हॉकर्सचा फ्लश पत्यांचा खेळ. आडाण्याशी( संग) खेळ नको. बिनसले कि सुऱ्याशी गाठ असे त्यांच्या बोलण्यात आले. जुगाऱ्याकडील अन्न घ्यावे काय? ते उदारही असतात हा विचार प्रत्यक्ष मागणी नाहीं.छोट्या स्टेशन वर मेल थांबत नाहीं. टाटानगरला जावयास पाहिजे . म्हणून गाडीत बसलो. पुनश्च रात्रीचे गाडीत T.C. भेट No Money म्हटल्यावर मध्येच उतरून घ्या म्हणाला. बर म्हणालो. उतरू लागताच डब्यातील बहुतेक मुसलमान प्रवाश्यांनी हुं ! म्हणावयाचे व प्रवास चालू ठेवावयाचा सल्ला दिला.साऱ्यांनी "भाजा बदाम" शेंगा खावयास घेतल्या Except me तेंव्हा एका व्यापाऱ्याने ५ पैशाच्या अयाचित शेंगा घेऊन दिल्या टाटा नगर ८-८.५ ला व रात्री २.५-३ तासांनी मुंबई गाडी.
                                                                                               ------------------ x ----------------
टाटा नगरहून पुढे प्रवास चालू. जागा मिळणे मुश्कील ३.५ ते ४ तास उभ्याने. पुन्हा T.C. बंगाली वाघाची गाठ. परंतु गर्दी मुळे माझ्या पर्यंत पोहोचू शकला नाहीं.विलासपूर मार्गे पुढे मुंबई दिशेने रवाना संत्रा फोडी,पोहे, शेंगदाणे गुळ हि शिदोरी एकाने पुरी भाजी घेतली होती परंतु ती त्याला नको होती ती disopse off करण्या अगोदर तुम्हास नको असेल तर मी वापरू शकेन असे म्हणावे वाटते न वाटते तो खिडकीतून त्याने टाकून दिली.मनात विचार आला न जाणो त्यात दुसऱ्याचा शेर असेल त्याने जागा सोडण्यापूर्वी एक चिवडा पुडी गाडीत मिळून आली व त्याचा उपयोग. त्याची पुडी राहिली का? हे confirm केले जावयास हवे होते काय? एक ठिकाणी गोंदिया पुढे एक पोलीस ड्रेस घालून जागेकरिता दमात घेऊ पाहत होता.परंतु प्रवाशाने मी उठून बसतो परंतु तुला जागा मिळणार नाहीं असा पवित्रा घेतल्यावर तो गप्प पोलीस म्हणून नव्हे तर माणूस म्हणून शेजारी जागा दिली. शासनाचा बोज राहील तर बरे हा हेतू कल्याणवरून शिवाजीनगर oppsite बाजू कडे उतरून सौ. अक्का तिला कलकत्त्याहून लिहिलेले पत्र मी येण्या अगोदर मिळाले होते. प्रमिला येण्याचा आज संभव किल्ली असेल तर तिकडेच कोथरूडला जातो. जेवून जा म्हणाल्यावर जेवण. तुला सांगायला काही हरकत नाहीं तुझी बायको, अशी धीराची खऱ्या संस्कृतीची, तुझ भाग्य थोर म्हणून तुला मिळाली असे सौ. बद्दल गौरवोदगार व ती ऐकायला इथ नाहीं असे म्हणत असतानाच ती वाट चालत होती. मला पाहिल्यावर प्रथम अश्रूंना वाट.आज राजारामबापू पिंपरीला त्या दिवशी उभयता तिथेच थांबलो. गेल्या नंतर कांता व पंडित यांनी शोध शोधी चे जे परिश्रम त्याची हकीगत कानठळ्या बसवणारा आवाज. भूकंप अशी प्रतिक्रिया .तुझ्या भरवशावर कलकत्ता गाठले तसेच (T.C. ना तोंड देत ) पुणे हि गाठीन व हा प्रवास सुखरूप पार पाडण्याची जबाबदारी त्याने (भगवंताने) पार पाडली पुण्यात आल्यावर प्रेस्टीजच्या कल्पनेने कपडे बदलून सौ अक्काच्या घराकडे वाटेत विठ्ठल वाडीला जाऊन या प्रवासाची सांगता करावी हा विचार परंतु ज्ञानेश्वर पादुका दर्शनाने समाप्ती………(समाप्त)
डायरीतील नोंद-मला समजलेली - गेल्या दहा भागात मला गवसलेली माझ्या वडिलांची रोजनिशी जशीच्या तशी तुमच्या समोर मांडली. आम्ही तीन भावंडे आणि माझी आई यांना एकटे सोडून अचानक सर्व संग त्याग करून विरक्तीच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेत वडिलांनी घर सोडले होते. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सुरवातीच्या प्रवासातील तीन ते चार ठिकाणी ते ठिकाण वडिलांनी सोडले आणि मग त्यांना शोधत माग काढणारे माझे काका तिथे पोहचले असे झाले. पुढे मग त्यांच्या घर सोडून जाण्याच्या प्रश्नाची तीव्रता जगाच्या दृष्टीने कमी होत गेली. आता मुलांकडे बघून तुलाच घर चालवले पाहिजे असे सांगत, बहुतेक नातेवाईक आपापल्या संसारात रममाण झाले.आज त्याकाळी मी स्वतः आजोळी असल्याने आईचे रोजचे भावनिक हाल पाहण्यास मी नव्हतो. पण आज त्या दिवसातील आठवणी मन सुन्न करतात.
आज अखेरचा रोजनिशीचा भाग मी आपणासमोर ठेवला आहे. वडिलांना घरी परतण्याचा कौल मिळाला. ते कलकत्ता पुणे प्रवास विनातिकीट करताना पकडले गेले नाहीत. सुमारे दोन महिन्याचा कालावधी त्यांनी, समाज माझी काळजी घेईल. सर्व व्यवस्थित पार पडण्यासाठी भगवंत आहे, या श्रद्धेवर काढला. आज चाळीस वर्षांनतर या घटना क्रमाकडे पहिले कि, खरोखर श्रद्धा माणसाला किती बळ  देते याची प्रचीती येते.
पुण्यात परत आल्यावर देखील माझ्या वडिलांची पाऊले प्रथम माझ्या आत्याच्या घराकडेच वळली. आई माघारी वडिलांना आईच्या प्रेमाने तिनेच लहानाचे मोठे केले होते. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर पादुकांच्या दर्शना नंतर माझ्या आत्याचे घर जवळ केले. या प्रवासानंतर पुढे दोन वर्षांनी किरकोळ आजारपणाचे कारण होवून जुलै १९७३ मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आईस तरुण पाणीच वैधव्य आले. पण अखेरच्या दिवसात त्यांची काळजी घेता आली या समाधानावर आईने आम्हा सर्व भावंडांना लहानाचे मोठे केले.
पण या रोजनिशीच्या वाचनातून,भले लौकिक दृष्ट्या माझे वडील संसारात यशस्वी नसतील, पण पारलौकिक अर्थाने ते सरळ मार्गी आणि त्यांचा अभिमान बाळगावा असे आदर्श पिता होते हे मात्र अंतिम सत्य मला समजले...
आणि हे सत्य मी माझ्या शब्दात तुमच्या समोर ठेवीत वडिलांची   डायरी बंद करतो....

Monday, May 9, 2011

मराठी काव्यातील 'माणिक'

१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत. त्यांच्या कविता तरल,गूढ गंभीर आणि आडनावाप्रमाणे गोडघाटणीच्या असल्या तरी त्यांनी लिह्ण्याकरिता घेतलेले नाव आहे 'ग्रेस'. माणिक हे पाळण्यातील नाव असले तरी ते लिहिते झाले ग्रेस या पूर्णतः ग्रेसफुल शीर्षकाने .

ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादात होता... किंवा
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते... या रचनांनी आज मनामनात प्रतिभावंत म्हणून नोंदलेले कवी ग्रेस त्यांचा ७१वा वाढदिवस दिनांक दहा मे रोजी साजरा करीत आहेत.त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांना मानाचा  मुजरा देत समस्त रसिकाच्या वतीने जीवेत शरद शतम! अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत मी त्यांना दीर्घायुष चिंतितो.
प्रकाश जळतो हळू हळू कि चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दुखः सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका..
या ओळीतून जिथे कवीस प्रकाशाच्या उजळण्याच्या जागी प्रकाशाचे जळणे दिसते. किंवा निबिड अरण्यातील अनेक पावसात भिजून,हिरवा कच्च शेवाळलेला वृक्ष जणू मूकपणेच त्या रंगाचा स्वीकार करीत आहे. आणि नेणिवेच्या जाणीवेतून आयुष्याच्या क्षितिजावर सुख दुःखाकडे तटस्थतेने पाहणारा मेघ आपोआपच परका वाटू लागतो
या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कविता देताना या कवीने गूढता,दुर्बोधता याकडे खऱ्या अर्थाने पाहण्यास शिकवले.कवीता समजणे आणि कविता उलगडणे यातील अन्तर जर तुम्हास कमी करता येणार असेल तरच तुम्ही ग्रेस समजून घेवू शकाल.अर्थात स्वतः कवी ग्रेस यांनी त्यांच्यावर बसलेल्या दुर्बोध कवितांचा जनक या शिक्याची कधीच पर्वा केली नाही. या उलट स्वतःमधील आणि कवितेतील गूढता आणि इतरांना वाटणारी दुर्बोधता जपताना त्यांनी भरभरून बोलत, त्यांच्या 'ती गेली तेंव्हा..'या सुप्रसिद्ध कवितेचे विश्लेषण अपुर्वतेने केले आहे त्यासाठी हि लींक आपण वेळ काढून जरूर ऐका-
सदर फिल्मच्या शीर्षकात ग्रेस यांना विचारवंत कवी असे संबोधले आहे.पण त्यांच्या कविता वाचयला लागले कि, प्रतिभावान कवीच्या अंतर्मुख करणाऱ्या प्रगल्भ रचना असे त्यांच्या कवितेस संबोधावे वाटते.कविमन कविता साकारताना वेगवेगळ्या रचनांमधून स्वतःला उलगडून सांगत असते असे मानतात. पण खराखुरा प्रतिभावान कवी स्वानुभावापेक्षा भावानुभव नेहमीच प्रभावी पणे मांडत असतो. कवी ग्रेस म्हणजे या कलाविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण आहे.त्यामुळेच ऐन तारुण्यात हा कवी 'संध्याकालीन' रचनांतून तरलतेने उलगडत जातो.दिवसाच्या विविध कालपर्वतील सर्वाधिक गूढ वेळ म्हणजे कातरवेळ- सायंकाळ आणि या कवीची सर्वाधिक आवडती वेळ हीच आहे त्यामुळे -
संध्याकाळच्या कविता -१९६७(कवितासंग्रह)
चंद्रमाधवीचे प्रदेश - १९७७(कवितासंग्रह)
सांध्यपर्वातील वैष्णवी - १९९५(कवितासंग्रह)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - २०००(ललित लेख संग्रह)
सांजभयाच्या साजणी -२००६ (कवितासंग्रह) यासारखे प्रमुख काव्य व लिखाण या गूढ अशा सांजवेळेशी निगडीत झाले आहे.
या कवीस समजून घेणे हे एक आव्हानच ठरेल. आणि असे आव्हान पेलणे कठीण झाले कि, तथाकथित समीक्षक पटकन त्याच्यावर दुर्बोध हा शिक्का मारून रिकामे होतात. माझ्या दृष्टीने कवी ग्रेस हे दुर्बोध नसून एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे केवळ काव्य रचनेत नाही तर ललित लेखातून व्यक्त होणे असो किंवा एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रिका असो, त्यांच्या शीर्षकातच वाचकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद आहे.त्यामुळे -
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - -हत्तीच्या डोळ्यांतील पाणी निकराने मागे परतविणार्‍या एका मुंगीस...
मितवा : ...अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
वार्‍याने हलते रान : हे तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय... ...(स्वाक्षरीखाली ’अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी’ असा सूचक उल्लेख)
यासारखी विचार मग्न वृत्ती फुलवणारी शीर्षके ललित संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते सहजतेने वापरतात.
नागपूरच्या दाहक हवेत वाढताना माणूस,उन्हाने करपला तरी वृतीने शीतल राहत असावा.त्यामुळेच कवी सुरेश भट काय किंवा कवी ग्रेस काय हे संध्याकाळच्या गुढते बरोबर त्यातील अनाकलनीय नजाकत टिपताना दिसतात.
सुफी काव्य प्रकार हा ग्रेस यांना मनापासून भावलेला काव्यप्रकार त्यांनी त्यावर मनपूर्वक प्रेम केले.आपण जर या सुफी काव्य प्रकारच्या उत्त्पती बाबतचे हे वाक्य वाचले -
The word ‘Sufi’ is derived from the Arabic word ’suf’ which means wool. Sufi songs resembles a path of devotion and love which leads to none other than God himself. A person can strives towards intimate knowledge or communion with God through listening to Sufi Songs. तर या मनस्वी वृत्तीच्या माणसाचे या काव्य प्रकारावर का प्रेम होते ते आपोआप स्पष्ट होते.
या कवीला संध्यासूक्तांचा यात्रिक असे संबोधतात. मला वाटते कि कातर वेळेस जेंव्हा दिवस संपून पूर्ण अंधार होण्यापूर्वी जी धूसर वेळ असते ना ती मन अगतिक करणारी भावविवश वेळ. ती वेळ हि सर्वाधिक आभासी वेळ. या वेळेवर या कवीने मनस्वी प्रेम केले म्हणूनच या श्रेष्ठ कवीच्या रचना म्हणजे अक्षरशः अभासातील भास वाटतात.कारण ओळी त्याच पण प्रत्येकासाठी भिन्न अनुभूती देणाऱ्या.किती म्हणून आणि काय काय घ्यायचे ....
म्हणूनच त्यांच्याच- ' ती गेली तेंव्हा ..'या प्रसिद्ध रचनेतील -
तशी सांजही आमुच्या दारी, येवून थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता....
या ओळीवर थबकत मी शेवटी इतकेच म्हणतो कि-

मोत्यातून शोधण्या 'माणिक' मी रत्नपारखी झालो
शब्दात गवसता अर्थ मी अर्थ पारखा झालो ....

Sunday, May 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून.भाग दहा

नागपूर सकाळी सोडल्यावर मध्यंतरी प्रवासात एक कॅन्सर झालेल्या बोलू,खावू न शकलेल्या माणसाची  गाठ पडली.   विलासपूरचा  प्रवास श्रीवास पोस्टल क्लार्क यांचे बंधू मुळे घडून आला.घरी आजारी माणसास घेऊन जाताच,हॉस्पिटलची चौकशी सायकल रिक्षात असतानाच झाली. परंतु घरात कोणी माणसे नाहीत का? यांचे भाऊ कोठे आहेत ? म्हटल्यावर अगोदर घरी उतरून घेतले.बरोबर घरी पोचण्याकरिता स्टेशन-पोस्ट ऑफिस मधला पेंडर रोडचा माणूस,रिक्षावाला, पोस्टल शिपाई पुरषोत्तम या सर्वांनी सहकार्य दिले.पोहचल्यावर त्याची व्यवस्था लागल्यावर निघावयाचे तेंव्हा त्यांनी थांबून जा म्हटल्यावर जेवून निघालो.परंतु जेवण्यास मन होईना.तो वाचावा अशी भावना व भगवंताजवळ तसा मनोदय.परंतु घरी आल्यावर एकटा, लग्न न झालेला ,आजारामुळे खंगलेला हे सर्व पाहून त्यांचे भावाला विनाशोक कर्तव्य करावे,म्हणून निरोप घेतला व काय ती भगवंताची मर्जी म्हटले.
                                                   ---------------------- X ----------------------
विलासपूर ते हौरा पैसे नाहीतT.C..ला कसे तोंड द्यावयाचे असे काही विचार मनात नसता T.C.आल्यावर तिकीट तिकीट म्हटल्यावर नुसताच बसून,तर पुढे बंगाल मध्ये शिरण्यापूर्वी सकाळच्या वेळी काही खात असता तसेच खाणे पुढे चालू ठेवले. त्यावेळीही कोणतीही T.C.कडून चौकशी न होता प्रवास निर्विघ्न पार पडला.रात्री दुसरी मुंबई असलेले अफाट कलकत्ता पाहून मन काही दडपल्यासारखे झाले. मी अंधारात पाऊल टाकीत नाही ना ? तथापि Light has always guided me म्हणून धीरही. बोगदा. आत वस्ती करून असणाऱ्या माणसांबद्दलच्या जीवनाचे विचार, तसे म्हटले तर रात्र पडल्यावर सारे जग अंधारातच बुडून जाते.व आपण बोगद्यातच राहतो.दुसरी कशाचीही अशा नसलेल्या मनुष्यास खावयास कसे मिळते,याचा विचार करावा लागतो काय? का तो विचार मनात येतो? आज सकाळी हुगळी नदीत स्नान करून रामकृष्णांच्या तपोभूमीचे दक्षिणेश्वराचे दर्शन घेतले. काळी बाजूस पाच पिंडी यनेश्वर, जलेश्वर etc.अजून सर्व इतिहास समजून घ्यावयाचा आहे.एका खोलीत काही(बंगाली)पहात असता एक म्हातारा काही समजते का? म्हणून विचारात होता.नाही म्हणालो.पुन्हा काही वेळाने त्याची बाहेर गाठ पडली.वय वर्षे ८० संधिवाताचा विकार,बायको वारून २४ वर्षे झाली.तरी मला इथे आले पाहिजे ही भूमी पवित्र आहे इथल्या मातीने रामकृष्णांचे विचार शोषून घेतले आहेत (soaked ) त्या महापुरुष्याच्या सांगण्याकरिता,मला इथे आले पाहिजे.मला उद्देशून तो म्हणाला ( Face reading ) You have caunestness कळकळ मनाची शुद्धता वाढली पाहिजे. रामकृष्णांना सरस्वती प्रसन्न होती म्हणजे काय? केवळ सरस्वतीच प्रसन्न होती काय? असा माणूस ५०० वा हजर वर्षात होणार नाही तसेच श्रद्धा काय करू शकते.या बद्दलच्या ओळी. बेलूर मठात संध्याकाळी सरस्वती पूजा. भजने साष्टांग नमस्कार मी देवी समोर जाऊन केला तेंव्हा ते प्रमाम बाहेरून केला तरी चालेल असे म्हणाले. गुढघे टेकून नमस्काराची इथे पद्धत दिसली. पतंग आकाशात ३५ते ४० दिसले.दक्षिणेश्वराजवळच्या लोकल स्टेशनाजवळ एक बाई बरोबर आणि २-३ पुरुष स्त्री ( तरुण) व एक पुरुष वर्दळीवर आले रस्त्यावर भांडण .दुसऱ्या एकास कारण विचारता मोहबातीत अंतर पडले दुसरे कारण काय असणार? स्टेशनवर पुरी भाजी खाल्यावर पानावर जे राहिले ते चाटावयास मागितले (लहान मुलगा)त्याने अंग शहारले what hoorible
                                                                         ----------------------x --------------------------
आज कालीच्या देवळात ( कलकत्ता ) सकाळी ट्रामने गेलो. आयुष्यात प्रथमच ट्राममध्ये बसलो.तिथे दोन दोन चिठ्या तयार केल्या?
१. सौ. वती व मुलांची आर्थिक जबाबदारी स्वीकारणे ,२. सौ. वती व मुलांची जबाबदारी भगवंतावर टाकून निश्चिंत होणे, व जी चिट्ठी निघेल त्याप्रमाणे वागायचे ठरवून दोन्ही पैकी कोणताच निर्णय स्वतः घेण्यास असमर्थ असल्याने असा कौल लावायचे ठरवले.चिट्ठी पुजाऱ्याच्या संबंधी १०-१२ वर्षाचे मुलाने उचलली व तोच काली प्रसाद मानावयाचे ठरविले निर्णय सौ.वतीचे बाजूने लागला. इथेही १रु.ठेवा असा आग्रह परंतु पंढरपूरची बडवे गिरी नाही.देवळातून २-३ तासानंतर शांत चित्ताने बाहेर पडलो व हौरा स्टेशनचा रस्ता विचारात पायी चालावयास सुरवात केली.जाताना सेंट पॉल कॉथेड्रोल व त्यापलीकडे दिसणारी पांढरी शुभ्र व्हिक्टोरिया मुझीयमची इमारत पाहिली. व्हिक्टोरिया प्रजा वत्सल दाखवण्या करिता इमारतीवर एका बालकाला दुध पाजणारा,तसेच बालकाला ८-९ वर्षाच्या जवळ घेतलेला पुतळा.राज निष्ठेची शपथ घेतली जात आहे असे देखावे.राज्य रोहणाची मिरवणूक हत्ती घोडे जात आहेत असे bronze structure कर्झन , रिपनचे पुतळे पहावयास मिळाले.व अवघ्या ६५ वर्षाहूनहि थोड्या काळात कर्झनशाहीचा अस्त होऊन काळ बदलल्याची जाणीव. राज्य रोहणाच्या व शपथे च्या प्रसंगी दहशतीचा भाव, हर्ष एकाच्या चेहऱ्यावर नाही.सातव्या एडवर्ड चा अश्वारूढ पुतळा.शीर झुकलेले, गर्वोद्धत वाटला नाही नेहमीपेक्षा वेगळी पोझ. विस्तृत आकार जलाशय.पुढच्या बाजूस व्हिक्टोरिया राणीच्या हातात पृथ्वीचा गोल असून दुसऱ्या हातात राजदंड असावा. प्रवेश दारावर दोन संगमरवरी सिंह दारावर त्या राजवटीचे सील. जिन्याचे पॉंलिश कालच केल्या सारखे ताजे. ६५ वर्षानंतरही, पितळी तोफा. आतील भाग बंद. असून सैनिकी पहारा. अंधार झाला. सरस्वती विसर्जनाच्या मिरवणुका ट्रक मधून. एका मोठ्या मैदानातून बाहेर पडल्यावर Hevay traffic .१० अंक मोजावयाच्या आत ५ मोटारी पास थोडाही खळ नाही पायी रस्ता ओलांडणे कौशल्याचे काम. बहुतेक पायी प्रवास. रस्ता विचारल्यावरशार्ट कटने न जाता रहदारीच्या रस्त्यावरून जावे व इधर उधर न घुसना असा सल्ला.हलवायाने जिलबी देताना भगवान काय म्हणाला? असा प्रश्न केला. तोच दुसरीकडून चोरी करू नको असा आवाज आला हावडा स्टेशन वर झोप. (क्रमशः)
डायरीतील नोंद-मला समजलेली -या टप्यात घर सोडल्यापासून त्यांनी मनाशी निश्चय करून ठरवलेले काली मातेचे दर्शन घेण्यात त्यांना आलेल्या यशामुळे मला आजही मनास समाधान वाटते. अर्थात घर सोडून मातेच्या दर्शनाची ओढ मनात असताना त्यांची सामाजिक कर्तव्याची जाण जागरूक असल्याचे दिसते. नागपूर सोडल्यानंतर वाटेत आजारी परंतु अपरिचित व्यक्तीची भेट होताच सर्वतोपरी मदत करीत त्यांनी त्या व्यक्तीस सुखरूप घरी पोहचवले आहे. पुढे प्रत्यक्षात कोलकता येथे आगमन झाल्यावर तेथील गर्दी, गजबज यांनी आलेले भारावलेपण,अन्य भाविकांचे रामकृष्ण यांचे बद्दलचे मत, गरिबीतील लाचारी,या प्रसंगानि त्यांचे मन हेलावले आहे. रामकृष्ण मठाचे दर्शन पार पडल्यावर दुसरे दिवशी कालीमातेचे प्रत्यक्ष दर्शन. त्या दर्शनास जातानाच ते एका निश्चित उदेशाने तिथे गेल्याचे नोंदीतून स्पष्ट होते. घर सोडून हा सुरु केलेला प्रवास असाच सुरु ठेवावा कि संसारात परत जावे? या द्विधा मनास्थितीस उत्तर त्यांनी देवीकडे 'कौल' स्वरुपात मागितले. त्यांचे उत्तर घरी परत जा. असे आले. आणि त्यांनी तीन तासांपर्यंत बसून देवीची मूर्त मनात साठवून, त्यादिवशी अतिशय शांत चित्ताने परतण्याचा निर्णय घेतला.

Thursday, April 21, 2011

झिंगलेला साप .......

वारुळातून आला साप,चालू लागला सरळ
मधेच त्याने थांबून,टाकली थोडी गरळ
पाहून त्याची चाल जो तो गाली हसतो
बघून त्याची थेर, वयस्कर साप पुटपुटतो...
वेळ काळाचे भान नाही याला, केंव्हाही हा लावतो.

झिंगून सरळ चालल्यावर सारेजण हसणारच
घ्यावी इतकी थोडीच कि चाल राहावी वळणदार
वाढले जरी उन तरी, आतून वाटेल गार गार.

थोडा वेळ सरळ चालून,साप आला भानावर
फार नव्हती चढली,म्हणत डोलू लागला वाऱ्यावर
ते पाहून आजोबा सापांनी फुत्कारले त्याला ...
खूप झाला तमाशा,आता वारुळात जावून डोला

हो हो निघालोच म्हणत,पुन्हा सरळ गेला वारुळात
पाहून त्याची सरळ चाल सापिण बाईच्या डोळा पाणी
कधी संपणार वनवास म्हणत, उगारली तिने फुंकणी

पाहून तो अवतार,पुरेपूर उतरली सापाची
कात टाकीत तिला म्हणाला ,यापुढे पिईन फक्त विदेशी छापाची

Friday, April 15, 2011

थडग्यातून पुन्हा बाहेर आलेला कलाकार......

डोक्यावर टोपी, हातात काठी,
ढगळी विजार आणि तंगकोट,
असा पेहराव देहाशी
बोलके डोळे आणि नाकाखाली छोटीशी मिशी.
ओळखले का कोण बरे हि स्वारी खाशी
हि तर व्यक्ती दिसते विदुषकी
पण बुद्धी, प्रसिद्धी आणि पैसा चालत आला याच्या पायाशी ......
ओळखलेत न हे वर्णन आहे एका अति प्रसिद्ध विनोद वीर, कलासक्त अभिनेत्याचे.
ज्याचे नाव घेताच, तुम्ही कितीही काळजीत, तणावात असलात तरी खुदकन हसाल असा अभिनेता ...चार्ली चॅप्लीन.
या थोर कलाकाराचा आज जन्म दिवस. आपले आयुष्य लोकांना हसवत ठेण्यासाठी खर्ची घालणारा हा कलंदर माणूस
आपल्या वडिलांचे बोट धरून याने चित्रपट सृष्टीत प्रवेश करत - "The Eight Lancashire Lads," या चित्रपटापासून कामास सुरवात केली.
जगाला हसवणाऱ्या या कलाकाराने वास्तव जीवनात हर तऱ्हेचे भोग भोगले. मुलगा आणि कुटुंबीय याची देखभाल नीट
न केल्याच्या आरोपावरून चार्लीच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला. अति मद्यपानामुळे वयाच्या ३७ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी चार्लीचे वय होते फक्त बारा वर्षे.
चार्लीवर सर्वाधिक प्रभाव होता त्याची आई हॅना हिचा. गायिका आणि विनोदी अभिनेत्री म्हणून काम करणारी त्याची आई ही त्याचे श्रद्धास्थान होते. पण आजारपणामुळे आवाजावर परिणाम झाल्याने,चार्ली वयाच्या पाचव्या वर्ष पासून काम करू लागला. आईचे आजारपण मात्र वाढत जावून शेवटी त्याची परिणीती ती मानसिक रुग्ण होण्यात झाली. पण चार्लीने आईस कधीच अंतर दिले नाही.
याप्रकारे कौटुंबिक ताण तणावा नंतर नाते संबंधात देखील या महान कलाकारास अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. काही वर्षांसाठी टिकलेली 'भातुकलीच्या खेळामधली ' अर्ध्यावर डाव मोडणारी तीन अयशस्वी लग्ने पदरी घेत केलेले त्याचे चौथे लग्न अखेर पर्यंत टिकले. हे लग्न झाले तेंव्हा चार्लीचे वय होते फक्त त्रेपन्न वर्षे. आणि वधु ओना-ओ-नील हि होती अठरा वर्षांची. या दाम्पत्यास आठ मुले झाली.
इतक्या हेलकावणाऱ्या नौकेतून प्रवास करणाऱ्या, या अस्थिर आयुष्य जगणाऱ्या कलाकाराने चित्रपट माध्यमातुन जगाला दिला तो फक्त निखळ आनंदच.
अर्थात या महान कलाकाराचे चित्रपट हसवणारे असले,तरी त्यातून जीवनातील विसंगती,दुखः, यावरील भाष्य पुरेपूर हादरवणारे होते.
आयुष्यभर असे अनंत चटके सोसत जगलेल्या कलाकाराचा अंत,स्विझर्लंड या सर्वात शांतताप्रिय देशात झाला. सन १९७७ च्या नाताळच्या पवित्र दिवशी चिरनिद्रा घेतलेल्या कलाकाराच्या नशिबी मृत्यू नंतर देखील शांत आयुष्य नसावे म्हणूनच कि काय पण १ मार्च १९७८ या दिवशी,त्याच्या मृतदेहाची चोरी झाली. मृतदेहाची शवपेटी परत करण्यासाठी पैशाची मागणी चोरांनी केली.
अर्थात स्विस सरकारने ११ आठवड्यात सदर शवपेटी परत मिळवून.ती अधिक सुरक्षित पणे दफन करून या प्रकरणावर पडदा टाकला. मी मात्र या घटना क्रमाकडे पाहताना असे म्हणतो कि, सतत ताण  तणावाच्या दुष्ट चक्रातून,जगाला  विनोद बुद्धी आणि विनोदी वृत्ती यांनी ज्याने जन्मभर फक्त हसवत ठेवले,तो परम प्रिय चार्ली त्याच्या मृत्युनंतर आता कोणी रडत नाही ना याची खात्री करण्यासाठीच जणू थडग्यातून पुन्हा बाहेर आला. आणि जणू त्याला समजले कि, मी गेलो तरी माझे चित्रपट लोकांना नेहमीच हसत ठेवतील. या खात्रीनंतर जणू त्याने खरी खुरी चिरनिद्रा घेतली. तर शेवटी इतकेच म्हणेन कि...
Simplicity is a difficult thing to achieve. हे एकच वाक्य प्रत्यक्षात अमलात आणणाऱ्या या कलाकारास त्याच्या जन्म दिनी केवळ सलाम !

Tuesday, April 12, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले- डायरीच्या नोंदीतून. भाग नऊ

डायरीतील नोंद -- असलेली.
शनिवार ता. २३-१-७१ आज स्टे. वेटिंग रूम मध्ये सकाळ उजाडली.कालचा विचार पुढे चालू होता.निर्णय स्नान करून घेण्याची कल्पना.स्नान. नंतर कार्यक्रम आखला.भारत भ्रमण पायी व रु.५० आरंभी जमवणे आवश्यक आहे काय? W. Ticket सारे विचार मनात घोळत होते.निवेदन व रामकृष्ण मिशन हे विचार मनात आले.निवेदन तयार केले व विठ्ठल मंदिर शहादे येथे रवाना. मनाशी ते विठ्ठलाच्या पुढ्यात वाचून,प्रथम निष्कांचन सराफ होणार.जवळची पुंजी ५०पैसे विठ्ठल पेटीत टाकून आजपासून समाजाच्या जीवावर जगण्याचा निश्चय.दुपार१२.५५ ....रेयॉन चे मॅनेजर ट्रस्टी बिर्लांपैकी देवळाच्या व्यवस्थापनामध्ये अतिथि अभ्यागत सोय नाही.तशी सोय वैष्णव मंदिरात असते.असे स्थानिक पुजारी म्हणाले. विश्रांती भवनामध्ये पैशांनी सोय व अगोदर नोटीस देण्याचा परिपाठ.देऊळ पालीढाणा शिल्प पद्धतीचे.वाईचा नंदी आणि येथील फात्तरांच्या शिल्प कृती मध्ये वाई उजवी वाटली. खर्चाचा अंदाज बांधण्याचा कालावधी नमूद नाही. स्त्री मूर्तीमध्ये काही उणीवा. निगा निगराणी चांगली. देऊळ टेकडीवर त्यामुळे प्रसन्नता, संगमरवरी फरशी स्वच्छता ,हिरवळ, पाण्याची सोय, पंडेगिरी नाही. आजच अगदी अनोखे वातावरण. फुटाणे घेण्याची हि सोय राखली नाही. एका केळीवाल्याला विनंती करताच केळ व सिंधी हिंदू खानावळी मध्ये सर्व आवरल तरी डाळ रोटीची सोय.
भोजन, भगवान तेरा भला करे असा आशीर्वाद.स्टेशन शहादवर पुढे टिटवाळा गणेश श्रींची ओढ.असाच काही वर्षांपूर्वी भटकत असता अपूर्ण राहिलेली,कामना पूर्ण करण्याचा मनोदय व लांब दूर जाताना आशीर्वादाची शिदोरी असावी अशा भावनेने दर्शन. भजन कोण असशी तू भजनानंतर खिरोद्याच्या शास्त्रींकडून आत्मानंदात (श्रोते नसताही) झालेले प्रवचन.मधुकर राव चौधरींच्या गावचा तरुण वय २४ लग्न नाही.अध्यात्म मार्गी कठोपनिषद भाषांतर करण्यात गुंतला असा इतिहास.बंगालच्या समस्येवर बोलणे.तुम्ही आत्मघातकी आहात,चालू नक्षलवाद्या बंगल्यांना उद्देशून इंदिराजी दोषी.हे विचार रात्री कल्याणमार्गे नागपूर मेलने रवाना. प्रवासात एका मुसलमानाशी आवाज चढवून भाषण,तसेच त्याच्या आजारी मुलाबद्दल सहानभूती.सिंधी व मुसलमान असे डब्यात दोन तट सिंधी स्त्री आपल्या पूर्वीच्या(फाळणी) दुःखांना न विसरलेली.मुसलमानास उद्देशून सो जाना तो सो जा बारा बरस को रामायणातील कुंभकर्ण उल्लेखावरून हसू.वेळ आल्यावर पाहू दुसऱ्या एका स्त्रीस उद्देशून मी प्रथम माताजीको जगह दि थी असा मुसलमानाच्या तोंडून शब्द्द प्रयोग ऐकल्यावर बरे वाटले.दुसरे व्यक्ती चित्र रेल्वेमधील जाडजूड मवाली वजा फणसासारखे राकट व्यक्तिमत्व .जीवनाचे तत्व ज्ञान जर जगावयाचे तर ज्या गोष्टी आवश्यक त्या केल्या पाहिजेत. तथापि विचारी वाटला.भगवान को मानते,या आप नही या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही.परंतु साधू संतांच्या विचारप्रणालीचा अभ्यास.  सूरदास पहिले आत्मा फिर परमात्मा,असे म्हणतो व हे गोपाळ ही कंठी माळ,तुझी तू सांभाळ असे उपवासी पोटी भडकल्यावर म्हणतो,असे त्याच्या बोलण्यात आले.चोर परीस्थीतीने चोरी करतो असे तो म्हणाल्यावर समजा तुमचे हे म्हणणे मान्य करून एखाद्याने तुमचे डबोले पळविल्यास,उदार मनाने त्याला क्षमा कराल काय? हे ऐकल्यावर तो वैयक्तिक  मालकी  हक्कांबद्दल बोलू लागला तात्पर्य आचार आणि विचार विचार आणि आचार सुसंगत नाहीत
रविवार ता. २४-१-७१ गाडी पुढे पुढे धावत होती आणि अकोल्याला उतरवयाचा निर्णय घेतला. "मै तो अभी नंगा हुवा है मेरे पास कूछ भी नही है!"असे T.C. ला म्हणण्याचा प्रसंग आला नाही.पायाला चप्पल लागलेली, केसांचे जंगल वाढलेलं अशा अवतारात चौकशी.आज रविवार सुट्टी पत्ता माहित नाही ११ ला खंडेलवाल टावर पाशी ते ४ ला घर दाढी कटिंग उरकले जाऊन. कृषी विद्यापीठात कोणी मला चपरासी समजले असावे वाचमन कडून पत्ता घेवून सदगुरु कृपा गजानन प्रसन्न अशा बंगल्यापाशी थकून बसलो असता अचानक दादांची गाठ. स्नान पोहे रात्रो भोजन. झाशीच्या राणीची मुलांना कथा राजेंद्र why so dull ? सायकोलॉजी विचारात घेवून शिक्षण दिल जात नाही हे काय? त्याला येत नाही असे न म्हणता प्रयत्न करणे आवश्यक आहे काय? वाचन. ....................... x ...........................
२५-१-७१ ... -१-७१ सो ... सकाळी गच्चीवर .............. घेत असता पंडितची गाठ पडल्यावर त्यास प्रथम मला येथे ३ दिवसापेक्षा जास्त राहता येणार नाही अशी कल्पना दिली.त्याचे म्हणणे मी अचानक न कळविता जावू नये. त्यानंतर त्याने महाबळेश्वर सातारा वाई पाली मढ अशा ठिकाणी शोध घेतल्याचे सांगितले.कांतानेही गाडी देऊन सहकार्य दिले. चुलत भाऊ मात्र लाबं राहिल्याचे दिसले. जोडलेले प्रेम अधिक प्रभावी ठरले काय? चुलत घरी सल्ला Go to police सौ. अजून पुण्याला आहे. तिची Reaction विचारण्याचे धैर्य झाले नाही She will be continued to live मुलांबद्दल तुला परम वाटत नाही का ? या प्रश्नास कर्तव्य म्हणून उत्तर दिले. श्रीरामाचे देऊळ पाहिले. कृषी विद्यापीठ अकोला देवळाचे त्यातील वचनांमुळे आकर्षण.
                                                                    .................................... x ................................
२६ जाने. ध्वजवंदन कलेक्टर कचेरीत जाण्या अगोदर स्वातंत्र्य रक्षणाकरिता भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे.अशा भूमिकेतून देवदर्शन त्यात झेंडा वंदन वेळ हुकली. आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र असले पाहिजे श्रीराम देवळातील वाचणे उदरुत वहीवर केली. संध्याकाळी कन्याशाळेजवळच्या बागेत. नाथ पै.निगर्वी कोकणात मोटरेबल रस्ता नसतां सायकल वर हिंडले प्रामाणिक आम्ही पार्लमेंट मध्ये जरी बोलत असलो तरी खरे कार्य तुमचेच आहे ग्रामीण कार्यकर्त्यांना उत्तेजन दिल्याचा प्रसंग. त्यानंतर मला आलेले अनुभव घराबाहेर पडल्या पासूनचे सांगून वही वाचावयास दिली काही खाणाखुणा सांगितल्या. फक्त एकच गोष्ट माझ्या मनात येते ती म्हणजे मुले पुरेशी मोठी झालेली नाहीत,परंतु ही गोष्ट मात्र नक्की कि मी असमाधानाने, चिडून ,रुसून, रागावून, निराश होऊन घर सोडत नसून,तू मला मुलां बाबतच्या कर्तव्याचा विचार कळकळीने करावयाची,जी आठवण देतो आहे त्याची जाणीव ठेवूनच घर सोडले आहे
                                                ................................. x .................................
२७ जाने तुझे नक्की ठरले का? याला होय उत्तर देऊन आज जाण्याची आठवण दिली. दादा काय म्हणाले दादांनाही कल्पना दिली आहे. दादांच्या स्वाभाविक शब्द्दाला तुम्हाला आमचा स्वभाव ओळखता आला नाही ...... ४५ वर्षांच्या विचारानंतर झालेली ही स्वाभाविकच परिणीती होय असे सांगितले
दुपारी सर्व गाड्या निघून गेल्यानंतर स्टेशनवर गेल्याने आजचे जाणे उद्यावर लांबले. 'मढे' या भावजयीच्या शब्द्दावरून काही समजावयाला गेलो असता एकेरीवर येवून तुझ्या खड्कुची मिंधी नाही मला फक्त माझा नवरा काय ते सांगू शकतो. तुला लाज नाही म्हणून माझ्या घरी भिक मागवयाला आलास. बायकोला ठेवलीयाय तिथ आणि इथ गिळायला आलाय स्टेशनवर वाटले तर ट्रंका उचलाव्यात etc..
                                                                   
                                                                  -----------x----------------
आज सकाळी १० च्या सुमारास अकोला सोडले. for Nagpur राम कृष्ण श्रमाबरोबरच रेशीम बाग मनात घोळत होती. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राम कृष्णाश्रम ,नागपूरला हजर झालो. पद्धत treatment प्रार्थनेनंतर कुणी प्रसादाचे राहिलय का? अगर इथे का बसला अशा प्रश्नातून संधी घेऊन ओळख करून द्यावयाचा विचार होता.परंतु बराच वेळ गेल्यानंतर स्वतःच एका स्वामींना मनोगत सांगितल्यावर त्यांनी Bengal is disturbed असे सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न परंतु शेवटी as you are adomnant you may go म्हणाले मी ते काय को ऑपरेशन देवू शकतात विचारल्यावर नियमांकडे बोट दाखवून No shelter for night . he is nor free to take such decision ......असे त्यांचे ऐकून स्टेशन कडे .via झाडाच्या तळातला गणपती पाहून Third class waiting रूम मध्ये मुक्काम. (क्रमशः)

डायरीतील नोंद-मला समजलेली -या भागातील डायरीची नोंद प्रवास एका नव्या टप्यावर पोहचल्याची माहिती देतो. महाबळेश्वरापासून पायी झालेला माणगाव ... पाली महड ..खोपोली मार्गे कल्याण असा प्रवासाचा पहिला टप्पा संपल्यानंतर त्यांच्या मनात देवाच्या शोधाच्या प्रेरणेतून भारत भ्रमणाची कल्पना साकारली आहे. फक्त निरुदेश भटकणे असते तर त्यांनी, कसलाही संग्रह न करण्याचा केलेला निश्चय, मग प्रथम रु. ५० गोळा होणे जरुरीचे असे ठरवले आणि कसलाच साठ करयचा नाही,समाज काळजी घेईल असे म्हणत,स्वतः जवळ असलेले ५०पैसे हि त्यांनी,देवासामोरील दानपेटीत टाकले.त्यावेळी मनातला  निश्चय पूर्ण होईल,तसेच हा समाजच माझी काळजी घेईल,हि त्यांची अंतरीची श्रद्धा मला वंदनीय वाटते.हा प्रवास सुरु असताना वाटेत अकोला येथे ते त्यांच्या भावाचे घरी जातात. प्रत्यक्षात पत्ता माहित नाही ऐकलेल्या परिसरात अंदाजाने चौकशी सुरु , आणि अचानक वडिलांना आजोबाची भेट होणे हे सहजतेने नोंदवलेले योग देखील मला अचंबित करतात. घर सोडून प्रवास करताना ते अकोला येथे भावाचे घरी आले तरी मुळ संकल्पापासून दूर जायचे नाही हे नक्की असल्याने दुसऱ्याच दिवशी त्यांनी भावास मला येथे तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहता येणार नाही. असे सांगितले.त्यावर माझे काका यांनी वडिलांना खूपच समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी न कळवता घर सोडण्यातून निर्माण झालेल्या अडचणी,त्यांच्या शोधासाठी तेंव्हा केलेली धडपड त्यांना सांगितली.पण त्यांनी त्याकडे तटस्थतेने पाहिल्याचे दिसते. माझ्या काकुस माझे वडील, काम धंदा न करता आता भावाचे घरीच ठाण मांडणार, अशी वाटलेली अनाठायी भीती व त्यातून झालेला संघर्ष हे प्रत्येकाचे विचार आणि संसार चालवताना जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, कसे भिन्न असतात याचीच साक्ष देतात. पुढे अकोल्यानंतर नागपुरात रामकृष्ण मठात अपेक्षित सहकार्य न मिळून देखील कसलेही किल्मिष मनात न ठेवता त्यांनी स्टेशनवर रात्र काढली. एकूणच अडचणींकडे त्यांनी खूपच निग्रहपूर्वक व त्रयस्थ वृत्तीने पाहिल्याचे पदोपदी दिसत आहे.

Friday, April 8, 2011

माझ्यासाठी नव निर्मिती.....

आज बसलो लिहायला कविता, लेखणीत भरली ठासून शाई
जुळवण्यासाठी यमक, कानामात्रे शोधताना,वेलांटीच उलटी होई

आठवेनात नवीन शब्द,सुचेनात विचार
अकार उकार हवेत कोणाला,नुसतेच मारू रफार

मग पुन्हा पुन्हा उचलले,भोवतीचे कागदांचे बोळे
कडव्याच्या जुळवा जुळवी साठी ,फिरवले त्यावरून डोळे

ताल  नाही, सूर नाही, नाहीत अलंकार,अनुप्रास
त्यासाठी सुचावे लागते,आतून विनासायास

आडातच काही नाही,तर येईल कसे पोहऱ्यात
छंद बद्ध झाली नाही,तरी मीच माझ्या तोऱ्यात

अशी हि माझी कविता,मीच पुन्हा पुन्हा वाचून पाही
माझ्यासाठी नव निर्मिती, बाकी म्हणती काहीच्या काही

Tuesday, April 5, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून. भाग आठ

डायरीतील नोंद -- असलेली
 श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत मुक्काम. समोरील दोन्ही तळ्याची स्वच्छता वाटली नाही. शेवाळ्याने झाकून हिरवट. चुळ. एक प्रकारचा वास.पुढे उन पाण्याच्या झऱ्यावर स्नान,काल उपवास अतिशय थकवा.स्नानोत्तर ग्लानी जवळ श्री विठ्ठल रुखमाई च्या देवळात दर्शन व जवळ हॉटेल मध्ये लाडू. जेवणाची सोय ( साधे) नसल्याचे सांगितले.सावकाश बल्लाळेश्वर मंदिरात जावून साष्टांग नमस्कार व बंगालला जाण्यास आशीर्वाद मागितला. पुराणीकांच्या जेवणाची आयत्यावेळी सोय नाही. संन्यासी,अथिती, अभ्यागतांची देवस्थानातर्फे काही व्यवस्था होते किंवा नाही, याची चौकशी न करिता तेथल्या पेटीत मूलतः निवृत्तीची प्रेरणा होवून आलेले,रानटी वाघ माणसाळविता येत नाहीत अशा अर्थाचे व शक्यतो राम कृष्ण परम हंसाच्या मार्गाने जाण्याबाबतचे पत्र रवाना करून बाहेर. राइस प्लेट भागवत एक नमुना (धंदा करावयाचा तो कठोर वृत्तीने . भोजनगृह प्रोप्रायटर) दुपारी पुन्हा प्रवासास सुरवात.सुमारे पाच मैलावर मुक्काम. आजच्या यजमानाचा मोठा विलक्षण अनुभव आला. संध्याकाळ संपून निरव रात्रीला सुरवात.रस्त्यावरील एकमेव झोपडीत मी एक वाटसरू असून सोय होईल का?म्हणून विचारल्यावर माझ्याकडे ढुंकूनही न बघता आपल्याच उद्योगात मग्न असताना हुं केले.नंतर माझ्या जवळचे तांदूळ शिजवून द्याल का, त्यावर काय बुवा का? हो बुवाच म्हटल्यावर पातेल्यात भाताची हंडी चढवून त्याकडे मला पहावयास सांगून बुवा कसे? बायको मुले असता विरक्त वृत्तीचा त्याला भयंकर संताप येवून मी बरे केले नाही असी त्याची भावना.त्याला स्वतःला ९ मुले असून एक मँट्रिक गावातला कार्यकर्ता, कॉंग्रेसशी संबंधी शिव शंकराचा भक्त. त्याची प्रथम ओळखच आज होला मारून आणलाय या शब्दाने प्रांजळ मला निदान महिन्यातून एकदा बायको पाहिजे. मी थापड्या बुवा असून थापेबाजी चालणार नाही संपूर्ण नाव व पत्ता लिहून हि हकीगत पोलीस पाटलांना कळविणार आहे.बुवा होऊन देशाचे कल्याण म्हटल्यावर तुम्ही आणि देशाचे कल्याण करणार म्हणून, उपहासाने तुम्ही जेवून घ्या जेवल्यावर तुम्हाला बांधून घालतो, गडबड कराल तर कोयत्याशी गाठ आहे,अशा वातावरणात जेवणाची सुरवात झाली. माझी वृत्ती शांत होती. त्याला बिडी प्यायचीही सवय जेवतांना स्थिर वृत्ती.भात तुम्ही घेवू शकता. त्याने  आपली भाकरी कालवणासह आग्रहाने मला दिली.तिथे असलेली गावातली माणसे गेल्यावर एक कातकरी फरारी असून त्याला पकडण्याकरिता पोलीस फिरताहेत त्याला आश्रय मी देतो हि समजूत (गावकऱ्यांची )असून तुम्ही शांतपणे जेवा.तुम्ही शिव शंकरच आहात. परंतु मला वाटते तुमच्या डोक्यावर काहीतरी नक्की परिणाम झाला आहे.त्याकरिता तुमच्या कपाळावर डाग दिला पाहिजे. स्वतःला झालेली दुःखे व त्याकरिता त्याने हाता पायावर घेतलेले डाग पाहून,त्याच्या शूरत्वाचा प्रत्यय.जेवण झाल्यावर आता तुम्ही बाहेर अंगणात झोपा, अशी माझी रवानगी. अंगावर पांघरूण नाही.वरील वातावरणात हि मी येथेच झोपणार.गृहस्थाने त्याच्या वृत्तीत पालट होऊन एक पोते पांघरावयास दिले.नाथाच्या पोथीतल्या कथा ( बाळासाहेब) पोराला रसाळपणे सांगत होता.सकाळी निरोप घेतला. बंद दाराशी पोते ठेवले आभार मानले व विचारून निघालो.
-------------------x ------------------------
वार दिनांक खोपोलीच्या दिशेने उजाडण्या पूर्वी वाटचाल सुरु. सुमारे तेरा मैल चालल्यावर खाण्याची हालचाल. वाटेत कोयना पुनर्वसहातींची गावे. शिमडी, कारगाव . एके ठिकाणी मारुतीचे देऊळ . मुळ ठिकाणाहून त्यांनी श्रद्धेने आणला असला पाहिजे. जवळचे तांदूळ कुठे शिजवून मिळतील का?
अलीकडच्या गावच्या म्हातारीने सून बाहेर गेली आहे. पुढील गावी वस्ती आहे. पुढील गावी आई मला तांदूळ शिजवून मिळतील का?म्हणून विचारल्यावर तिने शेजारच्या म्हातारीकडे बोट दाखवले.२-५ जण भोवती जमा झाले. परंतु कोठे सोय होण्यासारखी दिसली नाही.प्रवास चालू शीळ फाट्याला रात्र. पूर्व इतिहास जेंव्हा घरावर जप्त्ती आली तेंव्हा आईने मला पोटाशी धरून " तुझा सांभाळ आता प्रत्यक्ष परमेश्वर करील" त्याची प्रचीती.राम कृष्णांना भावना नसतात त्यांना इतिहास ऐकावयाचा आहे हि भूमिका.
-------------------------- x --------------------------
वार दिनांक शीळ फाटा ते खोपोली. दैनंदिन संगीत भजनांची जोड देऊन खर्च भागवण्याची व रेल्वेने पुढील प्रवासाची कल्पना. खोपोली कर्जत (अंबरनाथला शहादे येथे न जाता) रेल्वेने प्रवास.कर्जतला मध्यान्हीच्या वेळी हेतू सांगून अथिती म्हणून आलो आहे. स्टेशन जवळच्या बंगल्यात शेट लोक झोपलेले आहेत असे उत्तर. दुसरीकडे वयस्क ब्राह्मणाकडे गेलो असता जात पोटशाखा चौकशी केली. देशस्थ यजुर्वेदी म्हटल्यावर मी तुम्हाला ५० पैसे देतो तुमची अपेक्षा काय? संग्रह नाही हे सूत्र सांगितले. पुढे तुम्ही येथील श्रीराम मेढी ५ लाखांची असामी आहे, दिलच अस काही मी सांगत नाही परंतु तुम्ही त्यांच्या कडे जावू शकता गाडी २.४५ थांबावयाचे नाही म्हणून मध्ये हॉटेलमध्ये खावून कल्याणकडे रवाना. कल्याणला हितगुज स्वतःची कुवत किती अदमास घे.जेवणाचे भान नाही स्टेशनवर खाऊन पाणी पिऊन वेटिंग रूम मध्ये झोप. बाकावरील जागा.पाय लागणे असे वादाचे विषय.छोटा मुलगा वय ८ते १० बाकावर झोपायचे नाही, असे पोलीस म्हणतात ,हि थाप देवून खाली झोपण्याची सूचना देई. हमाल हितसंबंधी असावा असे पाहटे दिसले.शहादे विठ्ठल मंदिरात जाऊन वेडावाकडा गाईन, परंतु तुझाच म्हणवीन अशी योजना. दक्षिणेश्वराचे ओढीने टाळली.निवांत जागी पुस्तकावरील विठ्ठलाला साक्षी ठेवून भजने म्हटली. (क्रमशः)
डायरीतील नोंद-मला समजलेली -- माणूस देव शोधण्याचे मागे धावतो. पण त्या मागे त्यागाची भावना ठेवत दिनक्रम आचरला,तर अनंत अडचणीत देखिल मार्ग सापडतो. आणि मला वाटतेय कि पाली पासून कर्जत पर्यंतच्या प्रवासातील अनुभव याचीच साक्ष देतात. उपवासाची तयारी आणि जिद्द असली तरी उपवास आणि पायी चालत राहणे यातून आलेला थकवा नोंदवताना, देवस्थानात जेवणाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याचा निषेध लेखी पेटीत टाकून पुढील प्रवास सुरु ठेवला. मुक्कामासाठी झोपडीत मागितलेला आश्रय आणि तेथील घटना क्रम हा आलीप्तपणे पाहिल्यास संकटास तटस्थतेने सामोरे जाणे, हे त्यांनी अंगवळणीच पडून घेतले होते असे वाटते. जेवण तयार करून मिळावे म्हणून अपरिचित ठिकाणी प्रयत्न करताना,झालेली भावना विवशता आईची आठवण येण्यास कारणीभूत ठरली. तर आजूबाजूस नतद्रष्ट वृत्ती दिसल्यास त्यातून संताप उफाळून येवू नये म्हणून भजनाचा आधार घेत त्यांनी त्याचा प्रवास सुरु ठेवल्याचे दिसत आहे.

Friday, April 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग सात

चिमणी चाक
जंगलातील चिमणी कोणताही संग्रह करीत नाही लागणाऱ्या दिवसापुरती कमाई केली आणि स्वच्छंदी राहील असे तिचे जीवन असते.
पोलादपूर महाड प्रवास फार सुंदर झाला चाकाच्या घरघरी बरोबर राम कृष्ण राम कृष्ण परमहंस आवाज महाड नदीत स्नान प्रवास रामदास .. रामकृष्ण
लंगोटी वरून विचार
....... x .......
s t stand वर झोपून. पाणी सोय शेडच्या मध्ये नाही. तोंड धुवून माणगाव रस्त्याने पुढे जाता पाळे येथे सावलीत. इथे कां? एकाने पृच्छा केली.
मुंबईला निघालो आहे चालत. मला वाटले वेडसर आहात पण तसे वाटत नाही .इथच थांबा. गावात तुमच्याकरिता काही पैश्याची सोय होते कां? नंतर वडारी केंजळ बाजूचे अशी ओळख करून देऊन त्याने आपल्या प्रपंचाची कहाणी सांगितली मुलगा थोरला नाव रामदास सुनेचे नाव सुलोचना अलीकडे पटेना ती ३/४ दिवस जेवा काही म्हणेना वेगळे राहण्याची प्रवृत्ती पाठीमागची भावंडे त्यांच्यावर माया नाही. त्यांना सल्ला. जर तुमच्या शिवाय संसाराचे गाडे अड्नारच असेल तरच तुम्ही त्यात लक्ष घाला सुनेला सिनेमा हवा वगैरे हकीगत. मुलांच्या अंगी कर्तुत्व असेल तर तो किती उड्या मारतोय ते पहा. बापाची आणि मुलाची माया तुटत नाही वेळेला ते एक झाल्याशिवाय राहणार नाहीत तरी त्याला तोडल्या सारखे दाखवा पण तोडू नका. दुपारी तीन वाजे पर्यंत जेवणाचा निरोप आला नाही तेंव्हा confirm करून पुढे निघण्याची तयारी तेंव्हा ४ पुऱ्या मुलाबरोबर आल्या. रस्ता तापला आहे पायाला फोड आले तरी श्रद्धेने पुढे पाऊल. दक्षिणेश्वर या ध्यासाने रायगडाची ओढ असूनही गेलो नाही. बौद्ध व पांडव लेण्या पहिल्या नाहीत महात्माजींना एकदा जोग फाल्स पाहायला येणार कां असे विचारले असता मी याहूनही उंचावरून पडणारे पाणी पहिले आहे (पाऊस) मी माझ्या कामात निमग्न आहे तुम्ही जावून या या उत्तराची आठवण पुढे वीट भट्ट्या, खाडीचे पाणी आत घुसलेले. देखावा सुंदर पुलाच्या कट्ट्यावर बसलो असता एक समाज सेवक आंबेडकर यांची गाठ त्यांचे गाव मैलावर.प्रवासाची कल्पना दिल्यावर दासगावी धर्मशाळा असल्याचे सांगितले जे बुद्ध झाले त्यांच्या वागणुकीत फरक झाला आहे कां? फक्त टोपी पाटी बदलल्यासारखे हे झाले आहे.त्यांच्या म्हणण्या प्रमाणे खर्च आटोक्यात, मुख्यतः हिंसेबद्दल कोंबड्या वगैरेबद्दल मला विचारायचे होते ठाम उत्तर नाही.
डोंगरातच घळीतच मुक्काम महाड पेक्षा हवामान रात्रीचे आल्हाद दायक
........ x .......
सकाळी उठून पाहतो तो भोंवती डाव पडलेले.उठून पाहतो तो रानफुल जाईसारखे पांढरे शुभ्र प्रसन्नतेने हासते आहे. प्रत्येक वस्तूच्या निर्मिती मागे काहीतरी परमेश्वरी हेतू दडलेला असतो हे निश्चित प्रसन्नतेने अधिक प्रसन्न वाटले हे मात्र खरे पुढे पाणी लागेल तिथे स्नान.परंतु आज सौ उन्हेरे नारळीच्या बागेत उन्हाळी असलेले हे स्थान, असे स्नान हि मेजवानी वाटली. पाण्याची तीन कुंडे पहिल्या कुंडावर मुस्लीम पद्धतीने बांधकाम . शेजारी दर्गा, कबर १३४२ H असे नमूद असलेले त्याला जी निशाणी वाहिली ती भगव्या झेंड्याच्या आकाराची रंगाने हिरवी होती. मुसलमानी प्रार्थना
स्नान करताना एकजण 'या अल्ला परवर दिगार' असे म्हणाला. लोकांनी लावलेली काठी असे तिथे खेळणाऱ्या मुलीला फकीर म्हणाला.परंतु लोकांनी कुठली आम्हीच लावली आहे असे छोटी मुलगी वय ८ते१० म्हणाली. दासगावला अंदाजे १.५ ते २ च्या सुमारास पोहोचलो व हॉटेल मध्ये जावून साधुत्व वृत्ती धारण करून मुंबई मार्गे बंगालला दक्षिणेश्वरी जात आहे आपणास आपल्या इच्छेने काही (उपहार) द्यावयाचे असल्यास देऊ शकता. चहा पुढे आला तो घेवून अंमळ प्रश्नोतरे ऐकत होतो. खा पिके सौना नाही खा पिके सौ देना साधू समाजाला अनुपयुक्त (भूभार) असा कदाचित त्यांचा ग्रह झाला असावा असे वाटून ठिकाण सोडले.दासगावला मी परमेश्वराचा दासानुदास असून दक्षिणेश्वराच्या रोखानेच माझी पाऊले पडतील व एकदा तोंडातून बंगालचे नाव निघाल्यावर आता मागे घेता येणार नाही. सूर्य मावळे पर्यंत जमेल तसे चालावयाचे मुक्काम लोणारीला वाटेत नाक्यावर एक ग्रहस्थ (वेषावरून) ब्राह्मण भेटला त्याला मी देवाचे नावाने घर सोडले आहे पायी प्रवास चालू आहे आज कुठे मुक्कामाची सोय होत असेल एखाद्याचे नाव सांगा. तात्या खोत जाणकार आहे तुमची नक्की सोय होईल परंतु तिथे गेल्यावर सर्वजण

सिनेमाला जाणार आहेत बायकांनी नाक्यावर जावे असा सल्ला दिला.व तेथून निघालो बुंदी लाडू पोटभर पाणी आणि st शेड मध्ये मुक्काम. वाटेत एका मुसलमानाच्या घरी पाणी पिण्याचा प्रसंग आला त्या घरी हरिश्चंद्र नावाचा गुराखी होता. त्यास म्हणालो पाणी जे देवाने निर्माण केले ते हिंदुकारिता अगर मुसल मानंकारिता नव्हे व मुसलमान अखेर माणूसच आहे
वार दिनांक जाने १९७ लोणारी पासून पायी प्रवासास सुरवात. माणगाव सुमारे १ मैल. सुमारे १६ तासात पाणी नाही व १.५ दिवसाहून जास्त जेवण नाही. चाल मात्र चालू चलो अभेदानंद अभी चलो. गुरु म्हणून कुणा माणसावर माझा विश्वास ठेवावयाची तयारी नव्हती, म्हणून प्रत्यक्ष भगवंतच माझा गुरु झालाय. वेळ आली म्हणजे गुरु भेटल्याशिवाय राहत नाही तो प्रत्यक्ष चालून येतो.सहन करण्याची वृत्ती म्हणजे तितिक्षा याचे आज असे धडे घेतले
पोटात अन्नाचा कण नव्हता. पाणी नाही तरी मधले काही क्षण विलक्षण समाधानात गेले येता येता उपवासाचा खरा अर्थ कळला सर्वांभूती आत्मा या तत्वाची जाणीव व्हावी म्हणून उपवास. वाटल साऱ्या श्रीमंतांना २ दिवस उपवास करावयाला सांगावे म्हणजे त्यांना गरिबांबद्दल खरा कळवळा उत्पन्न होईल खांजाई देवीजवळ बंगालच्या परिस्थितीबद्दल चे एक कच्चे निवेदन तयार केले. देवीच्या देवळात बैठक (meeting) बहुदा राजकीय कार्यकर्त्यांची . मी तिथे कदाचित थांबेन म्हणून त्यांनी मला माणगावला जायचा सल्ला दिला
----------- x ----------
माणगावच्या नदीत स्नान करताना मामू अशी भाषा, परंतु गळ्यात जानवे दिसले पेर फुटीवर कपडे वाळत टाकलेले सोडवून घेताना काट्याशी धसमुसळे पणा करून चालत नसतो.
वसंत भुवन देहरूपी गाडीमध्ये पाण्याचे पेट्रोल भरून पुढील प्रवासास. कोलाड नोगोठ्ण्याचे दिशेने. वाटेत बायकोच्या खुनाचा आरोप असलेला कातकरी पहाण्यात आला पण निरखून पाहिले गेले नाही. खांबला आज प्रथमच एके ठिकाणी (वेदक) जावून मी देवाकरिता गाव सोडले असून मुंबईस पायी प्रवास करीत आहे. आज संध्याकाळी मुक्कामाची व्यवस्था व्हावी.
तेंव्हा एका प्रौढ बाईने इच्छा असली तरी मुलाला पसंत पडणार नाही थोडे तांदूळ घेवून जा व देवीच्या देवळात मुक्काम करावा असा सल्ला दिला Helpless असल्याबद्दल
रागवू नये. तसे मानण्याचे काहीच कारण नाही म्हणून निरोप. देवळातील पोथी प्रवचने पुराणे बंद पडली असावीत तथापि नित्य पूजा चालू. मुंबईकर मंडळींनी भक्ती भावाने मोठी घंटा अर्पण केली आहे.देवळातच शाळा तीतीक्षेकारिता काही पाळणूक थके पर्यंत चाललो, भूक लागल्यावर जेवण . अंगावर एक किडा २-३ दा फुंकर मारली तरी हलेना तेंव्हा बैस बाबा म्हणालो अशीच भगवंताची वागणूक असावी. What creative energy has got by brain
स्वप्न सुंदरीचे सौंदर्य माझ्यावर परिणाम करू शकले नाही. स्वप्न आपण नुसते पाहतो परंतु स्वप्नातील भावनेशी एकरूप होवून त्या देखाव्यात जे शुचितेचे वातावरण तयार केले होते त्यात भर म्हणून रांगोळी पाहिजे असे मनात येवून "रांगोळी" असे उद्गगार बाहेर पडले.परंतु ते अखेर स्वप्नच होय.तशा प्रकारेच माणूस या जगताशी एकरूप झालेला असतो. बोगदेवजा गुहा पाणी मारून थंडगार आल्हाद दायक वातावरण
................. x ................
खांब हून सकाळी नागोठ्ण्याचे दिशेने जात असता एकाच्या गळ्यात पाली असे नाव लिहिलेला गंजीफ्राक दिसला तत्पूर्वी पाली बद्दल सूचना मिळाली होती. पाली वाकण पासून पाच मैल मध्ये नदीवर स्नान पुढे चाल पालीच्या दिशेने. पुलावर डोळे मिटून पडलो असता आकाशाचा देखावा त्यातून एक काळा ठिपका स्वच्छ आकाशात एक पक्षी उडतो तसा निर्माण होवून विलीन. पालीला पोहचल्यावर देवळात थांबू नये असा सूर. परंतु परिस्थिती सांगितल्यावर धर्मशाळेवजा ओवरीत पाडावयाची पंचांची परवानगी(आपटे)
इतरही बेत बोललो पण no response म्हणून निरोप स्वस्थ झोप. श्री गणेशा पुढे निवेदन करावे अशी भावना.
................. x ................
डायरीतील नोंद-मला समजलेली --
यापूर्वीच्या भागात त्यांनी महाबळेश्वर पासुन पुढील प्रवास पायी केला असे मी म्हटले होते. पण सातव्या भागाची सुरवात बघताना त्यांच्या नोंदीवरून असे वाटते कि, त्यांनी महाबळेश्वर सोडताना पोलादपूर पर्यंतचा प्रवास पायी केला आहे आणि त्यानंतर पोलादपूर ते महाड हा टप्पा बहुदा प्रवास वाहनाने केला आहे.कारण हा प्रवास सुंदर झाला असे लिहताना ते म्हणतात-
'चाकाच्या घरघरी बरोबर राम कृष्ण राम कृष्ण परमहंस आवाज' त्यावरून,चार ते सहा दिवसानंतर त्यांनी एक टप्पा गाडी वापरली असावी आणि त्या प्रवासात गाडीच्या संथ लयीतील आवाजाबरोबर त्यांचे मनातील विचार उफाळून वर आले असावेत.आपले नव्हते का होत लहानपणी कि,जर पिठाच्या गिरणीत गेलो तर तेथील चाकाच्या पाट्याच्या लयीत कोणतेही गाणे म्हणता येत असे तसेच काहीसे झाले असावे.याप्रमाणे घर सोडल्यानंतर त्यातल्यात्यात सुखाचा प्रवासाचा बसने केलेला प्रवास संपल्यानंतर पहिली रात्र त्यांनी एस.टीच्या शेडमध्ये काढली आणि पुढील प्रवास पायी सुरु केला. घर सोडून आलेला मानसिक ताण खाण्या पिण्याची सुरु झालेली अबाळ यांच्या बाह्य खुणा चेहरा शरीर यावर दिसू लागल्या असाव्यात. आणि त्यामुळेच पुढच्या टप्प्यात थकलेले शरीर विश्रांती साठी झाडा खाली विसावतच,बघणाऱ्याच्या नजरेत एक वेडा थांबल्याचे दिसते.
यानंतर पुढील दोन तीन दिवसातील प्रवास म्हणजे, घेतलेला निर्णय किती कठीण आहे, पुढे किती कष्टप्रद परीस्थीतीस तोंड द्यावे लागणार आहे, याचीच झलक होती. पायी सलग चालण्याची सवय अद्याप झाली नसल्याने, पायास फोड येणे;शिधा अथवा जेवण उपलब्ध होण्यात आलेला अनियमितपणा, यातून किती कठीण परिस्थिती अनुभवली, याची साक्ष ठायी ठायी दिसते.

Thursday, March 31, 2011

असेही एक "एप्रिल फूल"

मी एक जागरूक पुणेकर या नात्याने सर्व कामे बाजूला ठेवून चहा बरोबर पेपर वाचत होतो. काही प्रमुख बातम्यावरून नजर फिरवली आणि त्यावरील प्रतिक्रिया देण्या साठी हिला हकनाक हाक मारली.
कारण बातम्या होत्याच तशा सनसनाटी.....
चितळे बंधू मिठाईवाले यांनी पुण्यात स्वतःच्या १०० शाखा सुरु करण्याचे ठरवले. पाश्चिमात्य बाजार पेठेस अनुसरून मुख्य दुकान यापुढे २४*७ असे पूर्णवेळ ग्राहक सेवा देणार ...सकाळ पुणे.
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... महाराष्ट्र टाईम्स मुंबई
येत्या पाच वर्षात सर्व खेड्यांना विद्युत पुरवठा करणार..पंतप्रधान .. टाईम्स ऑफ इंडिया यासारख्या स्थानिक, राज्य स्तरावरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील अशा बातम्या आपल्या आज वाचनात आल्या तर तुम्ही काय कराल.
मला माहित नाही तुमचे पण मी काय केले ते सांगतो
मी  तिन्ही वेळा पेपर पुन्हा पुन्हा उलट सुलट कर करून बघितला  आणि चहा घेता घेता ओरडून म्हणालो, " अग्ग्ग पाहिलस का पेपरात काय आलंय! "
त्यावर आतून आवाज आला ...."मला मेलीला मिळतो इतक्या लवकर वाचायला पेपर,काय ते तुम्हीच सांगा. "
अग काय ऐकतेस का ? कोठून सुरवात करू
हे बघ दिल्लीची घोषणा आहे ....येत्या पाच वर्षात सर्व खेड्यांना विद्युत पुरवठा करणार..पंतप्रधान
बर! डब्यात भाजी काय देवू. म्हणजे बर ! बातमीसाठी आणि भाजी काय देवू माझ्यासाठी.
पुढे ऐक, महाराष्ट्र टाईम्स ने म्हटलेय
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... ऐक प्राणांकित घोषणा ... महाराष्ट्र टाईम्स
ते ठीक आहे, तुम्हाला डब्यात किती पोळ्या भरू ते सांगा.
अग मी बोलतोय काय तुझे चाललेय काय ?
बर आता आपली पुण्याची बातमी ऐक .
चितळे बंधू त्यांच्या १०० शाखा काढणार आहेत. आणि त्याचे मुख्य शाखा आता चोवीस तास आणि सातहि दिवस उघडी ठेवणार.
अहो! तुमची तब्येत ठीक आहे न ! आणि बर नसेल तर कामावर जावूच नका. पण हे काय भलतेच वाचताय मगापासून ...
अग असे काय करतेस आज एक एप्रिल आणि मी आजचाच पेपर वाचतोय म्हटले ...

अस्स होय. आत्ता समजले आता पेपरवाले पण 'एप्रिल फूल' करतात वाटते.

Thursday, March 24, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग सहा

डायरीतील नोंद-- असलेली
गुरुवार -
श्री क्षेत्र महाबळेश्वर दर्शन
जीवनाचे बिल्बपत्र अर्पण करण्याची कल्पना
रम्य निसर्ग पंच नद्या सनातन जीवन दायिनी कृष्णा व आधुनिक विज्ञान वाहिनी कोयना
देवस्थान ब्रह्मारण्य अतिबळ, महाबळ लिंगा मध्ये नद्यांचे साक्षात्कार ---देवस्थान उत्त्पन्न ,सेवा विशेष शिसवी चंद्र राव मोरे नाग वीज ट्रस्टी
पायी प्रतापगडाकडे मधल्या वाटेने प्रयाण व वाड्याकडील पायथ्याशी रोशी मुक्काम
शुक्रवार -
वाड्यावरून मधल्या वाटेने प्रतापगडाकडे आईचे स्नान करून दर्शन फार दिवसांची इच्छा पूर्ण. आई तुझे लाडके लेकरू आज तुझ्या कडे आले आहे. शिवस्तुती संध्या काळी मधून अधून वीज परंतु चांदणे प्रचंड वाऱ्याच्या झोतात झोप गारठा तथापि शीण नाही चमकती चांदणी दर्शन शब्दांचा भास.
शनिवार + सोमवार
तटावर ३ तास निश्चल तटावरून उडी घेशील कां ? विचारले गेले हो म्हणालो पापणीही हलवायची नाही निविकल्प समाधी समाधीत रामकृष्ण हे नाव (अभेदानंद) एक साप मी इथेच बसतो तिकडे साप न येता बिळात.
जंगलात जीवनाचे उद्दिष्ट कोणते? विश्वाची नियतीशक्ती तिचा शोध बोध घेणे whether दक्षिणेश्वराकडे. माझा भूतांवर विश्वास नाही if दक्षिणेश्वर पथ्ये
३ दिवसांपेक्षा जास्त  मुक्काम नाही.
            वार स्नान व भवानी मातेच्या मंदिरात. राम कृष्ण विवेकानंद अभेदानंद असा जप गाभाऱ्यातून आवाज समग्र प्रतापगड दर्शन "क्ष" भेट
केंव्हा जाणार ? पृच्छा सातारच्या महाराजांची हि मिळकत असून माझ्यापासून कोणालाही त्रास नाही त्रासाचे उदाहरण न दाखविता धक्के मारून काढण्याची भाषा . केदारेश्वर दिवा नाही शिवाजी महाराज साक्षात शिवाचे अवतार साष्टांग नमस्कार दंडेलीच्या भाषेने राम कृष्ण पुरे पडतील काय? हा विचार. बंद दरवाजा नजीक बाहेरील बाजूस मुक्काम रात्रो गडावरून विचारपूस तेंव्हा तुम्ही ज्याला दुखः मानता त्याला आम्ही सुख मानतो असे उत्तर दिले आपुलकी बद्दल आभार मानले.
              वार प्रतापगडाकडून वाड्याकडे येताना बहुधा फकीर नावाचा एक जन भेटला. मुले विचारात नाहीत असे त्याचे म्हणणे अफझलखान कबरी जवळ यांनी( Possibly मुस्लीम ) नाव गाव न पुसता १ रु. भेट म्हणून दिला(अल्ला तेरा भला करो)आशीर्वाद. पुराणिक यांनी काळ जेवणखाणाबद्दल चौकशी केली होती आज त्यांच्या कडे वडा खाताना म्हाताऱ्याने पुन्हा प्रपंचात जावून पडण्याचा सल्ला दिला मीही आता सध्या निरुपयोगीच आहे तुम्हीही आपल्या मुलांबाळाकडून मिळेल ते संतोषाने खाऊन राहा. डोक्यात राख घालू नका .
I have said nothing त्यांचे आभार मानून देव करता करविता त्यांच्या बुद्धी प्रमाणे वागणार असे म्हणालो. वाड्यावरून चालत प्रयाण. वाटेत खेड्यात जेथे वाहतुकीची साधने पोचली नाहीत व माणुसकी शिल्लक आहे असा सुमारे ५० वर्षाचा म्हातारा भेटला. पृच्छा. देवासाठी घरदार सोडले हे त्यास खरे वाटले नाही. माणूस भाऊबंदांच्या भांडणाने घरदार सोडणार नाही पण (जीवाची सखी) बायको मुळे सोडेल. तेंव्हा बायकोस दोष द्यावयास जागा नाही असे म्हणालो त्याने जाताना भाकरीची (नाचणी) सोय केली. निरोगी दष्टपुष्ट गाय व तिचे वासरू ( as if काली रामकृष्ण ) यांचे दर्शन ...
One above can see all पुरावा Luxury bus पायी चार मैल चालेन असा अंदाज भगवंताने ७.५ मैल चालवले वस्ती कडे दिव्यांच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न परंतु मध्येच जंगलात मुक्काम.
                                                                                           .......... X ...... X ........X .......
डायरीतील नोंद-मला समजलेली – पहिल्या भाग एक ते भाग सहा मध्ये,बाबांचा प्रवास जरी कोथरूड ते सातारा मार्गे स्वारगेट इतकाच असला तरी मनाने ते त्यांचे बालपण फिरून आले.आई तिचा अकाली मृत्यू त्यांचे पुण्यास येणे,नातेवाईकांकडून आलेले अनुभव, चुलत आजोबांनी पुढील शिक्षणासाठी घरी ठेवून घेणे,थोरल्या बहिणी पासून ते पत्नी पर्यंत नातेसंबंधाने झालेली मानसिक आंदोलने असा त्यांचा पस्तीस वर्षांचा प्रवास नोंदला आहे. सातारा ते महाबळेश्वर ते कसे आलेत याची नोंद नाही.पण महाबळेश्वर आणि त्यापुढील कल्याण पर्यंतचा प्रवास,त्यांनी पायी केला आहे. तो काळ हा त्यांच्या मनस्थितीचा अंदाज केल्यास त्यांनी परिसर निसर्ग आणि माणसे यासह पुरेपूर अनुभवला पण नोंदी मात्र तुलनेने तटस्थपणे केल्या आहेत. तसेच डायरीतील प्रत्येक नोंद मुळात जशी आहे तशीच ठेवताना संपूर्ण सत्य सांगणे आणि अन्वयार्थ कुवतीनुसार काय वाटते ते सांगताना काढणे हेच तंत्र अखेरपर्यंत पाळावयाचे ठरवले आहे.
काळ १९७०/७१ चा.त्याकाळी महाराष्ट्राचा ग्रामीण परिसर तुलनेने अधिक वनांनी व्यापलेला होता. त्यामुळे तेंव्हा महाबळेश्वर व त्यापुढे रायगड जिल्ह्यातून त्यांनी केलेला प्रवास बहुतांशी पायी आहे.आणि नंतर कल्याण ते कोलकता हा रेल्वे प्रवास तोही विना तिकीट केला आहे.त्यावरून त्यांनी केलेल्या धाडसाची आपणास थोडीफार कल्पना येईल. आणि त्याच्या प्रवासाला मी धाडस या करिता म्हणतो आहे कारण त्यांचा महाबळेश्वर नंतर सुरु झालेला प्रवास पायी आहे. पण त्याच बरोबर तो चाळीस वर्षांपूर्वीचा आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तसेच घर सोडताना त्यांनी किती रक्कम बरोबर घेतली याची नोंद नसली तरी नव्वद ते शंभर रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याचेकडे असणे शक्यच नव्हते. पुढे जावून त्यांच्या जवळील रोकड रक्कमेचा झालेला उल्लेख मी ओघातच सांगेन म्हणजे आपणास त्यांच्या प्रवासाची महती लक्षात येईल.
खरे तर घर सोडण्याची मानसिक तयारी असणे आणि घरदार सोडल्याची परिस्थिती प्रत्यक्ष स्वीकारणे यातील अंतर भरून काढणे तसे खुपच अवघड काम आहे. कणखर मनाने निर्णय घेतलेला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे सुरवातीस मन दोलायमान झाल्याचे दिसून येते.त्यामुळे महाबळेश्वर मुक्कामी देव दर्शनानंतर महादेवाचे पिंडीवर बिल्ब पत्र वाहताना त्याच्या मनात सर्वस्व त्यागाची भावना उफाळून आली असावी असे वाटते. त्या सर्वच परिस्थितीचे वर्णन - 'जीवनाचे बिल्बपत्र अर्पण करण्याची कल्पना ' या एका वाक्यातून प्रतिबिंबित होताना दिसत आहे. येथून पुढील प्रवास हा पायी असल्याने त्यांनी दररोजचे अंतर कधी पंधरा तर कधी वीस किलोमीटर पर्यंत आक्रमले आहे.म्हणजेच दिवसातील आठ ते अकरा तास त्यांनी पायी चालण्यात खर्चले आहेत. महाबळेश्वर नंतर वाडा मार्गे त्यांनी प्रतापगडाकडे प्रयाण केले आहे. त्याचे करारी वागणे प्रेरणादायी गोष्टीची तीव्र ओढ यामुळे गड आणि परिसर याची त्यांना भुरळ पडल्याचे जाणवते. भवानी मातेचे दर्शन घेतल्यावर ते देवीचे दर्शन घेतले असे न म्हणता आईचे दर्शन असे लिहून ठेवतात. आणि प्रतापगड त्याचा इतिहास यापुढे नतमस्तक होताना ते स्वतः बरोबरच एक वेगळा संवाद साधताना दिसतात.तेथील निसर्ग व परिसर याच्याशी तद्रूप होताना त्यांनी किती एकाग्रता ठेवली हे त्यांच्या- 'तटावर ३ तास निश्चल तटावरून उडी घेशील कां ? विचारले गेले, “ हो म्हणालो”,पापणीही हलवायची नाही निविकल्प समाधी' या नोंदीतून जाणवते. प्रवासाचे सुरवातीस असलेली जीवन संपवण्याची कल्पना मागे पडून,आता कोणतेही धाडस करण्याची मनस्थिती या नोंदीतून जाणवते त्यामुळे तटस्थ बसल्यावर आलेल्या सापाचे देखील भय त्यांना वाटले नाही.
मात्र याच काळात विविध नमुन्याची,माणसे कशी पदोपदी भेटत होती.ते सर्व जण त्यांच्याशी कसे वागले याचा प्रत्यय या सुरवातीच्या नोंदीपासून दिसत आहे.त्यामुळे गडावरील देवळातील मुक्काम न आवडलेला कोणी,जेंव्हा धक्के मारून हाकलण्याची   भाषा करतो तेंव्हा हि जिगर किंवा अशी जिद्द जार परकीयांची आक्रमणे झाली तेंव्हा मराठी माणसांनी दाखवली असती तर इंग्रजांचा अंमल भारतावर झालाच नसता असे मला वाटले. कोणाकडून अनपेक्षित मदतीचा हात पुढे तर कोणाचा संसारात परत जा हा सल्ला. म्हणजे जणू चालती बोलती जीवनाची शाळाच त्यांच्या भोवती उघडली होती. आणि हर एक तऱ्हेचा शिक्षक त्यांना सल्ला देण्यासाठी पावलोपावली भेटत होता असेच मला वाटले. (क्रमशः)