Tuesday, February 22, 2011

काय घडते कशासाठी ?

फुल फुलते, गंधित होते,सुगंध त्याचा लुटण्यासाठी
भुंग्यांची मग होते धावपळ, त्यातला मध वेचण्यासाठी

नभातुनी सर बरसते, दाह धरतीचा शमवण्यासाठी
आमची नाहक धावपळ होते, मृदगंधाच्या वासासाठी

मीरा भजनी तल्लीन होते, शाम सुंदरा वरण्यासाठी
वेणूतुनी धून लहरते, बावऱ्या राधेस शाहरण्यासाठी

मीरा  आणि राधा वाहती, आपुले सर्वस्व जगदिशासाठी
कालचक्र पुढे सरकते, घाव जिव्हारी झेलण्यासाठी

Saturday, February 19, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग तीन

डायरीतील नोंद -- असलेली
अनासक्त योग पाण्यात राहून कमलपत्र लिप्त होत नाही, भाषा समजायला सोपी,पण आच्रायला अवघड. एरवी संथ असणाऱ्या सागरावर ६०-६० फुट उंचीच्या लाटा  उठाव्यात,त्या वादळग्रस्त मनस्थितीत नव्हे,तर सदाच समुद्र सपाटी पासूनची उंची मोजली जावयाची, त्या पृष्ठभागावरचा स्थिर बुद्धीचा,जीवनाची उलथापालथ घडवून आणणारा निर्णय अविवेकी, वादळातील स्थिर मनो वृत्तीचा नसून वादळाला हाक मारून अंगावर घेण्याचा.काही जणांना वाटणे आणि नाही तरी कोलंबसाचा बेभान साहसी पणा, पक्व मुरब्बी खलाशांच्या दृष्टीने. कदाचित मूर्खपणा,म्हणून मूल्यमापन होण्याची,सारी क्षणचित्रे नजरे समोरून सरकवत निर्णयाशी स्थिर होत,कारण हो अखेर स्वतःच घ्यावयाचा असतो.
भोवतालच्या साऱ्या पसाऱ्याची वाढ,जणू आपल्यालाच घुमारे फुटून झाली आहे हे माझे, मी,माझे, आप्त स्वजन कोणी नव्हेत व याहून हि मोठी निष्ठा असणे शक्य आहे अशी शिकवण ,श्रद्धा होती तरी तसा प्रसंग आचरून अनुभवणे म्हणजे "अपुले मरण पहिले म्या डोळा" आणि ती निष्ठा म्हणजे... माता,पिता,बंधु जीवांचा जिव्हाळा तू एक गोपाळा माता, तो मायापाश तिच्या मृत्यूनंतरही अमरत्वाने बांधू पाहणारा.पिता वृद्ध ज्याची काठी आपण व्हावयाचे ज्याची कावड आपण वाहवयाची त्यालाच श्रावणबाळाने पाणी पुरवण्यास सांगण्यासारखे बंधू जो उर्मिलेलाही प्रसंगी डावलून रामाच्या साथीचा जाणूनबुजून निर्णय घेण्यास स्वतः सिद्ध.
सौ. कुलवंताची कन्या,नाहीं भूलणे वैभवाला,अयोध्येची राणी लाडकी गेली वनवासाला,पती करता कोणतेही आग्निदिव्य करावयाला (सिद्ध) तयार,चिमणी पाखरे .... दोन पुत्र,एक कन्या जरा लाडावलेली आत्मज.
घे कुढार, चल उगार,घाव आता घाली चल , कुऱ्हाड आपली आपल्यावरच चालवायची आहे. उडी अंधारात घ्यावयाची आहे.नाही, आतला आवाज म्हणत होता तू सुखाच्या शोधार्थ निघालेला सिद्धार्थ आहेस . आता मागे फिरू नकोस.खरच, आयुष्यात मी सुखी आहे का? का असमाधानाची अतृप्त भावना माझा पाठलाग करते आहे .सारी पृथ्वी हिरवीगार सस्यशामाल आहे आणि माझ्या मनात समाधाना- बरोबर असमाधान तुडूंब भरून वाहत आहे.एका कोळियाने नाउमेद न होता , न खचता प्रपंच आकारावयास आणावयाचे नाना तऱ्हेने नाना यत्न केले होते. परंतु तेच,तेच ध्येय मात्र ठेवले नव्हते.complete detachment या प्रयोगात्मक अवस्थेने भारावून तिचा जबरदस्त  पगडा मनावर घेऊन हालचाल होत होती. या हालचालीत हरीवर हवाला अशी निर्भयता होती. व्यथितता मनाला स्पर्श करीत नव्हती आणि ३१ डिसेंबरचा पगार हातात घेऊन,उद्यापासून मी कामावर येणार नसल्याचे,मालकांना सूचित केले.त्यांनी कारण विचारले ? कारण काय सांगावयाचे ? अखेर राजीनाम्याचा पर्याय पुढे आला.
नोकरीवर हक्क ठेवण्याची कल्पना,दुरूनही मनात प्रवेश करू शकली नाही.स्वखुशीने राजीनामा,बंधमुक्त, पाशरहित याने प्रभावित होउन घराची वाट धरली. नोकरी करीत असता त्तुझ्या डोक्यावर काही बोजा होता? आता कसे? आसे विचारीतच घरी आलो.
स्वभाव तसा शांत, समजूतदार परंतु या मानस सरोवरातून,शीघ्रकोपित्वाचा मासा कसा अलगद उडी मारावा,याची कल्पना वर्षा ऋतू संपल्यावर,रंकाळा तुडूंब भरलेला असावा आणि कित्येक हंगामातही घीवाराच्या हाती न गवसलेली,छोटीशी मछली नकळत पुरेशी मोठी व्हावी आणि तिच्या संचारला तो तलावही अपुरा पडावा.तसे पहिले तर एकदा दोनदा तीनदा संधी देऊनही,सुधारणा घडली नाही तर अंतर्यामी शांत असूनही,जगावर सात्विक संतापाचा हक्क बजावण्याचा,अधिकार सोडावयाची तयारी नाही.कारण जगाचा अनुभव हि काही वेळा It is dangerous to be too good असा आलेला. प्रयोगाकरिता घर सोडावयाचे ठरले.परंतु ते कसे सोडावयाचे ? सुऱ्ह्दांचा निरोप घ्यावयाचा, परंतु कसा ? भरीत भर घरी पाहुणे आलेले. साऱ्यांशी व्यवहार कसे करावयाचे ?
Water tight compartments. सार, मन एकच परंतु एका भिंती पलीकडील हालचाल,दुसरीकडे कळता कामा नये. बेत अंमलात येण्यापूर्वी फुटला तर,सुभाष बाबू काबुलमार्गे जर्मनी जपानला जाणार कसे. आमच्याच कंपनी सरकारच्या सक्त नजरकैदेत,चौकी पहाऱ्यात आम्ही अडकून पडण्याची हुकमत. दुसऱ्यावर तो तारो व मारो,अशा विश्वासाने विसंबून राहण्याचा धोका जाणून बुजून पत्करण्याचा पत्नीचा स्वभाव.ती नसतानाच दूर जाण्याचा निर्णय अमलात आणावा, आणि म्हणतो ती वेळ जवळ येवून ठेपली.
डायरीतील नोंद-मला समजलेली --
आपल्या समाज रचनेत दुर्दैवाने,माणूस गरीब कि श्रीमंत,यावर त्याची यशस्विता मोजली जाते, पण त्याच्या कुटुंबाबाबत असणाऱ्या आपुलकीच्या भावना,या काही पैशात मोजल्या जात नाहीत. आणि म्हणूनच,दोन वेळचे जेवण हि सुद्धा जिथे कसरतच होती ते घर सोडताना,माझ्या बाबांची झालेली घालमेल,या नोंदीतून ठायी ठायी दिसते. आणि यामुळेच मनाची घालमेल नोंदवताना त्यांनी त्यांच्या निर्णयाचे परिणाम,ज्याज्या नाते संबंधांवर होणार होते,त्या नात्याची निरीक्षणे सहजच नोंदवली आहेत.त्यामुळेच,हि नाती नोंदविताना खरोखरच त्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष पटते.
त्यामुळे घर सोडण्याचा निर्णय मनाशी झाला तरी,त्याचे परिणाम थेट ज्या नात्यांवर होण्याची शक्यता आहे,त्याबाबत लिहताना त्यांनी, त्यांच्या वाचनातील आठवणी व संत साहित्याचा वापर केल्याचे दिसून येते. आणि म्हणूनच ते म्हणतात -"अपुले मरण पहिले म्या डोळा" आणि ती निष्ठा म्हणजे... माता,पिता,बंधु जीवांचा जिव्हाळा, तू एक गोपाळा.
आणि पुढे जावून त्यांची आई, जी त्यांच्या लहानपणीच गेली होती,तिच्या आठवणीने हळवे होत,ते म्हणतात,"तिचा मायपाश अमरत्वाने बांधु पाहणारा आहे." त्यांच्या नोंदीत असणारे,छोटे छोटे संदर्भ इतके अर्थपूर्ण आणि अंतर्मुख करणारे आहेत कि, खरोखर त्यावरून घर सोडून संसाराकडे पाठ फिरवून चालू लागणे म्हणजे,जगाच्या दृष्टीने तो जरी पळपुटेपणा वाटत असला असला तरी, तो निर्णय इतका अविवेकी नक्कीच नव्हता. आणि त्यामुळेच,त्यांना वडिलांना आधार देण्याचे काळात दूर जाणे,लक्ष्मणा सारख्या भावाची आठवण येणे,पत्नी व मुले यांच्या अस्तित्वानेच व्याकूळ होणे,याच बरोबर आता मागे फिरणे नाही, हा मनाचा निग्रह देखील त्यांनी तितक्याच ठामपणे नोंदवलेला दिसतो. मनाची हि अवस्था स्पष्ट करताना,त्यांनी स्वतःची तुलना नकळत सिद्धार्थ आणि सुभाष बाबू या व्यक्तीमत्वांशी केली आहे. मला पूर्ण जाणीव आहे कि सिद्धार्थ आणि सुभाष बाबू हे किती थोर आहेत,त्यांचे कार्य किती मोठे आहे,पण म्हणून माझ्या बाबांच्या मनातत्याची आठवण येण्याने, मनाच्या घालमेलीची उंची समजते.
सरकारी नोकरी असून ती न टिकणे, नवे शहर,नवी नोकरी,यातून मार्ग शोधत संसाराची घडी बसवणे,हे सुरु असताना,पुन्हा एकदा नवी नोकरी सोडून देण्याचा,निर्णय घेताना देखील त्यांनी स्वतःचा,निर्णय ठाम ठेवला होता असे दिसून येते. आणि सर्वात मोठा अडसर म्हणजे,सर्वात नाजूक असे पती पत्नीचे नाते. त्याची जाणीव असल्याने प्रत्यक्ष घराबाहेर पडताना,त्यांनी माझी आई घरी नसण्याची वेळ निवडली. एकूणच हा सर्व भाग वाचताना वर वर,शांतपणाने घर सोडून चाललेले,माझे बाबा,किती म्हणून अस्वस्थ होते याची साक्ष ठायी ठायी दिसून येते. (क्रमशः)

Friday, February 11, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग दोन

आज तुमच्या समोर माझ्या बाबांची डायरी ठेवताना त्यांच्या हस्तलिखित डायरीतील शब्द रचना जरासुद्धा बदललेली नाही,त्यामुळे त्यात काही ठिकाणी कवितेच्या ओळी, काही ठिकाणी इंग्लिश वाक्ये आलेली आहेत. यापुढील भागात "डायरीतील नोंद- असलेली" म्हणजे माझ्या बाबांची मुळ डायरी आहे. तर या डायरीच्या वाचनातून ते मला कसे वाटले किंवा कसे उगडत गेले त्याविषयी माझ्या भावना म्हणजे "डायरीतील नोंद-मला समजलेली" हा भाग आहे.
डायरीतील नोंद-- असलेली-

कुण्या एका कलंदराची भ्रमण गाथा.
पुणे गाठले ....
सुमारे ३६ वर्षापूर्वी या पुण्यनगरीत पडलेले जाणतेपणाचे पहिले पाऊल ...
ग्रीष्म ऋतू चंड प्रतापी रविराजाच्या सहस्त्र सहस्त्र किरणांनी पृथ्वी भाजून निघत होती.अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. घशाला तहनेचा शोष जाणवत होता.आणि माझ्या आसऱ्याकरिता मी व माझे वडील तथाकथित सज्जनांचे उंबऱ्या मागून उंबरे झिजवत होतो. कोणी नावाचेच "महाजन" होते.उंची आदर सत्काराची सवय असलेल्या माझ्या वडिलांकडे मी पाय भाजत असतानाही रोखून पाहत होतो.कारण त्यातील उंची कमी झाली होती.त्याचा परिस्थितीमुळे आलेला अगतिकपणा, या कोवळ्या अंकुराचे भवितव्य काय? या व्यथेने आलेली व्याकुळता, दारिद्र्यात मरण बरे व दारिद्र्यता खोटी, म्हणतच फिरणारा चारुदत्त तर काही ठिकाणी नाकारल्या जाणाऱ्या वधूच्या भावनेशी समरस होऊन अधीर उत्सुकपणाचा शेवट जाणून घेणेच नको.आणि आता पेटत्या भूकेनेही थैमान घातले होते.
अवेळी आलेल्यांनाही आमच्या आईने रांधून वाढले होते,परंतु असे सज्जन जेवायचे वेळीही जेवून जा म्हणावयास तयार नसलेले. कवडी कफल्लक निष्कांचनाला आता हो म्हटले तर न जाणो हि ब्याद आपल्याला कायमच चिकटायची या गृहिणीच्या व्यवहारी सल्ल्याची
पकड बसलेले ते महाभाग, व खमंग पदार्थांचा मध्यान्हीला सुवास दरवळत असताही अभूक्तपणे "येतो आता" म्हणणारे व तोंड देखले या या म्हणणारे यजमान यांचा निरोप आमची पावले ज्या घरच्या आतीथ्याने केवळ त्याच दिवशी नव्हे तर जीवनात कायमची स्थिरावली त्या घरी मी आता पुणे सोडताना जाऊ कि नको ? हे घर माझ्या चुलत चुलत चुलत्यांचे. इथे भर दुपारी बारा वाजता व रात्री बेरात्री हि जाण्यास मला प्रत्यवाय नव्हता. कारण इथेच माझे लालन पालन पोषण झालेले.चुली कोसळून पडल्या होत्या आणि एकतेचे अकृत्रिम बंध निर्माण झाले असताही आज मी या घरी जाणार नव्हतो. उदास असता मुक्त्तपणे खळाळून हास्याचा निर्झर वाहवा अशी जादू, वेदनांवर फुंकर घालण्याची शक्ती असलेले हे घर ,त्यातील चालते बोलते घराला घरपण देणारे यांचा मी आज मूकपणेच निरोप घेणार होतो व घेतलाही.बस स्वारगेटकडे याच घरावरून पुढे गेली आणि पुढे साताऱ्याच्या वाटेला लागलीही. पार्वती नजरेआड झाली आणि अशा तऱ्हेने जल स्थळ काष्ठ पाहन आदी तदंगभूत वस्तू सुद्धा मी पुण्याचा निरोप घेतला. जाताना एक मोठ्या अक्षरातली जाहिरात Lead असा संदेश देत होती. त्या आशय गर्भ शब्दांनी मनाची पकड घेतली आणि अंतर्मुख झालो. मी,माझे वडील, आजोबा पणजोबाजा आणखी किती मागे जाता येईल तितका जा. शिवाजी,चंद्रगुप्त, कृष्ण राम काळाच्या विशाल उदरातले आठवणारे टप्पे. ऋषीचे कुळ आणि नदीचे मुळ . तुझे गोत्र वसिष्ठ प्रवर तीन पण कोणते माहित नाही. तुझी परंपरा कुठे भिडते आहे, आहे माहित? रामगुरु वासिष्ठापर्यंत आणि मग राजर्षी आणि ब्रम्हर्षी यांचा झगडा. वसिष्ठ विश्वामित्र असा थोर परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी आहे का? पात्रते शिवाय नेतृत्व करणारे आजचे पुढारी ज्यांना नक्की कुठे जावयाचे आहे ते हे त्यांचे त्यानंच माहित नाही त्यात आणि तुझ्यात काही फरक आहे का ?
डायरीतील नोंद-मला समजलेली-
वरील नोंदीने ज्या रोजनिशीची सुरवात झाली आहे ती रोजनिशी माझ्या बाबांनी लिहिली आहे सन १९७१ च्या वर्षारंभी. सन १९६८ मध्ये नोकरीवर आरिष्ट, कोल्हापुरातील हलाखीत जेंव्हा तीन मुले व पत्नी यांची रोजची पोटाची खळगी कशी भरावी या प्रश्नांनी मन उद्विग्न तेंव्हा पर्याय म्हणून पुण्यास मुक्काम हलवलेला, पुढील वर्षभरात कुटुंब स्वास्थ्याची कोणतीही निशाणी समोर दिसत नाही, त्यावेळी माझ्या बाबांच्या मनाने अचानक परमार्थाकडे ओढ घेतली. राम कृष्ण परमहंस हाच त्यांचा जगण्याचा मार्ग ठरला. कोथरूडहून डेक्कन पर्यंत येण्यासाठी खिशात पैसे नसताना त्यांचा ' देवाचा शोध' घेण्याचा निश्चित ध्येयाचा पण अनिश्चित मार्गाने जाण्याचा प्रवास सुरु झाला. आणि या प्रवासाची सुरवात करताना प्रथम त्यांच्या मनाने मागे जावून ३५ वर्षापूर्वीचा पुण्यातील प्रथम दिवसापासूनचा प्रवास केला.
माझ्या वडिलांना त्यांच्या आईचे छत्र लहानपणीच गमवावे लागले. माझ्या आजोबांचा परंपरागत सराफीचा व्यवसाय खरे तर माझे आजोबा हे प्रतिथ यश रत्नपारखी. चांगले भविष्याचे जाणकार. त्यामुळे व्यवसाय भरभराटीस आलेला. पण रत्नांची पारख करणारे डोळे जवळची माणसे ओळखण्यात निरुपयोगी ठरले भागीदार गोत्यात आणेल हे स्वतःचे भविष्य ते पाहू शकले नाहीत. व्यवसाय आणि घरदार देशोधडीला लागले. पदरात चार मुले,पत्नीने नैराश्याच्या झटक्यात मृत्यूला आपलेसे केलेले.
या पार्श्वभूमीवर अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी माझे आजोबा पुण्यातील नातेवाईकांचे उंबरे झिजवत होते. पण पदरी येत होता तो अनुभव म्हणजे गदिमांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ... लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई .. असा होता आणि त्यांचा उल्लेखच प्रथमच्या नोंदीत आढळतो. पण अशी कटू आठवण देणारे अनुभव असूनही त्यांनी फक्त त्याच आठवणी जपल्यात असेहि नाही, तर त्यावेळी आसरा देणाऱ्या घराबाबतची त्यांची जाण देखील तितकीच भावूक असल्याचे दिसते.
फक्त संदर्भासाठी ते घर ' चुलत चुलत चुलत्यांचे ' पण त्याच्या गतस्मृतींसाठी ते मायेची शाल पांघरणारे सख्खेच घर होते. आणि अशी उदारता माझ्या ज्या आजोबांच्या घराने दाखवली ते घर म्हणजे गणित तज्ञ प्रा. नी. वा. किंकर यांचे लिमयेवाडी, सदाशिव पेठ पुणे.येथील पेरुगेट भावे हायस्कूलच्या पाठीमागचे घर.जे माझ्या बाबांच्या पाठीशी गडकोट किल्याप्रमाणे उभे राहिले.

स्वतःची दोन मुले व एक मुलगी यात आणखी एका मुलाची भर पडली आहे असे अगदी सहजतेने मानून त्यांनी माझ्या वडिलांना घरात आसरा दिला,खरे तर आसरा दिला असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल कारण आपल्याच मुलातील एक समजून त्यांनी वडिलांना सामावून घेतले. माझे हे चुलत आजोबा हे पेरुगेट भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक. त्यामुळेच की काय पण सतत मुलांच्यात राहून आतून एक बाल्यच त्यांनी जपले असावे आणि म्हणूनच घरात नव्याने आलेला एक मुलगा त्यांनी सहजतेने ठेवून घेतला. त्याची निरागसता जपली. वडिलांना फक्त ठेवून घेण्याची जबाबदारी त्यांनी पार पडली असे नाही तर त्यांना आधार,संस्कार आणि आकार दिला.
ज्या भावंडात राहून माझ्या वडिलांचे बालपण बहरले त्या भावंडांमध्ये निर्माण झालेली आपुलकी आमच्या पिढीने देखील तितक्याच सहजतेने अनुभवली. वडिलांनी घर सोडून देवदर्शनाच्या ओढीने प्रयाण केल्यावर त्यांच्या शोधासाठी केलेली धडपड असो किंवा माझ्या वडिलांचे अखेरचे आजारपण असो किंवा त्यांच्या मृत्युनंतर दिलेला मदतीचा हात असो.या घराची सावली कधीच आकसली नाही याचे कारण म्हणजे त्या आजोबांचे संस्कार आणि आमचे भाग्य होय. मला आठवतय हे माझे आजोबा श्री. नीलकंठ वासुदेव किंकर उर्फ नी. वा. किंकर प्रसिद्ध गणित तज्ञ म्हणून पुण्यात नामवंत होते पण आम्हाला ते आमच्या घरचे वडिलधारे म्हणूनच माहित. शाळेमध्ये धोतर ,काळा कोट डोक्यावर काळी गोल टोपी आणि खांद्यावर उपरणे या वेशात शाळेत प्रवेश करते झाले कि विद्यार्थ्यांसाठी दरारा व सहकाऱ्यांसाठी आधार निर्माण होत असे. पेरुगेट भावे हायस्कूल या नामवंत शाळेसाठी त्यांनी मुख्याधापक पद सांभाळून शाळेचे नाव आणि परंपरा नक्कीच उज्वल केली आणि त्याचा आम्हाला आज हि सार्थ अभिमान आहे. आणि यामुळेच स्वारगेटकडे बस जाताना बसने घर ओलांडले आणि माझ्या वडिलांच्या मनात त्यांच्या घर सोडून जाण्याविषयी निर्माण झालेल्या वादळाची चाहूल त्या डायरीत उमटली.पुढे जावून ते लिहतात ... (क्रमशः)

Wednesday, February 9, 2011

नजरेत आली चांदणी....

पडलो होतो अंगणी
नजरेत आली चांदणी

करून डोळे किलकिले
मला तिने बघितले

स्वतःशीच कुजबुजत,
मला तिने विचारले
या मध्यान्ह रातीला
कोण आहे साथीला?

दचकून तिच्या प्रश्नाने,
मीच मला सावरले,
मग म्हणालो, तिला

गूढ मनीच्या आभाळी
एक चांदणी लपलीय
इतकावेळ लुकलुकून
आत्ताच ती झोपलीय

तर ती म्हणाली...नको करूस हालचाल आणि आवाज श्वासाचा
तिला भेटलाय राजकुमार आत्ताच तिच्या स्वप्नांचा

पडून राहा असाच झोप येईल, डोळ्यात
हसू तिचे ऐकू येईल,गालावरच्या खळ्यात

निरोप तिचा ऐकून मी स्वप्नी सुखावलो
अन जाग येताच तिच्या आठवणीने दुखावलो...



.

Friday, February 4, 2011

शांत तळ्याकाठी....

शांत तळ्याकाठी तो एकटाच बसलेला
मनाचा कोरडेपणा चेहऱ्यावर उतरलेला
आभाळाचा करडेपणा तळ्यात उतरलेला
निशब्द परिसरात एकांत होता गढुळलेला

शांत तळ्यात त्याने एक खडा टाकला
वलायांकित लाटांचा थरार त्यालाच येवून भिडला
आठवणींचे मनतरंग दूरवर सरकले
तळ्यातील जलतरंग अस्मानी भिडले

काय मिळाले त्याला तळ्याला त्या जखमी करून
आपलीच खपली आपल्याच हाताने पुन्हा ओचकरून
जर आला होता घरापासून दूर सारे विसरण्यासाठी
तर का टाकला खडा आठवणींचा तळ गाठण्यासाठी



.

Thursday, February 3, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून-भाग एक.

खरे तर लेखाचे नाव असे का? असा आपणास नक्कीच प्रश्न पडला असेल. आणि खरेच आहे. कारण माझे बाबा त्यांना आम्ही 'अण्णा' म्हणत असू, हे मी दहावीत असतानाच गेले. जेंव्हा मी फक्त १४  वर्षांचा होतो. आणि त्यापूर्वी पाच वर्षे घरापासून दूरच राहत होतो. त्यामुळे बाबा म्हणजे आमचे अण्णा माझ्यापुरते आठवणींच्या धुक्यात दड्लेलेच ठरले. पुढे मला त्यांची एक वेगळीच 'रोजनिशी' अचानक गवसली आणि तिच्या वाचनातून आणि माझ्या आठवणीतून मी पुनश्च माझ्या बाबांचाच कसा झालो त्याची हि गोष्ट आणि म्हणूनच मी म्हटले आहे - माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून.
भाग एक ........
नाते संबंध तोडू म्हटले तरी तुटत नाहीत याचा साक्षात्कार मला पहिल्यांदा झाला तो त्यांच्या मृत्यू समयी. आता त्या घटनेला ३७ वर्षाहून अधिक काळ उलटला आहे पण माझ्या वडिलांच्या मृत्यूची वेळ आणि त्या क्षणाची माझी मनस्थिती मी आजही विसरू शकत नाही आणि असे का? याला शास्त्रीय आधारावर द्यायला माझ्याकडे आजही उत्तर नाही. त्यावेळी मी सांगली जिल्ह्यातील उरुण-इस्लामपूर या गावी माझ्या आजोळी मामाकडे राहून शिकत होतो. तर माझे इतर सर्व कुटुंबीय पुणे येथे राहत होते. 'विद्येचे माहेरघर' लक्ष्मीने पाठ फिरवल्यामुळे मला दूरच होते. माझे त्यावेळी पुण्यास येणे जाणे हे मे महिना आणि दिवाळी या सुट्ट्या पुरतेच असे. तो दिवस होता रविवार दि. ८ जुलै १९७३ . कांदे नवमी. मागील वर्षी पावसाने बऱ्यापैकी पाठ फिरवली होती त्याची भरपाई म्हणुन कि काय गेले दोन तीन दिवस तो कोसळतच होता सकाळी मामाच्या शेतावर व गावी जायचे म्हणून सकाळी ' बहे ' येथे गेलो होतो पण इस्लामपूर बहे यांना जोडणारा ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. मग आम्ही गावात न जाता फक्त शेतात जावून यायचे ठरवले. वाटेत घरी परतणारे शेतकरी आम्हाला पाहून "पावन आता कसले शेतात जाता?" पावसाने निवळी काढलीय. म्हणजे जेंव्हा अति पावसाने चिखलमय मातीच्यावर देखील स्वच्छ पाणी वाहू लागते तेंव्हा त्यास निवळी निघणे म्हणतात. त्यामुळे न गाव न शेत आमची वरात तिथूनच परत फिरली. घरी येण्यास चार वाजून गेले.खूप दमणूक झाली होती. घरी येवून पाहतो तर आजीची लगबग सुरु होती सायंकाळच्या जेवणाची तयारी जोरात सुरु होती. मामाचे एकदोन मित्र जेवायला येणार होते आणि कांद्याचे पिठले ताजी भाकरी, कांदा भजी असा चमचमीत बेत होता.मी सरळ झोपून गेलो. हे इतके सविस्तर सांगण्यामागे खरे कारण हे कि जेंव्हा इस्लामपुरात हे असे वातावरण होते तेंव्हा माझे बाबा -अण्णा ताराचंद हॉस्पिटल पुणे येथे पोटदुखीचा त्रास होतोय म्हणून गेले तीन दिवस झोपून होते त्यांच्या काकूने आज कांदे नवमी आहे आणि आता तब्येतीला उतार पडतो आहे म्हणून घरचे खाणे मिळावे म्हणून डबा करून आणलो होता वेळ संध्याकाळची सूर्य मावळती कडे झुकला आणि अचानक आमच्या कुटुंबावरचा सूर्य देखील कायमचा मावळला काकूने आणलेले जेवण न घेताच बाबा दूरच्या प्रवासाला निघून गेले. हि घटना घडली ती वेळ होती सायंकाळची ७.४० ची तेंव्हा मी त्यांच्या पासून दूर १२० मैलावर मामाकडे. बरे नुकताच दहावीत प्रवेश घेतलेला म्हणजे धड न लहान धड न मोठा असा अर्धवट वयातील त्या मुले बाबांच्या आजारपणाची माहिती कोणी कळवली नव्हती. आजीने मला ७.१५ वाजता उठवून दिवसभर बाहेर होतास जेवण खाण झालेले नाही पटकन जेवायला चल असे म्हणून पाने वाढली मामांचे मित्र पण आले . पहिली वाढ पानात पडली तो पर्यंत ७.४० झाले होते मी पहिला घास हातात घेतला आणि दिवसभर काही खाणे झालेले नसून देखील अचानक अन्नावरची वासना उडाली एक घास देखील न खाता मी पानावरून उठलो. आजी रागावली, मामा माझ्या हट्टाकडे दुर्लक्ष करून मित्रांबरोबर जेवला. पण मी मात्र अस्वस्थ मनस्थितीत ती रात्र तळमळत काढली . त्या सर्व अस्वस्थ पणाची कारणे पुढे चार दिवसांनी जेंव्हा त्या दुर्दैवी घटनेचे पत्र येवून धडकले तेंव्हा उलगडली. आज इतकी वर्षे उलटल्यावर काही प्रश्न आज हि अनुत्तरीत राहतात ते म्हणजे वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवून तीन दिवस झाले तरी त्या बाबत कोणीच मला का कळवले नाही? वय लहान म्हणून नाही कळवले हे आजारपणा पुरते ठीक, पण जेंव्हा मृत्यू झाला तेंव्हा अखेरच्या दर्शनासाठी तरी मुलास आणावे असे का नाही कोणास वाटले? १२० मैल हे खरच कधीच न संपणारे अंतर का ठरले? आणि जर मी नाकळता होता तर दिवसभर काही खाल्ले नसतांना रोजच्या पेक्षा वेगळा आणि साग्र संगीत स्वयंपाक असताना एक हि घास न खाता कोणत्या शक्तीने मला पानावरून उठवले? उत्तरे कधीच मिळाली नाहीत पण कांदे नवमी आली कि कांदे चिरताना आजही डोळे भरून येतात ते कांद्यामुळे नाही, तर बाबांच्या अखेरच्या दर्शनाचे योग नव्हते या दुर्भाग्यामुळे.
सन १९६८/६९ च्या दरम्यान वडिलाची नोकरी गेली आणि आमच्या घराची अवस्था व्यंकटेश स्तोत्रातील 'अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा ' यासारखी झाली. पण मला आठवतेय कि परिस्थीची खंत न बाळगता कष्टाने पण स्वाभिमानाने जगावे याचा पहिला धडा त्यांनी कृतीतून आम्हाला दिला. कोल्हापूर आणि रंकाळा यांचे नाते अतूट आहे. पण आमच्या आठवणीतील रंकाळा हा जेंव्हा शालिनी पॅलेस हे हॉटेल झाले नव्हते आणि रंकाळ्याचा काठ गावाबाहेर मोकळी हवा खाण्यासाठी फिरावयास जाण्याचे ठिकाण होते तो काळ. त्यावेळी 'रंकाळा चौपाटी' अस्तित्वात आलेली नव्हती पण हे ठिकाण एक दिवस नक्कीच चौपाटी होणार याची मनात खात्री होती बाबांच्या मनात पक्की खात्री होती. कारण तेथे फिरावयास येणाऱ्या लोकांना चिवडा पाकीट विकण्याचा पहिला प्रयोग माहे मे १९६८ मध्ये माझ्या बाबांनी केला. आणि त्या अर्थार्जनाचे प्रयोगास मी सक्रीय मदत केल्याचे मला आजही आठवते. इतकेच काय पण रु३.५०चे चिवडा सामान पोहे ,शेगदाणे ,खोबरे, तेल व छोट्या प्लास्टिक पिशव्या आणयचे मग आई त्याचा चिवडा बनवून देत असे. तर बाबा त्याची ५० पाकिटे तयार करीत असत. मग ती पाकिटे घेवून सायंकाळी ४.००ते ७.३० या वेळेत ती मी रंकाळ्यावर फिरावयास येणाऱ्या मंडळींना ती विकत असे. पन्नासावे पाकीट विकले गेले कि कोण आनंद होत असे मग ते ५.०० रुपये घेवून घरी गेले कि, त्यातून रु.३.५०चे चिवडा सामान व रु. १.५०चे किराणा सामान आणून त्या दिवशीची चूल पेटत असे.पण हे करताना कधी लाज बाळगण्याचे कारण नाही, आपण मिळवत आहे तो पैसा कष्ट करून मिळवत आहोत हे बाबांचे सांगणे असे. मला आठवते आहे कि, प्रथम हा धाडसी वाटलेला बाबांचा विचार पुढे किमान सहा महिने घर चालवण्यास उपयोगी ठरला. प्रथम हा प्रयोग करताना परिचित नातेवाईक यांनी केलेली थट्टा आजही आठवते, पण आज “ रंकाळा चौपाटी”चे बदलते रूप पहिले तर मला मात्र बाबांची दूर दृष्टीच जाणवते. या चिवडा विक्रीतील एक किस्सा मला आजही आठवतो माझा थोरला भाऊ शेखर यास हा उद्योग फारसा आवडत नसे त्यामुळे तो स्वतः चिवडा विक्रीस जाण्यास राजी नसे. एके दिवशी बाबांनी थोडेसे सक्त्तीनेच माझ्या ऐवजी भावास चिवडा विक्रीस पाठवले तर तो गेला पण तासाभरातच परत आला आल्यावर घरी सर्वच आश्चर्य चकित झाले व त्यास विचारले अरे वा तू तर लवकर काम संपवलेस किती पाकिटे संपली? तर तो म्हणाला एक! आणि त्याचे पैसे कुठायत विचारल्यावर तो म्हणाला एक पाकीट पेरुवाल्यास दिले आणि आणि त्याचे कडून पेरू घेतला आणि तो खाल्ला. त्यानंतर बाबांनी कधी त्याला चिवडा विक्रीस पाठवले नाही.
खरे तर मला अण्णांचा सहवास तसा अल्पच लाभला. मी दहावीत गेलो आणि अण्णा गेले म्हणजे मी जेम तेम १४ वर्षांचा होतो आणि त्या चवदा वर्षांपैकी अखेरची पाच वर्षे मी त्यांचे पासून दूर मामाकडेच काढली. कारण मी चवथीपर्यंत घरीच असल्याने पहिली, भगवंताचे मंदिर- बार्शी, दुसरी ते चौथी, भक्ती सेवा विद्यापीठ - कोल्हापूर या ठिकाणी शिकलो.आणि त्यामुळेच माझ्या वडिलांबाबतच्या आठवणी तश्या थोड्या धूसरच आहेत पण त्या आठवणींचा चलचित्रपट आणि माझ्या मध्ये एक अदृश्य असा धुक्याचा पडदा आहे. कधी कधी एखादीच आठवणींची झुळूक येते आणि तो पडदा क्षणभरासाठी दूर होतो आणि अण्णा येवून समोर उभे राहिलेत असे वाटून तो काळ मी आजही पुन्हा एकदा तसाच अनुभवतो. त्यामुळे जगाने जसे माझ्या बाबांना कधी ओळखले नाही तसे, जगास असे वाटते कि आम्हा मुलांना आमचे बाबा आठवतच नाहीत. पण त्याचा दोष मी माझ्या बाबांच्या आसपास वावरणाऱ्या परिचितांना देणार नाही कारण त्यांनी पहिले ते त्यांचे बाह्य रूप. अर्थात जवळचे नातेवाईक सुद्धा बाबांच्या वागणुकीवरून त्यांना तापट , हट्टी, दुराग्रही, हेकेखोर, तऱ्हेवाईक इतकेच काय पण  माथेफिरू, वेडसर,  मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावून मोकळे होत. या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले . जसा जसा काळ मागे पडू लागला तसे तसे ज्या माझ्या वडिलांना इतकी विशेषणे न मागताच मिळाली ते माझे बाबा खरेच कसे होते याचा मला वरचेवर प्रश्न पडू लागला. कारण माझ्या आठवणीतील बाबा हे त्यांना मिळालेल्या कोणत्याच विशेषणात बसत नाहीत असा माझा पक्का समज होता पण न कळते वय आणि मन मोकळे करावे असे कोणी मैत्र नाही त्यामुळे माझे बाबा हे फक्त माझेच राहिले. त्यांचे मला भावलेले रूप इतके दिवस माझ्यापाशीच राहिले. पुढे मी माझी पुण्यातील नोकरी संपवून चाकोरीतून बाहेर पडण्याचे ठरवले तेंव्हा मला बँकेतील मनेजर पद, भविष्यात बढती, पत्नी उच्च विद्या विभूषित, स्वतःचे चार खोल्यांचे अपार्टमेंट असताना हे स्थैर्य सोडून अनोळखी ठिकाणी जावून पुन्हा एकदा नवा डाव कशासाठी मांडायचा? असा प्रश्न केला ? फक्त हाच प्रश्न विचारून जर माझे हितचिंतक थांबले असते तरी ठीक होते. पण,का तू हि वडिलांसारखा वेडेपणा करायचे नक्की केले आहेस ? असा प्रश्न केला. आणि या प्रश्नाने मला खरोखर अंतर्मुख केले आणि ते मी वडिलांसारखा वेडेपणा करतोय का ? या विचारलेल्या प्रश्ना मुळे नाही तर माझे वडील या जगाला समजलेच नाहीत या दुःखाने. आणि मी ठरवले कि मला समजलेले माझे बाबा या जगासमोर उलगडून दाखवलेच पाहिजेत. आणि या माझ्या अन्तः प्रेरणेला जणू ईश्वरानेच साद दिली.
 माझ्या पीएच. डी. प्रबंधाचे काम अंतिम टप्यात आले होते प्रबंध पूर्तीतील अखेरचा 'सारांश ' प्रकरण अंतिम टप्यात पोहचले होते. पण माझे गाईड डॉ. कमलाकर देव त्याच्या अंतिम मसुद्याबाबत पूर्णतः समाधानी नव्हते. एक जुना संदर्भ तपासून देण्याबाबत ते आग्रही होते. मी माझे त्या बाबतचे पूर्वीचे काम शोधात होतो पण संदर्भ मिळत नव्हता मग एकदा सर्वच कागदपत्रांचा पसारा काढून तो संदर्भ मिळवायचाच असा निश्चय केला आणि सर्व पसारा काढला आणि तेंव्हा मला प्रबंधासाठीचा आवश्यक संदर्भ तर मिळालाच पण त्याच बरोबर हाती लागली बाबांची रोजनिशी आणि जेंव्हा ती रोजनिशी मी वाचावयास सुरवात केली तेंव्हा तिने मला पुन्हा एकदा बाबांची भेट घडवून आणली आणि ती भेट फक्त त्यांच्या आठवणी सांगणारी नव्हती तर त्या भेटीतून मला माझे बाबा फक्त भेटले नव्हे तर सापडले . आणि म्हणूनच मी आता तुमच्यासमोर घेवून आलो आहे माझ्या बाबांची रोजनिशी. आता प्रथम मी तुम्हाला सांगतो कि हि रोजनिशी कशी आहे तर ती आहे एका मानसिक आंदोलनाची नोंद. त्यात आहे प्रवास वर्णन, त्यात आहे जीवनसंघर्ष, त्यात आहे नाते संबंधावरील भाष्य, त्यात आहे भक्ती आणि विरक्तीची कथा. नोंदींची सुरवात आहे माहे जानेवारी १९७१ पासून त्यात बरीचशी सलगता आहे ती मार्च १९७१ पर्यंत. पुढे जवळजवळ मे १९७३ पर्यंतच्या नोंदी त्यात आहेत त्याही तुटक तुटक. पण तरीही हि रोजनिशी वाचताना मला माझे बाबा माझ्याशी बोलतायत असेच वाटते. कारण त्यातील नोंदी ह्या फक्त घटनांच्या नोंदी नसून बरेचदा घटना आणि त्यावरील भाष्य अशा त्या नोंदी आहेत. बर हि रोजनिशी कधी सलग, कधी तुटक,अशी असली तरी तिची सुरवात आहे ती त्यांच्या पुर्वीच्या स्मृतींची/ आठवणींची धांडोळा घेणारी धडपड.खरे  तर  ती रोजनिशी जशी आहे तशी आपणासमोर मांडली तर? असाही विचार माझ्या मनात आला. पण वयाच्या चौदा वर्ष पर्यंत मला माहित असलेले माझे बाबा व माझ्या बाबांचे माझ्या भोवतालच्या समाजाने माझ्यासमोर उभे केलेले चित्र यातील अंतर खऱ्या अर्था ने दूर झाले आहे ते जेंव्हा रोजनिशीतून माझ्याशी बोललेले माझे बाबा मला समजू शकले तेंव्हा. आणि म्हणून शेवटी मी बाबांची रोजनिशी 'जशी आहे तशी' पण सलग न  मांडता, रोजनिशीतील भाग व माझी भावना, माझे मत, माझा अनुभव यांची सांगड घालत त्या रोजनिशीचे वाचन आपणा समोर करावे. आता हा आगळा वेगळा प्रयोग आपणास रुचेल अशी मला आशा आहे.( क्रमशः)