Monday, April 27, 2020

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो

खरतर पियानो आणि हिंदी सिनेमा यांचे नाते बरेच जुने . विशेषतः ती हैसियत का काय जेंव्हा दाखवणे अतिशय जरुरीचे असते तेंव्हा एकवेळ नायक बी ए पास नसला तरी चालेल किंवा त्याच्या साठी गाजर का हलवा पण नको पण श्रीमंती थाटाचे प्रतीक म्हणून पियानो हवाच.

तसा याही चित्रपटात पियानो आहे पण तो खानदानी घरात  नाही तर आहे क्लब मध्ये आणि त्याचा वापर नायक किंवा नायिका यांच्या पैकी कोणी नाही तर चक्क सहनायिकेने केला आहे .

 कथा साधीच प्रेम झाले लग्न झाले मग अडचण कसली तर लग्न सासूच्या मनाविरुद्ध . मंगळीक असणारी ( हे खानदानी घराण्याच्या गुरुजींनी सांगितलेले ) सून म्हणून नाराजी.

मग व्यवसायात जुन्या जाणत्या लोकांनी केलेली फसवणूक , घरात अशांती मग काय आता हि सारी दुःख बुडवायला नायक क्लब मध्ये येऊन एकटाच ढोसत बसलाय आणि त्याच वेळी तिथे त्याची बालपणीची मैत्रीण ( जिला आपले लग्न नायकाशी व्हावे असे वाटत असत पण झालेले नसत ) तिथे अचानक (अवतरते ) येते.

मग अरे ,"असा का बरे स्वतःचा सर्वनाश करून घेतो आहेस ?" असं काकुळतीने विचारते . नायक आपल्या दुःखाचे मीटर किती हाय आहे हे सांगण्यासाठी प्रथम पेग भरतो आणि  मी काय सांगू असे म्हणत  मग काहीतरी बोलतो .

आणि त्यानंतर आपला म्हणजेच प्रेक्षकांचा ताबा खय्याम यांचे संगीत , त्याची पत्नी जगजीत कौर यांचा स्वर आणि शब्द रचना  साहिर या त्रयींकडून घेतला जातो.

या गाण्याचे सादरीकरण देखील इतके सुंदर केले आहे कि , सर्वसाधारण कथानक आणि दुःख व्यक्त करण्याचा पारंपरिक पद्धतीनुसार नायक त्याचे दुःख शब्दशः रिचवत  असूनही कॅमेरा प्रथम (निवेदिता )सहानायिकेच्या  नाजूक बोटांच्या वर येत पियानो वादनातील सहजता दाखवतो आणि तिथून थेट नायकाला प्रथम पाठमोरे दाखवत गीत सुरु होते.

अर्थात त्याला कारण आहे साहिर.....  सहनायिकेचे मनोगत मांडताना ती गीतांमधून नायकास विनंती करते ती खूप वेगळी आहे, तिच्या प्रेमाची जाणीव नायकास देताना ती म्हणते -

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो  
तुम्हे ग़म की कसम इस दिल की वीरानी मुझे दे दो .... 

जसे जसे सहानायिका आपले मनोगत मांडत जाते तसे गीतातील जीवघेणी विनंती आपले लक्ष वेधून घेते.
याठिकाणी मनोगत सहनायिकेचे असले तरी शब्दांची ताकद साहिरजींची आहे,. प्रत्यक्ष जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या प्रेमाचे वेगळ्याप्रकारचे अमृतानुभव पाठीशी असलेल्या या तरल कवीने आपलेच म्हणणे या सहानायिकेच्या तोंडी उतरवले आहे असे वाटते.

 गीतातील प्रत्येक कडव्यामध्ये नायकाकडे मागणी करताना ती काय काय मागते आहे ते पाहिले कि आपण जेंव्हा एखाद्यावर तरल प्रेम करणारी व्यक्ती कशाची मागणी करेल याचा नेम नाही त्यामळे  सहनायिका नायकाकडे  त्याची परेशानी,विरानी ,हैरानी मागतेच पण पुढे जात जर तुला समाज सतावत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याचे काम ( पाहरेदारी )निगेबानी , आणि शेवटी जर काही चुकीचे केल्याचे शल्य असेल तर ते म्हणजेच पशेमानी याची पण मागणी करते. म्हणजेच या ठिकाणी हे शब्द फक्त यमक आणि ताल जुळवण्यासाठी आलेत असे वाटतच नाही धन्य तो साहिर ..
.
इतक्या सुंदर रचनेला दिलेले खय्यामजींचे संगीत तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. हे गाणे त्यांनी पहाडी रागात बांधताना त्यांची हिमाचल आणि परिसर याच्याशी असलेली जवळीक सहज अधोरेखित केली आहे. एखाद्या उतुंग पर्वत रांगेत एखाद्या छोट्याश्या पठारावर एखादे शांत तळे आहे आणि एखाद्या निवांत संध्याकाळी त्या काठावर विचार मग्न अवस्थेत असताना त्या तळ्यात एखादा छोटासा दगड सहज भिरकावून दिल्यावर जसे तरंग उठतात तसे प्रत्येक कडव्यानंतर तिच्या भावना आपल्या मनात उतरतात असे वाटत राहते

या गीतासाठी त्यांनी निवडलेला आवाज इतका योग्य आहे कि पहाडी खर्ज आणि मार्दवता यांचा मिलाप असलेला हा आवाज त्यांच्या पत्नीचा आहे म्हणून नाही तर चपलख आहे म्हणून नितांत सुदर वाटतो आणि इतकी सुंदर रचना अशीच ऐकत राहावे असे वाटत असतानाच गीत संपून जाते मनात एक हुरहूर ठेवून
ती म्हणजे खरच सुंदर प्रेमाची प्रत्येक कहाणी अधुरीच असते का ?
ऐका एक  साहिर प्रेमाचे व्यक्त होणे -

Saturday, April 25, 2020

आओगे जब तुम ओ साजना

आयुष्यात प्रेम , ममता , आपुलकी सर्व काही गमावलेला एक तरुण, आर्थिक आघाडीवर भरपूर पैसे यश असूनही पराभूत आणि मनाच्या उद्विग्न अवस्थेत भरकटून सर्वस्व सोडून दिशाहीन जात असतो.

आणि जीवनावर भरभरून प्रेम करणारी एक अल्लड युवती, जिने तिच्या मनातल्या राजकुमाराशी लग्न  करून संसार थाटण्याचे नक्की केलेले असते आणि त्या  स्वप्नवत अवस्थेत आपल्या घरी जात असते.

आयुष्याच्या अशा अगदी  भिन्न मनस्थितीत ते दोघे जण एकमेकांना भेटतात. भेट एका रेल्वेच्या डब्यात झाली असल्याने रेल्वे  आणि ....... अर्थात जब वुई मेट या चित्रपटाची कथा पुढे सरकू लागते . एकूणच या चित्रपटाच्या कथेला वेग आहे . दोघांच्या आयुष्यातील  गतकाळ आणि भविष्य यांची सांगड घालत आपले अनुभव परस्परांना सांगत प्रवास पुढे चालू ठेवतात.

या अशा एका वेगवान कथानकात एका वळणावर  संपूर्ण चित्रपटाला कलाटणी देणाऱ्या क्षणी, कथानकात अतिशय सहज सामावून जाणारे हे गीत पडद्यावर इतक्या तरलतेने सुरु होते कि बस्स ....

उस्ताद रशीद खान यांनी ज्या ताकतीने पहिली आ आ आ  हि तान  घेतली आहे कि जणू त्या आर्ततेतूनच पुढील परिस्थिती काय असेल याचा अंदाज यावा.

पडद्यावर कॅमेरा पुढील दृश्यावर नेण्यासाठी या आलापी पाठोपाठ येणारे बासरीचे स्वर गीतातील आर्तता सुरवातीसच अधोरेखित करतात.


आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे .... हि रचना. हे गीत मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा त्यातून नवीन नवीन अर्थ उलगडतात असे मला नेहमीच वाटते.

नैना तेरे कजरारे हैं
नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने
वादे किए कई सारे हैं

या ओळी जेव्हा उस्तादजींच्या गळ्यातून उतरतात तेंव्हा का कोण जाणे पण सुमनजींनी गायलेल्या एका मराठी गाण्यातील या दोन ओळी मला सारख्या कानात गुंजत राहतात. ते गाणे आहे -- केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर ..., पण नैना तेरे कजरारे हैं या शब्दापाठोपाठ

गहिवरला  मेघ नभी,  सोडला ग धीर याच ओळी येतात आणि पराभूत प्रेमाची आर्तता  आणि मनोमन कोसळणे यांचा मिलाप होतो आहे असेच वाटत राहते



 काही गीत रचना अशा असतात कि प्रत्येक कडवे जीवनाचा नवा नवा अर्थ आपल्या समोर उलगडून, त्यातून जणू वेगवेगळ्या  भावनांच्या रेशीम लडीच आपल्यासमोर उलगडत असतात. आणि तरीही मन मात्र सारखे  गीताच्या ध्रुव पदाकडे धाव घेत राहते. त्यामुळे हे गीत ऐकताना मन सारखे -

बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे.... इकडेच धाव घेत राहते

आणि उस्ताद रशीद खान यांचे या गीताचे सादरीकरण देखील असेच आहे संपूर्ण गाणे जरी एक गायक गात  असला तरी, स्त्री मनाची घालमेल व्यक्त करणारी अगदी नाजूकातली नाजूक भावना  आवाजातील चढ उतारातून त्यांनी अलगद टिपली आहे. पण त्या ताना आलापी आपल्याला पुन्हा पुन्हा ध्रुव पदाकडे खेचत राहतात .

हि रचना ऐकताना नेहमी मला हे मनोगत जरी अगतिक प्रेमिकेचे असले तरी ती पराभूत वाटत नाही आणि या नाजूक स्थिती देखील आपले प्रेम नक्कीच यशस्वी होईल या आशावादावर ती जगते आहे  असे मला वाटते आणि त्यामुळेच शेवटी तिच्या ओठी शब्द येतात -
सपनों का जहाँ
होगा खिला खिला
बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे ...
तर मग डोळे मिटून शांतपणे एकदा ऐकुया -https://www.youtube.com/watch?v=WPwTPhFMm3k

Friday, April 24, 2020

बंदिवासातील रोजनिशी अर्थात लॉक डाउन डायरी -3

आजीच्या वडिलांच्या नावाचा शोध

जसा हा बंदिवासाचा काळ वाढत चाललाय तसा  वेळ कसा काढावा ? या जटील  प्रश्नांवर इतके उपाय आले कि काही विचारू नका. आवडीचे छंद जोपासा , वाचन करा ,जुनी नाटके बघा , संगीत ऐका , यासारखे अनेक. काहींनी काही प्रयोग केले देखील.
पण परत कंटाळा आला आणि व्हाट्स ऍप काही नवीन सांगताय का ? याच्या शोधात नाहीतर फेसबुक ते इंस्टाग्राम आहेच. या सर्वातून मला एक असा विचार सुचला कि , आपण -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान '  याचा शोध घ्यावा.

आता तुम्ही म्हणाल हे काय एखाद्या पी. एच डी च्या प्रबंधा  सारखा विषय मांडला आहे  अगदी खरे आहे पण या द्वारे आज मी तुम्हाला एक अवघड परंतु खूप दिवस पुरेल असा एक उपक्रम सांगत आहे . प्रयोग करून तर पहा. आता या विषयाचे महत्व समजावे म्हणून मी आपलयाला  प्रथम एक छोटासा प्रयोग करायला सांगतो.

घरातील शाळेत जात असणारा आणि सर्वात लहान सदस्य याची निवड करा आणि त्याला एक प्रश्न विचारायचा  ? तुझ्या आजीच्या वडिलांचे संपूर्ण नाव काय ? यात दादी ( वडिलांची आई ) किंवा नानी ( आईची आई ) कोणीही चालेल.

किती जण याचे अचूक उत्तर देतात पाहायचे . आता तुम्ही म्हणाल याचा आणि वर मांडलेल्या विषयाचा संबंधच काय ?

तर तो संबंध खूपच जवळचा आणि नाजूक आहे. एकत्र कुटुंब ते  चौकोनी कुटूंब पासून ते मी माझा किंवा मी माझी या व्याख्येत आलेले एक खांबी कुटुंब यात आपण अक्षरशः फरफटत तर नाही ना ? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत . आणि जे प्रश्न प्रथम कुटुंबाचे असतात तेच वाढत वाढत नंतर समाजाचे बनतात.
म्हणूनच आपण आपल्या कुटुंबाचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.

यासाठी सध्या तुम्ही उपलब्ध असलेला वेळ असा वापरा कि ज्यातून आपणच आपल्यासमोरून हरवत चाललेली माहिती  जतन  करून ठेवू शकाल. त्यासाठी काय करायचे तर एक माहितीचा तक्ता  तयार करू या. त्यात संपूर्ण नाव ,जन्मदिनांक , जन्म ठिकाण , नोकरी /व्यवसायाचे स्वरूप आणि कालावधी अशी प्राथमिक माहिती प्रथम पूर्ण करावी.
त्यानंतर घर ,शेती वाडी, जमीन जुमला याची माहिती घ्यावी. सदर मिळकत कशी वाढली किंवा कशी कमी झाली याची माहिती घ्यावी.. तुम्ही म्हणाल आज इतका खटाटोप करून काय साधणार ? तर इथेच -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान ' या विषयाची सांगड बसणार आहे कशी ते पहा.

आज तुमच्या घरातील सर्वात लहान सदस्याला त्याच्या पंजोबांचे संपूर्ण नाव  सांगता आले नाही तर तो त्याचा पराभव नसून आपला पराभव आहे असे समजून त्याकडे पाहणे जरुरीचे आहे . आपला आपल्या आधीच्या पिढीशी तुटत चाललेल्या संवादाचे ते प्रतीक आहे. आज निर्धार करणे जरुरीचे आहे कि, नाही हि माहिती मी मिळवीन . माझ्या मुला  बाळांना माझ्या कुटूंबाचे जे लागेबांधे आहेत त्याची माहिती देईन.
एकदा आपण हा निर्धार केलात कि त्याची सुरवात प्रथम घरात करा. घरातील जे जेष्ठ आहेत त्यांना वेळ द्या. सहज गप्पा मारत त्यांना बोलते करा . त्यांच्या धडपडीचा काळाची माहिती घ्या. यातून काय होईल तर त्यांना त्यांची दखल घेतल्याचा आनंद मिळेल. त्यांनी केलेल्या कष्टाची किंमत आपल्याला आज घर बसल्या समजेल. त्यांच्या आयुष्याच्या चढउतारांवरून त्यांच्या बरोबर तुम्हाला प्रवास करायला मिळेल
यातून तुम्ही जे तयार कराल ते असे पुस्तक असेल कि, काही प्राथमिक माहिती तुम्ही कुलवृत्तांत म्हणून जतन कराल पण त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतून तुम्हाला असे एखादे कथाबीज सापडेल कि त्याची गोष्ट होईल किंवा अगदी एखादे सनसनाटी कथानक होईल. कुणी सांगावे त्या वरून  एखादी चित्रपट कथा आज तुम्हाला नव्या वाटेवर उभे राहण्यास मदत करेल.
या प्रेरणेतून  -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान ' हा विषय तुम्ही काल  आज आणि येणाऱ्या पिढीसाठी म्हणून उद्या असा त्रिमिती मधून त्रिकालाबाधित म्हणून बघण्या इतके सक्षम व्हाल. कारण शेवटी समाज म्हणजे कोण तर आपण आणि आपले कुटूंबच ना !
तर मग आता आले ना लक्षात कि लॉक  डाउन  आज ना उद्या नक्कीच संपेल जीवनाचे रहाटगाडगे सुरु होईल.  पण तरीही मला आता वेळच पुरणार नाही कारण मला देखील माझ्या आजीच्या/आजोबांच्या  वडिलांचे संपूर्ण नाव नाही तर संपूर्ण कर्तृत्व जाणून घ्यायचे आहे

काय मग घेणार ना आपल्याच भोवती असून हि आपल्या पासून कोसो दूर चाललेल्या या कुटूंब विश्वाचा शोध.