Sunday, December 4, 2011

८८ हे काय वय होते का जायचे ?

सर्व साधारण आयुष्यमान,वाढते वयोमान विचारात घेतले तर याचे उत्तर होय असेच आहे.पण आज हा प्रश्न ज्यांच्या जाण्याचे संदर्भात विचारला गेला आहे त्यांच्या बाबत खरेतर हे काही जाण्याचे वय नव्हते हेच खरे.आपल्या सर्वांचे लाडके आणि अनेक तरुणींच्या मनातील'कॅटबरी चव' जिवंत ठेवणारे चॉकलेट हिरो देवानंद यांचे नुकतेच निधन झाले.त्यासंदर्भात मात्र नक्कीच त्यांचे जाण्याचे वय नक्कीच झाले नव्हते.आणि म्हणूनच ,मायबोलीकारांपैकी मित यांनी म्हटल्या प्रमाणे ८८ हे काय वय होते का जायचे ! हे अगदी भाव पूर्णतेने म्हटले आहे असे मनाला नक्की पटते.
खरच एखादी बातमी एखादी घटना इतकी त्रासदायक असते कि, आपले मन आपल्यालाच सतत विचारत राहते कि, असे का घडले? आणि हो हे आताच घडायला हवे होते का ? पण तरीही याबाबत एक त्रिकालाबाधित सत्य गदिमा त्यांच्या एका अजरामर काव्य रचनेत सांगून गेले आहेत ती ओळ इथे लागू होते ती म्हणजे ...'अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात'. आणि आत्ताच येवून धडकलेली हि बातमी अतर्क्य नसली तरी अकस्मात नक्कीच आहे.
पुण्यात माझे येणे कॉलेज शिक्षण संपल्यानंतर १९८० सालातील. जगण्याची धडपड सुरु करताना सुरवातीस केलेल्या नोकऱ्या देखील थोड्या रुटीनला सोडून.राहायला कोथरूड आणि नोकरी लक्ष्मी रस्त्यावर, दुपारचे दोन तीन तास कुठे काढायचे? हा त्या काळातील प्रश्न. बस प्रवासाचा खर्च दोनदा न परवडणारा. मग काय कधी अलका टॉकीज चौकातील रिगल किंवा डेक्कन वरील लकी हि वेळ काढण्याची ठिकाणे.त्यातील लकी हे सर्वाधिक आवडीचे ठिकाण  कारण देवानंद यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात आपला वेळ असाच लकी मध्ये चहा पीत काढला होता. पुढे लकीची आठवण ठेवत, देवानंद यांनी पुन्हा एकदा लकीला लकीली भेट पण दिल्याचे पुणेकरांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात असेल. आज लकीही नाही आणि देवानंद आपल्यात नाहीत, पण लकी आणि लकी पडण्यापूर्वी काही वर्षे तेथे असलेले देवानंद याचे हसमुख पोस्टर जसेच्या तसे डोळ्यासमोर आहे.
त्यांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने माझ्या श्री.शिरीष पिंगळे या मित्राने त्यांच्या कलागुणांचा यथोचित गौरव करणारा लेख एका इंग्रजी दैनिकात लिहल्याचे आजही स्मरणात आहे. आज चित्रपट सृष्टी आणि चित्रपट पाहणे यातील सुलभता पाहता आम्ही वयाच्या सतराव्या वर्षी पहिला चित्रपट पहिला हे वाक्य आज अनेकांना खरेही वाटणार नाही, पण हे सत्य आहे आणि सर्व प्रथम जिल्ह्याचे ठिकाणी जावून पाहिलेला माझा पहिला चित्रपट होता जॉनी मेरा नाम ... हि देव साहेबांची दुसरी आठवण.
पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले ! झुठाही सही.... असे म्हणत पुढे जीवन सुरु झाले. आयुष्यात प्रेम पुजारी होता आले नाही तरी प्रेम पुजारी या चित्रपटातील ...शोखीयोमे घोला जाये फुलोंका शबाब ह्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी आजही कणभरही कमी झालेली नाही. आज अमिताभ बच्चन किंवा अमीर , शाहरुख सलमान यांची कारकीर्द सुपरहिरो किंवा शतकातील नावाजलेले कलाकार म्हणून नोंदवली जाते, तरी अशी एक खांबी इमारत उभारण्याचे काम प्रथम देवजींनी केले. राज कपूर,दिलीपकुमार यांची छाप असलेला काळ असून देखील आपला वेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमटवणारे देवानंदजी कायमच लक्षात राहतील.
जर का मी आता जातोय असे सांगत निरोप घेण्याची इच्छा देवानंद यांनी व्यक्त केली असती तर त्यांचा प्रत्येक चाहता आजही म्हणाला असता कि ....अभी न जावो छोडकर कि दिल अभी भरा नही...
आणि आज  त्यांच्या पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीला नतमस्तक होत श्रद्धांजली वाहताना मन म्हणेल .... लेना होगा जनम तुम्हे कई कई बार

No comments:

Post a Comment