Thursday, March 10, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले- डायरीच्या नोंदीतून.भाग पाच.

डायरीतील नोंद -- असलेली
आमची आई तशी लवकरच वारली तिच्या मागे आमच्या थोरल्या बहिणीने आम्हा लहान भावंडांना आईचे प्रेम दिले.ती तर गावातच राहत होती.आमच्या सबंध घरादाराशी जवळीक राखून होती ती, तिची मुले एक बंडखोर,तर एक अबोल त्यागी तर एकाचा स्वभाव माझ्या मोठ्या मुला सारखा गूढ, त्यांचा जिव्हाळा.पावले आपोआप नकळत तिच्या घराकडे वळली.तीच घर तर मला परक नव्हतच. आई गेल्यावर एकाकी पोरकेपणावर तीनच फुंकर घालून दुखः हलक् केलेले. पण तिच्याशीही मोकळेपणे बोलावयाची चोरी. "जगावेगळा विक्षिप्तपणा" अशा शेलक्या शब्दात ती माझी संभावना करायला मागे पुढे पाहणारी नव्हती. जितकी प्रेमळ तितकीच शिस्तीची भोक्ती. ती रागावणे शक्य होते नव्हे तो तिचा हक्क होता. आणि मुख्य म्हणजे तिला हुकमत गाजवायची नसली तरी तिच्या प्रेमळ परंतु हुकमतीच्या शब्दापुढे मी पांगळा होतो. तिचे सामर्थ्य शब्दातले नसून त्यागातले, आपलेपणातले.भावाचे कल्याण व्हावे या शुद्ध हेतूतून निर्माण झालेले. मी अशावेळी काय करणार? मी एकटा आहे,निर्णयात कोणी सहभागी नाही तुझा तू एकट्याने घ्यावयाचा म्हणजे जबाबदारी अधिकच वाढलेली.त्यातून ती एक स्त्री. ती माझ्या पत्नीचीच बाजू घेणार,मग चक्क उरावर धोंडा ठेवून तथाकथित मोकळ्या वातावरणात हवापाण्याच्या गप्पा मारून,क्षेमकुशल विचारून,तिची मूर्ती भक्ती युक्त अंतकरणाने डोळ्यात साठवून निरोप घेतला.
जाये तू जाये कहां ? उपनगरातून नगरात आलो होतो. जावयाचेहि होते परंतु कोठे? याच नगरात बालपण गेले. त्याच्या खुणा ठायीठायी विखुरल्या होत्या.आज निर्जीव वास्तु देखील सजीव झाल्या सारख्या वाटत होत्या हितगुज करीत होत्या. कारण सर्वांपासून निरोप घेवून दूर जायचे होते. माझी शाळा असंख्य जुन्या आठवणी मनात डोकावत होत्या. या दगडमातीच्या वास्तुत हि शक्ती आली कोठून ? हसणारी फुले , वाऱ्याच्या झुळके बरोबर डोलणारी बाग उडणारे कारंजे क्रीडांगण, आईनंतर काही पवित्र संस्कार या शालामातेने माझ्यावर केले. आदर्शवादाची परंपरा जोपासली. “Factu non verba-"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" हे ध्येय वाक्य मिरवणारी हि माऊली कृती वीरांचा गौरव,तर वाचावीरांकडे पाहून हसत होती.बोल तू कोण? तिचा पुत्र म्हणवून घ्यावयास लायक आहेस ?
नाटकातला ट्रान्सफर सीन प्रमाणेंच,मी शिशुपणातून बालपणात केंव्हा प्रवेश केला,ते कळलेही नाही मात्र वातावरणात फरक जाणवणारा होता.कालचा राजा आजचा भिकारी, कालचा राजा आजचा गुलाम, कालचा अमीर आजचा फकीर,जमीन अस्मानचा फरक.
'गृहराज्यावर चिमणा राजा राज्य करी ,
आईची मृदुल कटी सिहासंन त्याचीया परी'
एखाद्या राज्यक्रांतीने सिहांसन उध्वस्थ व्हावे आगदी तसेच.आर्थिक आघाडीवर आमच्या वडिलांचा,सपशेल पराभव झाला होता व या पराभवाची हाय वडिलांआधी,माझ्या आईने खाल्ली. होते कसे? झाले कसे? हे दोन प्रश्न तिला सतावित होते. आणि इहलोकी हे प्रश्न सुटले नाहीत म्हणून कि काय तिने परलोकी धाव घेतली.
राजाच्या रंकाला, अमीराच्या फकिराला मग राजवाडा कुठला? हुमायुना तुझे स्थान दिल्लीत नाही. चाहु बाजूनी तुझी पारध होणार आहे. राजवाडा रिकामा करावाच लागणार आहे. कस्तुरीमृगाप्रमाणे या कस्तुरीचा सुगंध दश दिशात पसरो असेच आपले बाळ जन्मताना प्रत्येक पित्याचा आशीर्वाद आसतो.मात्र दैवे लाभला चिंतामणी तसे हे भाग्य लाखात एखाद्याचे वाट्याला येते. वडिलांचे आशीर्वाद पाठीशी घेवून जन्मग्राम सोडले आणि शिक्षणाकरींता पुणे गाठले.
डायरीतील नोंद-मला समजलेली –
वडील घराबाहेर पडले.कोथरूड येथून ते सर्वात प्रथम गणेशवाडी,डेक्कन जिमखाना येथे,माझ्या आत्याकडे गेले. आणि मग त्यांनी पुणे सोडले.घर सोडणे हा निर्णय मनी झाला.पण पुढील प्रवास नक्की केलेला नाही. या दोलायमान मनस्थितीत,त्यांनी वरील नोंद केली आहे.त्यामुळे ते आईच्या आठवणीने उदास होतात.आईच्या अकाली मृत्यूस कारणीभूत झालेली परिस्थिती,पुण्यात व्यतीत केले बालपण,त्यांच्या डोळ्यासमोरून सरकते.जीवनातील चढ उतार आणि प्राप्त परिस्थिती,याची सांगड घालताना ते ऐतिहासिक दाखले देतात.निर्णय अवघड असला,तरी पुढेच जावयाचे आहे,या मनाच्या खंबीरतेवर ते येतात,आणि त्यामुळे शाळा तिचे घोषवाक्य, शाळेने केलेले संस्कार यात देखील ते रममाण होतात. (क्रमशः)

No comments:

Post a Comment