Sunday, December 5, 2010

उचलले पेन लावले कागदाला ....

पूर्वी म्हणजे अगदी पूर्वी नाही ……फार तर तीस चाळीस वर्षांपूर्वी,मी तेंव्हा आजोळी राहत होतो तेंव्हाची गोष्ट. घरी दारी , शेती वाडीवर बोलणाऱ्या लोकांच्यात म्हणींचा वापर आगदी सहजतेने होत असे.माझी आजी देखील त्याला अपवाद नव्हती. आणि फक्त आजीच नाही आसपास राहणारे, कष्टकरी शेतकरी संपर्कात येणारा प्रत्येक जण आपले मत आपला विचार मांडताना समृद्ध भाषेचा वापर करीत असे.

आमच्या लहानपणी आम्ही तालुक्याचे गावी राहून शिकलो गावाचे नाव उरूण-इस्लामपूर ह्या गावाचे आणखी एक विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणची सर्व कार्यालये, म्हणजे तहसीलदार कार्यालय, गट विकास कार्यालय,पोलीस स्टेशन,कोर्ट हे उरूण -इस्लामपूर येथे आहे पण तालुक्याचे नाव मात्र आहे वाळवा तालुका.आणि मला वाटते कि तालुक्याचे गाव एका ठिकाणी आणि नाव एका ठिकाणी असे असणारा हा एकमेव तालुका असावा. थोडे विषयांतर झाले पण सांगण्याचा मुद्दा काय तर शेती प्रगत परिसरात राहताना भाषा जपण्याचे बाबत मात्र जुनी पिढी जागरूक होती. घरात जेवणाची वेळ झाली आणि आम्ही मित्र परिवारात भटकत( खरे तर उंडारत) असलो तर आजी मामास सांगे , जारे! "त्याला बोलवून आण" मग मामाने विचारले कि पण तो गेलाय कुठे तर आजी कधीही मी कोणत्या मित्राचे घरी असेन हे न सांगता मामास म्हणे 'चुकला पीर मशिदीत. कि,त्यानंतर मामा मला बोलवण्यासाठी माझ्या मित्राचे घरी हजर.त्या काळी महिनाअखेरीस शेजारी पाजारी तात्पुरती मदत मागणे हा नित्याचा प्रकार असे. पण ते काम आम्हा मुलांना सागितले कि,त्याचे खूप दडपण येत असे. असेच एकदा मला आजीने समोरच्या घरातून साखर आणण्यास जा म्हणून सांगितले आणि हातात वाटी दिली.मला ती वाटी हातात घेवून जाण्याची खूप लाज वाटत होती. मग मी ती वाटी मी चड्डीच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो ते पाहून,आजी म्हणाली,"जारे हातात घेवून-' ताकाला जाताना भांडे काय लपवतोस'?" माझी मात्र विकेट उडालेली ??? ? आणायची आहे साखर आणि आजी म्हणते ताकाला जाताना भांडे काय लपवतोस?

अर्थात घरी आणि परिसरात तेंव्हा अशा खूप सुंदर म्हणी किंवा सुविचार कानी पडत, गल्लीतील काही घरे हि खणात मोजली जाणारी ,खणखणीत होती. त्याची सर्व साधारण रचना सारखीच म्हणजे प्रथम अंगण, मग ओसरी, त्यापुढे सोपा नंतर माजघर ..
अशा घरांच्या तुळईवर खडूनी सुविचार लिहिण्याची प्रथा असे त्यातील --' यत्न तो देव जाणावा ' प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे 'हे नेहमी दिसणारे सुविचार तर काही ठिकाणी संस्कृत सुभाषिते लिहिलेली असत. एका ठिकाणी - 'उगीचच मध्ये बोलून अपमान करून घेवू नका.'अशी पुणेरी वळणाची पाटी पाहिल्याचे आठवते तर हेच एका ठिकाणी ' जाणत्या समोर आपले गुण सांगू नयेत, कारण तो ते स्वतःच जाणतो. मुर्खासमोर आपले गुण सांगू नयेत कारण त्याचा उपयोग नसतो. असे भले मोठे वाक्य लिहून तुम्ही गप्प बसणे हिताचे हे सांगितले होते.

आता माझ्या शाळे विषयी म्हणाल तर, शाळा तिची परंपरा आमच्या गुरुजनानांनी आम्ही घडण्यासाठी घेतलेले कष्ट यांचे महत्व त्या काळी पुरेसे उमगलेच नाही असे आता म्हणावे वाटते. कारण १९६७/६८ साली इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला तेंव्हा आमच्या शाळेचे सुवर्ण मोह्त्सवी वर्ष होते.आणि आमच्या शाळेतील मुख्याद्यापक श्री. सांगलीकर सर आणि त्यांचे अनेक सहकारी अक्षरशः दारोदार फिरून शाळेच्या भविष्यातील विविध प्रकल्पांचे पूर्तीसाठी निधी संकलन करीत होते.

त्या काळी त्यात त्यांना किती यश आले किंवा कसे यांची आकडेवारी कधीच समजली नाही पण समृद्ध विचारधन विद्यार्थ्यांना दिले पाहिजे हे जाणून तसा प्रयत्न आमच्या त्या शाळेने नक्कीच केला असे मी आज मनपूर्वक आणि खात्रीने सांगेन. या वाक्याची प्रचीती आपणास यावी यासाठी मी शाळेत असताना वार्षिक स्नेह संमेलनासाठी शाळेने बोलावलेले प्रमुख पाहुणे कोण होते यांची माझ्या आठवणीतली नावे तुम्हास सांगतो, त्यात होते श्री. गं.बा. सरदार, अँडमिरल आवटी , श्रीमती शांता शेळके, श्रीमती इंदिरा संत. आणि तरीही आणखी तीन नावे आता विस्मृतीत गेली आहेत.पण एक खात्री आहे कि पाहुणे कोण होते हे आठवत नसले तरी त्यांनी स्नेह संमेलनाचे निमित्ताने दिलेले विचारधन कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नक्कीच कोरलेले आहे. आजच्या संगणकीय जगताचे भाषेत सांगायचे झाले तर ते हार्ड डिस्कवर (नव्हे हार्ट डिस्कवर ) आहे.

त्या काळातील शिक्षक किंवा मास्तर यांना काय किंमत होती ते सांगायचे झाले तर माझे आजोबा श्री गणेश रघुनाथ कुलकर्णी हे बहे नावाच्या माझ्या आजोळचे गावी शाळेचे मुख्याद्यापक होते.त्यांना सर्वजण “बाबा मास्तर” म्हणत. त्यांचे निधन १९६४ साली झाले. आज पंचेचाळीस वर्षांनतर मी आजोळी गेलो तर,तेथील जुने जाणते लोक मला ओळखतात ते बाबा मास्तरांचा नातू म्हणून. त्यांची हि ओळख टिकली ती त्यांनी ज्ञान दानासाठी जे कष्ट त्याकाळी घेतले त्यामुळे.

आमच्या हि शाळेबाबत मला नेहमी असेच वाटत आले आहे कि, कदाचित आमच्या आधीच पन्नास वर्षे शाळेने त्या परिसरात असे अनेक विद्यार्थी घडवल्या मुळेच आमच्या कानावर समृद्ध भाषा पडत राहिली असेल का ? माहित नाही पण वयाचे भान न ठेवता जर आजी समोर कधी फुशारकी मारली तर मात्र आजी पटकन म्हणत असे तुझे हे नेहमीचेच आहे " उचलली जीभ लावली टाळूला "
पुढे जेंव्हा त्या म्हणीचा उलगडा झाला तेंव्हा पासून आपोआपच नको तेंव्हा नको ते इतरांना ऐकवण्याची सवय आपोआप मोडली. पण हि आठवण सांगण्यासाठी मात्र आज मी काय केले माहित आहे का ? नाही ना , काही नाही जेंव्हा हे सर्व आठवले तेंव्हा उचलले पेन आणि लावले कागदाला.

No comments:

Post a Comment