Friday, December 31, 2010

मन विश्वरंगी रंगले ........

मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने …
मन विश्वरंगी रंगले ........

मन हो रामरंगी रंगले ... ‘संगीत तुलसीदास’ या नाटकातील श्री गोविंद सदाशिव टेंबे यांचे पहाडी रागावर आधारित हे पद स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली रचना. या विषयी मी पुढे लिहणार आहेच. पण त्यातील "मन विश्वरंगी रंगले .... ही माझ्या ब्लॉगच्या नामकरणा मागील प्रेरणा . मनाच्या विचार तरंगातून उठणाऱ्या लहरी. ज्यावर उमटणार आहेत मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने …जिथे साकारणार आहेत शब्दचित्रे .वर लिहिलेला छोटासा परिच्छेद हि माझ्या ब्लॉग लिखाणाची सुरवात. त्यात मी ‘मन हो राम रंगी रंगले’…या रचनेविषयी पुढे लिहिणार आहे, असे म्हटले होते तर तेंव्हा पासून मनात घोळणाऱ्या चित्राचे हे शब्द चित्र.
एखादे गाणे डोक्यात जाते म्हणजे काय होते दिवस सुरु होतो.कुठे तरी दूरवर एखादी सुरावट थिरकत असते. कधी एखादा शब्द, तरी कधी एखादि धून कानात शिरते. शिरते मात्र आणि पुरा दिवस बदलून जातो. पंडित भिमसेनजींचा भक्ती रचना गाताना लागणारा आवाज हा माझा सर्वात प्रिय क्षण आहे. अर्थात पंडितजी म्हटले कि, भक्ती रचना आणि विठ्ठल गीते यांचे समीकरण इतके पक्के मनात असते कि, पंडितजी म्हणजे,'इंद्रायणी काठी.... किंवा पंडितजी म्हणजे,
'देह विठ्ठल तीर्थ विठ्ठल' ..... यांची आठवण प्रकर्षाने येते.
पण असे का घडते? मन सतत अशी ओढ घेत त्याच त्याच सुराववटींकडे धाव का घेते ? या भोवती माझी विचारांची गुंफण चालली होती. आणि मन,मना भोवतीच रुंजी घालू लागले. त्या दिवशी पण असेच काहीसे घडले. दूरवरून कानावर त्या ओळी पडल्या ...
मन हो राम रंगी रंगले.....
दिवसभर ते शब्द ती सुरावट यांनी पाठ सोडली नाही. सायंकाळी घरी आलो. आज बैठक मारून, निवांत आणि समजून घेवून हि रचना ऐकायची असे ठरवून गाणे ऐकले. गाणे ऐकले मात्र आणि मन अधिकच सैर भैर झाले कारण त्या गाण्यात होते एकूण फक्त सतरा शब्द .पहा ना तो अभंग असा आहे.
मन हो राम रंगी रंगले
आत्मरंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले
चरणी नेत्र गुंतले
भृंग अंबूजातले
भवतरंगी रंगले ....
पण किती मोठा आणि गर्भित अर्थ उलगडून दाखवण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. खरच एकदम मला, मन आणि त्याचे विविध पदर यांची मालिका व असे अनेक विचारांचे कल्लोळ यांनी चक्रावून टाकले. मन आकार हीन आहे अशरीरेय आहे, असा एक मत प्रवाह आहे तर मन हे अव्यक्त शरीर आहे असा एक प्रवाह आहे. मनाचे एकूण तीन स्तर मानले तर ते पुढील तीन प्रकारात मोडतात असे मानले जाते. पहिला मनाचा स्तर म्हणजे बाह्यमन , दुसरा स्तर म्हणजे अंतर्मन , आणि तिसरा म्हणजे वैश्विक मन होय. राम म्हणजे माझ्या दृष्टीने कोणी व्यक्ती अथवा दैवी शक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. आणि म्हणून ती चराचर व्यापून राहीली आहे. जर माणसाचे एखाद्या गोष्टीतील स्वारस्य संपले कि तो पटकन म्हणतो, यात काही राम नाही. आणि जेंव्हा एखादी अशक्यप्राय,अवघड गोष्ट देखील करण्याची इच्छा तीव्र झाली कि, त्याची सुरवात करताना जय राम , श्रीराम, जय रामजी कि असे म्हणत सहजतेने केली जाते.जुन्या परंपरेतील बायका स्वयंपाकात फोडणी टाकून पदार्थ करण्यास सुरु करताना 'श्रीराम' म्हणून सुरवात करताना आम्ही लहानपणी अनुभवले आहे. हे सर्व म्हणजेच परिसराकडे बघण्याची माणसाची मनोवृत्ती होय. म्हणजेज आपले बाह्यमन होय.
मनोवृत्ती निरक्षण परिसराचे करते.त्यातून स्वतः नियोजन केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी मी कायकेले पाहिजे हा प्रश्न माणूस स्व संवादातून मनास विचारतो. त्याचे उत्तर म्हणजे मेंदूने परिसराचे आकलन करून शरीरास कार्यरत होण्यासाठी दिलेली प्रेरणा होय. आणि म्हणून स्वयं प्रेरणेने केलेले काम कितीही कष्टप्रद असले तरी त्याच्या पुर्तातेतून आनंदच मिळतो. हि अन्तः प्रेरणा कार्यरत करण्याची प्रक्रिया ज्यातून निर्माण होते ते आपले अंतर्मन होय.
मग जर बाह्यमन आणि अंतर्मन हि दोन प्रेरणा स्थाने आहेत तर मग आता तिसऱ्या शक्तीची दखल का म्हणून घ्यायची. तर इथे सुरु होते वैश्विक मनाची संकल्पना. म्हणजे परिसर आणि आपण याचा दुवा बनलेले अवकाश आणि त्यातील घडामोडी यांचा कार्यकारण भाव लावताना होणारी मनाची अवस्था म्हणजे वैश्विक मन होय. हे असे का ? या प्रश्नास शास्त्रीय आधारावर उत्तरे आहेत. शास्त्रज्ञ त्याची उत्तरे देतात. ग्रह, परग्रह पृथ्वीची गतिशीलता यांच्या कार्यकारण भावाचा शोध घेण्यासाठी कोपर्निकस, गॅलिलिओ , यांच्या पासून ते अलीकडील डॉ. जयंत नारळीकर, स्टीफन हॉकिंग यांची संसोधाने पाहिली तर आजही हे असे का ? या प्रश्नाचे उत्तरात ज्ञातापेक्षा अज्ञाताचा हिस्सा अजूनहि अधिक आहे.अभ्यासातून लागलेल्या शोधांपेक्षा अपघाताने लागलेले शोध अधिक आहेत. इथे विश्वाच्या पसाऱ्यातील माणूस नगण्य का माणसाच्या अंतरंगातील विश्वाचा पसारा अगम्य हा माझ्या समोर असलेला प्रश्न आहे.त्यावर विचार करताना मन जिथे फिरते तो भव ताल. कदाचित भोवताली काय घडतेय ते जरा उघड्या डोळ्यांनी पाहण्यास शिका. या आपल्या आधीच्या पिढीतील करारी बापाच्या तोंडी असणाऱ्या वाक्यातील भोवताल हा या भव तालातूनच आला असेल का ? असा जेंव्हा मला प्रश्न पडतो तेंव्हा माझे मन खरोखरच भव तरंगात रंगलेले असते.
अशा अनेक विषयांवर स्वतःशी बोलत विचारांची साखळी मन जेंव्हा गुंफू लागते तेंव्हा खरोखरच मनाची अवस्था मन विश्वरंगी रंगले अशी होते. विचारांची शब्द चित्रे साकारू लागतात.कधी कधी ती मनाच्या कँनव्हासवरील रेखाटने ठरतात , तर कधी फुलात लपलेल्या भुंग्या सारखी अडकून पडतात.
माझ्या ब्लॉगवरील सर्वात पाहिली नोंद लिहताना मनात हीच भावना होती. विचार अनेक दिवस घोळत होते. शब्द रूप आज दिले. या बरोबरच संपणाऱ्या या वर्षास निरोप देत व सर्व ब्लॉग वाचकांना येणाऱ्या नाव वर्षाच्या शुभेच्छा देत या वर्षीचे माझे ब्लॉग लिखाण आटोपते घेतो.

No comments:

Post a Comment