Wednesday, October 6, 2010

शब्दांवाचून कळेल का सारे शब्दांच्या पलीकडले ?

नुकताच मागील महिन्यात मी ब्लॉग सुरु केला आहे.लवकरच तो 'मराठी ब्लॉग विश्व' च्या मुळ प्रवाहात सामील होईल.अद्याप तो वाचता झालेला नाही,पण खात्री आहे थोड्या दिवसातच तो सर्वांपर्यंत पोहचेल. आता वाटले पुढील लिखाण ज्याच्या मदतीने मी आपणा पर्यंत पोहचवणार आहे त्यावरच लिहावे. मला काही सांगायचय! असे म्हणताना ज्याचा आधार घेतल्याशिवाय विचारांची देवाण घेवाण पुरीच होत नाही त्याविषयी लिहावे, ते म्हणजे शब्द.

भाषा व त्या अनुषंगाने विचार करावयाचा झाला तर भावनांना अचूक रस्ता दाखवण्याचे काम जे शब्द करतात त्यांना आपण माध्यम म्हणतो. आणि भावना अचूकतेने मांडता आल्या तर त्यास आपण वैचारिक देवाणघेवाण म्हणतो. आणि भावना अचूकतेने मांडल्या तर त्यात वैचारिक स्पष्टता दिसते. माणूस प्राथमिक विचार किंवा स्वसंवाद नेहमीच मातृभाषेतूनच करतो पण उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मातृ भाषेतूनच देत असतो. त्या संदर्भातील बिरबलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहेच पण ती मी ओघात पुन्हा एकदा मांडतो.

एकदा अकबराच्या दरबारात एक भाषा पंडित येतो त्याने 'केल्याने देशाटन ' ....या उक्तीस उनुसरून देशोदेशी फिरून ज्ञान कीर्ती व अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलेले असते. हा भाषा पंडित अकबराचे सभेत सांगतो कि मला अरेबिक,पर्शियन संस्कृत, हिंदी मराठी या सारख्या एकूण सोळा भाषा व त्याही अस्खलितपणे बोलता येतात. माझे या नवरत्नांनी भरलेल्या जाणकारांच्या सभेस असे आव्हान आहे कि त्यांनी माझी मातृभाषा कोणती हे अचूकपणे ओळखावे. त्यावर अकबर बादशाह वादविवादास परवानगी देतो. अनेक भाषा तज्ञ आपआपल्यापरीने चर्चेत वादविवादात भाग घेतात पण त्या पंडिताची भाषा ओळखण्यात असमर्थ ठरतात. त्यावर अखेरीस बादशाह सभेस आवाहन करतो कि जो कोणी या पंडित महाशयांची मातृभाषा अचूक ओळखेल त्यास ५००० सुवर्ण मुद्रा बक्षिस देण्यात येतील.

या घोषणे नंतर बिरबल बादशहास म्हणतो, महाराज माझी यास तयारी आहे पण त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे आज रात्री भोजन आणि मुक्कामासाठी या पंडित महाशयांनी मजकडे आले पाहिजे. त्यास पंडित महाशयांनी होकार दिल्यावर त्यादिवशीची सभा संपते.

दुसरे दिवशी सभेत बिरबल त्या पंडित महाशायांसह येतो व अकबर बादशहास सांगतो कि यांची मातृभाषा अरेबिक आहे. त्यावर ते पंडित महाराज ते मान्य करतात कि होय माझी मातृभाषा अरेबीकच आहे. त्यावर बादशाह बिरबलास शाबासकी व बक्षीस देतो व विचारतो तेंव्हा बिरबल सांगतो.काही नाही महाराज मी घरी गेल्यावर महाराजांबरोबर हवा पाण्याच्याच गप्पा मारल्या व आम्ही झोपून गेलो. नंतर पंडित गाढ झोपी गेल्यावर मी त्यांच्या अंगावर थंडगार पाण्याची घागर ओतली त्यावर पंडित महाराज दचकून उठत ओरडले. अरे अरे कोण आहे ?कोण आहे ? आणि ते शब्द बाहेर पडताना ते शुद्ध अरेबिक मधीलच होते. माझे काम झाले होते मी त्याची क्षमा मागून रात्री झोपी गेलो मला माझे उत्तर मिळाले होते. हि गोष्ट काय सांगते कि..मनाच्या आत असणारी उर्मी शब्दबद्ध होताना ती मातृभाषेतूनच होते. आणि हि उर्मी सर्वार्थाने स्पष्ट करण्यासाठी गरज असते मातृभाषेची. आणि म्हणूनच जागतिक कीर्तीचे असंख्य शिक्षण तज्ञ देखील मान्य करतात कि विद्यार्थ्याचे किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. हे विचार आणि वरील गोष्ट पाहता आज मी माझे विचार शब्दबद्ध करीत आहे ते हे सांगण्यासाठी कि शब्द म्हणजे काय?

शब्द .. काय आणि किती म्हणून लिहणार?

शब्द .... मनातील भावना कागदावर उतरवण्यासाठीचे माध्यम.

मनातील विचार अचूक मांडण्याचे काम शब्द करतात. आता आपण या वाक्यावरच थांबून फेरविचार करूयात खरच मनातील प्रत्येक भावनेस शब्दरूप देता येते का? मला वाटते याचे उत्तर आहे हो आणि नाही दोन्हीही. जर तुम्हास मनाची सृजनशीलता असेल तर करू शकाल तुम्ही तुमच्या भावना शब्द बद्ध मग तुमचे बोलणे ठरेल अविस्मरणीय. पण जर तुमच्याकडे सृजनशीलताच नसेल तर तुमच्या तोंडून निघाणारे शब्द ठरतील बाष्कळ/ बाष्फळ बडबड.

शब्द म्हणजे कवी मनास पडलेले एक स्वप्नच म्हणा हवेतर. त्यामुळे कोणी म्हणते...

शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना

आवरू किती गडे धीर नाही लोचना ....

तर कोणी म्हणते ...

शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले

प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले...

पण या खेरीज मला सर्वार्थाने भावलेली रचना आहे

शब्द शब्द जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी ....

अर्थात या गीताबाबत एक गंमत अशी आहे कि हे गाणे प्रथम ऐकल्यापासून पुढे खूप दिवस मी ते एका चुकीच्या शब्दासह मनात कोरून ठेवले होते ते असे..

शब्द शस्त्र जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी .... आणि मला असे वाटत होते कि मराठीत एक सुविचार आहे कि 'शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा' आणि या संकल्पनेवरूनच हे गीत साकारलेले आहे.पण पुढे त्या गीताच्या ओळी जेंव्हा वाचण्यात आल्या आणि समजले कि, शब्द शस्त्र असे नाही तर शब्द शब्द जपून ठेव असे कवीस म्हणायचे आहे. आणि त्यावर अंतर्मुख होवून विचार करू लागल्यावर असे जाणवले कि बकुल फुलाची नाजूकता आणि नजाकत ज्यास भावली आहे त्यालाच शब्द शब्द जपून ठेवण्याच्या विनंती मागची कळकळ समजेल.

बरेचदा तोंडून गेलेला शब्द हा धनुष्यातून सुटलेला बाण असून तो गेला कि गेला. म्हणून एकदा गेलेला शब्द परत परत घेता येत नाही हे वाक्य दृढ झालेअसावे. पण मला वाटते कि शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा हा विचार भारतीयांपेक्षा ऑस्ट्रेलियातील लोकांना जास्त लागू होतो कारण त्या ठिकाणी चुकीचे शब्द वापरणे म्हणजे आपल्याच शब्दाचे 'बूमरँग' होणे होय. कारण आपलाच शब्द आपल्यावर कधी उलटेल हेच सांगता येत नाही.

आपल्याला संवादासाठी शब्द लागतो हे जरी खरे असले तरी 'मौनम् सर्वार्थ साधनंम' हे सुभाषित मात्र खूप बोलके ठरते. त्यामुळे चर्चेत भाग घ्यायचा आणि अचूक ठिकाणी गप्प बसायचे याला लोक धोरणीपणा म्हणतात. त्या कृतीवर शेरा मारताना त्याचे गप्प राहणे किंवा मौन खूपच बोलके होते असे म्हणतात. याउलट चुकीच्या वेळी चर्चेत गप्प राहणाऱ्यास नंतर त्यावेळी बोलायला तुझे तोंड शिवले होते का? या प्रश्नास सामोरे जावे लागते. एकूण काय तर इंग्लिश मधील 'Reading between the lines ' काय किंवा हिंदीतील 'समझनेवालोंको इशारा काफी होता हैं !' काय किंवा आपल्या मराठीतील ' शब्दावाचून कळले मजला शब्दांच्या पलीकडले ' काय हे सर्व संदर्भ हेच दर्शवतात कि शब्द तोच पण त्याच्या छटा अनेक आहेत. त्यामुळे शब्दातून मिळणारी माहिती हि शब्दछटा, शब्दार्थ, शब्दरूप, शब्द्छेद, यानुसार भिन्न ठरतात.

संवादाचे राहू दे पण भांडणाचे प्रकार सुद्धा प्रत्येक शब्दसमूह वेगवेगळ्या प्रकारे नमूद करतो. त्यामुळे शब्दाने शब्द वाढला,शाब्दिक चकमक झाली, वाद झाला, खटका उडाला, विषय हातघाईवर आला, डोकी फुटली इथपासून ते रणकंदन माजले इथपर्यंत विसंवादाची नोंद जावून पोहचते.

एखाद्याने काही वचन दिले, भविष्यात मदत करण्याची हमी दिली, मदतीची ग्वाही दिली तर आपण म्हणतो कि काही काळजी करू नका त्यांनी शब्द दिलाय. पुढे जर तो मनुष्य म्हटल्या प्रमाणे वागला तर आपण म्हणतो त्याने शब्द पाळला. पुढे वचनभंग केला, मदत नाकारली, तर आपण म्हणतो शब्द फिरवला.

शब्द समूह आणि त्याचा वापर करताना आपली जागरूकता कशी असते त्याचे उदाहरण म्हणजे एक दोघांपेक्षा जास्त एकत्र आलेल्या गटातील समूहाचे वर्णन करताना समूह माणसांचा असेल तर घोळका, पक्षांचा असेल तर थवा, गायी म्हशी असतील तर कळप, उंटांचा असेल तर जथा, असे भिन्न भिन्न शब्द समूह आपण वापरतो.

त्या पलीकडे जावून काही भावनांना आपण खरेच शब्दरूप देवू शकतो का ? हा मला खरा सतावणारा प्रश्न आहे. मानवी स्वभाव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेण्याचा आहे. हे जरी कितीही खरे मानले तरीही सगळेच शब्दातून सांगणे प्रत्येकास जमतेच असे नाही. म्हणूनच काही वेळेस परस्पर विरोधी संकल्पना वापरीत परिस्थितीचे वर्णन करण्याकडे माणसांचा कल असतो. त्यातून तयार होतात पुढील संकल्पना . बोलके मौन. भिजलेला पाऊस. जळणारे उन. अंधारी रात्र. लख्ख उजेड. तर काही संकल्पना शब्दात कशा उतरवाव्यात हे प्रश्न सुटतच नाहीत. उदा. तापलेल्या जमिनीवर कोसळलेल्या पहिल्या पावसाने निर्माण केलेला वास. अचानक अप्रिय घटना घडल्यावर पाठीच्या मणक्यातून थेट मस्तकापर्यंत गेलेली सणक. मला वाटते म्हणूनच अत्यानंद, अति तीव्र दुखः, पराकोटीची कृतज्ञता यावर भाष्य करताना आपल्या तोंडी शब्द येतात ....' हे सांगायला माझ्यापाशी शब्दच नाहीत' म्हणजेच पुन्हा एकदा आपण अव्यक्त शब्दानेच व्यक्त होतो नाही का ?

तर कसा वाटला हा माझा शब्द सोहळा. आपल्या प्रतिक्रिया शब्दांकित करावयासाठी मी निशब्द होवून वाट पाहत शब्दशः इथेच थांबतो....

No comments:

Post a Comment