Monday, October 11, 2010

अशीच एक सायंकाळ !

एक शहर थोडे वाढलेले. थोडे पसरलेले. नात्याचे गुंते फुललेले,
कधी नदी काठी,कधी किल्यापाठी,
कधी बाईक वरील लाँग राईड,
कधी गावाबाहेरील रस्त्यावरून चालतच पकडलेली एक साइड.
अशाच जातात अनेक संध्याकाळी.
माहित नसते पुढे काय लिहलेय भाळी.
त्या दिवशी एका संध्याकाळी हवेत असाच थोडा गारवा थोडी शिरशिरी.
रोजचा रस्ता रोजची वाट,
पण तिने माळली नाही नेत्र् कटाक्षातून ओसंडणारी हसरी वहिवाट.

तिला विचारले काय झाले तर म्हणते सारे संपले
खूप बोललो मनातून हललो. पण उत्तरादाखल मौनच बोलले.

ती संध्याकाळ खूपच लांबली जणू उन्हे परतायची थांबली
मला आठवल्या सगळ्याच संध्याकाळी
माहित नव्हते हेच आहे कपाळी.

आता सुद्धा संध्याकाळ होते
मनात एक कविता रेंगाळते ...

तीच हि कविता ...अशीच एक सायंकाळ !

कोणी म्हणते संध्याकाळ,
कोणी वदे कातरवेळ !

कोणासाठी बटाटेवडे, भेळ
कोणासाठी नाटक सिनेमाचा मेळ!

कुठे प्रश्न कसा काढू तुझ्यासाठी वेळ
जमत नाही कशाचाच ताळमेळ!

खरे तर सारे शब्दांचे खेळ ....
सूर्य कलतो,मन ढळते

रात्र मागे,प्रश्न सोडते
कदाचित उद्या,मिळेल उत्तर

प्रश्न नाही सुटला,तरी बेहत्तर !

सायंकाळी पुन्हा भेटेन
शिरशिरीत देखील पुन्हा पेटेन..

जळून जाता होईन खाक
मज सहवासाची लाज राख...

फिनिक्स पुन्हा धडपडून उडेल
पंखांची फडफड मनाला भिडेल

उद्या पुन्हा दिवस उगवेल
प्रश्नाचे नवे रान माजवेल..

रान तू सहज करशील पार
पण कातरवेळी पाऊल अडेल...
समोरचा पूल कोसळून पडेल

एक किनारा माझा एक किनारा तुझा
आणि मधला प्रवाह झपूर्झा ......

No comments:

Post a Comment